Wednesday, September 20, 2017

आनंदी वाटा

   आनंदी  वाटा.
    धैर्यशील पवार-एक  उमद व्यक्तीमत्व होत.एका खाजगी कंपनीत व्यवस्थ्यापक म्हणून त्यांनी इमानेइतबारे नोकरी केली आणि मागच्या वर्षी सेवानिवृत्त झाले. आपलं काम भले आणि आपण भले या वृत्तीने त्यांनी आपले आत्तापर्यन्तचे आयुष्य जगले होते.
     सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडलेले पवार साहेब संध्याकाळी आठनंतरच घरी यायचे.बऱ्याचदा गुरूवारी सुट्टीच्या दिवशीही त्यांना कंपनीत जायला लागायचे. रिटायर होईपर्यंत त्यांनी नेहमीच आपल्या कामाला प्राथमिकता दिली.घरात त्यांची बायको सगळ सांभाळून घ्यायची.घरातल्या कुठल्याच गोष्टीत पवार साहेबांची इन्व्हाल्वमेंट नसायची.एकुलत्या एका मुलाच्या शाळेतही ते ना कधी पालक मिटींगला गेले ना कधी कौतुकाने त्याच्या शाळेच्या गैदारिंगला हजेरी लावली. कुठल्याही नातेवाईकाच्या लग्न बारसेच काय पण कुणाच्या मयतीला जाणेही त्यांना उभ्या आयुष्यात जमले नव्हते.या सगळ्या आघाड्या त्यांची पत्नी अगदी लीलया पेलायची.मुलाच्या वाढदिवसालाही ते कसेबसे पोहोचायचे.मुलगा लहान होता तोपर्यंत ठीक होत पण मोठा झाल्यावर आपल्या वडीलांची अशा प्रसंगी असलेली अनुपस्थिती त्याला बोचायची.यावरून बरेचदा त्याने वडीलांशी अबोलाही धरला होता: पण पवार साहेबांच्या लेखी अशा गोष्टीना फारसे महत्व नव्हते.कमालीचे वर्कहोलिक असलेले पवारसाहेब रिटायर झाल्यावर मात्र काहीच काम उरले नसल्याने कासावीस झाले.आत्तापर्यंतच्या आयुष्यात त्यांना कुणाचीच गरज भासली नव्हती.फारसे मित्रही त्यांना जोडता आले नव्हते.कुणा नातेवाईकाशीही त्यांची कधी जवळीक नव्हती आणि घरात त्यांचे नसणे तर कुटुंबीयांना अंगवळणीच पडलेले होते त्यामुळे आपल्या मोकळ्या वेळेचे आता करायचे काय हा प्रश्न पवार साहेबांसमोर आ वासून उभा होता. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी घरात बसून काढले पण बसल्या बसल्या घरातल्या नको त्या गोष्टीतली त्यांची लुडबूड त्यांच्या पत्नीला त्रासदायक व्हायला लागली.बाहेर फिरायला जायला लागले तर एकटेच वेड्यासारखे तरी किती फिरणार? अवघ्या महिनाभरात ते रिटायर लाईफला कंटाळले.काम एके काम असे आयुष्य जगल्याने आपण आयुष्यात काय काय गमावले आहे याची आता त्यांना जाणीव झाली.आयुष्यात पैसा मिळवणे भरपूर काम करणे यालाच आपण आनंद मानत आलो.कुठलाही छंद जोपासला नाही,वर्तमानपत्रसुध्दा धडपणे वाचले नाही,बायकोमुलाबरोबर कधी कुठे फिरायला गेलो नाही.कधी निवांतपणे घरी टीव्ही सुध्दा बघितला नाही.अत्यंत एकसुरी आयुष्य जगलो याचा पवारसाहेबांना आता पश्चाताप होत होता;पण वेळ निघून गेली होती!
   आता मात्र पवार साहेबांनी स्वत:ला बदलायचं ठरवलं.जे झालं ते गेलं,एक नवी सुरुवात करायचा संकल्प केला.सोसायटीतल्या लोकांशी ते स्वत:हून बोलायला लागले.बायको व मुलाशी आपुलकीने बोलायला लागले.नातेवाईकाना भेटून त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली.कॉलेजात असताना ते कैरम व चेस खेळायचे.आता पुन्हा त्यांनी ते खेळ खेळायला सुरुवात केली.आयुष्यात जे जे करायचे राहून गेले आहे ते आता जमेल तसे करायचे असा त्यांनी संकल्प केला.आता पवार साहेब आनंदी जीवन जगत आहेत.
      बऱ्याच लोकांच असंच असतं....
      एका ठराविक वयानंतर माणसाला एका क्षणी असं वाटू लागतं की आजपर्यंत आपण जशा प्रकारे जगलो,जे काही केले वा करतो आहोत, ते सगळं निरर्थक आहे. जीवनातला अत्यंत महत्वाचा कालावधी आपण नको त्या गोष्टींमधे अडकून वाया घालवल्याची प्रखर जाणीव होते. अशावेळी आयुष्य अत्यंत निरस वाटायला लागतं, " का आणि कशासाठी एवढा अट्टाहास केला?" ही भावना मनात प्रबळ व्हायला लागते, आणि हाच तो क्षण असतो स्वत:ला सावरण्याचा, स्वत:ला समजावण्याचा-
     " अरे बाबा, ज्यात तू आनंद शोधत होतास, तेथे तो नाहीये!". हाच क्षण असतो स्वत:ला नव्याने ओळखण्याचा.
      ज्याला हे जमेल तो निश्चितच पुन्हा नवी सुरूवात करू शकतो! एकदा का हे जमायला लागलं ना की माणसाला कोणाच्याही बेगडी आधाराची गरज उरत नाही. आनंदी जीवनाच्या लाखो वाटा त्याच्या स्वागताला सज्ज असतात!
                                                                    .... प्रल्हाद दुधाळ.

