Tuesday, March 31, 2020

मलाआवडलेलीशॉर्टफिल्म

मलाआवडलेलीशॉर्टफिल्म
 
      सध्या रिटायर्ड असल्यामुळे सतत काही ना काही नाविन्याचा धांडोळा घेणे चालू असते. परवा असंच यु ट्यूब वर मराठी नाटकसिनेमाचा शोध चालू असताना एक लघुपट नजरेसमोर आला त्याचे शीर्षक होते...
"आबा ऐकताय ना.. "
 यातल्या प्रमुख कलाकाराचे नाव वाचूनच तो बघायचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त "आबा ऐकताय ना" या 28 मिनिटाच्या लघुपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केले आहे.त्यातील आबा अर्थात आजोबांची भूमिका साकारली आहे जेष्ठ कलाकार अरुण नलावडे यांनी!
   ही कथा आहे आबा या आजोबांची... आबांच्या वृद्धापकाळचे विलक्षण असे चित्रण यात आहे.अरुण नलावडे यांनी अगदी सूक्ष्म बारकाव्यांसह आबा हे आजोबा रंगवले आहेत. वृध्दपणीच्या विविध जाणिवा त्यांनी आपल्या समर्थ अभिनयाने अधोरेखित केल्या आहेत.
   एक परिपूर्ण असे जीवन जगलेले आबा आपले निवृत्तीनंतरचे जीवन अत्यंत समाधानाने व्यतीत करत असतात.जेष्ठ नागरिकांच्या हास्य क्लबात जाऊन ते रमत असतात. वयपरत्वे त्यांची श्रवणशक्ती कमी कमी व्हायला लागते.आपल्या वृध्द्व सहकाऱ्यांची सुखदु:खे ते जवळून पहात असतात.आबांची सून आणि मुलगा त्यांची खूप छान काळजी घेतात याचा त्यांच्या इत्तर मित्र मंडळींना हेवा वाटत असतो.त्यांचा वाढता बहिरेपणा त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यासाठी श्रवणयंत्र घेतले जाते.
      श्रवणयंत्र वापरायला सुरुवात केल्यानंतर  जीवनातले अनेक हरवलेले आवाज त्यांना ऐकू यायला लागतात.नुसत्या नजरेने अनुभवणे अशक्य असलेल्या  छोट्या छोटया गोष्टीतून निर्माण होणारे सुंदर ध्वनी अनुभवून आबा  अगदी लहान मुलासारखे हरकून जातात.
     घड्याळाची टिकटिक,देवघरातल्या घंटीचा आवाज, नातवाच्या खेळण्यातल्या मोटारीचा आवाज, पावसाची तडतड, स्वयंपाक घरातले विविध आवाज ऐकून आबांना "सुख सुख म्हणजे हेच!" याचा साक्षात्कार होतो.
हां धनींचा जादुई जगताची सफर करत असतानाच अचानक त्यांना घरातल्या मोलकरणीच्या आबांच्याबद्दलच्या तक्रारी, वकील असलेल्या सुनबाईच्या क्लायंटच्या केसेसवरची चर्चा.त्यातच त्यांच्या जावई आणि मुलीच्या घटस्फोटाबद्दलची मुलगा आणि सुनेच्या बेडरूममधली अस्पष्ट चर्चा त्यांना ऐकू येते. त्यांनी घाईत विकलेला प्लॉटच्या व्यवहारावर नाराज असलेल्या सून आणि मुलातली चर्चा अशा नको असलेल्या चर्चा त्यांच्या कानावर येते आणि आपल्या सुखी जीवनाबद्दल अत्यंत समाधानी असल्याच्या विश्वासाला धक्का बसतो. जर श्रवणयंत्र बसवलेच नसते तर या सगळ्या गोष्टींच्या अज्ञानात आपण सुखी असतो या वास्तव जाणीवेने ते आपल्या श्रवणयंत्राची बॅटरी काढून फेकून देतात. संपूर्ण लघुपटाला अरुण नलावडे यांच्या आवाजातील काव्यत्म स्वगताने एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. प्रत्येकाने त्यातल्या त्यात जेष्ठ लोकांनी जरूर पाहावा असा हा लघुपट आहे. जरूर पहा...
"आबा ऐकताय ना... "
.... प्रल्हाद दुधाळ.
  9423012020

Wednesday, March 11, 2020

सोशल मीडिया... एक व्यसन.

