Monday, December 7, 2020

त्या दोघी ..प्रल्हाद दुधाळ. ..कथा परीक्षण

 #कुबेरदिवाळीअंक    #आस्वाद(८)


 Pralhad Dudhal यांची #त्या_दोघी ही एक सुगम अशी लघुकथा. वृद्धाश्रम,  तिथली वेदना, त्या वेदनेला झिरपत नेणारे तिथले वृद्ध ..त्यांचं भावविश्व, त्यांचं कुटुंब, त्यांचे संस्कार आणि याच संस्काराला बाजूला सारून त्यांच्या  जीवलगांद्वारे  फोफावणारा स्वार्थ या सर्वांचं सुरेख चित्रण म्हणजे ही लघुकथा. कथेचा आवाका अत्यंत छोटा असला तरी विषयाने नि आशयाने कथेला महत्त्वाचे  स्थान मिळतेय. एका  संवेदनशील विषयाला अतिशय साधेपणाने पण सामर्थ्याने लेखकाने आपल्या शब्दांनी सजवलेय.  खरंच संस्कार  संस्कारच असतात. ते ग्रामीण आणि शहरी असा भेद करत नसतात. कारण कुठलेही आईवडील आपल्या लेकरांवर उत्तमोत्तम असेच संस्कार घडवत असतात. ग्रामीण, शहरी अशा वातावरणात फरक नसतो. तर तो असतो त्या व्यक्तिच्या विचारांच्या जडणघडणीत. स्वार्थ जेव्हा  पुढील दाराने आत प्रवेश करतो ना तेव्हा  हे उत्तम संस्कार मागील दाराने कधी निघून  जातात ते कळतही नाही. 'त्या दोघी' तील सरूबाई आणि सुमन अशाच स्वार्थीपणाला बळी पडलेल्या; पण सरूबाई... तिच्या मुलांनी तिला या आश्रमात आणलेले नसून त्यांच्या स्वार्थीपणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी  आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी  ती आपणहूनच या वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेते. तिथेच तिला मानसिक , भावनिक  नि शारीरिक साथ देणारी सुमन भेटते. या दोघींच्या भावविश्वावर प्रकाश टाकणारी ही कथा. अगदी साधीच. पण एक शिकवण देऊन जाते. आयुष्याच्या सायंकाळी  स्वाभिमानानं कसं जीवन जगावं हे सांगते. नवा विषय वाटला मला. नि तेवढाच समंजस आशय .. लेखक प्रल्हाद दुधाळ यांनी एक आगळीवेगळी कथा आपल्या हाती दिलीय . ते मुरलेले लेखक आहेत हे सर्वार्थाने खरे ठरले. 

या भावनिक , संवेदनशील कथेसाठी लेखकाला अनेकानेक धन्यवाद ...आणि अनंत शुभेच्छा लेखनप्रवाहासाठी.....!!

Wednesday, November 18, 2020

विचारचक्र आणि घटना

 आपले विचार आणि घटना....

  गेली अगणित वर्षे माणूस आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांसाठी त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीला किंवा व्यक्तींना दोष देत आलेला आहे.त्याच्या या विचार धारणेमुळे  तो आपल्या मनात कुणाबद्दल तरी मत्सर घृणा असूया अशा भावना बाळगून दुःखात जगतो आहे.

   खरं तर माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या अथवा वाईट घटना या त्याने त्याच्या मनात भरलेल्या चांगल्या अथवा वाईट विचारांचा परिपाक असतो.

    आपल्या अंतर्मनात रात्रंदिवस जे विचारचक्र चालू असते त्या विचारांमध्ये जर भीती चिंता,अंधश्रद्धा,इर्षा,असूया आणि द्वेष अशा भावना भरलेल्या असतील तर तशाच घटना जीवनात विविध समस्यांच्या/घटनांच्या स्वरूपात समोर येतात.

     आपण आनंदात जगायचे की यातना भोगायच्या हे माणसाची विचार करण्याची पध्दती ठरवते. 

अवचेतन मन हे नेहमीच तटस्थ वृत्तीचे असते आणि त्यामध्ये चांगले काय आणि वाईट काय याचा फरक करण्याची शक्ती  किंवा भावना नसते ,म्हणूनच जर आपल्या अवचेतन मनातील विचार जर वाईट व नकारात्मक स्वरूपाचे असतील तर प्रत्यक्ष जीवनातही केवळ तसेच वाईट व नकारात्मक अनुभव येत राहील. 

  आपले अवचेतन मन जसा विचार करेल तशाच घटना समोर येत रहातात म्हणून आपले विचार बदलले तरच जीवनात सकारात्मक बदल जाणवेल... 

   (ज्ञानकण वेचलेले १)

   ....©प्रल्हाद दुधाळ.

Friday, October 30, 2020

बाबांची नोकरी

 मागच्या वर्षी मी स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यावेळी माझ्या मुलाने सौरभने दिलेली कॉमेंट...नक्कीच अभिमानास्पद...


बाबा तुम्हाला नौकरी च्या शेवटच्या दिवशी खूप खुप शुभेच्छा..Well Played.


तुम्ही एक चांगले अधिकारी , कुशल लीडर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेवट पर्यंत कंपनीशी प्रामाणीक राहिलात, मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो...आम्हा IT वाल्यांना या गोष्टी जरा नवीन...


एक काळ असा होता जेव्हा आपण पुण्यात कुठे जरी गेलो तरी टेलिफोन खात्यातील अधिकारी आले म्हणून जाम मॅन मिळायचा , तुम्ही त्या गोष्टी चा कधी गर्व ठेवला नाही किंवा त्या गोष्टीचा कधी गैरवापर पण केला नाही. 


मला नेहमीच तुम्ही hardworking achiever म्हणून आठवतात. रास्ता पेठ मधले रेकॉर्ड connection असू किंवा सांगवी चे रेकॉर्ड land line connections किंवा भोरचा Exchange Failure issue असू जेव्हा तुम्ही 10 दिवस घरी आला नव्हता. तुम्ही नेहमीच कुशल कामगिरी करताना दिसला आणि ते खूप मोठे योगदान आहे माझ्या करिअरसाठी


एक साधे टेलिफोन ऑपरेटर ते SDE हा प्रवास मी पाहिलाय, 

Competitive exams देताना , अभ्यास करताना मी पाहायचो आणि maybe त्यामुळे मला नेहमी अभ्यास आवडायचा. 1996 तुम्ही मुंबई ला गेला , मी आणि आई पुण्याला होतो पण जेव्हा जसा वेळ मिळेल तेव्हा भेटायला यायचा , त्यावेळी मुंबई पुणे प्रवास कढतर होता पण तुम्ही effortlessley ते करायचा.तुम्हाला मिळालेला संचार सारथी आठवतो , मी त्यावेळी 2nd किंवा 3rd ला असेल, खूप भारी वाटले .पेपर मध्ये फोटो पाहून lai bhari वाटले


तुम्ही 2005 च्या आसपास बाजीराव exchange चे service सेंटरची कामगिरी घेतली , मी कॉलेज मधून जेव्हा पण ऑफिस ला यायचो तेव्हा तुम्ही कस्टमर complaints कश्या हँडल करायच्या ते मी पाहिलेत. Top Managers पण फसतात पण तुम्ही खूप smoothness आणला असे तुमचे कितेक customer म्हणायचे आणि तुम्ही फक्त म्हणायचे इट्स part ऑफ my जॉब.


2009 मध्ये तुम्ही सत्याराला ट्रान्सफर घेतली आणि मी म्हैसूर ला गेलो, त्यावेळी manual डेटा एन्ट्री मुळे खूप त्रास झाला तुम्हाला . 2009 च्या शेवटी परत आलो तेव्हा तुम्ही सगळी process automate केली होती, मी त्यावेळी ज्या काही कॉर्पोरेट basics शिकत होतो त्या तुम्ही practically implement करत होता.त्यानंतर तुम्ही Corporate HR Administration मध्ये गेला आणि ते पण शिकला


Milestones खूप आहेत पण त्याबरोबर वर्क life बॅलन्स, लिहायचा छंद आणि technology शिकायला तुम्ही नेहमीच तयार होता...


Retirement enjoy करा आणि खूप लिहा....


Happy Retirement

Saturday, October 10, 2020

नावाचा घोळ....

 नावाचा घोळ....

   

     आमच्या टेलिफोन खात्यात जवळपासच्या खेड्यातून अनेक ग्रुप डी कर्मचारी कामावर यायचे.लोहगाव,वडगाव, केसनंद,वाघोली, फुरसुंगी इत्यादी गावांतून असे शेकडो कर्मचारी कामाला यायचे.

   मी नोकरीला लागल्यावर हळू हळू या लोकांशी ओळखी झाल्या आणि मग त्या त्या गावांच्या उरसाची निमंत्रणे आम्हाला मिळायला लागली. ही झाली ओळखी झाल्यानंतरची गोष्ट, पण नोकरीला  लागल्यावर पहिल्याच वर्षी घडलेली एक गोष्ट सांगतो....

   माझ्याबरोबर केसंनंद गावावरून दररोज ये जा करणारे ज्ञानेश्वर हरगुडे  हे काम करायचे.मीही खेड्यातून आलेला असल्याने आमची थोड्याच दिवसात चांगली मैत्री झाली होती.आम्ही त्याला माऊली या नावाने हाक मारायचो...

   डिसेंबर महिन्यात केसनंद गावचा उरूस असतो.माऊलीने सांगितले होते की उरसापूर्वी   पंधरा दिवस आधी त्यांच्या गावात दूध किंवा  दुधाचे सगळे पदार्थ वर्ज्य केले जातात,अगदी लहान मुलांनाही दूध दिले जात नाही! या काळात सगळे गाव कोरा चहा पिते...

  त्या वर्षी पहिल्यांदाच माऊलीने आम्हा मित्रमंडळींना उरसाच्या दिवशी संध्याकाळी केसनंदला यायचे निमंत्रण दिले.तोपर्यंत त्या गावाबद्दल तिथल्या लोकांबद्दल फार काही माहीत नव्हते....

   ऑफिस सुटल्यावर त्या दिवशी आम्ही सात आठजण सायकलवर पंधरा किलोमीटरवर असलेल्या केसंनंदला निघालो....

   एक तर अंधार आणि आमच्यापैकी कुणी याआधी तिकडे गेलेला नसल्याने रस्ता विचारत विचारत आम्ही त्या गावात एकदाचे पोहोचलो....

