Monday, November 29, 2021

यंत्र मानव विचार करू लागला तर...

यंत्र मानवाला विचार करता येऊ लागला तर... नुकताच मी एका मॉलमध्ये गेलो होतो तिथे काही कामे यंत्र मानव करताना दिसले.उदाहरणार्थ मी पाहिले की मॉलमधील फरशी साफ करण्यासाठी एक रोबोट अर्थात यंत्रमानव बसवलेला आहे. मी शांतपणे त्या यंत्रमानवाचे काम पहात होतो.तो भिंतीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी सरळ रेषेत चालत तो जमिनीवरचा कचरा स्वाहा करत होता.त्याला सोपवलेली जबाबदारी तो इतक्या इमान इतबारे करत होता की त्याचे ते काम पहातच रहावे असे वाटत होते. सहजच मनात विचार आला की या यंत्रमानवाच्या जागी खराखुरा माणूस असता तर त्याने हेच काम करताना किती चुकारपणा केला असता? त्याच्या मागे एक सुपरवायझर पुन्हा त्या सुपरवायझरचा मुकादम एवढे मनुष्यबळ ठेऊनसुध्दा कामात हलगर्जीपणा झाला असता;पण हा यंत्रमानव त्याला दिलेल्या आदेशाचे किती तंतोतंत आणि शिस्तीने पालन करत होता... माणसाने त्याच्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर असे कितीतरी प्रकारचे यंत्रमानव तयार केले.माणसाचे कष्ट कमी करून सगळी कामे अगदी चुटकीसरशी व्हावीत,मानवी अंगमेहनत कमी व्हावी म्हणून, माणसाच्या बुध्दिवर अकारण पडणारा ताण कमी व्हावा, एकूणच उत्पादन क्षमता वाढावी म्हणून अशा यंत्रमानवांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली.या यंत्रासाठी काही ठराविक प्रोग्राम डिझाईन करून त्याला दिलेल्या ठराविक आदेशप्रणालीच्या भरवशावर माणसाची अनेक किचकट वेळखाऊ कामे सोपी करण्यात माणूस यशस्वी झाला. समजा काही चमत्कार झाला आणि माणसाने तयार केलेले यंत्रमानव विचार करू लागले तर? मी विचार करू लागलो.... शेवटी यंत्रमानव ही मानवाचीच निर्मिती आहे त्यामुळे त्याने बनवलेला यंत्रमानव विचार करू लागला तर तो माणसासारखाच विचार करणार ना? मग सध्या इमाने इतबारे जमिनीची स्वच्छता करणारा यंत्रमानव अचानक माणसासारखा विचार करेल की ' काल तर ही जमीन मी स्वच्छ केली.समोर कचरा किंवा धुळही दिसत नाहीये,मग मी विनाकारण कशाला फिरत राहू? त्यापेक्षा जरा आराम केला तर मालकाला थोडेच समजणार आहे? त्याला विचार करण्याची शक्ती मिळाल्याने स्वतः वेगळ्या पद्धतीने काम करणे सुरू होईल.चुकारपणा् सुरू होईल. यंत्राला माणसाने दिलेली आज्ञावली कुचकामी होऊन तो यंत्रमानव स्वतःच्या विचारप्रणालीवर निर्णय घ्यायला लागेल.' काम करायचे की नाही, आज सुट्टी घ्यायची का, आज थोड्या कमी चकरा मारू ' अशा प्रकारे विचार करून तो मनमानी करायला लागेल. पैसे मोजून घेणारा आणि देणारा यंत्रमानव असाच स्वतःच्या मनाने वागायला लागला तर आर्थिक क्षेत्राचा खेळखंडोबा होऊन जाईल. विविध इंडस्ट्रीजमधील यंत्रमानव जर त्यांना सोपवलेली कामे सोडून स्वतः विचार करून वेगळे वागायला लागले तर उत्पादनांची गुणवत्ता मार खाईल. थोडक्यात यंत्रमानव जित्याजागत्या माणसासारखा विचित्र पद्धतीने वागायला लागेल आणि त्याला बनविण्यासाठीचा माणसाचा उद्देशच निकालात निघेल... यंत्र मानव विचार करायला लागला तर माणसात आणि त्याच्यात फरक रहाणार नाही किंबहुना माणसाला यंत्रमानव आपल्याला वरचढ होतो आहे हे सहनच होणार नाही.मग माणूस आपल्या अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावर यंत्र मानवाचा विनाश घडवून आणेल आणि या बाबतीत मानवाने केलेली प्रगती शून्य होऊन जाईल.... म्हणून माणूस यंत्रमानव त्याच्या आज्ञेप्रमाणे च काम करेल स्वतः विचार करू शकणार नाही याची काळजी घेत आला आहे आणि पुढेही घेत राहील कारण सर्व प्राणिमात्रात मनुष्य हा प्राणी फारच खतरनाक आहे! ©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

