Friday, February 13, 2015

अंजन

अंजन 
स्थळ : परचुरे काकांचे घर 
पूर्वपीठीका- राघव व वसुधा यांचा दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेला पण सध्या दोघांमध्ये  पराकोटीचे वाद होत असतात.राघव परचुरे काकांना वसुधाचे लांबचे काका) फोनवर सर्व परिस्थितीची कल्पना देतो व त्यांचा तुटू पहाणारा संसार वाचविण्यासाठी वस
ुधाला समजावून सांगावे अशी विनंती करतो.काका दोघांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधतात. 
काका –अरे,वसुधा आणि राघव!या या,अलभ्य लाभ! आज कसे काय बुवा इकडे रस्ता चुकले?
राघव- काका,थोडं बोलायचं होत.वेळ आहे ना काका?”
काका- अवश्य बोलूया.प्रथम बसा बर दोघ! आणि काय ग वसुधा गप्प गप्प का एवढी?
वसुधा-(जमिनीकडे पहात) नाही काका,तसं काही नाही.(तिने कसनुसं हसायचा प्रयत्न केला).
काका -हे बघ वसुधा,मला सगळ काही माहीत आहे! राघवने सगळ सांगितलय!आपण याच विषयावर बोलणार आहोत.अरे शिकले सावरलेले तुम्ही पण अडाण्यासारखे वागता?(वसुधा राघवकडे बघते तो तिची नजर चुकवतो).
काका -मला तुम्ही प्रथम हे सांगा की,तुम्हाला माझ्याशी वेगवेगळे बोलायचे आहे की एकत्रच बोलू या?’
वसुधा- नाही, नाही काका,आपण समोरासमोरच बोलू!
काका -वसुधा मला प्रथम खर खर सांग,तू राघववर प्रेम करतेस? आणि हो,राघव, तू मधे एकही शब्द बोलायचा नाही!
वसुधा -हे काय विचारता काका! प्रेमविवाह आहे आमचा!(वसुधा हलकेच लाजते) 
काका -बर,समजलं! आता मला सांग,राघवच्या स्वभावातल्या कोणत्या गोष्टी तुला आवडतात?
(वसुधाचा आता मूड बदलला.आहे उत्साहात ती सांगायला लागते.)
वसुधा- खूप छान स्वभाव आहे त्यांचा! एकदम समजूतदार आहे! मला खूप समजावून घेतो.चुकल तरी रागावत नाही! खूप प्रेम होत हो त्याचं माझ्यावर पण आत्ताच काय झालंय कळत नाही!
काका- मग तुमचा प्रॉब्लेम काय आहे? वाद का होतात दोघात?”वसुधा तूच सांग.
वसुधा- काका,आता विषय निघालाच आहे तर सांगते सगळ तुम्हाला!मला भांडण नकोय हो! पण हल्ली काय होतंय ते समजतच नाही.राघव ऑफिसमधून आला की नुसता बसून रहातो.दिवसभर मी घरात एकटी असते.मला वाटत की त्याने मला वेळ द्यावा.माझ्याशी पूर्वीप्रमाणे बोलावे,पण हा कायम कामात बिझी!गेल्या वर्षभरात सुट्टीच्या दिवशीसुध्दा हा मला कुठे फिरायला घेवून गेलेला नाही.कुठलाही विषय काढला की खूप चिडतो.कुठलाही हट्ट धरला की त्याचा ताल जातो.दिवसभर एकटी असते याचा विचारच करत नाही!दिवसभर नाही नाही ते विचार माझ्या मनात येतात.पण हा लक्षच देत नाही माझ्याकडे!मी फक्त याची सेवाच करावी की काय?एक बायको म्हणून मी याचं सर्व करते,पण याला माझी किंमतच नाही! (वसुधा आता रडू लागते, राघव तिच्याकडे एक पाउल उचलतो पण काका त्याला हातानेच रोखतात, तोही मग बघ्यांच सोंग घेतो.वसुधाच्या.रडण्याचा आवेग हळू हळू ओसरतो. वसुधा पुन्हा बोलायला लागते)
वसुधा-मी माझ्या आईवडिलांशी वाईटपणा घेवून याच्याशी लग्न केलं,पण आता वाटतंय मी चूक केली!”
काका –वसुधा हे बघ,आता तुझी बाजू मला समजली.तुझा संतापही समजला.पण यावर वेगळे होणे हा एकच उपाय आहे का?यावर मागच्या खोलीत जाऊन शांतपणे विचार कर,ज्या कारणासाठी तुमचे वाद होतायेत ती कारणं एवढी गंभीर आहेत का?याचाही डोक्यात राख न घालता विचार कर.जे घडतंय त्या मागील कारणांचा मागोवा घे.मग पुन्हा आपण बोलू! जा तू आत.हे पाणी पी!( काकांन तिला पाण्याची बाटली देतात ती सावकाश आतल्या खोलीत जाते)

(आता काका राघवकडे वळतात) 
काका- हं राघव आता तू बोल!वसुधाच्या तुझ्याबद्द्लच्या तक्रारी तू आता ऐकल्या आहेसच,तेंव्हा त्याबद्दल तुझी भूमिका सांग. 

राघव- काका मला मान्य आहे की,मी कामात खूप बिझी असतो,ऑफिसमध्ये कामाचा खूप ताण असतो.वेगवेगळी टार्गेट पूर्ण करायची असतात.कामाकडे दुर्लक्ष केले तर नोकरी जाऊ शकते! नोकरी गेली तर घराच्या कर्जाचे हप्ते कुठून भरू?बऱ्याचदा घरीही काम घेऊन याव लागतं!पण घरी आलं की वसुधाची वेगळीच भुणभुण सुरू होते.ऑफिसात बॉसकडून त्रास असतोच त्यात अजून हिची भर पडते.अगदी संताप संताप होतो. मग रागाच्या भरात काही न काही बोलले जाते.एकदा का ती बिघडली की मग मला वाट्टेल तशी बोलते.शब्दाला प्रतिशब्द होतो.काका,अगदी वैतागून गेलोय!एका घरात का रहातोय आम्ही?मला तर नको नको झालंय!
काका- राघव,हे बघ,जरा शांतपणे विचार कर.तुझ्यावर अथवा वसुधावर कुणी लग्न लादले आहे का? तुम्ही दोघांनी समजून उमजून एकमेकांचे जोडीदार म्हणून स्वीकारले आहे!तुमचे एकमेकांवर अतिशय प्रेम आहे.आणि या प्रेमानेच तुमचा घात केला आहे.या प्रेमामुळेच तुमच्या एकमेकाबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत!आणि मग या अपेक्षा पूर्ण होत नाहीत,यापोटी तुम्ही भांडत आहात! अरे कसले हे प्रेम!ही गोष्ट तुम्ही विसरून गेलात की प्रेमात अपेक्षा आली की ते प्रेम रहात नाही तर त्याचे एका व्यवहारात रुपांतर होते!प्रेम म्हणजे त्याग!स्पष्ट बोलतो,पण तुम्ही दोघांनी लग्न म्हणजे काय खेळ समजला आहे का?एकदा विचार करून बघ की वसुधाला सोडून तू, किंवा तुला सोडून ती राहू शकता का?अरे लग्नात तुम्ही आणाभाका घेतल्या त्या काय उपचार म्हणूनच का? कोणत्याही परिस्थितीत शेवटपर्यंत एकमेकाला जीवापाड सांभाळायची शपथ तुम्ही घेतली आहे पण ती निभावण्याची वेळ आल्यावर मात्र माघार घेतायेत तुम्ही!”
(नकळत काकांचा आवाज वाढतो.त्या आवाजाने वसुधाही हॉलमध्ये येते,राघव च्या बाजूला उभी रहाते, काका दोघांना सांगू लागतात)
काका-अरे मुलांनो लग्न म्हणजे सहजीवन.या सहजीवनात पती व पत्नी एकमेकांच्या सुख वा दु:खात बरोबर असतात.वसुधा तिच्या ठिकाणी बरोबर आहे.राघवनेही तिला वेळ द्यायलाच हवा! नोकरी आणि संसार या दोन्हींचा समतोल राखत सहजीवनातला आनंद वेचायचा असतो!नोकरीमधले ताण घरी येऊ नयेत ही काळजी राघवने घ्यायलाच हवी,पण राघव आपल्या सुखी संसारासाठीच राबतोय.त्याला समजून घेणेही वसुधासाठी आवश्यक आहे! कमी तेथे आम्ही या भावनेने एकमेकाला साथ हवी! कुठलीही गोष्ट प्रतिष्ठेची न करता एकमेकाला समजून घेता यायला हवं,समजाऊन सांगताही यायला हवं! एवढी प्रगल्भा तर प्रेमात असायलाच हवी!
वसुधा-काका,आम्ही चुकलो!योग्य वेळी तुम्ही आमच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातलेत!यापुढे आम्ही कधीच भांडणार नाही.एकमेकांना अंतर देणार नाही.
(वसुधा काकांच्या पायाशी बसते राघव वसुधाच्या खांद्यावर हात ठेवतो काका दोघांना जवळ घेतात!)

 ..........प्रल्हाद दुधाळ.पुणे(९४२३०१२०२०)
प्रकाशित -माळी आवाज मुक्तांगण दिवाळी अंक २०१५ 

Wednesday, February 11, 2015

स्वीकार.