  " इथे माऊली हरगुडे कुठे रहातात हो? "

आमच्यापैकी एकाने रस्त्यात एकाला विचारले...

 " हे काय इथे ,चला माझ्याबरोबर...."

आम्हाला ती व्यक्ती एका चाळवजा घरात घेऊन गेली....

   आत जाऊन त्याने पाण्याचे तांबे भरून आणले आणि म्हणे...

"घ्या हात धुवून ...."

आम्ही हातपाय धुवेपर्यंत त्याने बसायला घोंगड्या अंथरल्या, आम्ही नजरेने माऊलीला - आमच्या मित्राला शोधत होतो, तोपर्यंत ती व्यक्ती म्हणाली...

" चला घ्या बसून जेवायला. .'

"माऊली कुठाय? "

" येईल तो एवढ्यात, बसा तुम्ही...."

समोर सुके मटण, कलरफुल रस्सा,चुलीवरच्या खरपूस भाकरी, कांदा लिंबाच्या फोडी भरलेली ताटे वाढली गेली. बऱ्यापैकी सायकलिंग झाल्याने सगळ्यांना सडकून भुका लागल्या होत्या....

   आम्ही सगळेजण त्या झणझणीत टेस्टी जेवणावर तुटून पडलो....

आमचे जेवण  करून झाले तरी आमचा मित्र माऊली काही आम्हाला दिसेना...

" अहो माऊली कसा काय नाही आला अजून?" 

  आमच्यातल्या एकाने पुन्हा विचारले....

 मग मात्र ती व्यक्ती बोलली...

"मी सुध्दा माऊली आहे की!"

आणि मी सुध्दा टेलिफोन खात्यात काम करतो की!"

आमच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्ह बघून शेवटी त्याने खुलासा केला....

" अहो खरंच, माझं नाव ही ज्ञानेश्वर हरगुडे आहे मलाही माऊली म्हणतात ..."

"मी लाईनमन आहे...

तुमचा माऊली ना, तिकडे वस्तीवर रहातो चला तुम्हाला सोडतो तिकडे!"

 म्हणजे आम्हाला भलत्याच माऊलीने जेवायला घातले होते तर!

 मग त्याने खुलासा केला...

 "पोरांनो तुम्ही टेलिफोन खात्यात नव्याने आलात म्हणून माहीत नाही तुम्हाला....

 आमच्या गावातल्या जवळ जवळ प्रत्येकाचे आडनाव हरगुडे आहे आणि प्रत्येक घरातला निदान एकजण तरी टेलिफोन खात्यात नोकरीला आहे! अजून एक - या गावात एकाच  नावाची दोन - दोन, तीन - तीन माणस आहेत बरं का! चला माऊलीचे घर दाखवतो!"

 एकदाचा आमचा माऊली आम्हाला भेटला आणि मग पुन्हा एकदा जेवणाची फर्मास पंगत जमली....

 नंतर हे चांगलच लक्षात आले की आमच्या लाईन स्टाफ मध्ये हरगुडे,शिंदे,सातव, हरपले  आडनाव असलेल्या माणसाचे नुसते आडनाव माहीत असून चालणार नाही तर त्याचे संपूर्ण नाव माहीत असायला हवे, कारण असे एकच आडनाव असलेली शेकडो माणसे पुण्यातल्या टेलिफोन खात्यात लाईनमन म्हणून काम करतात!

   ©प्रल्हाद दुधाळ.

संघर्ष व सकारात्मकता

 

#encouragement

 काही काही लोकांच्या प्रारब्धात केवळ संघर्षच लिहून आलेला असतो, जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याला संघर्ष केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही!

   माझ्या आयुष्याचे तसेच काहीसे आहे..

 मला जीवनात मिळालेल्या प्रत्येक यशाची एक संघर्ष गाथा आहे ती सगळी इथे मांडणे शक्य नाही!   तरीही ....

   मी जन्म घेतल्यापासूनच माझी जगण्याची लढाई सुरू झाली होती.माझी आई सांगायची की  जनमलो तेव्हा मी खूप अशक्त आणि आजारी होतो,जगतो की मरतो अशी माझी अवस्था होती, पण ती लढाई जिंकली! असो... 

   या लेखाचा विषय प्रेरणादायी संघर्ष असला तरी मला माझ्या संघर्षापेक्षा माझ्या सकारात्मक विचारांच्या जोरावर मला कसे मार्ग मिळाले ते सांगणे आवडेल....

त्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी कितीही त्रास झाला असला तरी शेवट सुखांत होता,मला सदैव एक अदृश्य शक्ती मदत करत होती,त्यामुळे असेल किंवा अशी मदत मला मिळणारच आहे या सकारात्मक विचाराच्या जोरावर असेल, मी अडचणी आल्या तरी त्यातून बाहेर पडलो...

आकर्षणाचा सिद्धांत मी हल्ली हल्ली वाचला पण त्याचा अनुभव मात्र मी लहानपणापासून घेतो आहे...

 माझे वडील मी तेरा वर्षाचा असताना गेलेले होते आणि आईच्या कष्टावर/ कसेबसे आमचे जगणे चालू होते.माझी आई कष्टाळू तर होतीच याशिवाय कमालीची स्वाभिमानी होती.धनाच्या बाबतीत दारिद्र्य असले तरी मनाची प्रचंड श्रीमंती तिच्या ठाई होती! सगळ्यांच्या मदतीला कायम तत्पर असणाऱ्या तिला कुणाकडूनही काही मागितलेले मात्र अजिबात खपायचे नाही. अभावातही मार्ग काढत जगण्याचे बाळकडू मला तिच्याकडून मिळाले.'आला दिवस जमेल तसा साजरा करायचा आणि पुढे चालायचे' ही तिची शिकवण मला पुढच्या आयुष्यात सतत कामाला आली....

घरी कमालीचे दारिद्र्य, खायची मारामार होती, असलेली थोडीशी जमीन गहान पडलेली, मोठा भाऊ दारूच्या आहारी गेलेला,अशा परिस्थितीत मी शिकत होतो. परिस्थितीने त्या वयातच एवढी प्रगल्भता आली होती की माझे सगळे लहानपण हरवून गेले होते.

    मी साधारण १० वी झालो होतो आणि अशी वेळ आली की सावकाराकडे गहान असलेली जमीन तो जप्त करणार असल्याची खबर मला मिळाली.नेमका त्याच सुमारास माझा एक चुलत चुलत भाऊ रिटायर झाला. कसं काय माहीत नाही, पण मला त्याला भेटून 'ती जमीन सोडव आणि तुझ्याकडे ठेव,मी नोकरी मिळाली की पैसे देईल' असे सांगायची बुध्दी मला झाली आणि विशेष म्हणजे माझ्या शब्दांवर विश्वास ठेऊन त्याने मदत केली...

   अभ्यासाला पोषक वातावरण नसूनही नशिबाने मी अभ्यासात हुशार होतो. अगदी पहिली ते दहावीपर्यंत मी शाळेत पहिला यायचो आणि केवळ हेच माझे सामर्थ्य होते! मला हायस्कूल स्कॉलरशिप, १२ रुपये महिना मिळायची, सहा महिन्याची स्कॉलरशिप ७२ रुपये एकदम आले की पुढचे चारपाच महिने घरातली तेल मिठाची नड भागवायची. नादारीमुळे शाळेच्या फीचा प्रश्न नव्हता, पण दहावीच्या फॉर्म फी साठी काय करायचे हा मोठा प्रश्न समोर आला होता...

   इथेही माझे प्रगतीपुस्तक कामाला आले आणि पडवळ नावाच्या शिक्षकाने माझी फी भरली...

   अकरावीला लोणंद या गावी नातेवाईकाकडे रहावे लागले, पण मानी स्वभावामुळे मी सहा महिन्यातच मी माझ्यासारख्याच एका फाटक्या मित्राच्या खोलीवर रहायला गेलो. जुनीपानी भांडी गोळा करून स्वतःची भाकरी तयार करायला शिकलो.इथले रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलचे बा.ना.येडेकर नावाचे मुख्याध्यापक आणि पुढे १२ वीला निरेत भोसले सर देवासारखे मागे उभे राहिले आणि अत्यंत वाईट आर्थिक आणि मानसिक परिस्थितीतही मी बारावी पास झालो.

    निरा गावात शिकत असताना जवळ पैसे नाहीत म्हणून सलग चार दिवस उपाशी रहाण्याची वेळ आली तेव्हाच ताटातली भाकरी किती मोलाची असते याचा साक्षात्कार झाला...

त्यावेळी क्षीरसागर नावाचा वीज मंडळाच्या लाईनमनने येऊन माझ्या खिशात नको नको म्हणत असताना वीस रुपयाची नोट कोंबली ...

वेळेला मिळालेल्या या मदतीला काय म्हणावे?

  पुढे पुण्यात दुसऱ्या भावाकडे शिक्षणासाठी आलो, पण त्याचवेळी त्याला परदेशी जायची संधी आली आणि त्याने आपले कुटुंब गावी पाठवले व तो दुबईला गेला.

    पोटासाठी एक भाकरी थापून मी भाड्याच्या सायकलवर १५ किमी सायकलिंग करून गरवारे कॉलेजला जायला लागलो.

   ज्या नागपूर चाळीत मी रहात होतो तिथे माझ्या नव्याने जोडलेल्या मित्रांत  आम्ही शिकणारी एकदोन मुले सोडली तर सगळा आनंदच होता.सगळ्या प्रकारची व्यसने करणारे अनेक मित्र आजूबाजूला होते, पण आपण त्यांच्यासारखे करून बघावे असे कधी वाटले नाही,उलट त्या छंदीफंदी मित्रांनी कायम मला अडचणीच्या वेळी सपोर्टच केला.पैशांची चणचण पाचवीलाच पुजलेली होती, त्यावेळी त्या गलिच्छ वस्तीतल्या इस्माईल खान या बेकरी दुकानदाराने तसेच राजू गुप्ता नावाच्या किराणा दुकानदाराने मला 

" जितना चाहे माल उधार लेके जाना, नोकरी लगेगी तब पैसा देना" असे सांगितले होते आणि स्वतःहून  मदत केली ते माझ्या बाबतीत एवढे उदार होऊन उधार द्यायला स्वतःहून का तयार झाले याचे स्पष्टीकरण मला कधीच समजले नाही! नोकरी लागल्यावर मी त्यांची उधारी चुकवली!