Friday, November 26, 2021

ज्ञानी- अज्ञानी

ज्ञानी-अज्ञानी ज्ञान अर्थात एखाद्या गोष्टी बाबतीत सखोल वास्तवाची जाणीव हा माणसाच्या जन्माबरोबर मिळणारा गुण नाही.प्रत्येक बाळ हे या पृथ्वीतलावर आल्यावर सारखेच असते.थोडीफार प्रत्येकाची आकलनशक्ती वेगळी वेगळी असू शकते;पण ज्ञान ही निश्चितच पुढच्या टप्प्यावर मिळण्याची गोष्ट आहे. दुसरे असे की प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रातले परिपूर्ण ज्ञान असणे केवळ अशक्य आहे.वाढत्या वयाबरोबर ज्ञानार्जन करण्याची भूकही वाढत जाते;पण व्यक्तीच्या आजूबाजूचे संस्कार,त्याला उपलब्ध असलेल्या संधी तसेच त्या व्यक्तीची ज्ञान ग्रहण करण्याची कुवत याप्रमाणे ती व्यक्ती कोणत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकते हे ठरते. मी असे मुळीच मानत नाही की आयुष्यात प्रत्येकाला योग्य संधी मिळेल पण असेही घडत नाही की इथला संधी मिळालेला प्रत्येकजण निश्चितपणे ज्ञानी होईल इथे प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार ज्ञानार्जन करतच असतो;पण एका क्षेत्रात प्रावीण्य असलेली व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रात तशी अज्ञानीच असते. समाजात वावरताना मात्र आपल्याला काही स्वतःला सर्वज्ञ समजणारी माणसे पदोपदी भेटतात.त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत आहे असे निदान त्यांना तरी वाटते.एखाद्या बाबतीत आपल्याला ज्ञान नाही हे कबूल करणे अशा व्यक्तींना कमीपणाचे वाटते! कोणतीही व्यक्ती स्वतःला परिपूर्ण समजत असेल तर तो वास्तवातील सर्वात मूर्ख व्यक्ती आहे असे माझे मत आहे. या जगातला प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे,प्रत्येकाची आवड वेगळी आहे.ज्ञानार्जनाची प्रत्येकाची कुवत वेगळी आहे.एखाद्या व्यक्तीला मिळणारी संधी, अंगिकारता आलेली कौशल्य यावर त्या त्या व्यक्तीचे ज्ञान कमी जास्ती असू शकते .म्हणूनच कुणी कुणाला अज्ञानी म्हणून हिनवणे चुकीचे आहे तसेच मी सर्वज्ञानी आहे असा अहंगंड बाळगणे सुध्दा पूर्णपणे चुकीचे आहे. हजार अज्ञानी परवडले पण एखादा अर्धवट ज्ञानी खूपच त्रासदायक ठरतो. जगातील ज्ञानाचे भांडार अमर्याद आहे आणि कोणीही व्यक्ती प्रत्येक क्षेत्रातला तज्ज्ञ होऊ शकत नाही. तसा तर प्रत्येकजण आयुष्यभर विद्यार्थीच असतो. प्रत्येकाने या मर्यादांची जाणीव नक्कीच ठेवायला हवी. कसे ओळखायचे हे ज्ञानी-अज्ञानी? कणभर ज्यास ज्ञान नाही वास्तवाचे परी भान नाही तया मूर्ख असे समजावे हात चार लांबच राहावे ! फारसे जरी ज्ञान नाही शिकण्यास नवे ना नाही असंस्कारी तया समजावे संस्कारांनी सुज्ञ करावे ! तसा तो अडाणी नाही ज्ञानाचे त्यास भान नाही निद्रेत मग्न समजावे जागृतीचे यत्न करावे! मुळी ज्यास ज्ञान नाही स्वीकाराचे भान नाही लबाड त्यास समजावे ढोंग तयाचे उघड करावे ! सर्वज्ञानी परी गर्व नाही ज्ञान दानास नां नाही गुरुपदी योग्य समजावे ज्ञानामृत ग्रहण करावे ! तर अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी प्रत्येकाने ज्ञानार्जनाची कास धरावी.... प्रत्येकास अधिकाधिक ज्ञानार्जनासाठी शुभेच्छा.... ©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