                        
    स्वीकार.
   रडून रडून लतिकाचे डोळे लालभडक झाले होते.रात्रभर ती हमसून हमसून रडत होती, पण माधव ने,तिच्या नवर्याने तिची समजूत घालण्याचा एका शब्दानेही प्रयत्न केला नव्हता.यापूर्वी असे कधी घडले नव्हते.किरकोळ वाद झाला तरी माधव तिला खूप समजावून सांगायचा.तिची बाजू समजून घ्यायचा.हे वरचेवर अगदी कारणाशिवाय घडतंय याची तिला जाणीव होती पण बऱ्याच वेळा तिच्याकडून ही चूक होत होती हे निश्चित! तिची जेंव्हा जेंव्हा चिडचिड होत असे त्या त्या वेळी माधव तिला असे वारंवार अगदी क्षुल्लक कारणावरून चिडणे किती धोकादायक आहे हे समजून सांगायचा प्रयत्न करत असे पण अशा प्रसंगी ती काय बोलते यावर तिचे नियंत्रणच रहात नसे! माधव मात्र तिची चूक असतानाही कमीपणा घेवून तिला शांत करायचा.जवळ घेवून हे जीवन काय आहे.आपल्या उज्वल भविष्यासाठी असे छोट्या छोट्या गोष्टीवरून होणारे वाद टाळायला हवेत हे छान समजून सांगायचा.तिला स्वत:ची चूक होतेय हे समजायचं,ती माफी मागायची व सर्व काही पूर्ववत व्हायचं.हे गेले दोन वर्ष कमी अधिक प्रमाणात होत होत,पण आज नेहमीसारखं काहीही घडले नव्हते. माधवने सकाळी उठल्यावर तिची मुळी दखलच घेतली नव्हती.आपलं आवरून तो ऑफिसला निघाला तेंव्हा तिला सारखं वाटत होत की तो निघताना तरी रात्रीच्या प्रकाराबद्दल काहीतरी बोलेल पण त्याने तिची अजिबात विचारपूस केली नाही.तो घराबाहेर पडल्यानंतर मात्र तिला अजूनच रडू यायला लागलं.अगदीच एकट एकट वाटायला लागलं.रडता रडता ती विचार करायला लागली ....
   फक्त दोन वर्षापूर्वी लग्न करून या घरी आले तेंव्हा किती उत्साहात होते! माधव च्या आईबाबांनी व इत्तर नातेवाइकानी अगदी मनापासून तिचे नव्या घरी स्वागत केले होते.एकुलत्या एका मुलाची ती पत्नी होती! माधवचे बाबा तर म्हणायचे की ही माझी लाडकी लेक आहे! आणि हे नुसते बोलले नव्हते तर आई व बाबांकडून तिला खरचं खूप प्रेम मिळत होत! आई बाबा तिला खूपच समजून घ्यायचे.प्रत्येक बाबतीत तिचे मत विचारायचे.घरातले सर्वजण तिचा आदर करायचे.पण तिला मधेच काय व्हायचं कुणास ठाऊक,अचानक ती विचित्र वागायला लागायची सर्वांवर चिडायची,खेकसून बोलायची.तरीही आईबाबा तिला समजून घ्यायचे.पण एकदोनदा अश्याच चिडचिडेपणा करताना तिच्याकडून आईबाबांचा अगदी वाईट शब्दांत अपमान केला गेला.दुसऱ्या दिवशी बाबांनी तिला व माधवला जवळ घेऊन सांगितले की यापुढे तुमच्या दोघांत आमची अडचण व्हायला नको.कुठलाही राग मनात न ठेवता आईवडिलांनी गावाकडे राहायचे ठरवले.लता व माधव ने पुन्हा असे घडणार नाही असे सांगून माफी मागितली पण त्यांचा निर्णय प्रत्यक्षात आणला होता व त्या दिवसापासून हे दोघेच घरात रहात होते! मधून मधून बाबांचा फोन येत असे अगदी प्रेमाने ते तिच्याशी बोलत पण परत यायला सौम्य भाषेतच नकार देत असत.आई बाबाना दुखाऊन आपण  खूप मोठी चूक केलेली आहे याची आता लताला जाणीव झाली होती  आणि याचा लताला खूप त्रासही  होत होता पण शब्दांनी झालेल्या जखमानी आपले काम चोख केले होते.माधवने लताच्या या समस्येवर अनेक वेळा एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ असे सुचवले होते पण तिने ते साफ धुडकावून लावले होते.त्यावरून सुध्दा दोघामधे एकदोनदा वाद झाले होते.माधवला पूर्ण कल्पना होती की योग्य ते मानसिक उपचार घेतले तर लता यातून पूर्णपणे बरी होवू शकेल.
     माधवने लताच्या स्वभावाचा अभ्यास केलेला होता.तिच्या लग्नापूर्वीच्या आयुष्याचा मागोवा घेताना एक गोष्ट त्याला समजली होती की, कॉलेजला असताना लताचे एका श्रीमंत व रुबाबदार तरुणावर एकतर्फी प्रेम होते.पण लता त्याच्या खिजगणतीतही नव्हती! त्या तरूणाचे लग्न झाल्यामुळे लताला त्या काळात  जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. अपेक्षाभगाच्या तीव्र दु:खामुळे तिला नर्वस ब्रेकडाऊन चा त्रास  सुरू झाला होता.पण हळूहळू कुठलाही उपचार न घेता ती या मानसिक धक्क्यातून सावरली होती.माधव बरोबरचा लग्नाचा सांगून आलेला प्रस्ताव तिने आनंदाने स्वीकारला होता व आपल्या सुखी वैवाहिक जीवनात पदार्पण केले होते.नव्या नवलाईचे पहिले सहा महिने अगदी सुरळीत गेले होते.लता माधव च्या सुखी संसाराचा व त्यांच्या सुखी कुटुंबाचा शेजारीपाजारी व नातेवाईक अगदी हेवा करत असत,पण अचानकपणे एक दिवस लताला अचानक  निराशेने ग्रासले व ती  विचित्रपणे वागू लागली.अगदी शांतपणे आनंदात जगणारे माधवचे कुटुंब काळजीत पडले.घरातले सर्वजण लतावर खूप प्रेम करत होते त्यामुळे आज ना उद्या सर्वकाही व्यवस्थित होईल असेच सगळे म्हणत.सर्वजण लताला शक्यतो सांभाळून घ्यायचा प्रयत्न करायचे.तिचा मूड बिघडू नये अशी काळजी जाणीवपूर्वक आई,बाबा व माधव घेत असत, पण लताचा मानसिक तोल वारंवार ढळतच राहिला.जेंव्हा ती नॉर्मल असेल, तेंव्हा लता सर्वांची खूप काळजी घेत असे.नवे  नवे पदार्थ तयार करून सर्वाना प्रेमाने भरवत असे.माधववर तर ती अतोनात प्रेम करत होती,अगदी सांगूनही लताचे वेगळे वागणे कुणाला पटले नसते, एवढी चांगली ती वागत असे! आणि असे वारंवार घडत राहिले!कितीही सांभाळले तरी पुन्हा पुन्हा तेच तेच घडत होते! माधव च्या आईवडिलाना वाटायला लागले की लता आणि माधवला वेगळा संसार करायला मिळाला तर सर्व काही सुरळीत होईल.एक दिवस नैराश्याच्या भरात लताने आई व बाबा ,दोघांचाही नको एवढा अपमान केला.जिव्हारी लागतील असे शब्द वापरले.आयुष्यात सरळमार्गी चालणारे हे जोडपे या प्रसंगाने खचून गेले.कायम दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारे ते दोघे हताश झाले होते! लताचा त्या दोघांना राग येत नव्हता तर कीव करावीशी वाटत होती.त्यांनी आपल्या मुलांच्या सुखासाठी गावाकडे जायचा निर्णय घेतला.
  आपल्याकडून अजाणता खूप मोठी चूक झाली आहे याची लताला जाणीव होती पण एकदा मूड बिघडला की काय होतंय याच तिला भानच रहात नव्हत. माधवने  शांतपणे तिला समोर बसवून जे तिच्या लग्नापूर्वीच्या आयुष्याबद्दल समजले होते त्याबद्दल तिच्याशी चर्चा केली. अडनिड्या वयात अशा गोष्टी जवळ जवळ  प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात घडत असतात आणि यात तिचा कोणताही दोष नसल्याचेही वारंवार समजावले.तिच्या मागे तो खंबीरपणे उभा आहे व तिने नैराश्याच्या या गर्तेतून बाहेर पडावे यासाठी आवश्यक ते सर्व उपचार करूया,असे वारंवार समजावले 
 ,पण आपल्याला उपचाराची  मुळीच गरज नाही असे ती ठामपणे सांगत राहिली.माधवने तिला हे पटवून देण्याचाही प्रयत्न केला की- मान्य आहे की ती त्या तरुणाबरोबर लग्न करून जास्त आनंदी झाली असती,पण ती गोष्ट वास्तवात येवू शकलेली नाही! म्हणून आपले आयुष्य बिघडवून घेण्यात अर्थ नाही! तेथे कदाचित तुला जास्त वैभवात व ऐटीत रहाता आले असते,पण तो सुद्धा तिला तेव्हढ्याच सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे! आपला पेला भले पूर्ण भरलेला नाही पण तो अर्धा तरी भरलेला आहे हे वास्तव तिने स्वीकारायला हवे! तो तिला समजून घेत होता,समजावून सांगत होता, पण कळूनही ती न कळल्यासारख वागत होती.त्याने आता निर्णय घेवून टाकला होता ही कुतरओढ थांबवायची! लताला तिच्या नशीबावर सोडून द्यायचे.तिच्या जगण्यातली आपली लुडबूड थांबवायची! रात्री झालेल्या वादानंतर त्याने आता लताबद्द्ल कोणतीही दया दाखवायची नाही असे ठरवूनच तिरीमिरीतच तो बाहेर पडला होता.कुठे कुठे फिरत राहिला. 
         लताला आता जाणीव व्हायला लागली होती की,आपण रात्री फारच टोकाला जाऊन बोलत होतो.नकळत आपण माधवाच्या आत्मसन्मानाला दुखावले आहे त्यामुळेच त्याने आज नेहमी प्रमाणे कोणत्याही प्रकारे समजूत काढली नाही.आपल्या स्वभावाची  आता लताला  लाज वाटायला लागली.काय काय नाही केले माधवने आपल्याला समजून सांगण्यासाठी? आपण उपचार घेतले तर यातून बरे होवू असे कितीतरी वेळा मला समजावले पण हट्टापायी मी त्याकडे दुर्लक्ष केले.याच हट्टापायी मी माधव व त्याच्या आईबाबांचा अपमान करत राहिले.माझ्या पुर्वायुष्यातल्या  एका  माणसाकडे मी आकृष्ट झाले. माझ्यासाठी खर तर तो नालायक होता .एकतर्फी  प्रेम कसले  आकर्षणच  होत ते ! त्याने  मला नाकारून  माझी अवहेलना केली अशी समजूत मी करून घेतली व नैराश्य ओढवून घेतले! या सर्व प्रकाराची  जबाबदारी माझीच आहे .माझ्या वाईट वागण्याची व त्यामुळे  ओढवलेल्या परिस्थितीची शिक्षा मात्र माधव व त्याच्या आईबाबाना देत राहिले.परंतू  या देवमाणसानी माझा राग राग न करता मला आधार दिला व  देत राहिले.किती कृतघ्न आहे मी! माझा सुखाचा पेला रिकामा आहे असे समजून मी माझे व माझ्या परिवाराचे जगणे अवघड करत आले.परंतु माझा हा पेला माधव व आईबाबांमुळे सुखाने भरलेला आहे हे वास्तव मात्र विसरले.आभासी सुखाने मला वेडे केले होते. काही नाही,आता ही चूक सुधारायची! माधव व आईबाबांना सुखात ठेवायचे! ते म्हणतील ते मानसिक उपचार घ्यायचे! माधवला ताबडतोब फोन करून माझा हा निर्णय सांगायलाच हवा.नाहीतर उशीर होईल! लताने ताबडतोब माधवचा मोबाईल नंबर लावला .......
                                              .........प्रल्हाद दुधाळ .पुणे (९४२३०१२०२०)

चला बालपण जगू या ........