सोशल मीडिया... एक व्यसन.
     आपल्या जीवनात सोशल मिडीयाने चंचूप्रवेश केला आणि थोडा थोडा वापर वाढत वाढत आता नकळत आपण त्याचे गुलाम झालो आहोत. सदासर्वकाळ फेसबुक, व्हाटसअप, ट्विटर, इंस्टाग्राम सारख्या समाजमाध्यमावर अनेकजण पडीक असल्याचं दिसतं आहे. सोशल मीडियाच्या अतिवापराचे अनेक मनोकायिक दुष्परिणाम माणसाच्या आयुष्यावर दिसू लागले आहेत.यातून अनेक मानसिक आजार वाढत चालंले आहेत. यातून संपूर्णपणे बाहेर पडणे जवळ जवळ अशक्य आहे;पण त्यांच्या वापराबाबत स्वतःवर काही बंधने घालून घेतली तर या व्यसनाचा अतिरेक नक्कीच आपण थोपवू शकतो
1.दिवसातले काही ठराविक तास( फार फार तर एक दोन तास) या कारणासाठी देण्याची मर्यादा स्वतःवर घालून त्या वेळेचे काटेकोर पालन करणे.
2.आठवड्यात एक दिवस सोशल मीडिया फास्ट म्हणजे त्या दिवशी काही झाले तरी या मीडियापासून लांब राहणे.
3.मोबाईल ऐवजी दुसरा एखादा आवडता छंद जोपासणे.
4.मोबाईल आपल्या हाताशी न ठेवता थोडा दूर ठेवणे व तो हातात घेण्याचा मोह जाणीवपूर्वक टाळणे.
5.अती वापराचे हे व्यसन सोडवण्यासाठी योग्य त्या समुपदेशकाचे मार्गदर्शन व उपचार घेणे.
 थोडक्यात सोशल मीडियाच्या या व्यसनाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी स्वयंशिस्त हा एकमेव उपाय आहे असे मला वाटते....
--- (c)प्रल्हाद दुधाळ 9423012020.

Thursday, February 27, 2020

मराठीराजभाषादिन

#मराठीराजभाषादिन

     आज 27फेब्रुवारी,मराठी साहित्याचा मानदंड  वि. वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस! हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून जगभरातले मराठी बांधव साजरा करतात.या निमित्ताने मराठी भाषेचे गोडवे गायले जातात.विविध साहित्यिक उपक्रम राबवले जातात.फेसबुक व्हाट्सअँप सारख्या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या घेतल्या जातात.अभिमानाने मराठी भाषेचा जागर केला जातो.
लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी.
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी.
धर्म, पंथ, जात एक, जाणतो मराठी.
एवढ्या जगात माय मानतो मराठी.
  कथा कविता कादंबऱ्या अशा साहित्याने समृद्ध असलेली मायमराठी आपली मातृभाषा आहे याचा प्रत्येक मराठी बांधवाला सार्थ अभिमान आहे आणि तो असायलाही हवा;पण हा अभिमान आजकाल फक्त 27फेब्रुवारी आणि 1मे या दोनच दिवशी प्रकर्षाने आढळतो.एरवी मात्र महाराष्ट्रातील विशेषतः शहरांत  मातृभाषा मराठी असूनही बऱ्याचदा दोन मराठी माणसे एकमेकांशी हिंदी वा इंग्रजी भाषेत संवाद साधताना दिसतात.मराठी शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होते आहे.मराठीत शिकण्याचा,  बोलण्याचा,लिहिण्याचा लोकांना कमीपणा वाटायला लागला आहे.
       हे खरे आहे की जागतिकीकरणाच्या धबडग्यात सर्वमान्य इंग्रजी भाषेचे महत्व  वाढले आहे.एक परिपूर्ण ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीला असे महत्व असणे साहजिकही आहे;पण 'आम्ही इंग्रजी माध्यमातून शिकतो आहोत यामुळे मराठी मुळीच नको' ही भावना मराठी भाषेला मारक ठरते आहे.व्यवहार भाषा म्हणून इंग्रजीचा अंगीकार करतानाच आपल्या मुलांनी आपली मातृभाषाही शिकायला हवी हा आग्रह मराठी पालकांनी धरायला काय हरकत आहे?
   फक्त मराठी माध्यमातूनच शिकावे असा  आग्रह आजच्या काळात जसा दुराग्रह आहे तसाच 'मराठ' हा विषयच  अभ्यासात नको असा अट्टाहासही मायमराठी भाषेसाठी प्रचंड मारक आहे!
      आजच्या स्पर्धेच्या युगात टिकाव लागण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने इंग्रजी शिकायलाच हवी कारण ती सध्याची जागतिक मान्यतेची व्यवहारभाषा आहे;पण त्याबरोबरच प्रत्येकाने आपली मातृभाषा  मराठीही शिकायला हवी, आवर्जून लिहायला हवी आणि बोलायलाही हवी.मराठी अस्मिता,  मराठी संस्कृती, मराठी साहित्याचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे जाण्यासाठी जाणीवपूर्वक
मराठी भाषा संवर्धनाचे काम घराघरात व्हायला हवे. थोडक्यात...
  स्तुती मराठीची भाषेच्या या दिनी
  एरवी मराठी भासे दीनवाणी.
  आजकाल लाज आईच्या भाषेची
  आवडते बोली सदा इंग्रजीची.
  परक्या भाषेत मिळवावे ज्ञान
   माय मराठीचे ठेवू परी भान.
   मराठी आपुली ओळख मातीची
   आठवावी भाषा बोबड्या बोलीची.
   बोलावे हसावे गावे मराठीत
   मराठी माणसा बोल मराठीत.

