Wednesday, January 30, 2019

जिद्द...

जिद्द....
     मागच्या आठवड्यात मी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी एक शपथ पोस्ट केली होती.खूप जणांना ती पोस्ट खूप आवडली होती.
   अनेक मित्रांनी यापुढे आपणही अन्नाची नासाडी टाळू असे सांगितले.माझ्या एका मित्राने तर ती शपथ खूपच गांभीर्याने घेतली होती....
   आज ऑफिसात एका गृपने संक्रातीच्या निमित्ताने दुपारचे जेवण आयोजित केले होते आणि आम्ही सगळे आमंत्रित म्हणून हजर होतो.जेवणात तीळ पोळी, मसाला भात टॉमॅटो सार असा मस्त मेनू होता. प्रत्येक ताटात खूपच वाढून दिले होते.आपल्याला हे सगळं संपवणं शक्य नाही हे जवळपास प्रत्येकाला माहीत होते;पण आग्रहापुढे कुणाचेही चालत नव्हते. बऱ्याच जणांनी माझ्यासह अगदी नाईलाजाने समोर वाढलेले संपवले.माझा तो मित्र मात्र एका पोळीत आऊट झाला होता. ताटात शिल्लक राहिलेले अन्न कुणाला तरी खायला देऊन ती शपथ पाळायची असे त्याने ठरवले.त्याने तसे बोलूनही दाखवले आणि एका रद्दी न्युज पेपरमध्ये उरलेले अन्न घेवून तो गरजु भुकेलेला माणूस शोधायला तो बाहेर पडला!
 दोनशे मीटर अंतरावर एक भिक्षेकरी नेहमी बसतो हे त्याला माहीत होते.तो त्या चौकात गेला;पण आज नेमका तो भिक्षेकरी गायब होता. मग तो तसाच पुढं चालत राहिला.एक दीड किलोमीटर परिसरात त्याला कुणी गरजु सापडला नाही.एका उभ्या असलेल्या टेंपोच्या सावलीत एक कुत्रे झोपले होते.त्याने शेवटी त्या कुत्र्याला ते अन्न द्यायचा निर्णय घेतला.कुत्र्याला त्याने आवाज दिला." काय कटकट आहे" असा भाव ठेवून कुत्रे महाशयांनी डोळे उघडले.मित्राने उत्साहाने अन्नाचा कागद त्याच्यासमोर ठेवला.कुत्रे महाशयांनी अन्नाकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा झोपून घेतले!पुन्हा प्रयत्न करूनही कुत्रोबाने डोळे उघडायला नकार दिला!
आता मित्राने हार मानली आणि तो कागद उचलून अजून पुढे चालायला लागला.उपाशी माणूस, कुत्रा किंवा कोणताही प्राणी ज्याला हे अन्न खायला देता येईल,असा विचार करत शोधत शोधत तो चांगला दोन किलोमीटर पुढे गेला. अचानक त्याला एक दुसरा कुत्रा दिसला.लगबग करून तो पुढे गेला आणि तो कागद त्या कुत्र्यासमोर ठेवला.कुत्रा थांबला त्याने तो कागद क्षणभर हुंगला आणि मित्राकडे  एक नजरेचा कटाक्ष टाकला आणि सरळ पुढे निघून गेला.
आता मात्र मित्र चांगलाच वैतागला!
"माणूस सोडा, एक साधे कुत्रेही त्याने दिलेले अन्न खायला तयार नव्हते!"
  नाईलाज होवून त्याने तो पेपर पुन्हा उचलला आणि अजून पुढे चालायला लागला.रस्त्याच्या कडेला काही कोंबड्या मातीत चोच मारत होत्या.मित्राला मग कल्पना सुचली आणि पोळीचे छोटे छोटे तुकडे करून तो त्या कोंबड्यांना अन्न भरवत राहीला.
"मी अन्न वाया घालवणार नाही" ही शपथ अशा प्रकारे त्याने एकदाची निभावली!!!
याला म्हणतात जिद्द! हो की नाही?
..... प्रल्हाद दुधाळ.
     ३०/१/२०१९