Monday, September 18, 2017

गोष्ट स्वप्नपुर्तीची....

गोष्ट स्वप्नपुर्तीची....
गोष्ट एकोणीसशे शहात्तर सालातली आहे,नुकताच मी शालांत परीक्षा उतीर्ण झालो होतो. त्या काळी आमच्या गावाच्या जवळपास कोठेही पुढच्या शिक्षणाची सोय नव्हती,त्यामुळे यापुढे शिक्षणासाठी पुण्याला जायचं आणि किमान इंजीनारिंगची पदवी वा पदविका घ्यायची असे स्वप्न मी पहात होतो!
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती त्यामुळे हे स्वप्न कितीही आकर्षक वाटत असले तरी कुणाचेतरी आर्थिक पाठबळ व मानसिक आधार मिळाला तरच प्रत्यक्षात येणार होते! त्याकाळी आजच्यासारखी उदंड खाजगी कॉलेजेस नव्हती.पदवी अथवा पदविकेसाठी शासकीय संस्थेमधेच प्रवेश मिळवायला लागायचा आणि ते तेव्हढे सोपे नव्हते.पदविकेसाठी प्रवेशसंख्या अत्यंत मर्यादित असायची. मला कसेही करून इंजिनिअरिंग पदविकेला प्रवेश मिळवायचा होता. मी इकडून तिकडून माहिती गोळा केली आणि शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेशासाठी अर्ज केला.मला शालांत परीक्षेला चांगले मार्क्स होते त्यामुळे पदविकेला प्रवेश मिळायची खात्री वाटत होती.प्रवेशाची यादी लागायला बरेच दिवस अवधी होता त्यामुळे अर्ज करून मी परत गावाला गेलो.साधारण एकदीड महिना गेला तरी प्रवेशासंबंधी काहीच समजले नाही.गावात टेलिफोनची सुविधाही नव्हती.प्रवेशासंबंधात पोस्टाने कळविले जाईल असे अर्ज स्वीकारताना मला सांगण्यात आले होते,त्यामुळे दररोज नेमाने पोस्टमनकडे चोकशी करत होतो.चोकशीसाठी प्रत्यक्ष पुण्याला जाणे आर्थिक कारणाने शक्य नव्हते.
त्या वर्षी जुलै महिन्यात प्रचंड पाऊस पडत होता.सगळ्या ओढ्यांनाल्यांना पूर आलेला होता, रस्ते वाहून गेले होते.गावाकडे येणारी एस.टी.ची बसही चारपाच दिवस गावाकडे फिरकली नव्हती! आठवडाभरानंतर एकदाचा पाऊस थांबला.
एक दिवस पोस्टमनने शासकीय तंत्रनिकेतनकडून आलेले पत्र घरी दिले,नेमका त्या दिवशी मी अकरावीच्या प्रवेशासाठी विसेक किलोमीटर अंतरावरच्या दुसऱ्या गावाला गेलो होतो. त्या दिवशी मी तिकडेच बहिणीच्या घरी मुक्काम केला.तिसऱ्या दिवशी परत घरी आल्यावर मला ते पत्र मिळाले.माझा आनंद गगनात मावत नव्हता!
शासकीय तंत्रानिकेतनकडून माझ्या प्रवेशासंबधीचे ते पत्र होते!