  पुढे एक वर्षातच मला शिक्षणाचे स्वप्न अर्धवट सोडून नोकरी शोधण्याची वेळ आली आणि मला फार तिष्ठत न ठेवता माझ्या शालांत परीक्षेच्या गुणांच्या जोरावर मला  टेलिफोन खात्यात ऑपरेटर म्हणून नोकरी मिळाली! कुणाची तरी कृपादृष्टी असल्याशिवाय अडचणीच्या प्रसंगी एकदा नाही अनेकदा मार्ग मिळणे शक्य होते का? पण, हे सत्य आहे की प्रचंड अडचणी आल्या,त्या निर्मिकाने थोडीफार परीक्षा घेतली आणि संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग मिळत गेले...कुणी याला अंधविश्वास म्हणेल,पण माझ्या सकारात्मक विचारांनी हे मार्ग माझ्यासमोर आले हा माझा ठाम विश्वास आहे....

  एकट्याच्या तुटपुंज्या पगारात समोर असलेले मोठे मोठे प्रश्न सुटणे केवळ अशक्य होते त्यामुळे आपण शक्यतो विवाह करताना कमावती मुलगी बघायची असा मी विचार करत होतो.माझ्या मनात विचार आला आणि मला हवे तसे स्थळ स्वतःहून समोर आले, लग्न व संसार उभारणी ही कामे माझ्या आर्थिक गणितात बसणे सोपे नव्हते,पण मार्ग निघत गेले... वडगाव शेरीत एका सिंगल खोलीत गांधी शेठच्या दुकानातून हप्त्यावर सगळ्या संसारोपयोगी वस्तू खरेदी केल्या आणि स्मिताचा आणि माझा संसार सुरू झाला!

लग्न ही गोष्ट माझ्या आयुष्यातली टर्निंग पॉइंट ठरली आणि एकापाठोपाठ समस्या सुटत गेल्या...

   जमीन सोडवली, दोन्ही भावांच्या मिळून  पाच  मुलींच्या लग्नाला भरीव अर्थसहाय्य केले, गावी छोटेसे घर बांधले, पुण्यात एक छोटा फ्लॅट घेतला ..

    एका बाजूला आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली तर दुसऱ्या बाजूला स्पर्धा परीक्षा देत एकामागोमाग एक प्रमोशन घेत गेलो...

 कधीतरी इंजिनिअर व्हायचं हुकलेले स्वप्न साकार झाले.

मुलगा इंजिनिअर झाला...

हे सगळ चांगलं घडत होते तरी माझ्या समोर नोकरीत व वैयक्तिक पातळीवर काही ना काही अगदी हातघाईच्या समस्या उभ्या रहात होत्याच,पण एव्हाना मला या गोष्टींची सवय झाली होती....

 सकारात्मक विचारसरणीच्या जोरावर आज मी वयाची एकसष्टी पार केली आहे आणि सध्या समाधानी सेवानिवृत्त जीवन जगतो आहे...

  समस्या आली तरी न डगमगता सारासार विवेक वापरून, सकारात्मकता ठेऊन थंड डोक्याने शक्यता पडताळून बघायच्या आणि विश्वासाने निर्णय घायचा, अपयश आले तर एक धडा म्हणून त्याकडे बघायचे आणि पुन्हा प्रयत्न करायचा! 

   फायनली यश मिळणारच आहे या सकारात्मक विचाराने यश निश्चित मिळते, हे मी आज ठामपणे सांगू शकतो ते केवळ मला आलेल्या प्रचीतीमुळे!

 माझा हा संघर्ष माझ्याच एका कवितेत...

जमले जसे....

काही असे काही तसे, जगलो असे जमले जसे,

लाचार कधी झालो नाही, स्व कधी विकला नाही,

 हात कधी पसरला नाही,पडले मनासारखे फासे,

जगलो असे जमले जसे!

गरिबीची लाज नाही,श्रीमंतीचा माज नाही,

सरळ मार्ग सोडला नाही,टाकले नाही घेतले वसे,

जगलो असे जमले जसे!

हवेत इमले बांधले नाही,मृगजळामागे धावलो नाही,

शब्दात कधी सापडलो नाही,झाले नाही कधी हसे,

जगलो असा जमले जसे!

भावनेत कधी वाहीलो नाही, वास्तव कधी सोडले नाही,

विवेकाला तोडले नाही,वागावे लागले जशास तसे,

जगलो असे जमले जसे!

वावगा कधी हट्ट नाही, तडजोडीला ना नाही,

रक्त उगा आटवले नाही, सजवले क्षण छोटे छोटेसे,

जगलो असे जमले जसे!

काही असे काही तसे, 

जगलो असे जमले जसे!

Be Positive...

धन्यवाद....

©प्रल्हाद दुधाळ.(9423012020)

Wednesday, July 22, 2020

करु काय

करु काय...
वृत्त ...तोटक
सराव (ललगा ललगा ललगा ललगा)

हिरवी धरती मनही हिरवे
फुलली हृदयी हसरी कमळे
रुसवे फुगवे मज ना रुचले
नयनी दिसते मन तेे सगळे
तुजला मजला करता करता
उधळून दिले क्षण जे फसले
हसते  जनता करु काय असे
टपुनी लहरी बगळे बसले
    प्रल्हाद दुधाळ

Sunday, June 21, 2020

फादर्स डे.

फादर्स डे.
    एरवी आपण पाश्चात्य संस्कृतीला कितीही नावे ठेवत असलो तरी त्यांच्या काही काही गोष्टींना मात्र सलाम करावासा वाटतो. वेगवेगळ्या नात्यांचे सन्मान करणारे विविध 'डे'ज साजरे करण्याची त्यांची पद्धत खरंच कौतुकास्पद आहे!
   नात्यांबद्दलच्या भावना व त्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक छान मार्ग या निमित्ताने मिळतो त्यामुळेच जगभर असे 'डे'ज उत्साहाने साजरे केले जातात.
   काहीजण म्हणतील की वर्षातून एकदा असा डे साजरा करून काय होणार; पण आपल्या विवेकबुद्धीला स्मरून खरं खरं सांगा की आपण आपल्या या नात्यांसाठी सध्या किती वेळा संवेदनशील असतो? या विधानाला काही सन्मान्य अपवाद असतील तर ते खरंच खूप थोर आणि वंदनीय आहेत!
त्यातल्या त्यात मदर्स डे आणि फादर्स डे म्हणजे तर माता पित्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करायची सुवर्णंसंधीच!
   सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना आई वडिलांप्रती आपल्या अव्यक्त  भावना व्यक्त  होत  आहेत,  ही माझ्या मते त्यातली खूप मोलाची बाब आहे.
  आज फादर्स डे च्या निमित्ताने ज्या नात्याबद्दल सहसा बोलले जात नाही त्या पित्याबद्दलच्या  भावना व्यक्त करायला मलाही प्रेरणा मिळाली आहे.
    माझ्या बाबतीत म्हणाल तर माझ्याकडे माझ्या वडिलांबद्दलच्या खूप कमी आठवणी आहेत,  कारण मी तेरा चौदा वर्षांचा असतानाच आमच्या दादांनी हे जग सोडले होते.
त्या अल्पकाळातली त्यांची जी प्रतिमा समोर आहे ती खूपच आदर्शवत आहे.
   मला अस्पष्टसे आठवते त्याप्रमाणे माझे आईवडील मी लहान होतो त्यावेळी काही दिवस शेतीबरोबरच कांदा बटाटा लसूण घेऊन आजूबाजूच्या गावातल्या आठवडाबाजारात विकायचे.त्या काळात बहूतेक ते बऱ्यापैकी कमवत असावेत. गावात त्यांना बराच मानही  होता. लोक त्यांना सावकार या टोपण नावाने ओळखायचे...
    पुढे मात्र ते आजारी पडू लागले आणि तो व्यापार बंद झाला. मग त्यांनी आपल्याला झेपेल असे मोसंबी डाळींबीच्या बागांच्या राखणीचे काम सुरु केले. शहरातले बागवान लोक या फळबागा ठोक भावात घ्यायचे आणि पुढे फळे काढायला येईपर्यंत राखण्याची जबाबदारी दादांना मिळायची. मी अगदी सहावी सातवीत असतानापर्यंत शाळेतून आल्यावर त्या बागेत त्यांच्याबरोबर जायचो. तिथेच मी अभ्यास करत त्यांना मदत करायचो.
   मधल्या काळात बहिणीच्या लग्नात होती ती जमीन गहाण पडली. आई शेतमजुरीबरोबर सकाळी आजूबाजूच्या खेड्यात तरकारीची हाळीपाटी करायची. वडिलांची तब्बेत आणि आमच्या कुटुंबाची आर्थिक हालत खालावत गेली आणि मी आठवीत असताना कार्तिकी एकादशीच्या दिवशी दादांनी इथला मुक्काम संपवला. खूप कमी वय होते माझे त्यावेळी...
     त्यांच्या सहवासातल्या त्या मोसंबीच्या बागेतल्या आठवणीच काय त्या सोबत आहेत. मी शाळेत कायम पाहिला नंबर मिळवतो याचे त्यांना खूप अप्रूप होते! मला ते अत्यंत मृदू भाषेत जगरहाटी समजावून सांगायचे. इथे गावात राहिला तर खायचे वांदे होतील त्यामुळे जमेल तेवढं शिकून एखादी चांगली नोकरी मिळाली तरच आयुष्यात निभाव लागेल याची जाणीव त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत मला करून दिली होती,  त्यामुळे कितीही हाल झाले तरी शिक्षण घेणे सोडायचे नाही हे ठामपणे ठरवले होते.
     त्यांच्याकडूनच मला माझ्या शांत स्वभावाची व सारासार विचार करून निर्णय घेण्याच्या  वृत्तीची देणगी मिळालेली आहे आणि त्या जोरावर मी आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी माझे मानसिक स्वास्थ्य ढळू देत नाही.त्यांचा करारी बाणा व स्वाभिमानी वृत्तीही माझ्यात वारशाने आलेली आहे.
 आज जे काही समाधानी व आंनदी जीवन मी जगतो आहे त्यामागे माझ्या माता पित्याचे संस्कार आणि आशीर्वाद आहेत!
 आजच्या फादर्स डे च्या निमित्ताने परमपूज्य दादांस अभिवादन...
   फादर्स डे च्या सर्व बाप लोकांना शुभेच्छा..
©प्रल्हाद दुधाळ.

Monday, June 15, 2020

कुबेर_मातृदिन.