Thursday, January 24, 2019

मोबाईलची कथा व्यथा

      मोबाईलची कथा व्यथा
       आमच्या बिल्डिंगमध्ये केवळ माझ्या घरात, तोही मी दूरसंचार खात्यात काम करत असल्याने फुकट मिळालेला टेलिफोन होता.बिल्डिंगमधील कुणाला फोन करायचा असला किंवा कुणाचा इनकमिंग कॉल आला तर त्याला बोलावून घेवून परत कॉल करायची मोफत सोय मी करून दिली होती.त्यावेळी मोबाईल सेवा नुकतीच चालू झाली होती इन्कमिंग कॉलला ही आठ रूपये चार्ज होता.आमच्या शेजारी एक व्यापारी राहायचे.त्यांच्याकडे असा मोबाईल होता.एकदा त्यांची बायको एका लग्नाला गेली आणि तेथे अचानक बेशुध्द  झाली.त्याचा फोन लागत नव्हता, त्यामुळे तो निरोप मला माझ्या फोनवर कुणीतरी दिला.ते महाशय नेमके बाहेर गेले होते.त्यांच्याकडे नवा नवा आलेला मोबाईल होता.मी त्यांना मोबाईलवर कॉल करून त्याच्या बायकोबद्दल सांगायचा प्रयत्न करत होतो;पण इन्कमिंगला चार्ज आहे म्हणून बाबा मोबाईलचा कॉल घ्यायला तयारच नाही! तब्बल एक तास मी  प्रयत्न करत होतो;पण त्याने फोन काही घेतला नाही! असा राग आला होता ना!शेवटी मी नाद सोडून दिला...
दुसऱ्या दिवशी कळाले की त्याच्या एका नातेवाईकाने परस्पर याच्या बायकोला हॉस्पीटलमध्ये  एडमिट केले होते ....

कथा कुणाची व्यथा कुणाला!
....प्रल्हाद दुधाळ.

Monday, January 14, 2019

शपथ...

शपथ....
 
   शिक्षिका असलेल्या एका फेसबुक मैत्रिणीचा मेसेज आला की शाळेत तिच्या विद्यार्थ्याना "अन्नाची नासाडी करू नये" अशा आशयाची  एक शपथ द्यायची आहे आणि त्यासाठीचा मजकूर मी लिहून द्यावा.मी प्रयत्न करतो म्हणालो...
 आज ती शपथ लिहून द्यायचा प्रयत्न केला.
मी लिहिलेली ती शपथ जेव्हा पुन्हा वाचली तेव्हा लक्षात आले की अरे; ते विद्यार्थीच का, अशी शपथ तर माझ्यासह प्रत्येकाने घ्यायला हवी ....
बघा जमली का?
 "आम्ही शपथ घेतो की...
- अन्न हे पूर्णब्रह्म आहे आणि या अन्नाचा प्रत्येक कण ही राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे हे मला माहीत आहे .अन्न वाया घालवून या संपत्तीचा मी विनाश करणार नाही व होवू देणार नाही.
- माझ्या ताटात येणाऱ्या अन्नाच्या प्रत्येक घासामागे बळीराजाने केलेल्या अतोनात कष्टाची मला जाणीव आहे. अन्न वाया घालवून बळीराजाच्या त्या कष्टाचा मी अपमान करणार नाही .
- घरात किंवा एखाद्या कार्यक्रमात जेवण करताना भूक असेल एवढेच अन्न मी वाढून घेईन .अन्नाचा प्रत्येक घास मी निर्मिकाने दिलेला प्रसाद म्हणून खाईन.अन्न वाया जाणार नाही याची मी दक्षता घेईन व ईतर लोकांनासुध्दा अन्नाचे महत्त्व समजावून सांगेन
- मला जाणीव आहे की माझ्या देशात अनेक लोकांना खायला पुरेसे अन्न मिळत नाही. माझ्या अवतीभवतीच्या अशा एका तरी उपाशी माणसाला जमेल तेव्हा माझ्या घासातला घास द्यायचा मी प्रयत्न करीन.
- भूक असताना खाणे ही प्रकृती, भूक नसताना खाणे ही विकृती आणि स्वत: अर्धपोटी असताना आपल्यातला अर्धा घास दुसऱ्या गरजूला खायला देणे ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती जोपासण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न करीन."
..... प्रल्हाद दुधाळ.