मी घाईघाईने पत्र उघडले,माझ्या पदविका प्रवेशासाठीचा तो “चान्स कॉल'' होता!
मी ते पत्र पुन्हा नीट वाचले.पत्रातील मजकुराप्रमाणे दिलेल्या तारखेच्या आत मी प्रवेशासाठी संपर्क साधायचा होता,तसेच प्रवेश फी भरून प्रवेशाचे इत्तर सोपस्कार पूर्ण करायचे होते.पुढे एक सूचनाही दिलेली होती की दिलेल्या वेळेत हे सोपस्कार पूर्ण न केल्यास माझ्याऐवजी माझ्यानंतर वेटिंग लिस्टमधील पुढच्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार होता! पत्रावरची तारीख पुन्हा पाहिली आणि मला रडूच कोसळलं! प्रवेशाचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्याची शेवटची तारीख उलटून वर एक आठवडा झाला होता!
माझ इंजिनिअर व्हायचं स्वप्न धुळीला मिळालं होते!
आयुष्यातली एक अत्यंत अनमोल अशी संधी हुकली होती! थोड्याच वेळात मी स्वत:ला सावरले, कारण रडून काहीच उपयोग नव्हता.
याबाबतीत मदत वा मार्गदर्शन करेल असे कुणीही ओळखीचे नव्हते.मुळात त्याकाळी अख्ख्या गावातून दोनतीन लोकच पदवीपर्यंत शिकले होते आणि ते सगळेजण शहरात रहात होते.
मला खूप वाईट वाटत होते,कारण त्या काळी इंजीनारिंग पदविकाधारकाला शासकीय व खाजगी क्षेत्रात भरमसाठ संधी उपलब्ध होत्या! पण आता विचार करून फायदा नव्हता.
पुढे काहीतरी करणे भाग होते.
नातेवाईकांचा आधार घेवून शेजारच्या गावी अकरावीला प्रवेश घेतला.अकरावी झाली, नंतर बारावीसाठी अजून दुसऱ्या गावाला गेलो. कसाबसा बारावी पास झालो.
पुढे पुण्यात बी एस्सीला प्रवेश घेतला.दुसऱ्या वर्षात शिकत असतानाच टेलिफोन खात्यात नोकरी लागली. मग नोकरी करता करता पदवी मिळवली.खात्याअंतर्गत प्रमोशनसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धापरीक्षा देत देत एकदाचा “इंजिनिअर” झालो.
आपण इंजिनिअर व्हायचं हे माझे स्वप्न उशिरा का होईना पण आता साकार झाले होते!
आता माझ्या ऑफीसच्या केबिनबाहेर लावलेल्या पाटीवरच्या नावासमोर ‘उपविभागीय अभियंता’ हे पद लावत असलो तरी असे पुन्हा पुन्हा वाटत रहाते की त्यावेळी ‘ती’ संधी जर साधता आली असती तर आयुष्यात अजून खूप मोठा पल्ला गाठता आला असता!
आजच्या अभियंता दिनाच्या सर्व क्षेत्रातल्या अभियंत्यांना खूप खूप शुभेच्छा!
. ....प्रल्हाद दुधाळ.पुणे (९४२३०१२०२०)

