Wednesday, April 16, 2014

वृत्ती-1

वृत्ती-1

“ माझं ही माझं आणि तुझं ही माझं " अशी मानसिकता असणाऱ्या माणसाचा स्वभाव जन्मत: तर नक्कीच तसा नसतो! अशा व्यक्तीच्या या वृत्तीचा अभ्यास करताना त्याचे बालपण कोणत्या वातावरणात गेले? कुठल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमध्ये तो वाढला? त्याचेवर कुणा कुणाचे चांगले/वाईट संस्कार झाले? या सर्व बाबींचा व्यवस्थितपणे विचार करावा लागेल! कुठल्यातरी प्रकारची असुरक्षितता त्याला वाटत असावी व त्यातूनच अशी स्वार्थी वृत्ती माणसात तयार होत असावी.जी गोष्ट हवी असते ती योग्य त्या वयात व योग्य त्या प्रमाणात  न मिळाल्यामुळे संधी मिळताच  माणूस कुठल्याही थराला जाऊन अशा गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. अश्या प्रकारे मिळवलेली गोष्ट त्याच्याकडून कुणी हिसकावून तर घेणार नाही ना? अशी भीती त्याच्या मनात कायम घर करून रहाते,मग तो अशा गोष्टींचा साठा करायला लागत असावा.मग- माझे आहे ते माझेच आहे पण इत्तरांकडे आहे, तेही फक्त माझ्याकडेच असले पाहिजे! अशा मानसिकतेपोटी त्याच्यामधील स्वार्थी वृत्ती त्याच्या मनात जागी होत असावी व शेवटी तोच त्यांचा स्वभाव होत असावा! आपल्याकडे आजूबाजूचे लोक वेगळ्या नजरेने बघत आहेत याची अशा माणसांना जाणीवच होत नसावी!!!. .......प्रल्हाद दुधाळ.

Thursday, April 10, 2014

ओळख.