चला बालपण जगू या ........
               खरे तर बालपणाचा काळ,रम्य सुखाचाअसे म्हटले जाते.सर्वसाधारणपणे बहुसंख्य लोकांचा
बालपणीचा काळ लाडाकोडात व आनंदात गेलेला असतो
      पण सर्वांचे बालपण तसे रम्य असेलच असे म्हणता येत नाही! अती डोंगराळ भागातील खेड्यामधल्या अल्पभूधारक शेतकरी/शेतमजूर कुटुंबातला जन्म,  त्यामुळे अगदी न कळत्या वयातही पालकांची आपल्या लहानग्यांच्या तोंडात चार घास कसे पडतील यासाठी चाललेली धडपड पहातच बालपण गेलेलेत्यामुळे बालपणीच्या आठवणीतले रम्य क्षण आठवू म्हटले तरी फार काही हाती लागत नाही! 
       आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीबीची असली तरी मनाची अतोनात श्रीमंती लाभलेल्या आईवडिलांच्या पोटी जन्म मिळणे म्हणजे भाग्यच की! आई व वडील दोघेही अक्षरशत्रू! सहीच्या वेळी हाताचा डावा अंगठा पुढे करणारे! पण आपली मुले शिकायला हवीत,ती आपल्या हिमतीवर शिकून मोठी व्हावीत,त्यांनी आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहून गरीबीचा कलंक पुसला जावा, म्हणून कितीही कष्ट पडले तरी ते करण्याची त्यांची तयारी! आणि ही धडपड पहातच लहानाचा मोठा होत असलेला मी! पण त्या वयातच एक सत्य समजलेलं-
जसं जमेल तसं शिकून लवकरात लवकर  स्वत:च्या पायावर  उभं रहाण्याला पर्याय नाही!’.पालकांच्या या ध्यासाला साथ देत अगदी पहिलीपासून ते शालांत परीक्षेपर्यंत पहिल्या क्रमांकाने उतीर्ण होत राहिलो.प्रत्येक वर्गाच्या परीक्षेचा रिझल्ट आल्यावर आईवडिलांच्या डोळ्यातले अपेक्षापूर्तीच्या आनंदाने अनावर झालेले,पण प्रयत्नपूर्वक लपवलेले आनंदाश्रूयापेक्षा रम्य आठवण ती काय असू शकेल! त्यातूनही एक हृद्य आठवण सांगायला हरकत नाही-
                  सातवीत असतानाची गोष्ट आहे,दर अमावास्येच्या दिवशी ग्रामदेवता भैरवनाथाच्या मंदिरात गावजेवण(भंडारा)दिले जात असे.गावात त्यावेळी विजेची सोय नव्हती,त्यामुळे रात्री अभ्यासासाठी
आम्ही शाळेतच राहून कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत असू.शाळेची कडक शिस्त होती.गावातच राहणारे अत्यंत मारकुटे म्हणून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड दहशत असलेले गुरुजी शाळेचे मुख्याध्यापक होते.त्यांचा नियम होता की काहीही कारण असले तरी रात्री आठ वाजल्यानंतर कुणीही शाळेच्या बाहेर पडायचे नाही.आमची शाळा गावातल्या पेशवेकालीन वाड्यात भरत असे. तर झाले काय की त्या दिवशी आम्हा मुलांनी मंदिरातल्या भंडाऱ्याच्या जेवणावळीत जेवायचे ठरवले. कुणाच्याही नकळत गुपचूपपणे आम्ही मंदिरात गेलो व मान खाली घालून जेवणावळीच्या पंक्तीत बसलो.समोरच्या पत्रावळीवर लापशी वाढली गेली हातात घास घेणार तोच समोर लक्ष गेले आणि समोरच्या व्यक्तीला पाहून हादरलोच!
           शाळेचे मुख्याध्यापकच पंक्तीत लापशी वाढत होते!त्यांची एवढी दहशत होती की आम्ही जेवायचे सोडून  शाळेकडे धूम ठोकली! आता आपली धडगत नाही,शाळेतून आपल्याला काढून टाकणार या भीतीपोटी पुढचे तीन दिवस शाळेच्या वेळेत घरातून निघत होतो,पण शाळेला गेलोच नाही! आता शाळा कायमसाठी सोडायची व शेतातच काम करायचे असं मनाशी पक्क ठरवूनही टाकले!
  स्वत: मुख्याध्यापक चौथ्या दिवशी जातीने घरी आले व समजूत घातली तेंव्हा कुठे शाळेवर उपकार
केल्याच्या अविर्भावात अस्मादिक शाळेत गेले! त्यावर्षी सातवीच्या (त्यावेळची पी.एस.सी.)परीक्षेत
केंद्रात पहिला आलो आणि शेतमजूर होता होता वाचलो!!!!
आजही तो प्रसंग आठवतो तेंव्हा अजाण वयातल्या त्या वेडेपणाचे हसू येते!
.....प्रल्हाद दुधाळ. पुणे. (९४२३०१२०२०)


बोचरे शल्य.

बोचरे शल्य.

  माणसाच्या आयुष्यात अनेक बऱ्यावाईट घटना घडतच असतात.कधी हातून अजाणता काही चुका होतात,कधी अचानक नकोशा प्रसंगाना सामोरे जावे लागते.यातील काही घटना टाळता येण्यासारख्या असतात,तर काही प्रसंग टाळणे कुणाच्याही हातात नसते.खर तर जे घडले आहे त्याबद्दल खंत न करता जे काही समोर वाढलेले आहे त्या वास्तवाचा स्वीकार करत मार्गक्रमणा करणे हा आनंदी जीवनाचा राजमार्ग आहे, अस असलं तरी,प्रत्यक्षात असे क्षण आयुष्यभर टोचणी देतच रहातात कधी अपेक्षाभंग,कधी हातातली निसटलेली महत्वाची संधी,अपूर्ण राहिलेली स्वप्ने,पाळता न आलेले शब्द,गैरसमजातून तुटलेले नातेसंबंध वा अजून एखाद्या वेगळ्या कारणांची बोच माणूस आयुष्यभर बाळगत असतो! अश्या बोचऱ्या जखमा बऱ्या झाल्या असे वरवर वाटले तरी एखाद्या हळव्या क्षणी त्यावरची खपली निघतेच! अशा अनेक शल्यांची अदृश्य गाठोडी बाळगतच माणूस जगत असतो!
   गोष्ट एकोणीसशे शहात्तर सालातली आहे,नुकताच मी शालांत परीक्षा उतीर्ण झालो होतो.जवळपास कोठेही पुढील शिक्षणाची सोय नव्हती त्यामुळे यापुढे शिक्षणासाठी जिल्ह्यांच ठिकाण-पुण्यात जायचं किमान इंजीनारिंगची पदवी वा पदविका घ्यायची असे स्वप्न मी पहात होतो! घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती त्यामुळे हे स्वप्न कितीही आकर्षक वाटत असले तरी कुणीतरी आर्थिक व मानसिक आधार दिला तरच ते प्रत्यक्षात येणार होते! आजच्या इतके इंजीनारिंग पदविकेला प्रवेश मिळवणे सोप्पे नव्हते कारण त्याकाळी फक्त चारदोन शासकीय संस्थ्यामधेच असे शिक्षण घेता येत असे! मी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेशासाठी अर्ज दिला व गावाकडे जावून राहिलो. साधारण एक महिना गेला तरी प्रवेशासंबंधी काहीच समजले नाही.त्याकाळी गावाकडे टेलिफोनची सुविधा नव्हती.पोस्टाने पत्र येईल व प्रवेशासंबंधी कळविले जाईल असे संस्थेने सांगितले होते त्यामुळे दररोज पोस्टमनला त्याबद्दल विचारत होतो.पुण्याला जाण्यासाठी प्रवासखर्चाची सोय करणेही दुरापास्त होते. त्या वर्षीच्या जुलै महिन्यात प्रचंड पाऊस पडत होता सगळ्या ओढ्यांना,नाल्यांना पूर आलेला होता, रस्ते वाहून गेले होते त्यामुळे गावाकडे येणारी एस.टी.ची बसही चारपाच दिवस गावाकडे फिरकली नव्हती! आठवडाभरानंतर पाऊस थांबला.एक दिवस पोस्टमन ने शासकीय तंत्रनिकेतन कडून आलेले पत्र मला दिले,आनंद गगनात मावत नव्हता! घाई घाईने पत्र उघडले माझ्या प्रवेशासाठीचा तो चान्स कॉल'' होता! मी पत्र पुन्हा वाचले त्या पत्रातील मजकुराप्रमाणे दिलेल्या तारखेच्या आत मी प्रवेशासाठी प्रवेश फी व प्रवेशाचे इत्तर सोपस्कार पूर्ण करायचे होते अन्यथा वेटिंग लिस्ट मधील पुढच्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार होता! पत्रावरची तारीख पुन्हा पुन्हा पाहिली आणि रडूच कोसळलं! शेवटची तारीख उलटून एक आठवडा झाला होता! आयुष्यातली एक अनमोल संधी हुकली होती! रडून काहीच होणार नव्हत!उशीर तर झालाच होता.कुणाचेही या बाबतीत मार्गदर्शन मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती!
   त्या काळी इंजीनारिंग पदविका धारकाला शासकीय व खाजगी क्षेत्रात भरमसाठ संधी उपलब्ध होत्या!आपल्या आयुष्यातली आयुष्याचं सोन करणारी ती संधी हुकल्याचे बोचरे शल्य कायमच खुपत राहिले!नियतीची योजना दुसरे काय?
    पुढच्या आयुष्यात टेलिफोन खात्यात नोकरी करत करत परीक्षा देत देत अभियंता झालो. तेस्वप्न साकार झाल्याचे समाधान नक्कीच मिळाले! आता नावासमोर उपविभागीय अभियंताहे पद लावत असलो तरी त्यावेळी तीसंधी जर साधता आली असती तर आयुष्यात अजून खूप मोठा पल्ला गाठता आला असता असे पुन्हा पुन्हा वाटते! संधी हुकल्याच शल्य कितीही नाही म्हटलं तरी, नकळत बोचतेच आहे!बोचतच राहील!
. ....प्रल्हाद दुधाळ.पुणे (९४२३०१२०२०)


Saturday, February 7, 2015

संयुक्त कुटुंब की विभक्त कुटुंब -चर्चा

संयुक्त  कुटुंब की विभक्त कुटुंब -चर्चा 


रजनीकांत जाधव -छोटे कुटुंब.... पण नक्की सुखी कुटुंब...?????