       चला आजच्या मराठी भाषा दिनी शपथ घेऊ...
      मराठी लिहू,मराठी वाचू,मराठी बोलू!
    ......  प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

Friday, January 31, 2020

स्वेच्छा सेवानिवृत्ती. एक संदेश

भारत संचार निगम लिमिटेड या माझ्या कंपनीतून आज 31 जानेवारी 2020 रोजी हजारो कर्मचारी व अधिकारी स्वेच्छानिवृत्त होत आहेत त्यांच्यासाठी एक संदेश
.....प्रल्हाद दुधाळ पुणे.

नमस्कार मित्र मंडळी,
   आज आपल्या जीवनातल्या एका अत्यंत  महत्वपूर्ण अशा टप्प्यावर उभ्या असलेल्या सर्व  सहकर्मचारी व अधिकारी बंधू भगिनींना स्वेच्छानिवृत्ती नंतरच्या मुक्त आनंदी पर्वासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
   मित्रहो उद्यापासून इतकी वर्षें अंगवळणी पडलेल्या दिनक्रमात बदल होणार आहे,आता ना सकाळची पळापळ, ना ऑफिसचे टेन्शन!खरं तर या पळापळीची ऑफिसमधल्या टार्गेट्स आणि इत्तर रुटीनची आपल्याला सवय जडली आहे.आपल्याला झोकून देऊन काम करायची सवय लागलेली आहे!
  कदाचित  इतकी वर्षें अंगवळणी पडलेल्या या दिनक्रमात अचानक असा बदल करावा लागेल अशी स्वप्नातही आपण कल्पना केली नसेल;पण उद्यापासून आपल्याला नोकरीसाठी बाहेर पडायचे नाही हे वास्तव आहे, आणि या वास्तवाचा जेव्हढ्या लवकर आपण स्वीकार करू तेवढे आपल्याला पुढील आयुष्याचे नियोजन करायला सोपे जाणार आहे हे लक्षात घ्या. फार भावनिक नं होता आता गरज आहे ती आपल्या जीवनाकडे तटस्थ्यवृत्तीने बघण्याची!
 "हे असं का घडलं?" "असं केलं असतं तर तसं झालं असतं", "अजून थोडा वेळ मिळाला असता तर मी यांव केलं असतं आणि त्यांव केलं असतं!" असला विचारांचा किंवा चर्चेचा काथ्याकूट करुन वेळ वाया घालवण्यापेक्षा 'आता आपण सध्याच्या नोकरीतून निवृत्ती घेतली आहे आणि पुढील आनंदी आयुष्याचे तातडीने नियोजन करायचे आहे'  हे सत्य स्वीकारणे आपल्या मानसिक आणि पर्यायाने शाररिक आरोग्यासाठी हिताचे आहे याची खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधावी असं मला वाटतं.
    मिळणाऱ्या पैशाच्या गुणवणूकीच्या सुनियोजनाबरोबरच उद्यापासून हाताशी असलेल्या मुबलक मोकळ्या वेळेचे नियोजन करणेही अत्यावश्यक आहे!