ओळख.
आपण जेंव्हा बोलत असतो त्यावेळी सतत ‘मी’पणाचा पाढा म्हणत असतो. मी कोण आहे माहीत आहे का? माझी कोणा कोणाशी ओळख आहे माहिती आहे का? मी अमक्या चा मित्र/नातेवाईक/ओळखीचा इत्यादी इत्यादी अशी आपली ओळख करून देत असतो.मला तुम्ही ओळखत नाही का? मी यांव आहे आणि मी त्यांव आहे! अशा प्रकारे माणूस आपली ओळख सांगत असतो.ही ओळख सांगताना आपण कुणीतरी स्पेशल असल्याचा अविर्भाव शब्दा शब्दात ठासून भरलेला असतो. स्वत:बद्दल व स्वकर्तुत्वा बद्दल वास्तव अभिमान जरूर असायला हवा, पण हा अभिमानाला जेंव्हा गर्वाची बाधा होते तेंव्हा माणूस हा मीपणाचा ढोल अजूनच जोरात वाजवायला लागतो! माणूस सर्वात जास्त कुणावर प्रेम करत असेल तर ते या मीपणावर! खर तर जन्माला आलेल्या प्रत्येकाची किमान एक ओळख असतेच! अगदी बेवारस म्हणून सापडलेल्या बालकाची सुध्दा “ बेवारस” अशी एक ओळख असते! प्रत्येक व्यक्ती कुणाचे तरी अपत्य असते,कुणाचेतरी नातवंड असते,कुणाचा भाऊ अथवा बहीण असते अशी अनेक सख्खी, चुलत, मावस, वा दूरची जवळची नाती या स्वरूपात तर त्याची ओळख असतेच पण त्या बरोबरच त्याचे आडनाव, धर्म,जात,पोटजात अशा वेगवेगळ्या प्रकारची त्याची ओळख जन्मापासूनच त्याला चिकटलेली असते. पुढे घराणे,व्यवसाय,उपाधी, पुरस्कार ,प्रसिद्धी अथवा कुप्रसिद्धी यामुळे सुद्धा ही ओळख अजून घट्ट होत जाते.लग्नानंतर अमक्याचा जावई वा सून,अमक्याची बायको अथवा नवरा अशी ओळखीची लांबड वाढतच जाते.समाजात ही ओळख जेवढी मोठी तेवढे त्या व्यक्तीचे नाव मोठे असे गणित मांडले जाते! वास्तव आयुष्यात ही वेगवेगळ्या पातळीवरची ओळख त्या व्यक्तीला नाव व प्रतिष्ठा मिळवूनदेत असते. त्याच्या या ओळखी मुळे समाजात त्याला मान सन्मान मिळतो असा सर्वमान्य समज आहे.आपल्या समाजातील या ओळखीमुळे जे महत्व त्याला प्राप्त झालेले असते ते महत्व दिवसेंदिवस वाढायला हवे असे त्याला वाटत रहाते या मानसिक गरजेतून मग तो मीपणाची जाहिरात जेथे संधी मिळेल तेथे करायला लागतो अशा कायम आत्मस्तुती करणाऱ्या माणसाला काही काळानंतर सगळेजण अहंकारी व्यक्ती म्हणून ओळखायला लागतात. एक नवीन प्रकारची ओळख त्याला मिळू लागते! अशा व्यक्तीला एखाद्या प्रसंगी जर त्याला अपेक्षित असलेल्या प्रकारचे महत्व दिले गेले नाही तर त्याच्या अहंकाराला ठेच लागते. तो या गोष्टीला आपला जाणीवपूर्वक केला गेलेला अपमान मानतो व याला कारणीभूत असलेल्या सबंधित व्यक्तीला आपला वैरी मानायला लागतो! त्याचा द्वेष करायला लागतो.संधी मिळेल तेथे तो याचे उट्टे काढायचा प्रयत्न करतो.
खरच अशा बेगडी ओळखीमुळे मिळालेली प्रतिष्ठा एवढी महत्वाची असते का? सत्ता संपत्ती मान संन्मान यानेच माणसाची ओळख असायला हवी का? एका आध्यात्मिक ट्रेनिंग मध्ये“तुम्ही कोण आहात?” हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो. पहिल्या पाच सहा वेळा त्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तरे मिळतात. जसे - प्रथम व्यक्ती आपले नाव/आडनाव सांगते. मग कुणाचा मुलगा आहे ते सांगितले जाते.नंतर कुणाचा नातू/पणतू/बहीण/भाऊ/नातेवाईक अशी उत्तरे मिळतात. त्यापुढे धर्म जात,शिक्षण,पदव्या ,पुरस्कार,अधिकार ,नोकरी,व्यवसाय यांचा आधार घेऊन व्यक्ती स्वत:ची ओळख तेत रहाते. पण पुढे “तू खरच कोण?”या प्रश्नाला उत्तर शिल्लक रहातच नाही! त्याला आपली ओळख सहा सात वाक्यातच संपली असल्याची जाणीव होते व एकवेळ अशी येतेकी “ तू कोण आहेस?” या प्रश्नाला केवळ एकच उत्तर द्यावे लागते,ते म्हणजे “मी एक माणूस आहे!” आणि हीच त्याची खरी ओळख असते! कोणत्याही व्यक्तीची एक माणूस हीच एकमेव चिरंतन ओळख आहे! ही खरी ओळख टिकविण्याचा माणसाने खर तर आयुष्यभर प्रयत्न करायला हवा पण वास्तवात असे घडत नाही प्रतिष्ठेच्या खोटा कल्पना घेऊन आयुष्यभर तो जगत असतो,मी आणि माझे माझे म्हणत नीती-अनीती चे सगळे विधिनिषेध पायदळी तुडवून मोहापोटी सत्ता,संपत्ती गोळा करण्याचा तो आटापिटा करतो, जे मिळाले ते त्याने त्याचे समाधान होत नाही मग दिवसेंदिवस त्याची ही हाव वाढतच जाते. मोहाच्या या लाटेत तो वाहात जातो. अखंड धावत रहातोपण ज्या जगण्यासाठी हे सर्व तो करतो ते जगण मात्र राहून जात! जे मिळाले आहे त्याचा उपभोग घ्यायचं तसचं राहून जात आणि एक दिवस त्याचा शेवट होतो! जसा आला होता तसाच मोकळ्या हाताने त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागतो. एका मानसाचं मुल म्हणून त्याची प्रथम ओळख असते तर डेड बॉडी म्हणून त्याची शेवटची ओळख असते! मधल्या आयुष्यात त्याला मिळालेली ओळख त्याच्या शेवटच्या क्षणी ओळख वा वशिला लावायला कामाला येत नाही!
म्हणूनच मला वाटते आपण आता तरी स्वत:ला ओळखायला हवं, माणसासारख, माणसाशी माणुसकीने वागायला हवं सर्वांना माणसासारख वागवायला हव!
ओळख आता तरी स्वत:ला, आहेस तू एक ‘टिंब’,
महासागरातल्या विशाल, इवलासा एक ‘थेंब’!
तू रे आहेस नियतीच्या हातचे, एक ते बाहुले,
आस्तित्व इथले तुझे, ‘त्याच्या’ इशाऱ्या वरती हले!
भंगून गेली सुख शांती, ऐहिकाच्या मोहापायी,
नीती अनीती ची चाड, उरली तुला मुळी नाही,
फासे तुझे टाकतो तो निर्मिक, बैसुनिया त्या ‘तिथे’
मारू नको बढाई सांगून, मी आलो कोठून कुठे!
माझे माझे म्हणून या जगाला, कितीही तू रे सांग,
सुटते जसेच तसे हातचे म्हणताच तो ‘थांब’!
हे सगळ असंच सुचल म्हणून आपल्याला सांगितलं!
कृपया गैरसमज नको, मी कुणी अध्यात्मिक गुरु नाही!
......प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, April 9, 2014

संवेदनशील.

                      संवेदनशील .