आजकाल काळ बदलला अस म्हणतात. आणि बदलत्या कालानुसार माणूस पण बदलला.. कारण काही
 का असेना पण आजकाल बहुतेक जन विभक्त कुटुंब पद्धति अवलंबू लागलेत. लहानपणी आजी,आजोबा,आई, वडिल, भावू,बहिन ,वडिलांच्या कोणत्या तरी मित्राचा मुलगा इत्यादि असे बरेच माणस कुतुम्बामाधे असत.. घर कस भरल्या भरल्यासारख वाटायच. आनंद असो व दू:ख प्रत्येक क्षण सगळे मिलुन घालवायचे. घरातल्या vadildharyaanmule लहान मुलांवर चांगले संस्कार पण व्हायचे.. कुटुंब खर्या अर्थाने सुखी कुटुंब वाटायच...
पण काळ बदलला कुटुंब पद्धति पन बदलली. नोकरी,धंदा किंवा आपल्या संसारात वडिलधारया माणसांची अड़गल म्हणून आजच्या तरुणाने विभक्त कुटुंब पद्धति अवलाम्बली.. काहींच्या मते ही पद्धति समर्थनीय असेल ही पण तिचे दुषपरिणाम पण  आहेत... आई वडिल दिवसभर office मधे बिजी.. मुलाना ठेवणार पालानाघरात. अहो जे संस्कार आजी आणि आजोबा करू  शकतात ते संस्कार पैसे घेवुन साम्भालानारी बाई कशी करू शकते.. सुख आल की ते 2- 4 मानासानी भोगायाच आणि दू:खात कोणी असेलच याची कही शाश्वती नाही...दिवसभर आई वडिलांचा सहवास नासल्यामुले एकलकोंडी होणारी मूल. आई वडिलांच लक्ष नस्ल्यामुले लहान वयातच व्यसनाधीन होणारी मूल आशा समस्या वाढायला लागल्या आहेत.आपल्या सरकारच 1 ब्रीदवाक्य आहे छोट कुटुंब... सुखी कुटुंब पण आशा पधातिने छोट कुटुंब पद्धति अवलाम्बिलेल्या
माणसांच कुटुंब नक्की सुखी कुटुंब आहे किंवा कधीतरी सुखी कुटुंब होतील का ?असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही....
एकत्र कुटुंब विरुध्द विभक्त कुटुंब
Shilpa Dhomney-आजचा चर्चेचा विषय खरोखरच खूप छान आहे.कुटुंब एकत्र असो वा विभक्त दोन्हीचे फायदे तोटे आहेतच. विभक्त कुटुंब पद्धती अनेकांना आवडते कारण विभक्त कुटुंबात सगळ्यांना स्वातंत्र असत विशेषतः घरातील नवीन लग्न झालेल्या जोडप्याला. त्यामुळे सुरुवातीला एकत्र नांदणारे आई वडील
 आणि मुलगा घरातल्या केवळ एका व्यक्तीच्या आगमनाने विभक्त होतात. कुटुंब लहान असेल तर काम (कष्ट) कमी खर्च कमी त्यामुळे सुख जास्त असा समज होतो आणि हाच पर्याय हवाहवासा वाटतो.
मला स्वतःला मात्र एकत्र कुटुंब पद्धती आवडते. एकत्र कुटुंबात वावरताना प्रत्येकावर काही ना काहीतरी बंधन असतात हे खरअसल तरीही तिथे जाणवणारी मायेची ऊब, एकमेकांना केलेली मदत ह्या गोष्टी कुटुंबातून बाहेर पडल्या नंतर जास्त जाणवतअसावे.गेल्या पंचवीस वर्षां पासून मी एकत्र कुटुंबात रहात आहे. लग्न होऊन मी सासरी आले तेव्हा आमच्या घरात चौदा पंधरा लोकांचा वावर होता. सगळेच अगदी गुण्यागोविंदाने नांदत होते असे मी म्हणणार नाही पण मतभेद कुणात नसतात?
पुढे कधी गैरसमज झाला म्हणून तर कधी स्वातंत्र हवे म्हणून एक एक करत आमच्या एका घराची तीन घरे झाली. पण आजही सासू, सासरे आणि हम दो हमारे दो जिथे एकत्र नांदतात त्या माझ्या घरात जास्त सूख आणि आनंद आहे असे माझ्या सहित इतरांना वाटते.
प्रल्हाद दुधाळ -संयुक्त कुटुंब पद्धती वा विभक्त कुटुंब पद्धती.
आजकाल समाजात विभक्त कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करण्याची वा तसा विचार करणारांची संख्या झपाट्याने वाढते आहे.पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंबात वाढलेली आजची पालक पिढी आज मात्र काही अपवाद वगळता स्वत:च्या संसारात विभक्त रहाणे पसंत करतात. याची माझ्या मते अनेक कारणे असू शकतात.
१ ) बदललेली मानसिकता- मी आणि माझं कुटुंब यापलीकडे ढुंकून न पहाण्याची वृत्ती वाढली आहे. व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पना बाळगून हम दो और हमारे दोच्याही पुढे जाऊन डबल इन्कम नो कीड’ (DINK) कुटंबाची कल्पना रुजलीजात आहे. आपल्या personal space ला अजिबात धक्का न लागता आपल्याच मस्तीत जगता यावे म्हणून आपल्या जन्मदात्या वृद्ध आईवडिलांची जबाबदारी नाकारणारी कृतघ्न पिढी हे याच मानसिकतेचे फळ आहे.
२ ) परिस्थितीतून आलेली अगतिकता- नोकरी धंद्यामुळे इच्छा असूनही अनेकांना विभक्त राहावे लागत आहे.आपल्या कुटुंबापासून नाईलाजाने दूर राहावे लागत आहे याची खंत बाळगत या लोकांनीविभक्त रहाणे स्वीकारले आहे. कारण काहीही असो पण संयुक्त कुटुंब पद्धतीचे माणसांच्या जडणघडणीत जे काही फायदे होते व आहेत, विभक्त कुटुंबे अशा फायद्यांपासून नक्कीच वंचित झाली आहेत.विभक्त कुटुंबातील चिमुरड्यांना आजकाल चालवल्या जाणार्या तथाकथित संस्कार वर्गातून कधीच होवू शकणार नाहीत असे संस्कार एकत्र कुटुंबात आपोआपच होत असत.नात्यांमधला गोडवा लहानपणापासूनच  अनुभवता येत होता व तो वागण्याबोलण्यात रुजत होता.वडिलधार्यांच्या प्रती आदर शिकवावा लागत नव्हता.चांगले काय वाईट काय याचे भान नकळतपणे यायचे. विभक्त कुटुंबात दोघेही कमावते असले तर विचारायलाच नको! मुलांना पाळणाघरात सोडून पैसा कमावण्याचे मशीन म्हणूनच दोघेही जगत असतात.भरपूर पैसा असतो पण एकमेकांसाठी वा मुलांसाठी वेळ देणे कुणालाही शक्य नसते. त्यातूनच चिडचिडेपणा केला जातो. अहंकार डिवचले जातात,मतभेद वाढतात,विसंवाद वाढत जातो.मानसिक संतुलनावर परिणाम होतो.मनोकायिक आजारांना सामोरे जावे लागते. मुलांवर याचे विपरीत परिणाम होत रहातात. घरात समजून घ्यायला व
समजून सांगायला कुणी वयस्कर अनुभवी व्यक्ती नसतात. त्यातच बोकाळलेला चंगळवाद,आधुनिक जीवनशैली,इन्टरनेट,टी व्ही वरील मालिका,सोशल नेटवर्किंग यातील नकोते घटक आपले दुष्परिणाम दाखवतात! एकूणच माझ्या मते दोन्ही कुटुंब पद्धतींचे काही कालानुरूप फायदे वा तोटे आहेतच! काय चांगले वा काय वाईट या विचारापेक्षा आजकाल आपल्यासाठी योग्य काय याचाच विचार सोयीस्करपणे जास्त होतोय!
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काही कारणास्तव जर खरोखरच एकमेकांशी संबंध बिघडले तर कुटुंब विभक्त होतात. पण एकदा विभक्त झाल्या नंतर पुन्हा एकत्र येण खरोखरच खूप कठीण आहे.आई वडील मुलांना माफ करतात पण पुन्हा एकत्रीत राहण्याचा विचारसुद्धा करत नाहीत. या साऱ्याची झळ मात्र पुढच्या पिढीला सोसावी लागते.अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे
रजनीकांत जाधव -ताई अगदी बरोबर म्हनन आहे तुमच.... नात हे विश्वासावर आधारित असत... एकदा विश्वास गमवालात की परत मिलावयाला खुप कठिन होवून जात.
मिलिंद जोशी - खरंय... तुम्ही म्हणता ते. पण सध्याची जी पिढी आहे ती त्या दृष्टीने खूप जागरूक आहे. किमान मला तरी असेच दिसते आहे. आणि म्हणूनच म्हणतो. तो दिवस दूर नाही ज्या दिवशी अशी अनेक मोठ्ठी घरं आपल्याला जागोजागी पाहायला मिळतील. जिथे आनंद असेल, आपुलकी असेल, प्रेम असेल, जिव्हाळा असेल... वाद सुद्धा असतील पण ते विकोपाला जाणार नाहीत तर फक्त जेवणातील चटणीचं काम करतील....
वसंत जोशी-एकत्र कुटुंब ...काळाची गरज सध्या पती पत्नी दोघे हि नोकरी व्यवसाय करतात ...दिवसाचे साधारण बारा तास बाहेर असतात ....मुलाना जन्म देणे सोप्पे असते पण त्यांच्या वाढत्या वयात त्यांना DAY CARE CENTRE मध्ये सोडले  आणि त्यांचे लाड पुरवले म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही ...हाच कालखंड असतो मुलांच्या मनात नाना प्रकारचे प्रश्न उत्पान्न होण्याचा ....असुरक्षित वाटण्याचा .....आई वडील आपल्यासाठी वेळ देऊ शकत नसल्यामुळे त्यांच्याबद्दल कटुता निर्माण होण्याचा ..क्वचित त्यांच्या बद्दल असूया निर्माण होण्याचा ... अशा वेळी जर घरात आजी आजोबा असतील तर मुलाना "लावारिस "पणा जाणवणार नाही .....मायेच्या व्यक्ती घरात असल्यामुळे ..मुलांचे संगोपन ...त्यांच्या दैनदिन गरजा
पुर्या होणे याबद्दल आईवडील आणि मुले सुद्धा निशंक राहू शकतात ...मुलांचे हसरे खेळते रूप जिवंत राहू शकते ....हे सर्व होण्यासाठी ...मुलांच्या मानसिक सुरक्षेसाठी आजी आजोबा घरी असणे आवश्यक .....मुले घरी असल्यामुळे आजी आजोबांना  सुद्धा आपण एकटे पडलेलो नाही ...हि भावना सुखावह वाटेल नोकरीला प्राधान्य देताना मुलांकडे पुरेसे लक्ष नसेल तरDAY CARE CENTRE मध्ये लहानाची मोठी झालेल्या मुलांनी नंतर व आपल्या आई वडिलाना वृद्धाश्रमाचा दरवाजा दाखवला तर नंतर त्रागा करू आपले उत्तरायुष्य वृद्धाश्रमात जाऊ नये असे वाटत असेल तर आपले आईवडील आणि आपली मुलेदोघानाही अंतर देऊ नका
सचिन भुजबळ- एकत्र कुटुंब विरुध्द विभक्त कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील
सख्खी आणि चुलत भावंडे एकाच घरात आणि एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने राहतात. एकत्र कुटुंबाची गोष्टबहुतेक
कुटुंबसंस्था पितृसत्ताक असतात, अभावानेच काही देशात, भागात मातृसत्ताक पद्धती आपल्याला बघायला मिळतात.
मुलांच्या वाढत्या वयात होणारे संस्कार हे एकत्र कुटुंबाच्या घरात होताना दिसतात.लहानग्या सदस्यांच्या शंकांचे निराकारण
 एकत्र कुटुंबातील जेष्ठ सदस्याकडून होते, आता मात्र,विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात असल्याने मुलांना आपल्या भावनांचा
निचरा होण्यास अडचण निर्माण होते तसेच त्यास वेळ लागतो किंवा बंधने येतात असे वाटते. किशोरवयीन मुलांचा भावनिक
 बुद्ध्यांक कसा ओळखावा, पाल्याने शारिरीक व मानसिक बदलांमध्ये स्वत:ला कसे सांभाळावे याचेही भान एकत्र कुटुंबात
एकमेकांशी चर्चा केल्याने चांगल्या प्रकारे होते. भारतात ग्रामीण भागात ही पद्धत सध्यातरी प्रचलित असली तरी नागरी
भागातून ही पद्धत आता हळूहळू नाहीशी होत चालली आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वमाऊलींनी पसायदानात म्हंटलेच आहे की
 विश्वची माझे घरम्हणजे विश्वालाच एक कुटुंब मानले. काळानुसार कुटुंबाची संकल्पना आणि व्याख्याही बदलत गेली.
एकत्रित कुटुंबातून संयुक्त कुटुंबेही अस्तित्त्वात आली असे आपल्याला वेळोवेळी समाजात वावरतांना जाणवते. अशा
 कुटुंबातही प्रत्येक सदस्याचीही त्याच आपुलकीने तशीच काळजी घेतली जाते. विश्वची माझे घर या संकल्पने नुसार
 जगातील एकत्रित कुटुंबावर जेंव्हा एखादी नैसर्गिक मानव निर्मित आपत्ती कोसळते तेंव्हा त्यांना वसुंधरेवरील इतर
कुटुंबं सदस्यांनी केलेली सहाय्यता किंवा मदत म्हणजे रक्ताच्या नात्यांपलिकडेही प्रेम आणि मायेने जोडलेल्या नात्यातील
मानवतेच्या कुटुंबाला जिद्दीने आणि ताठ मानेने जगण्यास शिकविणारे परमेश्वराचे प्रेषकच म्हणावे लागतील. एकत्र कुटुंबात
 जर काही कार्यक्रम असेल जसे कि जन्म, मरण, लग्नसोहळ्याच्या प्रसंगात एकत्र कुटुंबाचे योगदान फार जास्त असते जन्म
व विवाह प्रसंग एकत्र कुटुंबात समरसून साजरे होत. कुटुंबात घडलेल्या वाईट प्रसंगी एकमेकांना मानसिक आधार
 मिळे.माणसांच्या उबेमुळे उदासीनतेवरची खपली नैसर्गिकरीत्या सहजपणे भरून येत असे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी
