Saturday, November 18, 2017

ड्रायव्हर....

ड्रायव्हर....
शिंगटेआण्णा म्हणजे अफलातून माणूस! हवाई दलात शिपाई म्हणून पंधरा वर्षाची नोकरी करून आण्णा रिटायर झाला आणि एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीमधे ड्रायव्हर म्हणून सरकारी खात्यात चिकटला.
सगळ्याच सरकारी खात्यात मुख्य अधिकाऱ्यांच्या ड्रायव्हरचा फारच रूबाब असतो. अधिकारी कधीच त्याच्या ड्रायव्हरला दुखावत नाही, त्याची बरीच कारणे असतात! त्यातले महत्वाचे कारण असते ते म्हणजे साहेब दिवसभरात कुठे कुठे फिरला, कुणाकुणाला भेटला हे सगळ फक्त त्याच्या ड्रायव्हरलाच माहीत असते आणि त्यातली काही ठिकाणे साहेबाला कुणाला समजू द्यायची नसतात! आपली गुपिते ड्रायव्हरने कुणाला सांगू नयेत म्हणून मग साहेब लोक आपल्या ड्रायव्हरला खूप जपतात, विश्वासात घेतात! साहेबाची अशी बरीच खाजगी गुपिते ड्रायव्हर स्वत:जवळ बाळगत असल्यामुळे साहेब लोक आपल्या ड्रायव्हरला वचकून असतात.
तर आपला हा शिंगटेआण्णाही अशाच एका बड्या अधिकाऱ्याच्या दिमतीला ड्रायव्हर म्हणून काम करायचा. साहेबाचा जवळचा माणूस म्हणून त्याला अख्ख्या खात्यात सगळे टरकून असायचे.मुळात आण्णा दिसायला एकदम गोरागोमटा होता शिवाय एक्स सर्व्हीसमन असल्याने त्याचे राहणीमान कडक होते.दररोज गुळगुळीत दाढी करून कडक इस्त्रीचा सफारी घातलेल्या आण्णाची छाप समोरच्या माणसावर अशी काही पडायची की कधीकधी साहेबच याचा ड्रायव्हर असावा असे वाटायचे!
एकदा काय झालं, दिल्लीच्या मुख्य कार्यालयातून एक व्हीआयपी अधिकारी इन्स्पेक्शनसाठी पुण्याला यायचा होता.या बड्या अधिकाऱ्याला रेल्वे स्टेशनवर रिसीव्ह करून हॉटेलवर घेवून जायची सूचना साहेबाला मिळाली.ठरलेल्या वेळी शिंगटे आण्णाला घेवून साहेब रेल्वे स्टेशनवर पोहोचले. आण्णाने आज नवीन सफारी घातला होता. 
फलाटावर आण्णा पुढे आणि साहेब मागे असे उभे राहिले.साहेबाच्या हातातला त्या बड्या अधिकाऱ्यासाठी बनवलेला स्वागतफलक आपल्या हातात घ्यायला हवा हे आण्णा विसरून गेला. 
गाडी फलाटावर आली. तो बडा अधिकारी फलाटावर उतरला.आल्या आल्या त्याने कडक सफारीतल्या आण्णाशी हस्तांदोलन केले.आपली व्हीआयपी सुटकेस त्या अधिकाऱ्याने आण्णाच्या साहेबाच्या हातात दिली! हे एवढे पटकन झाले की साहेबाला काही बोलायचे सुचलेच नाही.आण्णाने साहेबाच्या हातातली सुटकेस पटकन काढून घेतली आणि स्टेशनबाहेरच्या गाडीत ड्रायव्हरसीटवर जावून बसला!
दोन्ही अधिकारी कानकोंडे होत काही न बोलता गाडीत येवून बसले.
आण्णाने साहेबाच्या तोंडाकडे बघायचे टाळत हॉटेलकडे गाडी पिटाळली. 
दुसऱ्या दिवशी साहेबाने आण्णाला यापुढे दररोज खाकी युनिफॉर्म घालायचा आदेशच काढला!
...... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, November 8, 2017

चणे दात आणि आपण ...