कुबेर_मातृदिन... लेखन स्पर्धेतील पारितोषिक विजेता लेख. 
आई.... 
   प्रत्येकाच्या हृदयात आपल्या आईसाठी एक हळवा कोपरा असतोच असतो.ज्या व्यक्तींना आईवडिलांचा सहवास त्यांच्या वयाच्या पन्नाशी-साठीनंतरही मिळत रहातो त्या व्यक्तींचा मला खरंच खूप हेवा वाटतो! अशी माणसं माझ्या दृष्टीने खूप म्हणजे खूप भाग्यवान असतात! 
    आपल्याकडे एक जुनी म्हण आहे "माणसाने नकटं व्हावं;पण धाकटं होऊ नये". माझ्या दृष्टीने या म्हणीचा उगम अशा धाकट्या असलेल्या व्यक्तीच्या व्यथेतून झाला असावा, कारण आई आणि वडिलांचा सर्वात कमी सहवास धाकट्याला मिळतो!
   माझ्या सहा बहीणभावंडातले मी शेंडेफळ!कधी कधी सहजच मनात विचार येतो की जर पन्नास साठच्या दशकात मर्यादित कुटुंबाचा फंडा असता तर?... 
....तर,  कदाचित माझा जन्मच झाला नसता!
...  तर, मी माझ्या पालकांचे शेवटचे अपत्य होतो....
    पुरंदर तालुक्यातल्या परिंचे गावातील आमचं कुटुंब अत्यंत गरीब, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबं होतं. शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर भागणे शक्यच नव्हते,त्यामुळे आई आणि वडील दोघेही मजुरी करता करता आजूबाजूच्या गावात आठवडा बाजारात तरकारी विकायला जायचे.
   आठवडा बाजार नसेल त्या दिवशी माझी आई पहाटे उठून भाजीपाला घेऊन माहूर, मांढर, हरगुडे, यादववाडी, सटलवाडी इत्यादी ठिकाणी हाळीपाटी करायची.पुन्हा घरी येऊन कुणाच्यातरी शेतावर खुरपणी, काढणी अशी काही ना काही कामे करायची.उन्हाळ्यात कामे नसायची तेव्हा कुणाच्या शेवया, कुरडया  करून दे, गोधड्या शिवून दे अशी तिची अखंड कामे चालू असायची.माझे प्राथमिक शिक्षण चालू असताना वडील वारंवार आजारी पडू लागले....
    त्यांच्या आजारपणामुळे आठवडा बाजार बंद झाले.मग ते तब्बेतीला झेपेल असे काम म्हणून मोसंबीच्या बागा राखणीला घेऊ लागले. मी तिसरी चौथीत असल्यापासून शाळा सुटली की त्या बागेत त्यांच्या मदतीला जायचो.
   पुढे माझ्यापेक्षा मोठ्या बहिणीच्या लग्नात होती नव्हती ती शेती सावकाराकडे गहाण पडली. मी आठवीत असताना वडिलांचा आजार बळावला आणि ते आम्हाला सोडून गेले.
   वडील गेल्यानंतर आई आणि मी असे दोघेच गावी रहायचो.दोन मोठे बंधू आपापल्या वाटेने शहराकडे गेले आणि आपल्या तुटपुंज्या मिळकतीत स्वतःच्या संसारात रमले....
     आईच्या आयुष्यात एवढी संकटे आली, प्रचंड  चढउतार आले;पण मी माझ्या आईला वैतागलेले, त्रागा करताना कधीच पाहिलेले नाही.सतत हसतमुखाने ती आलेला दिवस साजरा करायची....
    तिला घरगुती झाडपाल्याच्या औषधांची खूप माहिती होती.पंचक्रोशीत तिच्यासारखी दाई नव्हती असे अजूनही जुने लोक नाव काढतात! 
      ती स्वतः अजिबात शिकलेली नव्हती;पण का कुणास ठाऊक ती मला  शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन देत राहिली.
      शाळेत प्रत्येक वर्षी मी पहिल्या क्रमांकाने पास होतं होतो,माझे प्रगतीपुस्तक घरोघरी बघण्यासाठी/दाखवण्यासाठी फिरायचं, माझ्या हुशारीचे कौतुक व्हायचे. तिला मिळालेले मार्क्स, पाहिला नंबर त्यातलं फारसं काही समजायचं नाही;पण आपल्या धाकट्याचं सारं गाव कौतुक करतं याची  प्रचंड ख़ुशी मी प्रत्येक रिझल्टच्या दिवशी तिच्या डोळ्यात पाहायचो!.
     ती मला नेहमी म्हणायची...
" भरपूर शिक,मोठा हो, कुणाच्यापुढे हात पसरू नको, आपली आब सांभाळून रहा!"
मला हायस्कुल स्कॉलरशीप मिळायची.बारा रुपये महिना मिळायचे.स्कॉलरशिपचे पैसे घरातल्या तेलमिठाची पाच सहा महिन्याची  बेगमी करायचे.
    बहात्तरच्या दुष्काळात आई दुष्काळी कामावर जायची.तिथे मिळणाऱ्या लाल मिलोची भाकरी,सुकडी खाऊन आम्ही कित्येक दिवस काढले आहेत.कित्येकदा हुलग्याचं माडगं खाऊन रहावे लागायचं;पण शेवटपर्यंत तिने आत्मसन्मानाशी तडजोड केली नाही.
     आपली मोठी दोन पोरं आयुष्यात फार काही करु शकली नाहीत, आता या धाकट्याचं तरी नीट व्हावं.कपाळावरचा दारिद्र्याचा शिक्का पुसला जावा असं तिला मनोमन वाटायचं.
     पहाटे जात्यावर दळण दळताना ती ज्या ओव्या म्हणायची त्यात माझे नाव गुंफून माझ्या कर्तृत्वाची स्वप्ने ती रंगवायची... 
अवसेची जाईल रात उगवेल तो चंद्र पुन्हा,बुक वाचतो माझा राजा, बैरीस्तर माझा कान्हा!
किंवा 
लेक चालला साळला,संगे दिलीय भाकरी, साहेबावानी आहे त्याची, मोठ्या पैक्याची नोकरी!
 तिच्या त्या माझ्या भविष्याची स्वप्ने पेरलेल्या ओव्या मला खूप आवडायच्या, तासन तास मी त्या ओव्या ऐकत रहायचो, त्यातला अर्थ शोधत रहायचो!
मला वाटते पुढे जीवनात मला चारोळ्या,कविता,कथा,लेख,लिहिण्यावाचनाची आवड निर्माण झाली, ती आईने माझ्यावर लहानपणी केलेल्या या संस्कारांमुळेच!
तिने आपल्या वागण्याबोलण्यातून मला सतत काही ना काही शिकवण दिली..
- कोणतीही वाईट परिस्थिती आली तरी  आपल्या स्वाभिमानाशी इमान राखायचे.
उगाच हवेत इमले न बांधता कायम वास्तवात जगायचे.
जीवनात ऐश्वर्य आले म्हणून माजायाचे नाही,गरीबीला लाजायचे नाही.
अन्याय सहन करायचा नाही, स्वार्थासाठी कोणालाही फसवायचं नाही.
आपण चांगले वागलो तर आपल्याशीही लोक चांगलेच वागतात.
आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले तर त्याचे चांगले फळ एक ना एक दिवस नक्कीच  मिळते,
मोठी स्वप्ने बघायची;पण नेहमी अंथरून पाहून पाय पसरायचे.
व्यसनाने आयुष्याचं वाटोळे होते, त्यामुळे कधीही कोणतेही व्यसन करायचे नाही.
   मी आयुष्यभर तिने  दिलेल्या शिकवणीप्रमाणे मार्गक्रमणा करत राहिलो. हायस्कूल आणि कॉलेजला असताना अनेक व्यसनी छंदीफंदी मित्रांच्यात राहूनही मला कधी त्यांच्यासारखे वागायचा मोह झाला नाही.आयुष्यात वाममार्गाने पैसा कमावण्याच्या अनेक संधी हात जोडून समोर उभ्या होत्या; पण त्या आडवाटेने जाण्याचा लोभ कधीच झाला नाही.ज्या गोष्टीवर माझा नैतिक अधिकार नव्हता,अशा कोणत्याच गोष्टीचा मला जीवनात कधी मोह झाला नाही.माझ्या तोंडी कधीही कुणासाठीही अरेतुरेची भाषा नसते.कुणी माझ्याशी वाईट वागले तरी मी कुणाबद्दलही आकस बाळगत नाही.कुणी माझा रस्ता आडवला तर मी आपली ऊर्जा वाया न घालवता आपला रस्ता बदलण्याचा प्रयत्न करतो.
“ऐसी जगह बैठिये-कोई ना बोले उठ, ऐसी बात कहिये-कोई ना बोले झूठ!” हे माझे जगण्याचे तत्व माझ्या आईच्या संस्कारांचा परिपाक आहे असे मी मानतो! प्रतिकूल परिस्थिती असतानाही जीवनात सकारात्मक कसे रहावे, समस्येत दडलेली संधी कशी शोधायची यांचे व्यावहारिक ज्ञान मला माझ्या आईच्या सहवासात राहून मिळाले.मला मिळालेल्या या ज्ञानाच्या जोरावर मी मला अभिप्रेत असलेल्या यशापर्यंत पोहोचलो याचं सगळं श्रेय्य माझ्या आईने माझ्यावर केलेल्या संस्कारांना आहे.आईच्या प्रचंड इच्छाशक्ती,आशीर्वाद आणि केलेले संस्कार यांच्या जोडीला माझे प्रयत्न आणि नशिबाची साथ या जोरावर आमच्या खानदानातला पहिला सरकारी नोकरदार होण्याचे भाग्य मला मिळाले.
   नोकरीतील प्रगतीबरोबरच पद प्रतिष्ठा आणि आर्थिक सुबत्ता आली...
    माझ्या प्रगतीमधला फक्त एकच टप्पा तिने डोळे भरून पाहिला;पण माझ्या कर्तुत्वाला खऱ्या अर्थाने आलेली गती बघायला मात्र ती थांबली नाही.
    अठरा मार्च 1994 रोजी माझ्या आईने  आमचा आणि या जगाचा निरोप घेतला...       आई मला सोडून गेली त्याला एवढी वर्षे झाली;पण आजही माझ्या जीवनावर तिचा  प्रचंड प्रभाव आहे.
    अडचणी आल्या म्हणून रडत बसण्यापेक्षा त्या अडचणींचे संधीत रूपांतर करून त्यावर स्वार व्हायचे बाळकडू मला माझ्या आईकडून मिळालेले आहे आणि त्याच्या जोरावर माझी मार्गक्रमणा सतत सकारात्मक दिशेने चालू आहे, आणि अशीच चालू राहील....
ती कधी न पाहिली थकलेली, समस्येशी कुठल्या थबकलेली.
सुरकुतल्या हातात हत्तीच बळ, आधार मोठा ती असता जवळ.
कोणत्याही प्रसंगी मागे ती सदा,निस्वार्थ सेवा वृत्तीने वागे सर्वदा.
माया ममता सेवा भरलेल ते गाव, सदा ओठी असु दे आई तुझे नाव!