Wednesday, November 24, 2021

हट्टी माणसे हटवादी माणसे

हट्टी माणसे हटवादी माणसे... 'हट्टी आहे हो खूप तो' एखाद्या लहान मुलासाठी हे वाक्य आपण अनेकदा ऐकलेले असते.लहान मुलांचा हट्टीपणा हा सर्वांनी गृहीत धरलेला असतो किंबहुना प्रत्येकजण लहानपणी हट्टी असतोच असतो. एखाद्या लहान नासमज मुलाने एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे आणि परिस्थिती असो अथवा नसो तो हट्ट पालकाने पुरवणे हे अगदी साहजिक आहे;पण एखादा वयाने आणि बुध्दीने सशक्त असलेला माणूस ' मी म्हणतो तेच खरे' असे म्हणून आपले चुकीचे म्हणणे इत्तरांवर लादत असेल तर? नक्कीच अशा हट्टीपणाचे कुणी समर्थन करणार नाही. हट्टीपणा या विषयाबद्दल जेव्हा चर्चा होते त्यावेळी तीन व्यक्तींचा हट्ट पुरवावाच लागतो असे सर्रास म्हटले जाते.ते म्हणजे बालहट्ट, राजहट्ट आणि स्रीहट्ट .लोक चेष्टेने म्हणतात एकवेळ पहिले दोन हट्ट नाही पुरवले गेले तरी हरकत नाही:पण स्री हट्ट पुरवणे मात्र टाळता येत नाही. एखाद्या गोष्टीचा कट्टर आग्रह म्हणजे हट्ट. हा हट्ट टोकाचा असेल तर मात्र बऱ्याचदा त्रासदायक ठरतो. पुराणात असे अनेक हट्टाचे आणि त्यापायी झालेल्या नुकसानीचे दाखले पानोपानी दिसतात. रामायणात कैकयी हट्टामुळे रामाला वनवासात जावे लागले तर सीतेच्या सोनेरी हरणाच्या हट्टापायी पुढचे रामायण घडले असे म्हटले जाते.अनेक पौराणिक व ऐतिहासिक कथांमध्ये कुणा ना कुणाच्या हट्टामुळे टोकाच्या घटना घडल्याचे दिसते. हट्ट ही गोष्ट चांगली की वाईट? मला वाटते हट्ट चांगला अथवा वाईट नसतो तर त्या हट्टामुळे होणारे परिणाम चांगले अथवा वाईट असू शकतात.एखादा विद्यार्थी म्हट्ट म्हणून उच्च विद्याविभूषित होऊ शकतो तर एखादा विद्यार्थी हट्टाने व्यसनांच्या अथवा कुमार्गाने जातो आणि आपल्या जीवनाचे मातेरे करून घेतो म्हणजेच हट्ट कशाचा आहे यावर तो हट्ट चांगला की वाईट हे ठरेल. हट्टाने प्रगती होऊ शकते तशीच अधोगतीही होऊ शकते.हट्टाने केलेल्या कष्टाने आयुष्याचे सोने केलेल्या अनेक माणसांची यशोगाथा आपण वाचतो तशीच वावग्या हट्टामुळे सुखात असलेला जीव दारूण दुःखात लोटलेली माणसेही समाजात बघायला मिळतात.हट्टापायी आयुष्याची धूळधाण झालेली माणसेही पावला पावलावर बघायला मिळतात. हट्ट आणि हटवादीपणा यात निश्चितच फरक आहे.आग्रह आणि दुराग्रह यात जो फरक आहे तोच फरक इथेही आहे.सर्वसमावेशक हितासाठी धरलेला हट्ट नक्कीच भल्यासाठी असेल;पण केवळ मी म्हणतो म्हणून किंवा स्वतःच्या अहंकरापोटी केलेला हटवादी पणा त्या संबंधित व्यक्तीबरोबर सामाजिक आरोग्यासाठीही महाभयंकर ठरू शकतो त्यामुळे हट्ट किती आणि कसला याचे तारतम्य नक्कीच असायला हवे. अशा हट्टापायी काय काय होऊ शकते ?... करतो तो पुरा बरबाद,नात्यात येई दुरावा, हवा का वेगळा पुरावा,नाशच होई हट्टापायी! माझेच खरे जे म्हणती,दुराग्रह ना सोडती , विनाश ओढवून घेती, दुःखी होती हट्टापायी! नाही वास्तवाचे भान, अंगी वसे दुराभिमान, अहंकाराने त्या ग्रासला, मातीस मिळे हट्टापायी! बरोबर ना? आता तुम्हीच ठरवा हट्टी व्हायचं की हटवादी? ©प्रल्हाद दुधाळ. पुणे 9423012020