चणे  दात आणि आपण ...
      आमच्या शेजारच्या सोसायटीत घोलपकाका रहातात.एकदम उत्साही व्यक्तीमत्व लाभलेल्या या फक्त सत्त्याऐंशी वर्षे वयोमान असलेल्या तरूणाशी गप्पा मारणे म्हणजे  माझ्यासाठी प्रचंड आनंददायी अनुभव असतो.अशा वयाने जेष्ठ व सर्वार्थाने अनुभवी लोकांशी मैत्री करायला मला मनापासून आवडते. वेळ मिळाला की या माझ्यापेक्षा तब्बल तीस पावसाळे जास्त पाहीलेल्या मित्राशी संवाद साधण्याची संधी साधायचा माझा प्रयत्न असतो. जवळ जवळ तीस वर्षापूर्वी एका सरकारी खात्यातून  वरिष्ठ अधिकारी पदावरून रिटायर झालेल्या घोलप काकांची तब्बेत तशी एकदम ठणठणीत दिसत असली तरी वयपरत्वे त्यांच्या हिंडण्याफिरण्यावर मर्यादा आलेल्या आहेत.काकू होत्या तोपर्यंत तसा त्यांना काहीच प्रश्न नव्हता;पण आता सुनामुले अगदी कितीही काळजी घेत असले तरी काका मानसिकदृष्ट्या थोडे एकटे पडले आहेत.बोलताना तसे ते जाणवू देत नसले तरी त्यांचा एकटेपणा लपत नाही.
  असाच एका रविवारी काका माझ्याशी गप्पा मारत होते......म्हणजे, ते बोलत होते आणि मी फक्त ऐकत होतो ....
"आमच्या पिढीचे प्रश्नच वेगळे होते. जीवनातल्या प्राथमिकता आजच्यापेक्षा भिन्न होत्या,आपल्याला रिटायर झाल्यावर आयुष्यभर पेंशन मिळत राहील म्हणून त्या काळात खाजगी क्षेत्रात भरपूर पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध असूनही सुरक्षित  सरकारी नोकरीला मी चिकटून राहीलो.लग्न झाले, मग नवा संसार, मुलांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण असे चारी बाजूंनी खर्चच खर्च आ वासून उभे असायचे. सरकारी नोकरीत पगार तसा अत्यंत तुटपूंजा होता.महिना अखेरपर्यंत खर्चांची तोंडमिळवणी करता करता अक्षरश: नको नको व्हायचं.त्या काळी शॉपींग,हॉटेलिंग पिकनिक, नाटकसिनेमा या गोष्टी आमच्या शब्दकोशातच नव्हत्या.सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या निभावता निभावता आयुष्यातील सगळी उमेदीची वर्षे भरकन उडून  गेली आणि  रिटायरमेंट कधी समोर आली ते समजलेच नाही!"
 "रिटायर झालो, मिळालेल्या पैशात नडीअडीला काढलेलं तसचं घराचं उरलेलं कर्ज फेडलं आणि दर महिन्याला मिळणाऱ्या पेंशनवर उदर्निर्वाह सुरू झाला.मुलांची लग्नकार्ये होता होता पासष्टी कधी ओलांडली ते कळलेच नाही.आता बास झाली पळापळ, जरा स्वत:च्या आयुष्यातील राहून गेलेल्या हौशीमौजी करू म्हणे  म्हणेपर्यंत  नातवंडासाठी वेळ काढावा लागला आणि छंद व आवडी बाजूला पडले."
 " पंचाहत्तर वर्षाचा झाल्यावर सरकारी नियमांनुसार पेंशन वाढली, पुन्हा ऐंशी व पंचाऐंशी वय झाल्यावर पेंशनचा आकडा वाढतच राहिला.वेतन आयोग लागू झाला आणि बँकेतल्या शिलकीचा आकडा अजूनच फुगला.आता तर रिटायर होताना जेवढा पगार मिळायचा त्याच्या दुप्पट रक्कम दरमहा बॅंकेत जमा होते आहे,आज माझ्याकडे भरपूर पैसा  आहे; पण या वयात  तो खर्च करायची उमेद वा उत्साह उरलेला नाही नाही. कुठे फिरायला बाहेर पडावं तर  या वयात प्रवासही झेपत नाही! ज्यांच्यासाठी एवढा आटापिटा केला त्या मुलाबाळांनाही माझ्याकडच्या पैशाची आज तरी गरज वाटत नाही!" घोलप काकांचे डोळे भरून आले होते.
      काय असत ना? आयुष्यभर नोकरी एके नोकरी माणूस करत रहातो, प्रमोशन पगारवाढ याच्या चक्रात अडकतो,आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्याच्या नादात आवश्यक असलेल्या खर्चालाही कात्री लावत पैसा साठवतो आणि त्याचे स्वत:साठी जगणे राहूनजाते.जेव्हा खऱ्या अर्थाने उपभोगाचे वय असते तेव्हा स्वत:च्या आवडीनिवडीला फाटा देवून डोळ्याला झापडं लावून शर्यत लावल्यासारखा माणूस पळत राहतो.अगदी रिटायरमेंटचा क्षण समोर येईपर्यंत त्याला ‘एक दिवस या सगळ्या व्यापांतून बाहेर पडावे लागणार आहे या वास्तवाची जाणीवच नसते!
जेव्हा हे सगळं लक्षात येइपर्यंत ना उमेद राहीलेली असते ना उपभोगाचे वय!
"दात असतात तेव्हा चणे घ्यायची परिस्थिती नसते आणि आता भरपूर चणे  समोर पडलेले आहेत; पण ते चावून खायला आता तोंडात दातनाहीत!"
थोडक्यात काय की,
आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की पैसा कितीही आला तरी त्याची हाव मरेपर्यंत संपत नाही! आपण जे काही कमावतो ना,त्याचा योग्य वयात योग्य प्रमाणात उपभोगही घेता यायला हवा!
अन्यथा, सगळच व्यर्थ!,
बरोबर ना?
...........प्रल्हाद दुधाळ.