  ... ©प्रल्हाद दुधाळ, पुणे.9423012020

Tuesday, June 9, 2020

पात्र... विचारमंथन

'पात्र'
  मराठी भाषा आहे ही, एकाच शब्दाचे कितीतरी अर्थ असणारी ही समृद्ध अशी भाषा आहे! आता हाच शब्द घ्या की 'पात्र', या एका शब्दाच्या उच्चाराने वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनात वेगवेगळा अर्थ येऊ शकतो,  म्हणजेच मराठीत फक्त तो शब्द  सांगून उपयोगाचा नाही तर तो शब्द कोणत्या संदर्भात वापरण्यात आलेला आहे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे.
 उदाहरण म्हणून खालील वर्णन वाचा...
   "पात्रता असूनही त्याला डावलले गेल्याने तो विरक्त होऊन गंगा किनारी गेली कित्येक दिवस रहात होता. आता गंगा नदीच्या त्या विशाल पात्राकडे पाहून  त्याला आपण किती शूद्र आहोत याची प्रथमच जाणीव झाली. त्याने तिथेच किनाऱ्यावर बैठक ठोकली आणि हातातले भिक्षापात्र समोर ठेवले. समोरच्या बाजूला  विद्यार्थ्यांचे एक पथनाट्य चालू होते. गंगा नदीच्या प्रदूषणावर आधारित त्या पथनाट्यातले प्रत्येक पात्र जीव तोडून गंगामय्याच्या स्वच्छतेचा संदेश देत होते.थोडे पलीकडे एक युवक आपल्या प्रेमपात्राला बाहुपाशात घेऊन तिच्याशी लगट करत बसला होता.बाजूने जाणारे येणारे त्यांच्या त्या उघड्यावरच्या शृंगाराचे नयनसुख घेत होते... '
   बघा इथे 'पात्र' हा एकच शब्द; पण किती वेगवेगळ्या संदर्भात वापरला गेला आहे...
अशी माझी मराठी भाषा, एक समृद्ध बोली!
(विचार मंथन)
©प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, May 13, 2020

परिचय

परिचय
   अनोळखी लोकांसमोर गेलं, की त्यांना आपण कोण आहोत हे सांगण्याची प्रक्रिया म्हणजे परिचय असे ढोबळ्मानाने म्हणता येईल.
    एखाद्याचा परिचय करून द्यायचा म्हणजे काय काय माहिती दिली जाते?
  परिचयात सर्वप्रथम सांगितले जाते नाव, गाव, तो करत असलेला व्यवसाय, त्यातले त्याचे पद इत्यादी इत्यादी.
  मी एका अज्ञात्मिक शिबिराला गेलो होतो. तिथे एक प्रश्न विचारला गेला...
तुम्ही कोण आहात?
 तुमचा परिचय द्या...
मी माझं नाव सांगितलं.
 अजून...?
मी माझं आडनाव सांगितलं.
अजून...?
मी माझ्या वडिलांचा मुलगा, आजोबाचा नातू, पंजोबाचा पणतू, माझ्या मुलाचा बाप, नातवाचा आजोबा, पणतूचा पणजोबा इतपर्यंत पोहोचलो.
बस एवढाच परिचय?  अजून?
मग मी माझं पद, गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देशही सांगितला!
 अजून...?
मी विचारात पडलो, खरंच काय आहे माझा परिचय?
या जगातल्या हजारो माणसांसारखा एक माणूस,
असंख्य पशू, पक्षी, जीव, जंतू यांसारखाच एक सजीव!
 मनुष्यप्राणी?
हो,यत्किंचित प्राणीच!
बस्स,  तुझी एवढीच ओळख आहे...
एक... मनुष्यप्राणी!
हाच आहे तुझा खरा परिचय!
..... प्रल्हाद  दुधाळ.

Saturday, May 9, 2020

द्वेष...

द्वेष...
आज एक काम करा. डोळे मिटून जरा विचार करा आपण सध्या कुणा कुणाचा द्वेष करतो?
    कारण काहीही असो, आपण ज्या ज्या व्यक्तींचा द्वेष करतो अशांची नावे डोळ्यासमोर आणा.ही यादी कदाचित खूप मोठी असेल! असे असेल तर सरळ कागद पेन घ्या आणि त्यांची नावे लिहून काढा.
     तुम्ही माना अथवा मानू नका; पण हे सत्य आहे की तुम्ही द्वेष करत असलेल्या व्यक्तींची ही यादी जेव्हढी मोठी तेव्हढी तुमची मानसिक अस्वस्थता जास्त आहे!
    जरा प्रामाणिकपणे आपली मनातली ही अशांतता आणि त्यापोटी होणारे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होणारे  दुष्परिणाम मग ते मानसिक असतील वा त्यापुढच्या टप्प्यावर म्हणजे कोणत्या तरी शारीरिक आजाराच्या स्वरूपात असतील, त्याची पडताळणी करून घ्या. या सगळ्या अशांतीचे मूळ कदाचित तुम्ही लोकांच्या करत असलेल्या द्वेषभावनेत असू शकेल.         तुम्ही केलेल्या यादीतले एक एक नाव बंद डोळ्यसमोर आणा आणि स्वतःची माफी मागा. इथे तुम्हाला त्या व्यक्तीच्या समोर जाऊन माफी मागायची नाही तर त्या व्यक्तीच्या द्वेषभावनेचे ओझे मनावर बाळगल्याबद्दल स्वतःची माफी मागायची आहे. तुम्ही जेव्हा असे प्रत्येकाला तुमच्या द्वेषभावनेतून मुक्त कराल तेव्हा बघा तुम्हाला किती हलकं हलकं वाटायला लागेल. ते हलकेपण जाणीवपूर्वक सांभाळा.   
      तुम्ही द्वेष केल्याने समोरच्या व्यक्तीला काही फरक पडत नाही तर तुमच्या स्वतःच्या जीवनावर मात्र दूरगामी परिणाम होतो. म्हणून या द्वेष भावनेचा त्याग करा आणि जीवनातला आनंद साजरा करा...
 पटलं तर  जरूर अमलात आणून बघा!
  © प्रल्हाद दुधाळ. 

Thursday, April 30, 2020

परांजपे वाडा...आठवणीतला.