Tuesday, November 23, 2021

सजगता..काळाची गरज

सजगता अर्थात चौफेर जागरूकता अंगी असणे ही आज काळाची गरज आहे.तुम्ही कोणीही असा,तुम्ही कोणत्याही वयोगटात असा,दैनंदिन आयुष्यात जगताना पावलोंपावली तुम्ही सजग असायलाच हवे. दररोजच्या वर्तमान पत्रात किंवा बातम्यात तुम्ही अनेक फसवणुकीचे नवे नवे प्रकार संबंधित भामट्यांनी अंगिकरलेले सतत वाचत वा ऐकत असता... उदाहरणार्थ ... घरात एकटे गाठून वृध्द व्यक्तीला लुबाडले. पॉलिशच्या बहान्याणे महिलेचे दागिने लांबवले. फोनवर ओ टी पी विचारून खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले. किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड संबंधी फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा. अशा त्या मानाने जुनाट पध्दती बरोबरच डिजिटल दुनियेत फसवणुकीचे नवे नवे प्रकार शोधून अपहरण /लुबाडणूक /फसवणूक असे प्रकार सर्रास घडत आहेत. कधी कधी तर अल्प लाभाच्या आमिषाला बळी पडून लोक विविध मार्गांनी अशा गुन्हेगारांनी लावलेल्या सापळ्यात अलगद सापडतात आणि राजरोसपणे फसवले जात आहेत. माणसाची एकदा अशी फसवणूक झाली की माणसाला "आपण इतक्या सहजासहजी फसलोच कसे?" असा प्रश्न पडतो.आर्थिक नुकसान तर होतेच त्याबरोबर अनेक प्रकरणात प्रचंड मानसिक त्रासही भोगावा लागतो.स्वतःला तांत्रिक तज्ज्ञ समजणाऱ्या व्यक्तीलाही संपूर्णपणे फसल्यानंतरच आपली हुशारी किती फोल आहे हे कळते. आजकाल लोकप्रिय झालेल्या ऑनलाईन खरेदी व इतर बँकिंग व्यवहारांमध्ये वेळेची आणि श्रमाची प्रचंड बचत होते याबद्दल दुमत असायचे कारण नाही; पण असे व्यवहार करताना पुरेसे सजग असणे गरजेचे आहे.कुणीतरी पाठवलेल्या कोणत्याही ऑनलाईन लिंक ला क्लिक करण्यापूर्वी सजगपणे त्या लिंक ची तपासणी करणे आवश्यक आहे. आपल्या आर्थिक तिजोरीच्या किल्ल्या अर्थात पासवर्ड ओटीपी कार्ड वा खात्याचे डिटेल्स कुणी मागते आहे म्हणून देणे म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. फेसबूक अथवा व्हॉट्स ॲप सारख्या आभासी जगातील मैत्रीच्या माध्यमातून व्यवहार करताना खूप सावध असणे गरजेचे आहे. कधी कधी तुमच्या स्वभावाचा पध्दतशीर अभ्यास करून तुम्हाला टार्गेट केले जाऊ शकते तर तुमच्या वयाचे तुमच्या एकटेपणाचे, तुमच्या आजाराचे भांडवल करून लोक तुमच्याशी सलगी वाढवून तुमच्या खाजगी आयुष्यात प्रवेश मिळवतात.नात्यात व्यवहार येतो आणि तुम्ही अलगद फसता.अशावेळी तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थीती जीवनात येते त्यामुळे स्वभावात सजगता असणे हे अत्यंत गरजेचे आहे. सध्याचा जमाना बोकाळला स्वार्थ भोळेपण व्यर्थ ध्यानी घे रे म्हणूनच आजच्या युगात ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्यवहारच काय पण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सजगपणे वागणे बोलणे ही काळाची गरज आहे. पटतय ना? © प्रल्हाद दुधाळ पुणे (9423012020)