प्रशिक्षण वर्गांची गरजच भासत नसे. व्यवहारी जीवनाचे खाचखळगे आपोआप आत्मसात केले जात होते. एकत्र कुटुंब
म्हणजे नैसर्गिक मानसोपचाराचे एक चालतेबोलते समुपदेशनकेंद्रच. दु:खद प्रसंगी एकमेकांना सांभाळून घेण्याची आपसूकच
चालून आलेली परंपरा. याप्रसंगी तीव्र मतभेद पण संपुष्टात येत होते. घरातील स्त्रीया कामानिमित्त बाहेर गेल्या असतील तर
 अन्य महिलांच्या मदतीमुळे कुटुंबात किंवा घरात अडचणी येत नसत. मुलांनाही मोठय़ा कुटुंबात राहण्याची सवय लागे. सण-
समारंभ एकमेकांच्या मदतीने उत्साहात साजरे करता येत होते. हे सगळे एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे आहेत.
नितेश राउत स्वर्ग से सुंदर सपनो से प्यारा था अपना घरद्वार .. हींदी चीत्रपटातील गीतांच्या ओळी आठवण्याचं कारण
म्हणजे आजचा चर्चेचा वीषय. पुर्वी बहूतेक संयुक्त कुटुंबपद्धती अस्तीत्वात होती, आताही कुठेतरी संयुक्त कुटुंब दीसतं पण
 क्वचीत. संयुक्त कुटुंबाचा पाया त्यागावर आधारीत असायचा, मुलांचा आईसाठी आईचा मुलांसाठी, पतीचा पत्नीसाठी आणी
पत्नीचा पतीसाठी, भावंडांचा एकमेकांसाठी. तर एकंदरीत संयूक्त कुटुंब हे वैयक्तीक आशा आकांक्षा आणी भावनेचा त्याग
 यावर उभं असायचं. यामध्ये कुटूंबातील स्त्रीवर्गाचा सहभाग म्हणजे सीहांचा वाटा. संयूक्त कुटुंबातील व्यक्तीला आपसुकच
कुटुंबाचं सुरक्षाकवच असायचं जीवनात येणा-या अडीअडचणींचा सामना संपुर्ण कुटुंब मीळुन करायचं. कालांतराने बदलती
जीवनपद्धती आणी आधुनीक संस्कार यामुळे "मीच का त्याग करायचा " ही भावना वाढीस लागली, आणी संयुक्त कुटुंबाचा
 पायाच ढासळला. हळुहळु एक सुंदर भारतीय जीवनपद्धती संपूष्टात आली. वीभक्त कुटुंबात मानसाच्या वैयक्तीक
महत्वाकांक्षा पुर्ण होऊ लागल्या मात्र मानवी नातेसंबधातला गोडवा संपला हे मात्र तीतकेच खरे ...
सुनील पवार -काळ बदलला तसा एकत्र कुटुंब पद्धती लोप पावल्या..एकत्र म्हणण्यापेक्षा सर्व समावेशक कुटुंब पद्धती म्हटले
तर वागावे ठरणार नाही..सर्व समावेशक अशा अर्थाने की त्यावेळी संपूर्ण चाळ, शेजारी पाजारी सुद्धा कुटुंबाप्रमाणेच वावरत
होते..एकमेकांच्या सहाय्याला धावून जात होते..सुख दुखाःत सहभागी होत होते..
पण हळू हळू हे सर्व बदलत गेले..समाजात विभक्त कुटुंब पद्धतीचा शिरकाव झाला..ह्याचे मुख्य कारण म्हणजे..एक तर
जागेचा अभाव आणि दुसरा म्हणजे वैयक्तिक स्वार्थ..तुम्ही म्हणाल जागेचा अभाव पूर्वी सुद्धा होता तरी १५ माणसांच कुटुंब
 १८० चौरस फुटाच्या खोलीत रहात होते.. तुमच म्हणण सुद्धा बरोबर आहे..त्यावेळी जागा जरी छोटी असली तरी माणसाचं
मन आणि हृदय विशाल होते..त्यामुळेच सर्व गुण्यागोविंदाने नांदत होते..काळानुरूप माणसाचं मन कोत बनलं..मग घर ते
काय हो ते सुद्धा सहाजिक छोट बनलं..आणि हि लागण फक्त शहारापुरती मर्यादित नाही तर अगदी खेड्या पाड्यात गाव
कुसा पर्यंत पोहचली आहे...गावातली विशाल घरे सुद्धा आज विभक्त होऊन कोंबड्याची खुराडी बनली आहेत व मनाने
विखुरली गेली आहेत..सर्वच कुटुंबात स्वार्थाचा शिरकाव झाला अस मी म्हणणार नाही काही अपवाद सुद्धा आहेत..तर काहींनी
 सामंजस पणाने निर्णय घेवून विभक्त पण मनाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला..आणि तो स्तुत्य आहे..अस मी म्हणेन..
आता आपण दुस-या कारणाकडे वळू तो म्हणजे वैयक्तिक स्वार्थ..मी आणि माझ त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब ह्या पलीकडे
कसलाच विचार..ह्या वैयक्तिक स्वार्थ पाहणा-या व्यक्ती करत नाही..अशा कुटुंबाचा प्रवास खरे तर उजेडाकडून अंधाराकडे
चालू आहे म्हंटल तर वागवे ठरणार नाही..कारण स्वतःच्या चार भिंतीत ह्यांच संपूर्ण जग सामावलेलं असत..ह्यांच्या शेजारी
कोण राहतो ह्याचा सुद्धा त्यांना पत्ता नसतो..फ्लैट पद्धत सुरु झाल्याने सताड उघडे असणारे दरवाजे आता कायमचे बंद
झाले..त्याच बरोबर मनाची कवाडं सुद्धा आपसूक बंद झाली..
आता तुम्ही म्हणाल विभक्त राहण्यात कसला आलाय स्वार्थ..?? तर त्याच अस आहे..सामंजसपणे घेतलेले निर्णय वेगळे..पण
अट्टाहासाने नाहक कुरापती काढून निर्णयाप्रत येणे हे वेगळे..अशा निर्णयात मागाहून पच्छाताप करून घेण्याची पाळी
येते..आणि सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी अवस्था होऊन जाते..त्यासाठीच इथे एक उदाहरण देऊ इच्छितो.. जे मी
 पाहिलं आहे..भाऊ आपल्या आई वडिलांसमवेत आणि त्याच्या अपत्यासह अगदी गुण्या गोविंदाने नांदत होते..पण आई वडील
गेले आणि कुठून तरी स्वार्थी किडा एका भावाच्या आणि त्याच्या पत्नीच्या मनात शिरला..क्षणात होत्याचे नव्हते झाले..दोन्ही
भाऊ विभक्त झाले..सहाजिक सुरवातीला दोघांनाही बरे वाटले..पण नंतर त्याना एकत्र राहण्याचे फायदे समजून आले तो पर्यंत
 उशीर झाला होता..ज्या कारणासाठी विभक्त झाले तेच कारण मुळावर आले.. कारण तस शुल्लक होत..म्हणे त्यांना एकांत
 मिळत नव्हता..तोच एकांत आज आकांत करतो आहे..माणसं जोडण्यासाठी अजूनही धडपतो आहे..माणसं जोडण्यासाठी
अजूनही धडपडतो आहे...
सरते शेवटी इतकेच सांगेन शरीराने भले विभक्त रहा पण मनाने कायम एकत्र या..एकत्र रहा..धन्यवाद...
मनीषा वैगंकर- पुर्वी एकत्र कुटुंबात प्राधान्याने मुले आणि अन्य सुरक्षित होते,त्याना सर्वांचा आधार आणि प्रेम मिळत
होते,संस्कार मिळत होते. विभक्त कुटुंबामुळे त्यापासून सर्व कमी अधिक प्रमाणात वंचित झालें. नात्यातली आपुलकी कमी
 झाली..नाते औपचारिक झाले. वरवर कितीही खुशी दर्शवत असले तरी विभक्त कुटुंबातील प्रत्येकाचा मानसिक ताण
 वाढला..कारण एकमेकाना वेळ देणे अशक्‍य होऊ लागले. एकंदरीत ,एकमेका साहाय्य करू,एकमेकांचा आदर करू अशा रीतीने
 वागुन समजूतदार पणा पेक्षा वैयक्तिक स्वातंत्र्याचा अतिरेक अलीकडे दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून अजाण,तरुण
 मुले यांच्या बरोबरच जाणत्या (?) व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आलेख खाली आला आहे.
त्यामुळे शक्य तिथे एकत्रित कुटुंब पध्धती टिकउन ठेवावी असे माझे मत आहे....जे आईवडील असूनही आणि त्यांच्या सोबत
राहणे शक्य असूनही मनमानी म्हणून स्वतंत्र रहातात...ते आईवडिलांचे भक्त नाहीत..म्हणून ते विभक्त आणि त्यानी
अंगिकारलेली कुटुंब पध्धती ती विभक्त कुटुंब पध्दती..!!!
सचिन भुजबळ - खर तर कुटुंब म्हटलं म्हणजे एक माळच आहे. ही माळ प्रेमाच्या धाग्याने गुंफल्या जाते. कुटुंबात राहणारा
 प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा घटक असतो.संकटाच्या क्षणी संपूर्ण कुटुंब एकत्र कुटुंबपद्धतीत एकजुटीने संकटाचा सामना
करतात. कुटुंब टिकवायचे असेल, तर कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात प्रेमभाव असणे गरजेचे आह.
एकत्र कटुंब कि छोटे कटुंब..... 
शीतल सूर्यवंशी- खरेच छोटे कुटुंब सुखी कटुंब आहे का?मला विचारलेत तर नाही .छोटे कुटुंब ही मधल्या काळात आर्थिक
नियोजनाची गरज होती पण कदाचित २१ व्या शतकात आपली गरज झाली आहे. नवरा बायको दोघे ही उच्च पगार घेत
असले तरी आपण मुलाला पाळणाघरात ठेऊन पैसे देऊ शकतो पण सासु-सासऱ्यान सोबत राहून आपल्या मुलाला चांगली
संगत,नात्यांची जाणीव,बंधनांची गरज,संस्कार इत्यादी सारख्या अगणित गोष्टी देऊ शकत नाही कारण आपण स्वता
 कोणत्याही बंधनात अडकन्यास तयार नसतो.आपली स्वतंत्रता,चैन, स्वार्थ, इ.गोष्टीना आळा लागू नये म्हणुन आपण फक्त
"छोटे कुटुंब,सुखी कुटुंब" ह्या नावाखाली आपली सोय जगासमोर मांडत असतो .
छोट्या कुटुंब पद्धतीमुळे मुले हेकेखोर,बंडखोर,एकलकोंडी,इ .तर कधी बुजरी, घाबरट, आत्मविश्वास कमी असलेलेली जाणवतात.
 नात्यात असलेला ओलावा अन त्यांची किंमत ह्या दोन्ही गोष्टीन पासून ती भरकटलेली असतात. आपण मुलांच्या
सोयीनसाठीच अन आपल्यासाठीच आपण कमावतो.त्यात इतर कोणालाही आपल्याला वाटा द्यायचा नसतो.त्यामुळे महिन्याचे
१ लाख रुपये कमावणारे कुटुंब ही पैसे पुरत नाहीत म्हणून तक्रार करत असतात.परिणाम म्हणजे पाहिजे ती वस्तू पाहिजे
तेव्हा मिळत गेल्याने मुलांच्यात हार पचवण्याची व्रुत्ती कमी झालेली असते . लहान असतात तेव्हा आपण ओरडून तर कधी
प्रेमाने मुलांना सांगतो तसेच आजकालची मुले थोडही यैकत नाहीत अशी आपण गावभर चर्चा ही करतो.त्याचवेळी १९व्या
शतकात आपण कसे होते ह्यावरही आपणच बोलतो पण "आपण तसे का होतो?" हे कधी आपण लक्षात घेत नाही.
त्यामागच्या कारणाकडे आपण कानाडोळा करतो.
आपण लहान असताना आपल्या वडिलांचा पगार काही बडा नव्हता तरी हसत खेळत आपण एकत्र कुटुंबात वाढलो
राहिलो,रुजलो इ . हा भाग वेगळा आहे कि नाण्यांनाला दोन बाजू असतात तसेच एकत्र कुटुंबामुळे खूप सार्या गोष्टीना आपण
मुकलो पण त्यामुळेच आज आपण पुर्णत्तावाने घडलो .आपण का नाही लक्षात घेत की आपल्या मुलाला छोट्या कुटुंबांच्या
चैनिपेक्षा एकत्र कुटुंबाच्या आनंदाची,प्रेमाची अन तडजोड करण्याच्या वृत्तीची गरज आहे. 
आपण नोकरीच्या कारणास्तव जास्त घराच्या बाहेर असतो अश्यावेळी आपल्या मुलासोबत आपल्या माणसाची गरज
असते.मुलांच्या वाईट प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी अन गरज पडली तर त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एका मायेच्या
हाताची गरज असते ती आपल्या माणसाशिवाय कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे एकत्र कुटुंब ही आर्थीक नियोजनाची गरज
असली तरी प्रत्येक्षात एकत्र कुटंब पद्धत ही काळाची तसेच आपल्या मुलांची गरज आहे.हे आपणच त्याला अन स्वताला
समजावले पाहिजे.--शीतल सूर्यवंशी
रत्नाकर दशावतारी- कौटुंबिक माधुर्य !
आपल्या कुटुंबात माधुर्य असणे गरजेचे आहे. मग कुटुंबाचा आकार किती मोठा , किती लहान हे फारसे म्हत्वाचे नाही. एकाच
 छता खाली एकत्र राहण्याचा नुसता देखावा हि उपयोगाचा नाही. आता यावर काही म्हणतील तुम्हाला साधे एकत्र राहता येत
नाही, साधे तुमच्या कुटुंबाला एकत्र जोडता येत नाही तर तुम्ही देशाच्या एकजूटतेची स्वप्ने कशी पाहू शकता.. मला वाटते
 एकजुटता आणण्यासाठी एकाच छता खाली राहण्याची काय गरज. तसे असेल तर आख्ही गावेच्या गावे एकाच छता खाली
 का नाही राहत.एकाच छता खाली राहण्याचा अट्टाहास जसा उपयोगाचा नाही तसेच एकाच छता खाली राहताना मुद्दामहून
वेगळे राहणे, फारकत घेणे हे देखील चुकीचेच. जे एकत्र राहतात ते चांगलेच पण जे राहत नाहीत ते वाईट हे ठरवणे चुकीचे.
एकत्र कुटुंब पद्धती गावाकडे बघायला जास्त मिळते शहरात त्याचे प्रमाण न च्या बरोबर असावे. याचे कारण मुख्यता शहर
 आणि गाव यामधील भिन्न भिन्न जीवनमाना मध्ये आहे. शहरामधील जागेचा प्रश्न , काम करण्याच्या पद्धतींमधील