     
परांजपे वाडा...आठवण

       काल टाईमपास म्हणून शब्दकोडे सोडवत असताना  एक  दोन अक्षरी शब्द समोर आला.पुण्यात पेशवेकालीन घरांसाठी हा शब्द वापरला जायचा तो शब्द म्हणजे 'वाडा'! जुन्या पुण्यात असे खूप वाडे असायचे!
     वाड्याचा विचार मनात आला आणि मन भरकटत पोहोचले आठवणीतल्या एका वाड्यात -आमची चवथी ते सातवीची शाळा ज्या वाड्यात भरायची त्या परांजपे वाड्यात!
      परांजपे नावाच्या ऐतिहासिक घराण्याचा  त्यावेळी सुस्थितीत असलेला हा वाडा शाळेच्या वापरासाठी दिलेला होता.या परांजपे लोकांच्या आडनावावरूनच कदाचित आमच्या गावाचे नाव परिंचे असे पडले असावे!
      मी नक्की  कुठे ते आठवत नाही; पण कुठेतरी वाचले होते की  शिवकाळातल्या बाळाजी विश्वनाथ यांना कोकणातून घाटावर आणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे घेऊन जाण्यात सरदार पुरंदरे यांच्याबरोबरच आमच्या गावच्या या परांजपे सावकारांचीही महत्वाची भूमिका होती.यासंबंधीची अधिक माहीती मात्र पुढे कधी वाचनात आली नाही.
    या परांजपे कुटुंबाची भरपूर जमीन परिंचे गावालगत होती असे म्हणतात;पण स्वातंत्र्यानंतर आलेल्या कुळकायद्यात ही सगळी जमीन कुळांकडे गेली असावी.
     परिंच्यात परांजपे यांचे एकमेकाला लागून असलेले दोन चौसोपी वाडे होते.त्या काळी  त्यापैकी एका वाड्यात रयत शिक्षण संस्थेचे हायस्कुल (आठवी ते अकरावी) होते.हायस्कुलची स्वतःची इमारत बांधून झाल्यावर या वाड्यात डॉक्टर कोठाडिया रहायला आल्या आणि तिथेच त्यांचे क्लिनिकही पुढे बरेच दिवस सुरु होते. दुसऱ्या वाड्यात प्राथमिक शाळेचे चौथी ते सातवीचे वर्ग भरायचे.जिल्हा परिषदेच्या 'शेती शाळा परींचे' या शाळेचे पहिली ते तिसरीचे वर्ग शाळेच्या इमारतीत व राम मंदिरात भरत असायचे;पण चौथीत गेलो की गावाच्या मध्यभागी असलेल्या या परांजपे वाड्यात  आपल्याला जायला मिळणार याचा त्या काळी मुलांना भलताच आनंद असायचा!
     मी सुद्धा चौथीत गेल्यावर या परांजपे वाड्यातल्या शाळेत प्रथम गेलो आणि त्या जुन्या वाड्याच्या प्रेमात पडलो....
   भरपूर उंची असलेल्या दोन मजले आणि वर एक उंच पोटमाळा असलेल्या या वाड्याचे बांधकाम कोरीव घडीव दगडात होते.सागवानी लाकडाचा मुबलक वापर या वाड्याच्या बांधकामात केलेला होता. वाड्याचा मजबूत साधारण वीस फुटी दरवाजा त्यावर पितळी कड्या. त्यातल्या एक दरवाजाला एक व्यक्ती एकावेळी आत जाऊ शकेल असा दिंडीदरवाजा होता. आतल्या बाजूने संपूर्ण दरवाजाला आतून कव्हर करणारी भली मोठी आगळ ( का अडसर),जी एरवी भिंतीच्या आत सरकवता यायची, दरवाजाच्या आत गेले की समोर भला मोठा चौक आणि चारी बाजूला मोठे मोठे हॉल आजही नजरेसमोर जसेच्या तसे उभे रहातात.वाड्यात वरच्या मजल्यावर जायला डाव्या आणि उजव्या बाजूने भिंतीच्या आतून पायऱ्या होत्या. या जिन्यात दिवसाही खूप अंधार असायचा.एकंदरीत वाड्याचा तो डामडौल  या परांजपे सावकाराच्या शिवकालीन व पुढे पेशवाईच्या काळात त्यांच्याकडील  धनदौलत आणि श्रीमंतीबद्दल सांगत असायचा!
      मी चॊथीत असताना वाड्याच्या मागच्या भागात एक व्यक्ती एकटीच रहायची त्या व्यक्तीचे नाव बंडोपंत असे होते.गावात त्यांना लोक काका म्हणायचे. परांजपे कुटुंबातील त्या वाड्यात वास्तव्य केलेली ही  बहुतेक शेवटची व्यक्ती असावी! बंडोपंत कायम वाड्यातच असायचे. आठवड्यात कधीतरी एखाद्या वेळी ते अगदी आमच्या दुधाळवाडीपर्यंत आलेले दिसायचे.मी शाळेतल्या सगळ्या तुकड्यात कायम पहिला असायचो त्यामुळे माझ्याशी हे बंडोपंत छान बोलायचे. वयाने पन्नाशी साठीतले,  एकदम गोरेगोमटे, तब्बेत बरीच स्थूल, अंगावर कायम पांढरा पायजमा आणि फेंट निळा हाफ शर्ट त्यावर वर्षभर फुल बाह्यांचा काळा स्वेटर अशा वेशात असणारे बंडोपंत सतत तपकीर ओढायचे. त्यामुळे संपूर्ण परांजपे वाड्यात कायम या तपकिरीचा मंद घमघमाट सुटलेला असायचा. माझ्यावर बंडोपंतांचा विशेष लोभ असल्याने शाळा सुटली तरी सगळ्या वाड्यात मला मुक्त प्रवेश होता.आता मला आठवत नाही नक्की ते माझ्याशी काय बोलत असायचे;पण मी आणि  माझ्या वर्गातला किसन कायम त्यांच्याकडे असायचो.
     बऱ्याचदा त्यांच्या स्वयंपाक घरात नेऊन त्यांनी आम्हाला छोट्या प्लेटमधे पोहे किंवा शिरा   खायला घातल्याचे चांगलेच आठवते!...
   या वाड्याच्या त्या अंधाऱ्या जिन्यातून वरच्या मजल्यावर जायला मात्र आम्ही खूप  घाबरायचो. नंतर सहावी सातवीचा वर्ग वरच्या मजल्यावर असल्यामुळे ही भीती कमी झाली.रात्री या वाड्यात वरच्या पोटमाळ्यावरून कसले कसले आवाज येतात, वर भुते नाचतात अशा काही अफवा गावात असायच्या.
     वाड्यात एकटे रहाणाऱ्या बंडोपंतांचे व्यक्तिमत्वही गावात बऱ्याच लोकांना गूढ वाटायचं;पण आमच्याशी त्यांची चांगलीच गट्टी होती.परिंच्यात बाहेरून गावात आलेल्या कुटुंबातली एक बाई तिच्या आमच्याच वयाच्या मुलीबरोबर बंडोपंतांकडे स्वयंपाक आणि इत्तर  कामासाठी यायची....
     शाळा सुटेपर्यंत मुलामुलींच्या आवाजाने गजबजलेला वाडा शाळा सुटली की मात्र एकदम  भकास वाटायचा.
     सातवीत असताना आम्ही रात्री अभ्यासाला आणि झोपायला वाड्यातच असायचो.त्या काळी गावात वीज नव्हती. या वाड्यात गॅसबत्ती च्या प्रकाशात अभ्यास करूनच मी हायस्कुल स्कॉलरशिप मिळवली,त्यावेळी असलेल्या सातवीच्या बोर्डाच्या परीक्षेत केंद्रात पहिला आलो.
      शालेय वयात या वाड्यात काढलेले दिवस अजूनही आठवतात; मात्र आम्ही आठवीत जाईपर्यंत  हायस्कुल गावाबाहेर नव्याने बांधलेल्या इमारतीत गेल्याने या वाड्याकडे यायचे बंद झाले. बंडोपंतही आजारी पडल्याने गाव सोडून गेले. पाचवी नंतरचे वर्ग त्याच दरम्यान हायस्कुलला जोडल्याने परांजपे वाड्याचा वापर मंगल कार्यालय म्हणून व्हायला लागला. तिथे कुणी रहात नसल्याने वाड्याची पडझड सुरु झाली.घडीव दगड आणि खूप जुने  सागवानी लाकडाच्या चोऱ्या होवू लागल्या.
    खूप वर्षांनी सहजच गावाच्या त्या भागात असलेल्या सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेलो होतो. वाड्याकडे नजर गेल्यावर त्याची अवस्था पाहून वाईट वाटले. संपूर्ण वाडा आता जमीनदोस्त झाला होता वाड्याची समोरची भिंत मात्र अजूनही त्या वाड्याच्या वैभवशाली इतिहासाची  केविलवाणी साक्ष देत शेवटच्या घटका मोजत असलेली आढळली.मनात विचार आला किती करंटे आहोत आपण!गावच्या ऐतिहासिक वारश्याच्या या वाड्याच्या रूपाने जिवंत असलेल्या खुणा आम्ही सांभाळू शकलो नाही.....
      माझ्या चवथी ते सातवी या संस्कारक्षम वयातल्या शालेय जीवनातल्या परांजपे वाड्याशी निगडीत आठवणी मनात पिंगा घालत होत्या....
     © प्रल्हाद दुधाळ पुणे., 942312020

Sunday, April 26, 2020

विनाकारण...

विनाकारण...
     सगळं सुरळीत चालू असताना अचानक एखाद्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच उदास उदास वाटायला लागतं, काही म्हणजे काही करावंसं वाटत नाही...
     अगदी दैनंदिनीतल्या ब्रश, अंघोळ, ब्रेकफास्ट अशा रुटीनच्या गोष्टींसाठीही अंगात उत्साह नसतो.. .
      खरं तर उदास होण्यासारखं एवढ्यात काही घडलेलं नसतं, समोर  ताणतणाव देणारे काही प्रश्नही नसतात....
   मागच्या दोन तीन दिवसात आहार विहारात काही बदल झाले होते का, कुणा नकारात्मक विचाराच्या व्यक्तीशी संपर्क आला होता का अशा गोष्टीही तपासून बघितल्या जातात,  तर तसंही काही कारण सापडत नाही...
    या निरुत्साही उदासीच्या मागे नक्की काय कारण आहे हे शोधूनही सापडत नाही.
   झोपून राहावं म्हटलं तर तेही नको वाटतं, निवांत बसून टीव्हीवर काही हलकफुलकं बघायचा प्रयत्न करून बघितला तर नेहमी खळाळून हसवणारा कार्यक्रमही निरस वाटायला लागतो.
      कुठं तरी वाचलेलं असतं की बिघडलेला मूड बदलण्यात आवडतं संगीत ऐकल्याने मदत होते. लगेच तोही प्रयोग करून बघितला जातो. अरुण दाते, सुधीर फडके, रफी, मुकेश, जगजीत सगळ्यांची गाणी शोधून शोधून ऐकली;तरी मरगळ होती तिथेच!
     यू ट्यूब वर रिलॅक्सिंग ट्रॅक लाऊन डोळे मिटून ध्यानमुद्रेत जाऊनही कधी नव्हे ते सगळं बकवास आहे असा फील येऊ लागतो.
फेसबुक, व्हाट्सअप, टिकटॉकवर जाऊनही काहीच फायदा नाही.
    नक्की आपलं काय बिनसलंय?  काय खुपतंय?  कसला आणि कुणाचा त्रास होतोय? 'सहन होत नाही आणि सांगताही येत नाही' अशा अवस्थेत का गेलो आहोत आपण?मानसशास्रात आणि अध्यात्मात मन अस्वस्थ असल्यावर करायचे सगळे प्रयोग कित्येक वेळा वाचलेत, त्यातले सगळे उपाय करून बघितले तरी ही उदासी काही संपेना तेव्हा 'आपल्याला काही आजार तर झाला नाही ना?' अशी शंका येते; पण सध्याच्या परिस्थितीत  डॉक्टरकडे जाणही धोक्याचं! उगा नैराश्य वाढणार!
     पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींचा विचार करून या उदासीचं कारण आपणच  शोधावं असं वाटायला लागतं.
      घरात उगाचंच चकरा मारता मारता विचारचक्र फिरत असतं.
    आपण अचानक आरशासमोर जाऊन उभं राहतो आणि स्वतःकडे नजर जाते....
   "अरे क्या हालत बना रखी है खुदकी?"
   अस्ताव्यस्त वाढलेले केस, खुरटलेली दाढी, गेला एक महिना तोच अवतार, दोन बर्मुडा आणि दोन टी शर्ट आलटून पालटून!.
    गेली चाळीस वर्षे महिन्याच्या महिन्याला सलूनमधे जाऊन केस एकदम शिस्तीत राखणारा तू, दररोज क्लीन शेव्ह करून दिवसाला कडक इस्त्रीचे कपडे बदलणारा तू, अगदी  सोसायटीच्या गेटवर जायचे असले तरी तोंडावर फेसपावडरचा हात फिरवून, कपड्यावर आवडत्या परफ्युमचा फवारणी करणारा तू, आज काय अवतार झालाय तुझा?
  कुठे गेला तो टिपटॉप अवतार?
  या उदासीचं कारण हे आहे तर !
   आपण झटकन कामाला लागतो, सेल्फ सर्वीस करून केसांना शेप देतो, गुळगुळीत दाढी करून गुणगुणत मस्त बाथ घेतो, वार्डरोबमधून बऱ्याच दिवसांनी आवडता फॉर्मल पिंक शर्ट अंगावर घालतो, परफ्युमचा मस्त सुगंध दरवळतो.इनशर्ट करून शूज घालतो, शीळ घालत डोळे ऑफिस बॅग शोधू लागतात...
   इतका वेळ आपल्या हालचाली शांतपणे न्याहाळणारी बायको समोर येते आणि सांगते...
" महाशय कुठे निघालात, लॉकडाऊन संपलेला नाही अजून!" आपण भानावर येतो...
पण; आता उदासी कुठल्या कुठं पळालेली असते, आपण मोबाईल हातात घेऊन कुबेरवरचे  बोलके व्हा मधले व्हिडीओ बघण्यात रंगून जातो....
   ©प्रल्हाद दुधाळ पुणे.
        26.4.2020