Monday, November 22, 2021

विवेक...एक विचार

विवेक विवेक म्हणजे नक्की काय? मला असे वाटते विवेक म्हणजे सारासार तारतम्य! जीवनातल्या चांगल्या आणि वाईटात फरक करण्याची हातोटी! योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची माणसाची क्षमता म्हणजेही विवेकच! हा विवेक ज्याच्या अंगी आहे त्याला आयुष्यात सहसा अपयशाचा सामना करावा लागत नाही,कारण ज्या गोष्टीत यश मिळेल असेच काम हातात घ्यायची सारासार बुद्धी त्या व्यक्तीला अंगी असलेल्या विवेकामुळे लाभलेली असते. ज्यांच्या अंगी विवेक असतो त्या व्यक्तींच्या अंगी प्रचंड सहनशीलता असते कारण विवेक जागा ठेऊन निर्णय घेताना खूप संयम ठेवावा लागतो. माणसाच्या आयुष्यात त्याला अनेक चढउतारांचा संकटांचा सामना करावा लागतो.अनेकदा मानसिक परिस्थिती दोलायमान असते.कधी कधी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर माणसाला लढावे लागते.प्रचंड कष्ट करावे लागतात.हे कष्ट कधी अंगमेहनत स्वरूपात असतात तर कधी ही बौद्धीक स्वरूपाची मेहनत असते. अनेकदा निर्णय घेताना त्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी त्या व्यक्तीवर असते अशावेळी खरा विवेकाचा कस लागतो .कधी निर्णय घेताना निती अनितीचा प्रश्नही असतो त्यावेळी तर निर्णय घेताना नुसते बुध्दीचे काम नसते तर संबंधित लोकांच्या सामाजिक व मानसिक स्तरावर होणाऱ्या परिणामांचा विचार होणेही आवश्यक असते.अशावेळी सदविवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावे लागतात. भले काय बुरे काय, काय केले तर काय होईल.निर्णयाचे चांगले परिणाम काय आहेत, वाईट परिणाम काय आहेत,कोण आनंदी होईल, कुणाला त्रास होईल, कोण दुखावले जाईल आणि या सगळ्यांच्या संभाव्य प्रतिक्रिया काय असतील? त्या प्रतिक्रियांचे काय पडसाद उमटू शकतात? त्याचे समाजावर किंवा कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम लगेच किंवा कालांतराने दिसतील इथपर्यंत लांबवर विचार करण्याचे तारतम्य केवळ विवेकाने साधता येते .... थोडक्यात काय माणसाच्या जीवनात विवेक या गुणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जगताना रात्रंदिवस हर क्षणाला हा विवेक जागा ठेवावा लागतो.त्यातल्या त्यात आनंदी जीवनासाठी हे तारतम्य किंवा विवेक खूपच महत्त्वाचा आहे? बरोबर ना? © प्रल्हाद दुधाळ 9423012020