वेगळेपणा या मध्ये याचे उत्तर सापडते. प्रवीण दवणे यांच्या काव्य पंक्ती मला इथे आठवतात 

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती ||
अशी काही अट नाही कि घरात फक्त रक्त्याच्या नात्याचीच लोक एकत्र नान्दावीत. रक्ताची नाती नसताना सुद्धा ज्या
भिंतींच्या आत  भिन्न जाती पातीची लोक सुद्धा एकत्र गुण्या गोविंदाने नांदू लागतील तेंव्हा त्यातील माधुर्य काही और च
असेल यात शंकाच नाही. अशी घरे आनंद वनात बाबा आमटेनी उभारली, अशी घरे सिंधू ताई सपकाळ यांच्या सारख्या थोर
समाज सुधारकांनी बांधली.त्यांना शतशः नमन

अरुण देशपांडे - चर्चेचा विषय -चित्रात दिसते आहे त्या प्रमाणे -त्यावर मत व्यक्त करतांना खालील विचार मनात आले 

-----------------------------------------------------------------------------------------
कुटुम मोठे की छोटे - हे महत्वाचे नाही .
--------------------------------------------------------------------------------------------
----चित्रात दिसते आहे- आणि मला जाणवले ते असे की - मोठे कुटुंब आणि छोटे कुटुंब. आजच्या वर्तमानातील कुटुंबाची
 व्याख्या समजून घेतली तर असे कळून येते की .पती -पत्नी आणि त्यंची मुलं , इतकी मर्यादेत ही व्याख्या आहे. मग,
गेल्या पिढीला अपेक्षित असलेले मोठे कुटुंब -एकत्र -कुटुंब आता कसे असणार .?
विभक्त कुटुंब "ही संकल्पना अर्थार्जनासाठीची गरज "यातून प्रत्याक्ष्यात आली.आणि या अशा जोडप्यांना मिळणारे "स्वातंत्र्य
" पाहून इतर जोडप्यांना "आपण ही आपले  स्वत्रंत्र कौटुंबिक जीवन सुरु का करू नये ? " असे वाटलेच असणार मग
नोकरीसाठी बाहेर पडणे क्रमप्राप्तच झाले. खेड्यातील आणि निमशहरी भागातून मोठी कुटुंबे असत., यातून बाहेर पडून
 मोठ्या शहरात आपले छोटे कुटुंब घेऊन मजेत (?) ,आनंदात (?) राहणार्यांच्या त्रासाची कधीच चर्चा झाली नाही.
, आपापल्या सोयीने प्रत्येकानेच -प्रत्येकाला दुषण देणे, टीका करणे ,अवहेलना करणे" हे प्रकार केले . जे मोठ्या कुटुंबातून
 बाहेर पडू शकले नाहीत ते दुखी ,आणि आपल्या मानसान पासून दूर झाले ते ही दुखी असे काहीसे होऊन बसले .
ज्या गोष्टी आपल्या हाता बाहेर गेल्या आहेत" त्यांच्या बद्दल एकूणच सर्व्ना "पुळका " असतो,
एकत्र-कुटुंब " हा विषय असाच आहे. जिथे शक्य आहे तिथेच एकत्र कुटुंब अगर मोठे कुटुंब  असणे हितकारक आहे , आणि
जिथे असे होऊ शकणार नाही, तिथे विनाकारण "गहिवरून जाण्यात काही अर्थ नाही."
आज मोठ मोठ्या नगरात -परिवार मात्र छोटे छोटे आहेत. अशा घरांना मोठ्या माणसांची गरज आहे. पण, वैयक्तिक -इगो "
गोंजारणार्या मोठ्या माणसाना ,मनाने मात्र अजून मोठे होने जमलेले नाही" ही वस्तुस्थिती मान्य करण्यास काय हरकत
आहे.? तेव्न्हा "वेळेचे महत्व जाणून घेत - कुटुंबाचे हित राखणे " ही भावना मनात आली तर ,
घराचे घरपण नक्कीच जाणवेल. कुटुंब मोठे वा छोटे ? हे पाहण्या पेक्षा त्यातली माणसे ,त्यांचे सुख महत्वाचे आहे" हे
स्वीकारणे म्हणजेच -"सुखी कुटुंबाचा मंत्र "ठरेल.
संगीता देशपांडे - भारताची सामाजिक विचारधारा जरी कुटूंब संस्थेवर आधारलेली आहे,तरी आजच्या वाढत्या competition
मुळे,career oriented विचारसरणी मुळे,पाश्चिमात्य संस्कृतिचे अंधानुकरणा मुळे,आजची पिढी ही खूपच पुढारलेली आहे.त्यात
त्यांच्या priorities त्यांना माहित आहे,शिवाय त्यांची बदलती जीवनशैली व वाढत्या महागाई मुळे ती DINK(double income
but no kids) विचाराच्या प्रेमात पडलेली आहे.त्यात काही जणांना तर जबाबदारी रहित, ब बंधनविहरित एकत्र जीवन (live in
relationship)जगायचा विचार प्रेरित करत आहे. ह्या सगळ्या प्रकारा मुळेच एका नविनच विचारसरणीचे कुटूंब कानोसा घेत
दार ठोठवण्याची शक्याता आहे. त्यामुळे कुठले कुटूंब श्रेष्ठ हा मुद्दा गौण होतो , आणि कुटूंब संस्था (मुलांन सहित) कशी
टिकेल,या दृष्टीने विचार करणे आताच्या घडीला गरजेचे आहे...संगीता देशपांडे
हर्षवर्धन राजेंद्र घोडके - मी भारतात जन्म घेतल्याचा अन भारतीय असल्याचा मला खरोखरच अभिमान आहे
कारण जगामध्ये भारतीय संस्कृती प्रसिद्ध आहे कारण इथल्या संस्कृतीला एक परंपरा आहे इथे प्रत्येक नात्याला महत्व आहे
अन तितक्याच आत्मीयतेने इथे प्रत्येक नाते जपले जाते नात म्हणजे काय याची शिकवण लहानपणासून दिली जाते मला
तर वाटते भारत हा एकमेव देश आहे जिथे नात्यांचे सण आहेत  पण जस जस जग पुढे जात आहे येणारी पिढी अधिक
 आधुनिक होत आहे त्यामुळे संस्कृतीला धक्का बसत आहे कारण माणूस अन माणसाची वृत्ती इथे झपाट्याने बदलताना
दिसत आहे ज्याचा परिणाम साहजिकच नात्यांवर होताना दिसतो  रक्ताच्या नात्याइतकेच जिथे जोडलेल्या नात्याला महत्व
होत आज तिथेच रक्ताच्या नात्यांचीच किमत कवडीमोल ठरताना दिसत आहे न ती ओढ राहिली आहे न एकमेकांना
एकमेकांचा सहवास हवासा वाटतो आहेएकत्रित कुटुंब म्हणजे अनेक नात्यांचा जणू उरुसाच वाटायचं ते घर जिथे माणसाला
माणूस अन मनाला मन जोडलेलं दिसायचं पण आता ज्याला त्याला स्वतंत्रता हवी आहे लहान मुल जर समजदार झाले कि
त्याला वेगळी खोली दिली जाते अन तिथूनच दूर होण्याचे बीज पेरले जाते हळू हळू मुल आई बाबांपासून नंतर घरापासून दूर
होत जात लग्न झाले कि मुला मुलींना वेगळे घरटे थातावेसे वाटते पण आधी ज्यांनी रक्ताचे पाणी करून वाढवेलेल असते
आयुष्यात एका यशाच्या ठिकाणी आणण्यासाठी दिवस रात्र एक केलेले असतात त्या माता पित्यांना एकटे पडले जाते 
जिथे जन्मदात्यांचेच असे हाल असतील तर तिथे इतर नाती काका, काकू, मावशी, आत्या, आजी, आजोबा, पणजी जी आधी
 एका ठिकाणी गुण्यागोविंदाने राहत त्यांना कुठे एकत्रित राहते येते आताचे ब्रीदवाक्यच आहे की छोटे कुटुंब सुखी कुटुंब हम
 दो हमारे दोकाही दिवसांनी एकत्रित कुटुंबाचे पुस्तकातून केवळ धडेच वाचायला मिळतील त्यांच्या फक्त कथाच वाचायला
मिळतील आधुनिकता इतक्या सहजतेने अन मनापासून माणसाने स्वीकारली आहे कि माणूस माणसापासून माणुसकीपासून
दुअरवत चालला आहे अन छोटे कुटुंब अधिक छोटे होताच आहे अन एकत्रित कुटुंब इतिहासजमा होताना दिसत आहे 
प्रदीप अंबिके -सर्वात क्लेषकारक गोष्ट अशी की म्हातारपण आवडत नाही म्हणून वयस्कर लोकानचा तिटकारा करणे .---2 रे
 कारण -एकत्र कुटूम्बात लैन्गीक कुचंबना होतेय असे वाटणे पण प्रत्यक्षात वेगळ्याच निमीत्ताने भान्डण काढणे .3 रे कारण
एकुलता एक मुलगा लाडाचा चक्क सुनेच्या ताब्यात चाललाय . 4 थे कारण -नवर्याच्या बहीणी खरे तर त्यान्च्या ही बापाचे
भावाचे घर असते पण त्याना दुर करुन आपल्या माहेरची माणसेच फक्त आपली वाटणे .त्यासाठी वेगळे रहावे वाटणे ।5वे
तसे घडेल या भितीने सुनेच्या माहेरचा दुस्वास करणे .
वृषाली वैज्रीणकर-पहिल्या चित्रात आजी आजोबा आहेत ,आणि सर्वआनंदी दिसत आहेत आणि दुसरे black शेड मध्ये का आहे
कळत नाही कारण तेही आनंदी असू शकतात,सामंजस्याने आणि काही कारणाने मुले बाहेर गावी राहतात आजीआजोबा येत
जात राहतात...कुठेही असाल तरी संस्कार महत्वाचे घरात आजीआजोबा असूनही किंमत करणारे पाया पडणारे नसतात तेच
 दूर असणारे आदर संस्कारी असू शकतात, तसेच अजिअजोबनि नात्वान्दासोबत राहणे छानच पण काही कारणाने खुपदा दूर
राहूनहि माया करतात..चार janआहेतहेही नसे थोडके..आणि बरेच काही लिहित येईल वेळेअभावी एवढेच..कुठेही राहा सुखी
आनंदाने रहा..आजीआजोबांचा सन्मान करा आई बाबाा मुले हि छान एकत्र राहालच,कालच आम्ही जेष्ठ नागरिकांसाठी एक
दोन तासाचा कार्यक्रम घेतला खूपछान वाटले ....आभारी...वृषाली**
कुटुंबाला एकजिनसी ठेवणारी संयुक्त पद्धती आणि कुटुंबाला विस्कळीत करणारी विभक्त पद्धती. 
गंगाधर जोशी -आजची दोन्ही चित्रे बघून कालच्या आणि आजच्या कुटुंब पद्धतीतील फरक तीवृतेने जाणवतो.
माझे वय आता ८३ झाले आहे. मी स्वातंत्र्यापूर्वीचा आणि स्वातंत्र्योत्तर काळ पहिला आहे. खेड्यातील आणि शहरातील
जीवन अनुभवले आहे. त्याचबरोबर मी एकत्र कुटुंबात राहिलो आहे आणि आजच्या विस्कळीत ( विभक्त ) कुटुंबाचे जीवन
अनुभवतो आहे. समाज शास्त्रात या दोन्ही कुटुंब पद्धतीचा सविस्तर अभ्यास केला गेला आहे. जीवनाचा धांडोळा घेताना
 अभ्यासकाला संयुक्त पद्धतीचा अभ्यास करावाच लागतो. दोन्ही पद्धतींचे बरे वाईट परिणाम शोधले जातात.
डावीकडचे चित्र एकत्र कुटुंब पद्धतीचे तर उजवी कडचे विभक्त पद्धतीचे प्रतिक आहे. मला तरी संयुक्त पद्धतीचे हे चित्र पाहून
