Friday, November 26, 2021

ज्ञानी- अज्ञानी

ज्ञानी-अज्ञानी ज्ञान अर्थात एखाद्या गोष्टी बाबतीत सखोल वास्तवाची जाणीव हा माणसाच्या जन्माबरोबर मिळणारा गुण नाही.प्रत्येक बाळ हे या पृथ्वीतलावर आल्यावर सारखेच असते.थोडीफार प्रत्येकाची आकलनशक्ती वेगळी वेगळी असू शकते;पण ज्ञान ही निश्चितच पुढच्या टप्प्यावर मिळण्याची गोष्ट आहे. दुसरे असे की प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रातले परिपूर्ण ज्ञान असणे केवळ अशक्य आहे.वाढत्या वयाबरोबर ज्ञानार्जन करण्याची भूकही वाढत जाते;पण व्यक्तीच्या आजूबाजूचे संस्कार,त्याला उपलब्ध असलेल्या संधी तसेच त्या व्यक्तीची ज्ञान ग्रहण करण्याची कुवत याप्रमाणे ती व्यक्ती कोणत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकते हे ठरते. मी असे मुळीच मानत नाही की आयुष्यात प्रत्येकाला योग्य संधी मिळेल पण असेही घडत नाही की इथला संधी मिळालेला प्रत्येकजण निश्चितपणे ज्ञानी होईल इथे प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार ज्ञानार्जन करतच असतो;पण एका क्षेत्रात प्रावीण्य असलेली व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रात तशी अज्ञानीच असते. समाजात वावरताना मात्र आपल्याला काही स्वतःला सर्वज्ञ समजणारी माणसे पदोपदी भेटतात.त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत आहे असे निदान त्यांना तरी वाटते.एखाद्या बाबतीत आपल्याला ज्ञान नाही हे कबूल करणे अशा व्यक्तींना कमीपणाचे वाटते! कोणतीही व्यक्ती स्वतःला परिपूर्ण समजत असेल तर तो वास्तवातील सर्वात मूर्ख व्यक्ती आहे असे माझे मत आहे. या जगातला प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे,प्रत्येकाची आवड वेगळी आहे.ज्ञानार्जनाची प्रत्येकाची कुवत वेगळी आहे.एखाद्या व्यक्तीला मिळणारी संधी, अंगिकारता आलेली कौशल्य यावर त्या त्या व्यक्तीचे ज्ञान कमी जास्ती असू शकते .म्हणूनच कुणी कुणाला अज्ञानी म्हणून हिनवणे चुकीचे आहे तसेच मी सर्वज्ञानी आहे असा अहंगंड बाळगणे सुध्दा पूर्णपणे चुकीचे आहे. हजार अज्ञानी परवडले पण एखादा अर्धवट ज्ञानी खूपच त्रासदायक ठरतो. जगातील ज्ञानाचे भांडार अमर्याद आहे आणि कोणीही व्यक्ती प्रत्येक क्षेत्रातला तज्ज्ञ होऊ शकत नाही. तसा तर प्रत्येकजण आयुष्यभर विद्यार्थीच असतो. प्रत्येकाने या मर्यादांची जाणीव नक्कीच ठेवायला हवी. कसे ओळखायचे हे ज्ञानी-अज्ञानी? कणभर ज्यास ज्ञान नाही वास्तवाचे परी भान नाही तया मूर्ख असे समजावे हात चार लांबच राहावे ! फारसे जरी ज्ञान नाही शिकण्यास नवे ना नाही असंस्कारी तया समजावे संस्कारांनी सुज्ञ करावे ! तसा तो अडाणी नाही ज्ञानाचे त्यास भान नाही निद्रेत मग्न समजावे जागृतीचे यत्न करावे! मुळी ज्यास ज्ञान नाही स्वीकाराचे भान नाही लबाड त्यास समजावे ढोंग तयाचे उघड करावे ! सर्वज्ञानी परी गर्व नाही ज्ञान दानास नां नाही गुरुपदी योग्य समजावे ज्ञानामृत ग्रहण करावे ! तर अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी प्रत्येकाने ज्ञानार्जनाची कास धरावी.... प्रत्येकास अधिकाधिक ज्ञानार्जनासाठी शुभेच्छा.... ©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

No comments:

Post a Comment