     ज्यांच्याकडे वय आणि ऊर्जा आहे त्यांनी नक्कीच नव्या संधींचा धांडोळा घ्यावा;पण "आता बास, खूप वर्षें घासली" अशी मानसिकता असलेल्या मित्रांनी आपण आता नक्की वेळ कसा घालवणार आहोत याचा विचार आत्ताच सुरू करावा! आता आर्थिक सुबत्ता आहे त्यामुळे अर्थार्जन करण्यासाठी काही केले नाही तरी यापुढचा आपला दिनक्रम नक्की काय असेल यावर निदान प्राथमिक विचार तरी करायला हवा.
    आपल्या राहण्याच्या तीन चार किलोमीटर परिसरात आपल्याप्रमाणेच जे लोक निवृत्त झाले आहेत त्यांनी एकत्र येऊन बरेच काही करता येण्यासारखे आहे.
   आता "आपण कोणत्या पदावर काम केले", "कोणती अधिकारपदे भूषविली", "आपल्याला किती मान होता", "माझा किती रुबाब होता" या सगळ्या गोष्टीना फारसे महत्व नाही, तर "आपण आपल्या नोकरीतून सन्मानाने निवृत्ती घेतली आहे" आणि आता आपण एक "निवृत्त सरकारी कर्मचारी" आहोत हे एकदा का स्वीकारले की समाजात मिसळणे सहजसोप्पे होणार आहे हे लक्षात घ्या!
   यापुढे आपण आत्तापर्यंतच्या आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे  ज्या ज्या गोष्टींसाठी वेळ देऊ शकलो नव्हतो त्या गोष्टींसाठी आता आवर्जून वेळ द्या. आपल्या छंदांसाठी वेळ द्या. बागकाम करुन बघा. भटकंती करा. स्वयंपाक करुन बघा.आपल्याशी ज्यांची वेव्हलेन्थ जुळते अशा मित्रमंडळीत जा, गप्पा मारा.
Connecting India  अशी टॅगलाईन असलेल्या कंपनीत आपण आजपर्यंत काम करत होतो त्यामुळे अनेक लोकांशी आपण जोडलेले आहोत आणि हे जोडलेले स्नेहबंध अजून घट्ट कसे होतील ते पहा.
लोकांना भेटत रहा मनातलं बोलत रहा....
जोडलेली नाती आणि जोडलेली मने, स्नेहबंध तसेच यापुढेही जोपासत रहा.एकमेकांचा आधार व्हा.आधार द्या, आधार घ्या....
   अर्थात, यापुढे जे जे करावेसे वाटते (व्यसने सोडून) ते ते करावे. शाररिक व्यायामाइतकाच महत्वाचा असा बौद्धिक व्यायामही  सातत्याने करा.
   अवेळी आलेली स्वेच्छानिवृत्ती ही आपत्ती न समजता नियतीने आपल्याला आनंदात जगण्यासाठी दिलेली संधी आहे हे लक्षात घ्या आणि या संधीचे सोने करुन आपले आयुष्य अधिक सुंदर करायचा ठाम संकल्प करूनच आज ऑफिसातून बाहेर पडा.
बाहेरचे मुक्त सुंदर जग आपले स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.
 स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या सर्व बंधू भगिनींना पुन्हा एकदा त्यांच्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
   ..... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, January 15, 2020

नात्यात गोडवा -वाढवा .