आनंद होतोय. तुम्हालाही व्हावा. आजोबा आजी, आई बाप आणि दोन मुले कशी एकमेकांशी घट्ट नाती धरून उभी आहेत.
 थोरांनी धाकट्याच्या खांद्यावर ठेवलेला हातच सांगतोय "काळजी करू नकोस , आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. या उलट
उजवीकडचे चित्र पाहून हम दो हमारे दो ( आणि आता ओन्ली वन ) बाकी कुछ नही . अस नात तुटलेलं दिसतंय. या
चित्रात पोरांचे आई बाप हातात हात घालून उभे आहे पण पुढील पिढीला प्रेमाचा काही आधार दिलेला दिसत नाही. किंबहुना
 पुढील पिढीनेच मोठ्यांचा हात सहज सोडून आपण निवडलेल्या मार्गाने जायचे ठरविलेले दिसतेय. 
डाव्या चित्रात सुनेच्या डोक्यावर मुकुट दाखविलेला आहे. त्यावेळी वान्प्रस्थाला महत्व होत, आणि ते समाज धारणेच्या दृष्टीने
योग्यही होत. चित्रातील सासू सासरे घरातील मोठ्या सुनेच्या हाती तिजोरीच्या चाव्या हवाली करून कौटुंबिक जबाब्दार्यातून
परांगमुख होतात. सून आता महाराणी होते. कुटुंबाच्या सगळ्या जबाबदार्या सांभाळण्याइतकी ती सासूच्या हाताखाली तयार
 झालेली आहे. कौटुंबिक जीवनाच्या सगळ्या जबाबदार्या ती हसत मुखाने स्वीकारत आहे असे दिसते 
उजवीकडचे चित्र अगदी नीटनेटके , आखीव राखीव, कुठलाही फाफट पसारा नाही असे दाखविले आहे. पण त्यांची पुढील
वाटचाल डावीकडील मंडळींच्या सारखी सुखावह नसावी. त्यांच्यात एकोपा नाही, मौजमजा हास्यविनोद यांचा लवलेश त्यांच्या
मुखावर दिसत नाही. जीवन जगणे म्हणजे एक रुटीन .प्रत्येकाने आपापल्यापरी पुढील वाटचाल करायची असा भास होतो. 
समाज शास्त्रात सोशल ओरनायाझेशन and सोशल डिस ओर्गानायाझेषण ह्या विषयावर चर्चा होते. 
ग्रामीण भागात अजूनही सामाजिक एकोपा मोठ्या प्रमाणात जपला जातो पण आपण जसजसे खेड्यातून, तालुक्याचे गावी,
तेथून शहरात आणि मग कॉस्मोपॉलितन शहरे असा प्रवास करतो तसतसा सोशल डिसओर्गानायाझेषण वाढत जाताना बघतो.
 शेवटी कुणीच कुणाचा नसतो.एकत्र कुटुंब पद्धतीचा र्हास होत गेलाय, विभक्त कुटुंबात आम्ही आणि आमची मुले , पुढे मुलेही
 फक्त आम्ही आणि फक्त आम्हीच असे चित्र दिसू लागेल. संयुक्त कुटुंबात आम्ही आणि आम्ही सर्व असे चित्र होते.
 कौटुंबिक एकोपा , सर्वाना वाटून दिलेल्या किंवा स्वतः होऊन स्वीकारलेल्या जबादर्य यात प्रत्येकाला कौटुंबिक जीवन
 आश्वासक वाटत होत. मोठ्यांचा आदर ,त्यांचा सांभाळ सहज होई. आज घरातील म्हातारा म्हातारी कुणी सांभाळायची याचा
वाद होतो न पेक्षा वृद्धाश्रम ठरलेलाच.
आड.शिरीष शिंदे -वरील दोन्ही चित्रे ही कुटंबपध्दतीचीच आहेत यातील कुटंब म्हणजे आपण जे नातेसंबंध अंगीकारलेले आहे
त्याच्याशी इतर नात्यांची असणारी गुंफण; पहिल्या चित्रात एकत्र कुटूंब पध्दती दिसत आहे तर दुस-या कुटंबात विभक्त कुटूंब
म्हणजे 'हम दो हमारे दो'असे चित्र दिसत आहे; दोन्ही पध्दतीत कुटूंब असणे याला आजच्या काळात अतिशय महत्व आहे;
आधुनिक कालानुसार कुटूंब या व्याख्येला कोलमडून लावणारे लिव्ह इन रिलेशनशिप सारखे प्रकार समाजमान्य होवुन
न्यायालयाकडुन त्याला शिक्कामोर्तुब मिळू लागलेले आहे; खरंतर कालानुरूप यात बदल होत गेलेत ; वाढते शहरीकरण, मोठ्या
व ऐसपैस घरांचा अभाव व उत्पन्न हीसुध्दा काही कारणे आहेत; त्याचबरोबर एकत्र कुटूंबातून होणारे संस्कार, कुटंबातील
प्रत्येक घटकाचा ऐकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा, आत्मीयता प्रेम यातही कालानुरूप बदल होत गेले; मी वकीलीव्यवसायात
असलो तरी मी जेव्हा कौटुंबिक न्यायालयात कामासाठी जातो त्यावेळी तिथे असणारे पक्षकार, वाढलेले वैवाहिक वाद ही सर्व
दृश्य बघताना कमालीचे नैराश्य येते; एकत्रित रहात असताना ऐकमेकांना गुणदोषासह स्वीकारणेची वृत्ती लोप पावलेली दिसते
 किंवा प्राप्त साधनात अॅडजस्ट करणे किंवा तडजोडीने कलह मिटविणे अलीकडच्या पिढी ला नको वाटते शिवाय
आत्मसन्मान, इगो, यामुळे कोठेही कमीपणा घेण्याची मानसिकता नसते; एकत्रित कुटंबपध्दतीतील कर्ता वा कारभारी याचा
 सर्वांना धाक असायचा त्याचा शब्द हाच अंतिम शब्द मानला जायचा व एकहाती कारभारामुळे भांड्याला भांडे जरी लागले
तरी घरातल्या घरात सामोपचाराने मिटवामिटवी व्हायची; चार पैपाव्हणे सहज सपादुन जायचे आता विभक्त कुटूंबात
 पाव्हण्यारावळ्यची उठबस करणे अशक्यच झाले आहे; मी बरेचसे वाद असे बघितलेतकी बायकोची आईच लेकीला चिथावणी
 देवुन स्वतंत्र संसार करण्यासाठी प्रोत्साहन देते मग त्यावरून वाद; ज्या आईबापाने लहानाचे मोठे करून वाढवले त्यांना
एकाएकी वा-यावर सोडुन देवुन स्वतंत्र राहणे त्याच्या मनाला पटत नाही व एकीकडे बायको व एकीकडे आईबाबा अशा द्विधा
 अवस्थेत वाद वाढतच राहतो; सासुसास-यांना डस्टबीन अशी उपाधी देणारी सून कसा संसार यशस्वी करायची अर्थात
नाण्याला दोन बाजू आहेत नवरेकंपनीसुध्दा पैशाच्या हव्यासातुन अय्याशी व व्यसनी झालेली आहेत म्हणूनच विषय खूपच
 व्याप्त असलेने एवढेच म्हणेन की एकत्रित असो वा विभक्त; कुटूंब हे कुटंबच असायला हवे ; तिथे प्रेम जिव्हाळा आत्मीयता
व ऐकमेकांशी तडजोड करणेची वृत्ती असायला हवी..धन्यवाद.
गंगाधर टिपरे-कालच्या चर्चासत्रातले चित्र कोणता विषय दर्शवतंय, हे सर्वानीच बरोबर जाणलंय आणि त्याप्रमाणे सर्वानीच
 आपापली मते अगदी परखडपणे मांडली आहेत. या दोन कुटुंब पद्धतींच्या बाबतीत अनेकांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. जसे
 की, प्रेम-जिव्हाळा, संस्कार, आर्थिक बळकटी, संगोपन, वर्चस्व, मर्यादित स्वातंत्र्य इत्यादी. हे सर्व मुद्दे थोड्या फार फरकाने
कधी फायदेशीर तर कधी त्रासदायक किंवा जाचक होऊ शकतात. हे सर्व मुद्दे व्यक्तीसापेक्ष आहेत. 
पूर्वी बहुतकरून शेती हा कॉमन व्यवसाय असल्यामुळे ही एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आली असावी. अशा एकत्र कुटुंब
 पद्धतीत वयाने मोठ्या व्यक्तीचा एक आदरयुक्त दरारा असायचा. कुटुंबातील इतर लोक त्या व्यक्तीच्या अधिपत्याखाली
नांदत असत. आनंदाने, की बळजबरीने हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. त्यावेळीही घरात धुसफूस ही असायची, पण ती उघडपणे
कोणी बोलायला धजावत नसे. काहीका असेना, पण पूर्वी लोक एकत्र राहत असत. 
अनेकांनी इथं एकत्र कुटुंबातील फायद्या तोट्यांची छान चर्चा केली आहे आणि एकत्र कुटुंब पद्धतीला प्राधान्य दिलंय. सर्वानीच
 खूप चांगले चांगले विचार मांडले आहेत; पण मग अचानक विभक्त कुटुंब पद्धतीची गरज माणसांना का जाणवू लागली
असावी, हा विचार मनात आल्यावाचून राहत नाही.काळ बदलला तसा काळाबरोबर माणसाची मानसिकता बदलली, जागेच्या
 अडचणी, शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या, मुलांसाठी अनेक नवनवीन शैक्षणिक दालनं उघडली गेली. नवीन नोकरी-व्यवसायाचे
मार्ग निघाले. त्यामुळे माणसांच्या महत्वाकांक्षा वृद्धिंगत होऊ लागल्या. महत्वाकांक्षेबरोबरच स्वार्थभाव देखील वाढीस लागला
 आणि मग यातूनच विभक्त कुटुंब पद्धत अस्तित्वात आली असावी. आज महागाईने कळस गाठला असल्यामुळे नवरा-बायको
दोघांनाही अर्थार्जन करणे क्रमप्राप्त झाले आहे. नवरा-बायको दोघेही नोकरी करत असल्यामुळे विभक्त कुटुंब पद्धत जास्त
फोफावली. (क्रमशः)
एकत्र कुटुंबात माणसांना जास्त गृहीत धरलं जातं. आई-बाबा, काका-काकू घरीच आहेत ना, मग ते मुलांची काळजी घेतील.
 विभक्त कुटुंबात माणसाला जबाबदारीची जाणीव होते. अनुभवाने तो घडत जातो. मला वाटतं, की विभक्त कुटुंब हे एक
प्रकारचं स्वावलंबन आहे. इथं नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे दोघेही आपापली जबाबदारी पार पाडत
 असतात. एकत्र कुटुंब पद्धती चांगली की विभक्त कुटुंब पद्धती चांगली, हा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो. दोन्ही बाजूंचा
साकल्याने विचार केल्यावर मला तरी असं वाटतं, की आजच्या काळाला विभक्त कुटुंब पद्धतच फायदेशीर आहे. एकत्र राहून
 मग विभक्त होण्यापेक्षा, अगोदरच विभक्त होऊन, मग एकत्र कुटुंब पद्धतीतील कर्तव्ये आनंदाने पार पाडताही येऊ शकतात.
असो. सर्वांनी आजच्या या चर्चेत हिरीरीने भाग घेऊन आपली प्रांजळ मते माडली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
आजच्या या विषयाची समीक्षा मी माझ्या कुवतीनुसार केली आहे. कुठे काही चुकलं असेल मला समजून घ्याल अशी अपेक्षा
 बाळगतो. (संपूर्ण)