              हे खरे आहे की प्रत्येकाला हे जग आपल्या मनाप्रमाणे चालावे असे वाटते. मी म्हणतो तेच खरे आहे असे त्याचे ठाम मत असते पण असा विचार करताना त्याला इत्तरांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायची मात्र अजिबात गरज वाटत नाही! असा अतिरेकी विचार करणारी माणसे असंवेदनशील असतात! अशी माणसे सामान्यपणे हेकेखोरही असतात.आपल्या मनाप्रमाणे सर्वांनी वागले पाहिजे असा त्यांचा दुराग्रह असतो. या उलट संवेदनाशील माणूस प्रथम समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार करतो. आपले योग्य असलेले म्हणणे समोरच्या व्यक्तीला समजाऊन सांगण्याचा व त्याच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न तो जरूर करतो,पण त्याच्या मनासारखेच घडायला हवे असा त्याचा अट्टाहास नसतो.अर्थात संवेदनाशील माणूस समझदार असतो व योग्य तेथे तडजोड करायची त्याची तयारी असते!
                   अशा इत्तरांच्या मनाचा सतत विचार करणाऱ्या माणसाची व्यवहारी जगात मात्र प्रचंड गोची होते! कोंडमारा होतो ! होते काय की, संवेदनाशील माणूस जगताना प्रत्येकाच्या मनाचा विचार करून निर्णय घेतो/वागतो.पण ज्याच्याशी तो असे वागतो ती व्यक्ती मात्र अनेकदा असंवेदनशील असते! कुणाच्याही मनाचा विचार करायचा असतो हे त्याचा गावीच नसते! असंवेदनशील माणूस स्वत: तर दु:खी होतोच पण आपल्या वागण्यामुळे आजूबाजूच्या विचारी माणसांना फक्त दु:खच देत रहातो.
           आजूबाजूच्या असलेल्या अशा बहुसंख्य हट्टी व दुराग्रही माणसांच्या वागण्यामुळे मुळात संवेदनाशील असलेला माणुसही काही काळानंतर निराश व्हायला लागतो. आपण सगळ्यां जगाचा विचार करतो पण आपला कोणीच विचार करत नाही असे नकारात्मक विचार तो करायला लागतो. मग तो सर्वांशीच कोरडेपणाने वागू लागतो! आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच, पण त्याबरोबरच आजूबाजूला वावरत असलेल्या माणसांच्या मनाचा विचारही आपण करायला हवा हे कर्तव्य मात्र तो सोयीस्करपणे विसरुन जातो. माणसांच्या अशा संवेदना जर बोथट होत गेल्या तर जगात सर्वत्र मनमानी होईल.
             थोडक्यात काय तर, निकोप समाज व्यवस्थेसाठी प्रत्येकाने समोरच्या माणसाच्या मनाचा विचार प्रथम करायला हवा! आपले मत लादण्या ऐवजी इत्तरांच्या मनाचा विचार व त्यांच्या योग्य मताचा आदर करायला हवा, आपल्या मनात असलेले सर्व खरेच आहे हा हेका बाजूला ठेऊन इत्तरांकडून वेगळा अधिक योग्य पर्याय समोर येऊ शकतो असाही विचार करायला शिकणे आवश्यक आहे. तेंव्हा एकदा आत्मपरीक्षण करून बघू या का? आपल्या चुकीच्या वागण्याचा कुणाला त्रास तर होत नाही ना?.
                                                                                                                                                                          ........प्रल्हाद दुधाळ.

Friday, April 4, 2014

आनंदी माणूस.

आनंदी माणूस.
                    काही माणसंच अशी असतात की त्यांच्या नुसत्या आजूबाजूला असलेल्या आस्तीत्वामुळे इत्तरांना मनाची प्रसन्नता लाभते.आनंद उत्साह अगदी त्यांच्या नसानसात भरून वाहात असतो.ते कायम सकारात्मक विचार करत असतात.संकटात असलेल्यांच्या मदतीला ते धावून जातात.प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे त्यांच्यामुळे आनंदाचा दरवळ आजूबाजूला पसरत असतो.अशा माणसाला कुठले ना कुठले दु:ख असणारच पण त्याचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर वा वागण्या बोलण्यात नसतो.स्वत: तर ते सतत आनंदात असतातच पण तो आनंद सगळ्यांनाच कसा मिळेल असे पहातात, इत्तरांची काळजी घेतात, सर्वांना अशा माणसाचा  खूप आधार वाटतो.असा माणूस आपल्या सभोवती असणे म्हणजे आपले  भाग्यच! मला वाटते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी माणूस नक्कीच  असतो! फक्त गरज आहे त्याला ओळखण्याची! एकदा का असा माणूस तुम्हाला सापडला की तुमचे आयुष्यही अखंड आनंदाने भरून जाते! जरा शांतपणे विचार करून पहा, असा माणूस तुमच्या स्वत:च्या आतच आहे! त्या दृष्टीने स्वत:चे एकदा आत्मपरीक्षण करून तर बघा! लक्षात येईल की उगीच इकडे तिकडे शोधायची गरजच नाही असा एक माणूस जो आनंद वाटू शकतो आनंदात जगू शकतो तुमच्यातच आहे. त्याला ओळखा.हे खर आहे की आनंदी, समाधानी राहण्याची एक कला आहे ही कला प्रत्येकांनी आत्मसात करून घ्यावयास हवी.

                                                       ....प्रल्हाद दुधाळ.