Friday, September 8, 2017

नसतेस घरी तू जेंव्हा.......

       नसतेस घरी तू जेंव्हा.......

       तिची आणि माझी गाठ नियतीने बांधलेली होती म्हणूनच आम्ही दोघे एकमेकांच्या आयुष्यात आलो असेच म्हणावे लागेल! एकोणीसशे पंच्याऐशी साल होते,मी नोकरीला लागून चारेक वर्षे झाली होती.
  एक दिवस आमच्या साहेबांनी अचानक मला त्यांच्या केबीनमधे बोलावले.साहेबांकडे जाण्याचा माझा कधी संबंध आलेला नव्हता, त्यामुळे थोडा बिचकतच केबीनमधे मी प्रवेश केला.माझ्या आधी तेथे दोन वयस्कर गृहस्थ बसले होते.साहेबांनी त्यांची माझ्याशी ओळख करून दिली.नमस्कार वगैरे झाले.मी दोघांनाही ओळखत नव्हतो!
   झाले होते असे की, आता मी लग्न करणार असेल असे गृहीत धरून आमच्या साहेबांनी त्यातल्या एका गृहस्थाची मुलगी लग्नासाठी  मला सुचवली. साहेबांचे म्हणणे होते की मी त्या मुलीला पाहायचे आणि पसंती कळवावी.हा मला साहेबांनी दिलेला आदेशच होता! खरं तर तोपर्यंत मी माझ्या  लग्नाचा बिल्कूल विचार केलेला नव्हता.त्याची माझी स्वत:ची अशी काही  कारणेही होती.नुकतीच मी पंचविशी पार केलेले होती.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून माझा इथपर्यंतचा प्रवास झालेला होता.माझे वडील मी आठवीत असतानाच वारले होते आणि माझ्या आईने मोठ्या कष्टाने मला वाढवले होते.घरची थोडी शेती होती, ती सावकाराकडे गहाण पडलेली होती,ती सोडवायची होती.गावात एका खोपटात रहात होतो तेथे एखादी खोली बांधायची होती.भावांना मदत करायची होती .मी पुण्यात झोपडपट्टीत दहा बाय बाराच्या खोलीत एका  भावाच्या आसऱ्याला रहात होतो.एक सायकल आणि दोनचार  कपडयाचे गाठोडे, हीच काय ती माझी मालमत्ता होती! अशा परिस्थितीत मी लग्न करण्याचा विचार करणे अशक्यच होते, पण साहेबांनी आणलेले ते स्थळ तर बघावे लागणार होते! त्याना नाही कसे म्हणणार,नाही का?
  तर....नंतरच्या रविवारी एका जवळच्या मित्राला सोबत घेवून मी मुकूंदनगर भागात माझ्या आयुष्यातल्या पहिल्या मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला गेलो.मुलगी पाहिली ती मला शोभेल अशीहोती. राज्य सरकारी महामंडळात ती नोकरीला होती.त्यांचे घर म्हणजे एक सरकारी क्वार्टर होती.घरात फ्रीज,टीव्ही सारख्या सर्व सुखसुविधा होत्या.एकंदरीत ते उच्च मध्यमवर्गीय कुटूंब होते.त्यांच्यासमोर  मी सर्वच आघाड्यांवर अगदीच किरकोळ होतो.पोहे चहा घेतला, जुजबी प्रश्नोत्तरे झाली आणि तेथून बाहेर पडलो.मला  मुलगी पसंत जरी असली तरी आपल्यासारख्या फाटक्या माणसाला ही माणसे आपली मुलगी कशाला देतील ? मला तरी ते सर्व अशक्य कोटीतले वाटत होते! मी ते सर्व विसरून गप्प बसणे पसंत केले.
   आठ दहा दिवसातच आमच्या साहेबांनी परत केबीनमधे बोलावले.त्या मुलीचे वडील आणि आमच्या साहेबांचे मित्र असलेले ते दोघेजण पुन्हा माझ्याकडे आले होते. मी मुलगी बघून आलो पण त्यांना काहीच सांगितले नाही म्हणून साहेब माझ्यावर रागावले.मी शांतपणे ऐकून घेतले.मी साहेबांना व त्या दोघांना माझी सगळी परिस्थिती, माझ्यावर असलेल्या प्रचंड जबाबदाऱ्या, माझा तुटपुंजा पगार व मला पुढच्या आयुष्यात कसा खडतर प्रवास करावा लागणार आहे वगैरे अडचणी समजावून सांगितल्या.माझे बोलणे त्यानी अगदी शांतपणे ऐकून घेतले आणि मला सांगितले की "आम्ही तुमची सर्व माहिती आधीच काढली आहे तरीही तुमचे स्थळ आम्हाला पसंत आहे! तुम्हाला जर मुलगी पसंत असेल तर पुढचा विचार करू नका ती तुम्हाला आयुष्यभर साथ देईल.आज तुमच्याकडे काहीही नसले तरी तुम्ही कर्तुत्वाने मोठे होणार हे नक्की आहे!तुम्हा दोघांच्या पगारात तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाल!" माझा चांगला स्वभाव,माझा निर्व्यसनीपणा व काहीतरी करण्याची जिद्द व मुख्य म्हणजे सरकारी नोकरी या गोष्टी त्या लोकांसाठी महत्वाच्या होत्या! तरीही मला त्या मुलीशी माझ्या परिस्थिती बद्दल बोलणे मला आवश्यक वाटत होते म्हणून मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो व मुलीशीही बोललो. तिनेही मला संपूर्ण साथ देण्याची तयारी दाखवली.तिचे म्हणणे होते की, आपण दोघे एकत्र येवून सगळे प्रश्न सोडवू!” नंतर मात्र मी थोडा गंभीरपणे विचार केला कदाचित नियतीने ही मला देवू केलेली संधी असू शकते.लवकरच दोन्हीकडील वडीलधाऱ्या लोकांच्या सल्ल्याने व आशीर्वादाने माझे लग्न ठरले!