             वाढावा नात्यात गोडवा 

        परवा एक फेसबुक मित्र प्रथमच समोरासमोर भेटला.एरवी फेसबुकवर माझ्या पोस्ट्सवर/लिखाणावर मोकळ्याढाकळ्या कॉमेंट्स आणि लाईक करणारा हा माणूस प्रत्यक्षातही अगदी तसाच असेल अशी माझी कल्पना होती;पण समोरासमोर भेटल्यानंतर मात्र माझा भ्रमनिरास झाला.आपल्या फेसबुक भिंतीवर प्रचंड मजेशीर खुसखुशीत गोड गोड भाषेत व्यक्त होणारी ही व्यक्ती प्रत्यक्ष बोलताना मात्र अगदीच कोरड्या एकसुरी भाषेत बोलत होती! प्रथमच समोरासमोर भेटल्यानंतर पुढाकार घेऊन मी सुरू केलेल्या संवादात केवळ औपचारिकपणे सहभागी होऊन दोन चार वाक्यातच त्याने एका बाजूने संवाद संपवला.
     मग माझ्या लक्षात आले की त्या संवादात फक्त मीच भरभरून बोलत होतो आणि तो मात्र जेव्हढ्यास तेव्हढे बोलून संवाद केव्हा एकदा संपतोय याची वाट पहात होता! 
       काही काही लोकांना प्रथम भेटीत अनोळखी माणसाबरोबर बोलताना बुजल्यासारखे होऊ शकते हे मी समजू शकतो, काही लोक मितभाषीही असू शकतात हे सुद्धा मान्य आहे;पण सोशल मीडियावर एकमेकांना जन्मोजन्मीची ओळखत असल्यासारखी चॅटींग करताना मोकळेपणी वागणारी,बोलणारी माणसे प्रत्यक्षात भेट झाल्यावर अशी वागू शकतात हे पाहून नाही म्हटलं तरी थोडा निराश झालो.अर्थात प्रत्येकाचा आपला एक स्वभाव असतो.
    सोशल मीडियाचे सोडा;पण आपल्या वास्तव आयुष्यातही अशी अनेक माणसे वावरताना आढळतात ज्यांचे घातलेले गुडीगुडी मुखवटे आणि खरे चेहरे आपण कल्पनाही करू शकत नाही एवढे भिन्न असतात!
आपला काही मतलब साधायचा असला की तेव्हढ्यापुरतं गोड गोड बोलणाऱ्या व्यक्ती एकदा का अपेक्षित असलेला कार्यभाग साधला की आपला मूळ स्वभाव दाखवतात.असे कामापुरत्या गोड गोड बोलणाऱ्या माणसांकडून फसले जातो  तेव्हा संवेदनशील मनांना  किती यातना होतात ते फक्त अशी मने असलेल्या माणसासलाच माहीत! हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आजचा मकर संक्रांतीचा दिवस....
    आपल्याभोवती नेहमीच आतून बाहेरून स्वच्छ सुंदर पारदर्शी मन असलेली माणसं असावीत, त्यांचे संपर्कांतील प्रत्येक माणसांशी वागणेबोलणे स्वच्छ निर्मळ असावे.ज्यांच्याशी मनमोकळं बोलल्यानंतर प्रसन्न वाटावं,सुखदुःखाच्या प्रसंगी एकमेकांना आधार देण्याइतपत त्यांच्यात सहकार्य भावना असावी.एखाद्या चुकीच्या गोष्टींसाठी परखडपणे एकमेकांचे कान पकडण्यापर्यंत अधिकार आणि मायेचा ओलावा असावा.कोणत्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही इतपत निर्मळ निरपेक्ष नातं मनामनात असावं. जातीधर्म प्रातांच्या सीमा ओलांडून असे संबंध माणसामाणसात निर्माण व्हावेत म्हणून आपल्या संस्कृती व परंपरात अनेक सण सभारंभांची योजना केलेली आहे.आज मकरसंक्रात,माणसा माणसातील नाती वृद्धिंगत व्हावीत,तीळ आणि गुळाच्या रूपाने नात्यांमध्ये स्नेह आणि गोडवा निर्माण व्हावा म्हणून साजरा केला जाणारा सण! तिळगुळ घ्या व द्या आणि मनापासून एकमेकांशी गोड बोला/गोड वागा असा संदेश देणारा आपला सण!.....
   तर, अशा या मकरसंक्रांतीच्या आपणा सर्वाना खूप खूप शुभेच्छा!
   तीळगूळ घ्या गोड बोला!
           ...........प्रल्हाद दुधाळ.