Tuesday, March 31, 2020

मलाआवडलेलीशॉर्टफिल्म

मलाआवडलेलीशॉर्टफिल्म
 
      सध्या रिटायर्ड असल्यामुळे सतत काही ना काही नाविन्याचा धांडोळा घेणे चालू असते. परवा असंच यु ट्यूब वर मराठी नाटकसिनेमाचा शोध चालू असताना एक लघुपट नजरेसमोर आला त्याचे शीर्षक होते...
"आबा ऐकताय ना.. "
 यातल्या प्रमुख कलाकाराचे नाव वाचूनच तो बघायचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त "आबा ऐकताय ना" या 28 मिनिटाच्या लघुपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केले आहे.त्यातील आबा अर्थात आजोबांची भूमिका साकारली आहे जेष्ठ कलाकार अरुण नलावडे यांनी!
   ही कथा आहे आबा या आजोबांची... आबांच्या वृद्धापकाळचे विलक्षण असे चित्रण यात आहे.अरुण नलावडे यांनी अगदी सूक्ष्म बारकाव्यांसह आबा हे आजोबा रंगवले आहेत. वृध्दपणीच्या विविध जाणिवा त्यांनी आपल्या समर्थ अभिनयाने अधोरेखित केल्या आहेत.
   एक परिपूर्ण असे जीवन जगलेले आबा आपले निवृत्तीनंतरचे जीवन अत्यंत समाधानाने व्यतीत करत असतात.जेष्ठ नागरिकांच्या हास्य क्लबात जाऊन ते रमत असतात. वयपरत्वे त्यांची श्रवणशक्ती कमी कमी व्हायला लागते.आपल्या वृध्द्व सहकाऱ्यांची सुखदु:खे ते जवळून पहात असतात.आबांची सून आणि मुलगा त्यांची खूप छान काळजी घेतात याचा त्यांच्या इत्तर मित्र मंडळींना हेवा वाटत असतो.त्यांचा वाढता बहिरेपणा त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यासाठी श्रवणयंत्र घेतले जाते.
      श्रवणयंत्र वापरायला सुरुवात केल्यानंतर  जीवनातले अनेक हरवलेले आवाज त्यांना ऐकू यायला लागतात.नुसत्या नजरेने अनुभवणे अशक्य असलेल्या  छोट्या छोटया गोष्टीतून निर्माण होणारे सुंदर ध्वनी अनुभवून आबा  अगदी लहान मुलासारखे हरकून जातात.
     घड्याळाची टिकटिक,देवघरातल्या घंटीचा आवाज, नातवाच्या खेळण्यातल्या मोटारीचा आवाज, पावसाची तडतड, स्वयंपाक घरातले विविध आवाज ऐकून आबांना "सुख सुख म्हणजे हेच!" याचा साक्षात्कार होतो.
हां धनींचा जादुई जगताची सफर करत असतानाच अचानक त्यांना घरातल्या मोलकरणीच्या आबांच्याबद्दलच्या तक्रारी, वकील असलेल्या सुनबाईच्या क्लायंटच्या केसेसवरची चर्चा.त्यातच त्यांच्या जावई आणि मुलीच्या घटस्फोटाबद्दलची मुलगा आणि सुनेच्या बेडरूममधली अस्पष्ट चर्चा त्यांना ऐकू येते. त्यांनी घाईत विकलेला प्लॉटच्या व्यवहारावर नाराज असलेल्या सून आणि मुलातली चर्चा अशा नको असलेल्या चर्चा त्यांच्या कानावर येते आणि आपल्या सुखी जीवनाबद्दल अत्यंत समाधानी असल्याच्या विश्वासाला धक्का बसतो. जर श्रवणयंत्र बसवलेच नसते तर या सगळ्या गोष्टींच्या अज्ञानात आपण सुखी असतो या वास्तव जाणीवेने ते आपल्या श्रवणयंत्राची बॅटरी काढून फेकून देतात. संपूर्ण लघुपटाला अरुण नलावडे यांच्या आवाजातील काव्यत्म स्वगताने एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. प्रत्येकाने त्यातल्या त्यात जेष्ठ लोकांनी जरूर पाहावा असा हा लघुपट आहे. जरूर पहा...
"आबा ऐकताय ना... "
.... प्रल्हाद दुधाळ.
  9423012020

Wednesday, March 11, 2020

सोशल मीडिया... एक व्यसन.

सोशल मीडिया... एक व्यसन.
     आपल्या जीवनात सोशल मिडीयाने चंचूप्रवेश केला आणि थोडा थोडा वापर वाढत वाढत आता नकळत आपण त्याचे गुलाम झालो आहोत. सदासर्वकाळ फेसबुक, व्हाटसअप, ट्विटर, इंस्टाग्राम सारख्या समाजमाध्यमावर अनेकजण पडीक असल्याचं दिसतं आहे. सोशल मीडियाच्या अतिवापराचे अनेक मनोकायिक दुष्परिणाम माणसाच्या आयुष्यावर दिसू लागले आहेत.यातून अनेक मानसिक आजार वाढत चालंले आहेत. यातून संपूर्णपणे बाहेर पडणे जवळ जवळ अशक्य आहे;पण त्यांच्या वापराबाबत स्वतःवर काही बंधने घालून घेतली तर या व्यसनाचा अतिरेक नक्कीच आपण थोपवू शकतो
1.दिवसातले काही ठराविक तास( फार फार तर एक दोन तास) या कारणासाठी देण्याची मर्यादा स्वतःवर घालून त्या वेळेचे काटेकोर पालन करणे.
2.आठवड्यात एक दिवस सोशल मीडिया फास्ट म्हणजे त्या दिवशी काही झाले तरी या मीडियापासून लांब राहणे.
3.मोबाईल ऐवजी दुसरा एखादा आवडता छंद जोपासणे.
4.मोबाईल आपल्या हाताशी न ठेवता थोडा दूर ठेवणे व तो हातात घेण्याचा मोह जाणीवपूर्वक टाळणे.
5.अती वापराचे हे व्यसन सोडवण्यासाठी योग्य त्या समुपदेशकाचे मार्गदर्शन व उपचार घेणे.
 थोडक्यात सोशल मीडियाच्या या व्यसनाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी स्वयंशिस्त हा एकमेव उपाय आहे असे मला वाटते....
--- (c)प्रल्हाद दुधाळ 9423012020.

Thursday, February 27, 2020

मराठीराजभाषादिन

#मराठीराजभाषादिन

     आज 27फेब्रुवारी,मराठी साहित्याचा मानदंड  वि. वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस! हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून जगभरातले मराठी बांधव साजरा करतात.या निमित्ताने मराठी भाषेचे गोडवे गायले जातात.विविध साहित्यिक उपक्रम राबवले जातात.फेसबुक व्हाट्सअँप सारख्या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या घेतल्या जातात.अभिमानाने मराठी भाषेचा जागर केला जातो.
लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी.
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी.
धर्म, पंथ, जात एक, जाणतो मराठी.
एवढ्या जगात माय मानतो मराठी.
  कथा कविता कादंबऱ्या अशा साहित्याने समृद्ध असलेली मायमराठी आपली मातृभाषा आहे याचा प्रत्येक मराठी बांधवाला सार्थ अभिमान आहे आणि तो असायलाही हवा;पण हा अभिमान आजकाल फक्त 27फेब्रुवारी आणि 1मे या दोनच दिवशी प्रकर्षाने आढळतो.एरवी मात्र महाराष्ट्रातील विशेषतः शहरांत  मातृभाषा मराठी असूनही बऱ्याचदा दोन मराठी माणसे एकमेकांशी हिंदी वा इंग्रजी भाषेत संवाद साधताना दिसतात.मराठी शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होते आहे.मराठीत शिकण्याचा,  बोलण्याचा,लिहिण्याचा लोकांना कमीपणा वाटायला लागला आहे.
       हे खरे आहे की जागतिकीकरणाच्या धबडग्यात सर्वमान्य इंग्रजी भाषेचे महत्व  वाढले आहे.एक परिपूर्ण ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीला असे महत्व असणे साहजिकही आहे;पण 'आम्ही इंग्रजी माध्यमातून शिकतो आहोत यामुळे मराठी मुळीच नको' ही भावना मराठी भाषेला मारक ठरते आहे.व्यवहार भाषा म्हणून इंग्रजीचा अंगीकार करतानाच आपल्या मुलांनी आपली मातृभाषाही शिकायला हवी हा आग्रह मराठी पालकांनी धरायला काय हरकत आहे?
   फक्त मराठी माध्यमातूनच शिकावे असा  आग्रह आजच्या काळात जसा दुराग्रह आहे तसाच 'मराठ' हा विषयच  अभ्यासात नको असा अट्टाहासही मायमराठी भाषेसाठी प्रचंड मारक आहे!
      आजच्या स्पर्धेच्या युगात टिकाव लागण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने इंग्रजी शिकायलाच हवी कारण ती सध्याची जागतिक मान्यतेची व्यवहारभाषा आहे;पण त्याबरोबरच प्रत्येकाने आपली मातृभाषा  मराठीही शिकायला हवी, आवर्जून लिहायला हवी आणि बोलायलाही हवी.मराठी अस्मिता,  मराठी संस्कृती, मराठी साहित्याचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे जाण्यासाठी जाणीवपूर्वक
मराठी भाषा संवर्धनाचे काम घराघरात व्हायला हवे. थोडक्यात...
  स्तुती मराठीची भाषेच्या या दिनी
  एरवी मराठी भासे दीनवाणी.
  आजकाल लाज आईच्या भाषेची
  आवडते बोली सदा इंग्रजीची.
  परक्या भाषेत मिळवावे ज्ञान
   माय मराठीचे ठेवू परी भान.
   मराठी आपुली ओळख मातीची
   आठवावी भाषा बोबड्या बोलीची.
   बोलावे हसावे गावे मराठीत
   मराठी माणसा बोल मराठीत.

       चला आजच्या मराठी भाषा दिनी शपथ घेऊ...
      मराठी लिहू,मराठी वाचू,मराठी बोलू!
    ......  प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

Friday, January 31, 2020

स्वेच्छा सेवानिवृत्ती. एक संदेश

भारत संचार निगम लिमिटेड या माझ्या कंपनीतून आज 31 जानेवारी 2020 रोजी हजारो कर्मचारी व अधिकारी स्वेच्छानिवृत्त होत आहेत त्यांच्यासाठी एक संदेश
.....प्रल्हाद दुधाळ पुणे.