आसावरी इंगळे-एकत्र कुटुंब पद्धती विरुध्द विभक्त कुटुंब पद्धती', चित्रातील या विषयावर उत्तम समीक्षणाबद्दल धन्यवाद
जीटी! समीक्षणात जीटींनी दोन्ही कुटुंब पद्धतींची वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अतिशय सुरेख मीमांसा केली आहे. 
एकत्र कुटुंब पद्धती चांगली की विभक्त कुटुंब पद्धती चांगली हा खरंच वादाचा मुद्दा आहे. माझ्या मते दोन्ही पद्धतीत काही
फायदे तर काही तोटे आहेत. याविषयावरील चर्चा बरेचदा आपल्या अनुभवांवरही आधारित असते. परंतु 'आपण' या शब्दात
 सर्वांना सामावून घेण्याची जी ताकद आहे ती 'आम्ही' शब्दांत नाही. अगदी तसेच एकत्र कुटुंब पद्धतीत घरातील सर्वांनी
मिळून जीवन जगण्याचे जे फायदे आहेत ते विभक्त कुटुंब पद्धतीत नाहीत, असे मला तरी वाटते. शेवटी हात पाय हलणे
 कमी किंवा बंद झाल्यानंतर घरातील ज्येष्ठ मंडळींनी जायचे तरी कुठे, हा प्रश्न मला फारच भेसूर वाटतो. अर्थात एकत्र
 कुटुंब पद्धतीत अपेक्षित 'स्पेस' मिळत नाही, बरेचदा मन मारून जगावे लागते परंतु त्याची सकारात्मक बाजू पाहता ही
तडजोड जास्त योग्य वाटते. तसेही तडजोडीशिवाय जीवन ते कुठले? हल्लीच्या इ-युगात तर किमान मुलांच्या भविष्याकडे
पाहता एकत्र कुटुंब पद्धती अधिक चांगली वाटते. मुलांवर लक्ष तरी असू शकते. विभक्त कुटुंब पद्धतीत आईवडील जबाबदार्या
 पेलता पेलता इतके मेटाकुटीला येतात की घरीच पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, तिथे मुलांशी संवाद साधणार कुठून?
'चित्रावरून चर्चा' हा अगदी वेगळा उपक्रम आपण काल घेतला. या चर्चासत्राला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आजचे
समीक्षणाचे काम तसे किचकटच होते तरीही जीटींनी वेळात वेळ काढून केलेल्या विस्तृत समीक्षणाबद्दल त्यांचे मनःपूर्वक

आभार!