Tuesday, December 17, 2019

एक आनंदानुभव

#कुबेरदिवाळीअंक 2019
     दुपारनंतर गणेश कलाक्रीडा मंदिरात लागलेल्या फर्निचर प्रदर्शनाला गेलो होतो.तेथील एक एक स्टॉलवर फिरत असताना खिशात मोबाईल वाजत होता;पण माझ्या ते लक्षात आले नाही.घरी येऊन मोबाईल बघितल्यावर लक्षात आले की एका अनोळखी नंबरवरून तीनवेळा मिसकॉल येऊन गेला आहे."एवढं तातडीने कुणी फोन केला असेल? "
असा विचार करून मी घाईघाईने त्या नंबरवर कॉल केला .....
  फोनला उत्तर मिळाले आणि मी काही बोलण्यापूर्वीच समोरच्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केली...
"नमस्कार दुधाळ साहेब,आत्ताच कुबेर नावाच्या दिवाळी अंकात तुमची 'कवडसा'ही कथा वाचली.मला कथा खूप आवडली आपल्याला लगेच प्रतिक्रिया द्यावीशी वाटली म्हणून फोन केला होता."
समोरची व्यक्ती उत्साहात मला बोलण्याची संधी न देता बोलत होती!
"खूप खूप धन्यवाद सर,आपण कोण बोलताय?" संधी मिळताच मी चॊकशी केली.
"ओह्ह ,कधी एकदा कथेबद्दल सांगतो असं झालं होतं,गडबडीत माझी ओळख द्यायची राहूनच गेली की!बाय द वे,मी डॉक्टर रानडे बोलतोय दिघीहून...."
"सर थँक यू आवर्जून फोन केल्याबद्दल,तुम्ही कुबेर मेम्बर आहात का?"
"नाही नाही,आमच्या शेजारी एक दरेकर मॅडम राहातात त्यांनी कुबेर दिवाळी अंकाबद्दल शिफारस केली होती म्हणून आवर्जून मी अंक विकत घेतला आणि वाचून काढला! फारच सुंदर अंक झालाय! छान दर्जेदार असं काही वाचनाचा अनुभव मिळाला कुबेरमुळे!"
डॉक्टर रानडे कुबेर दिवाळी अंक आणि त्यातील साहित्याचे भरभरून कौतुक करत होते आणि माझ्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं वाटत होतं!
डॉक्टर रानडे पुढे बोलत होते....
" दुधाळ साहेब तुम्हाला चालणार असेल तर एक विचारायचं होतं....."
"विचारा न सर...."
" तुमच्या 'कवडसा' या कथेतल्या नायिकेबद्दल एका शब्दात काय सांगू शकाल?"
त्यांचा तो प्रश्न अनपेक्षित होता.मी थोडा विचारात पडलो ....
" त्या नायिकेबद्दल एकाच शब्दात सांगायचं तर 'दुर्दैवी' असे वर्णन मी करेल!"
" छान, तुम्ही कथेचा शेवट सकारात्मक केलात ते फार महत्वाचं आहे;पण अशा दुर्दैवी मूड स्विंगचा आजार असलेल्या मुलीला या फेऱ्यातून बाहेर काढणारी व्यक्ती भेटणे तसं प्रत्यक्षात खूप अवघड आहे,हो ना?"
" हो सर,प्रत्यक्षात अशा व्यक्ती खूप कॉम्लेक्स स्वभावाच्या असतात त्यामुळे अशा व्यक्तीपासून सगळे लांब पळतात;पण मला अशा व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण येऊ शकतो असा सकारात्मक संदेश द्यायचा होता!"
" बाय द वे तुम्ही सायकॉलॉजी शिकलाय का? कारण त्या नायिकेच्या तशा स्वभावामागील कारणमीमांसा,नकळत मनावर झालेला खोल परिणाम,एकंदरीत जगावरचा राग हे सगळं छान व्यक्त झालयं! " रानडे सर.
" सर सायकॉलॉजीचे शिक्षण असे नाही;पण मला त्या दृष्टीने माणसं वाचायची आवड आहे आणि अशी माणसे त्यांचे स्वभाव, विचार माझ्या लिखाणात डोकावतात."
माझ्या कथेतली पात्रं,प्रसंग,कथेची मांडणी याचं व्यवस्थित रसग्रहण रानडे सरांनी केलं होतं!माझ्यासारख्या नवख्या कथाकाराला त्यांनी दिलेली दाद खूपच आनंददायी होती.
 तब्बल पंधरा मिनिटे आम्ही बोलत होतो.कुबेर समूह, कुबेर फौंडेशन,समूहातर्फे चालविण्यात येणारे उपक्रम,कुबेर संमेलन याबाबत मी त्यांना माहिती दिली.अशा आगळ्या वेगळ्या समूहाबद्दल आणि समूहातील लेखक कवींच्या साहित्याने नटलेल्या सर्वांगसुंदर  दिवाळी अंकाबद्दल त्यांनी खूप कौतुक केले आणि कुबेर लेखकांना मनापासून शुभेच्छा दिल्या....
 कुबेर  समूह जनसामान्यांच्या मनावर आपलं नाव कोरतोय याचा प्रचंड आनंद आहे ....
.......प्रल्हाद  दुधाळ

ऐकूनही घ्या की राव !

ऐकूनही घ्या की राव!