नमस्कार मित्र मंडळी,
   आज आपल्या जीवनातल्या एका अत्यंत  महत्वपूर्ण अशा टप्प्यावर उभ्या असलेल्या सर्व  सहकर्मचारी व अधिकारी बंधू भगिनींना स्वेच्छानिवृत्ती नंतरच्या मुक्त आनंदी पर्वासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
   मित्रहो उद्यापासून इतकी वर्षें अंगवळणी पडलेल्या दिनक्रमात बदल होणार आहे,आता ना सकाळची पळापळ, ना ऑफिसचे टेन्शन!खरं तर या पळापळीची ऑफिसमधल्या टार्गेट्स आणि इत्तर रुटीनची आपल्याला सवय जडली आहे.आपल्याला झोकून देऊन काम करायची सवय लागलेली आहे!
  कदाचित  इतकी वर्षें अंगवळणी पडलेल्या या दिनक्रमात अचानक असा बदल करावा लागेल अशी स्वप्नातही आपण कल्पना केली नसेल;पण उद्यापासून आपल्याला नोकरीसाठी बाहेर पडायचे नाही हे वास्तव आहे, आणि या वास्तवाचा जेव्हढ्या लवकर आपण स्वीकार करू तेवढे आपल्याला पुढील आयुष्याचे नियोजन करायला सोपे जाणार आहे हे लक्षात घ्या. फार भावनिक नं होता आता गरज आहे ती आपल्या जीवनाकडे तटस्थ्यवृत्तीने बघण्याची!
 "हे असं का घडलं?" "असं केलं असतं तर तसं झालं असतं", "अजून थोडा वेळ मिळाला असता तर मी यांव केलं असतं आणि त्यांव केलं असतं!" असला विचारांचा किंवा चर्चेचा काथ्याकूट करुन वेळ वाया घालवण्यापेक्षा 'आता आपण सध्याच्या नोकरीतून निवृत्ती घेतली आहे आणि पुढील आनंदी आयुष्याचे तातडीने नियोजन करायचे आहे'  हे सत्य स्वीकारणे आपल्या मानसिक आणि पर्यायाने शाररिक आरोग्यासाठी हिताचे आहे याची खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधावी असं मला वाटतं.
    मिळणाऱ्या पैशाच्या गुणवणूकीच्या सुनियोजनाबरोबरच उद्यापासून हाताशी असलेल्या मुबलक मोकळ्या वेळेचे नियोजन करणेही अत्यावश्यक आहे!
     ज्यांच्याकडे वय आणि ऊर्जा आहे त्यांनी नक्कीच नव्या संधींचा धांडोळा घ्यावा;पण "आता बास, खूप वर्षें घासली" अशी मानसिकता असलेल्या मित्रांनी आपण आता नक्की वेळ कसा घालवणार आहोत याचा विचार आत्ताच सुरू करावा! आता आर्थिक सुबत्ता आहे त्यामुळे अर्थार्जन करण्यासाठी काही केले नाही तरी यापुढचा आपला दिनक्रम नक्की काय असेल यावर निदान प्राथमिक विचार तरी करायला हवा.
    आपल्या राहण्याच्या तीन चार किलोमीटर परिसरात आपल्याप्रमाणेच जे लोक निवृत्त झाले आहेत त्यांनी एकत्र येऊन बरेच काही करता येण्यासारखे आहे.
   आता "आपण कोणत्या पदावर काम केले", "कोणती अधिकारपदे भूषविली", "आपल्याला किती मान होता", "माझा किती रुबाब होता" या सगळ्या गोष्टीना फारसे महत्व नाही, तर "आपण आपल्या नोकरीतून सन्मानाने निवृत्ती घेतली आहे" आणि आता आपण एक "निवृत्त सरकारी कर्मचारी" आहोत हे एकदा का स्वीकारले की समाजात मिसळणे सहजसोप्पे होणार आहे हे लक्षात घ्या!
   यापुढे आपण आत्तापर्यंतच्या आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे  ज्या ज्या गोष्टींसाठी वेळ देऊ शकलो नव्हतो त्या गोष्टींसाठी आता आवर्जून वेळ द्या. आपल्या छंदांसाठी वेळ द्या. बागकाम करुन बघा. भटकंती करा. स्वयंपाक करुन बघा.आपल्याशी ज्यांची वेव्हलेन्थ जुळते अशा मित्रमंडळीत जा, गप्पा मारा.
Connecting India  अशी टॅगलाईन असलेल्या कंपनीत आपण आजपर्यंत काम करत होतो त्यामुळे अनेक लोकांशी आपण जोडलेले आहोत आणि हे जोडलेले स्नेहबंध अजून घट्ट कसे होतील ते पहा.
लोकांना भेटत रहा मनातलं बोलत रहा....
जोडलेली नाती आणि जोडलेली मने, स्नेहबंध तसेच यापुढेही जोपासत रहा.एकमेकांचा आधार व्हा.आधार द्या, आधार घ्या....
   अर्थात, यापुढे जे जे करावेसे वाटते (व्यसने सोडून) ते ते करावे. शाररिक व्यायामाइतकाच महत्वाचा असा बौद्धिक व्यायामही  सातत्याने करा.
   अवेळी आलेली स्वेच्छानिवृत्ती ही आपत्ती न समजता नियतीने आपल्याला आनंदात जगण्यासाठी दिलेली संधी आहे हे लक्षात घ्या आणि या संधीचे सोने करुन आपले आयुष्य अधिक सुंदर करायचा ठाम संकल्प करूनच आज ऑफिसातून बाहेर पडा.
बाहेरचे मुक्त सुंदर जग आपले स्वागत करण्यासाठी सज्ज आहे.
 स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या सर्व बंधू भगिनींना पुन्हा एकदा त्यांच्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
   ..... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, January 15, 2020

नात्यात गोडवा -वाढवा .

             वाढावा नात्यात गोडवा 

        परवा एक फेसबुक मित्र प्रथमच समोरासमोर भेटला.एरवी फेसबुकवर माझ्या पोस्ट्सवर/लिखाणावर मोकळ्याढाकळ्या कॉमेंट्स आणि लाईक करणारा हा माणूस प्रत्यक्षातही अगदी तसाच असेल अशी माझी कल्पना होती;पण समोरासमोर भेटल्यानंतर मात्र माझा भ्रमनिरास झाला.आपल्या फेसबुक भिंतीवर प्रचंड मजेशीर खुसखुशीत गोड गोड भाषेत व्यक्त होणारी ही व्यक्ती प्रत्यक्ष बोलताना मात्र अगदीच कोरड्या एकसुरी भाषेत बोलत होती! प्रथमच समोरासमोर भेटल्यानंतर पुढाकार घेऊन मी सुरू केलेल्या संवादात केवळ औपचारिकपणे सहभागी होऊन दोन चार वाक्यातच त्याने एका बाजूने संवाद संपवला.
     मग माझ्या लक्षात आले की त्या संवादात फक्त मीच भरभरून बोलत होतो आणि तो मात्र जेव्हढ्यास तेव्हढे बोलून संवाद केव्हा एकदा संपतोय याची वाट पहात होता! 
       काही काही लोकांना प्रथम भेटीत अनोळखी माणसाबरोबर बोलताना बुजल्यासारखे होऊ शकते हे मी समजू शकतो, काही लोक मितभाषीही असू शकतात हे सुद्धा मान्य आहे;पण सोशल मीडियावर एकमेकांना जन्मोजन्मीची ओळखत असल्यासारखी चॅटींग करताना मोकळेपणी वागणारी,बोलणारी माणसे प्रत्यक्षात भेट झाल्यावर अशी वागू शकतात हे पाहून नाही म्हटलं तरी थोडा निराश झालो.अर्थात प्रत्येकाचा आपला एक स्वभाव असतो.
    सोशल मीडियाचे सोडा;पण आपल्या वास्तव आयुष्यातही अशी अनेक माणसे वावरताना आढळतात ज्यांचे घातलेले गुडीगुडी मुखवटे आणि खरे चेहरे आपण कल्पनाही करू शकत नाही एवढे भिन्न असतात!
आपला काही मतलब साधायचा असला की तेव्हढ्यापुरतं गोड गोड बोलणाऱ्या व्यक्ती एकदा का अपेक्षित असलेला कार्यभाग साधला की आपला मूळ स्वभाव दाखवतात.असे कामापुरत्या गोड गोड बोलणाऱ्या माणसांकडून फसले जातो  तेव्हा संवेदनशील मनांना  किती यातना होतात ते फक्त अशी मने असलेल्या माणसासलाच माहीत! हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आजचा मकर संक्रांतीचा दिवस....
    आपल्याभोवती नेहमीच आतून बाहेरून स्वच्छ सुंदर पारदर्शी मन असलेली माणसं असावीत, त्यांचे संपर्कांतील प्रत्येक माणसांशी वागणेबोलणे स्वच्छ निर्मळ असावे.ज्यांच्याशी मनमोकळं बोलल्यानंतर प्रसन्न वाटावं,सुखदुःखाच्या प्रसंगी एकमेकांना आधार देण्याइतपत त्यांच्यात सहकार्य भावना असावी.एखाद्या चुकीच्या गोष्टींसाठी परखडपणे एकमेकांचे कान पकडण्यापर्यंत अधिकार आणि मायेचा ओलावा असावा.कोणत्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही इतपत निर्मळ निरपेक्ष नातं मनामनात असावं. जातीधर्म प्रातांच्या सीमा ओलांडून असे संबंध माणसामाणसात निर्माण व्हावेत म्हणून आपल्या संस्कृती व परंपरात अनेक सण सभारंभांची योजना केलेली आहे.आज मकरसंक्रात,माणसा माणसातील नाती वृद्धिंगत व्हावीत,तीळ आणि गुळाच्या रूपाने नात्यांमध्ये स्नेह आणि गोडवा निर्माण व्हावा म्हणून साजरा केला जाणारा सण! तिळगुळ घ्या व द्या आणि मनापासून एकमेकांशी गोड बोला/गोड वागा असा संदेश देणारा आपला सण!.....
   तर, अशा या मकरसंक्रांतीच्या आपणा सर्वाना खूप खूप शुभेच्छा!
   तीळगूळ घ्या गोड बोला!
           ...........प्रल्हाद दुधाळ.