         माझ्या ऑफिसमध्ये एक सहकारी होता अनेकदा काही ना काही कामाच्या निमित्ताने त्याच्याशी बोलावे लागायचे.त्याच्याशी बोलणे सुरू केले की मी माझे पहिले वाक्य संपवायच्या आतच जसं  काही त्याला मला काय म्हणायचंय ते सगळं आधीच माहीत आहे असं गृहीत धरून माझं बोलणं मधेच थांबवून तो सुरू व्हायचा.फक्त माझ्यासारख्या सहकारी व मित्रांशीच नाही तर त्याचा  बॉस किंवा हाताखाली काम करणाऱ्या प्रत्येकाशी बोलताना त्याचं वागणं असंच असायचं! 
    थोडक्यात त्याला समोरच्याचं बोलणं ऐकून घेण  बिलकूल मान्य नव्हतं! त्याच्या अशा वागण्यामुळे हळूहळू मी त्या व्यक्तीशी कामापुरताच संबंध ठेऊ लागलो.तो समोर असताना सहसा कुणी विषय वाढवायच्या फंदात पडायचं नाही कारण त्या संवादाचा शेवट नेहमी एकतरफी विसंवादात होणार हे निश्चित असायचं.पुढे पुढे मीसुध्दा त्याच्याशी बोलणेच नको असा विचार करुन त्याला टाळायला बघायचो.
     आपल्या  अवतीभवती अशा अनेक व्यक्ती वावरत असतात, ज्यांना समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेणे जमत नाही.जगातल्या कोणत्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान आपल्याला असल्याचा समज (खरं तर गैरसमज) अशा व्यक्तीला असतो. बोलणे ही एक कला आहे हे नक्कीच;पण त्याहीपेक्षा ऐकून घेण्याची कला महत्वाची आहे असे मला वाटते! 
        समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण म्हणणे ऐकून न घेता त्याला मधेच थांबवून आपले अर्धवट माहितीवर आधारित मत इत्तरांवर लादण्याची ही सवय अशा व्यक्तीला समाजापासून दूर करते.तडकाफडकी तोडायला जमत नाही म्हणून दोन चार वेळा लोक अशा व्यक्तीला सहन करतात;पण लवकरच अशा व्यक्तीला त्याला नकळत टाळणे सुरू होते.
      दोन व्यक्तीमधील खऱ्या अर्थाच्या सुसंवादासाठी दोघांचीही एकमेकांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेण्याची मानसिक तयारी असायला हवी अन्यथा असा one way संवाद त्या व्यक्तींमध्ये गैरसमज रूजवतो.दुसऱ्या व्यक्तीला बोलूच न देणे आणि आपले म्हणणे इतरांनी ऐकून झाले की संवादाची खिडकी बंद करुन नामानिराळे होण्याची सवय म्हणजे एक प्रकारची मानसिक विकृती आहे असे मला वाटते!
    आपल्या व्यावसायिक, सामाजिक वा कौटूंबिक जीवनात संवाद साधताना  समोरच्या व्यक्तीचे म्हणणे त्याला मधेच कोणताही अडथळा न आणता ऐकून घेणे आवश्यक आहे.अगदी वादाचा मुद्दा असला तरी किंवा टोकाची मतभिन्नता असली तरी समोरच्या व्यक्तीची बाजू शांतपणे ऐकून घेण्याची सवय नक्कीच नातेसंबंधात येणारी संभाव्य कटूता टाळू शकेल असे मला मनापासून वाटते. प्रत्येक गोष्टीची एक निश्चित अशी दुसरी बाजू असते;ती  बाजू योग्य आहे की अयोग्य आहे हा नंतरचा मुद्दा आहे;पण ती दुसरी बाजू किमान ऐकून घेतली गेली तरी माणसा माणसातील अहंकारापोटी होणारे टकराव कमी करू शकतील.सुसंवादासाठी एकमेकांशी संपर्कांचा दरवाजा कायम उघडा असला तर नातेसंबंधात दुराव्याची शक्यता निश्चितच काही प्रमाणात का होईना पण कमी होऊ शकेल. थोडीशी सहनशीलता ठेवून समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेण्याची सवय नसेल तर प्रयत्नपूर्वक ती सवय लावून घ्यायला हवी.
   आनंदी जीवनासाठी निश्चितच हे आवश्यक आहे! 
 तुम्हाला काय वाटतं?
......प्रल्हाद दुधाळ . 9423012020.