   लग्न झाले आणि आम्ही वडगावशेरी येथे चाळीत एका मित्राच्या शेजारी एक सिंगल खोली भाड्याने घेवून संसार थाटला! सौं.स्मिताचे माझ्या आयुष्यात येणे हा माझ्या आयुष्यात खरोखर टर्निंग पॉईंट ठरला! माझे भाग्य घेऊन ती माझ्या घरी आली असेच मी म्हणेन,कारण त्यानंतर आम्ही एकमेकांना साथ देत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.गावाकडे एक छोटे घर बांधले.गहाण पडलेली शेती सोडवली. सिंगल रूम मधून डबल रूममधे व नंतर चारपाच वर्षातच स्वत:च्या फ्लॅटमधे रहायला गेलो.खात्याअंतर्गत परिक्षा दिल्या व त्यात उतीर्ण होत होत टेलिफोनऑपरेटर या पदावरून आधी टेलिफोन इंस्पेक्टर नंतर कनिष्ठ दुरसंचार अधिकारी व पुढे उपमंडल अभियंता पदापर्यंत पोहोचलो.गरजू नातेवाईकांना आर्थिक मदत करून आपल्याबरोबर त्यांचीही प्रगती कशी होईल हे पाहीले. हे सर्व मी पुढे होवून करत असताना माझी अर्धांगिनी ठामपणे माझी सावली म्हणून माझ्यामागे उभी होती.इथे एक गोष्ट नमुद कराविशी वाटते की,आर्थिक बाबतीत घेतलेल्या एकाही निर्णयावर अगदी एकदाही आमच्यात वाद झाला नाही! माझ्या प्रत्येक निर्णयात ती समर्थपणे माझ्याबरोबर होती. यश जसे वाटून घेत होतो तसेच अपयशही वाटून घेतले.एकुलत्या एक मुलाच्या इंजिनीअर होईपर्यंतच्या सगळ्या परिक्षांच्या वेळी ऑफिसातून रजा घेवून ती त्याला सपोर्ट करत होती.माझे कामाचे स्वरूप असे होते की मला घरी लक्ष देणे अवघड व्हायचे,परंतु या गोष्टीवरून आमच्यात कधीच वाद झाला नाही.प्रत्येक बाबतीत आम्ही चर्चा करून निर्णय घेतले आणि यशाची एक एक पायरी चढत राहीलो. एकमेकांना साथ देताना माणूस म्हणून कधी कधी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो,तडजोडी कराव्या लागतात.तशा तडजोडी आम्हालाही खूप वेळा कराव्या लागल्या पण त्यावर तोंड वाकडे करण्यापेक्षा त्या गोष्टीमधले आव्हान स्वीकारून त्यातला आनंद घेण्यावर आम्हा दोघांचा भर असायचा,आपण जे करतोय ते आपल्या परिवारासाठी करतोय आणि परिवाराचा आनंद तोच आपला आनंद या एकाच ध्यासाने तिने मला व मी तिला साथ देत राहिलो.एवढे मोठे मन असलेली बायको मिळणे ही माझ्यासाठी खरचं भाग्याची गोष्ट होती.माहेर पुण्यातच असल्यामुळे क्वचितच एकमेकांना सोडून आम्ही राहिलो त्यामुळेच “नसतेस घरी तू जेंव्हा ....” हा अनुभव फारसा घेतला नाही पण आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यावर मात्र कधीतरी मनात विचार येतोच ....
तुला वजा केल्यावर....
उमजत नाही,समजत नाही,
असेल कसा तो भविष्यकाळ?
पुढ्यात काय असेल वाढलेले,
तुटली जर वर्तमानाशी नाळ?
अजुनही होते हे मन कातर,
आठवता भेट पहिली वहिली!
 
सात जन्माच्या शपथा हळव्या,
 
झालेली वाट एक ही आपुली!
 
संसारवेल बहरली फुललेली,
अन स्वप्ने सगळी साकारलेली!
आठवते आयुष्याच्या सायंकाळी,
सुखदु:खातली वाट चाललेली!
भयभीत मी, होईल काय माझे,
अर्ध्यावरती साथ सुटल्यावर?
असेल कसले जीवन सखये,
माझ्यातुन तुला वजा केल्यावर?
       
                   ....प्रल्हाद दुधाळ.
                     (९४२३०१२०२०)

                पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाईम्स ५ नोव्हे २०१६ 

Saturday, September 2, 2017

कारण

कारण.
श्यामराव नुकतेच एल आय सी मधून रिटायर झाले होते. लहानपणापासून त्यांनी अत्यंत कष्टाने एक शेतमजूराचा मुलगा ते एक उच्च अधिकारी पदापर्यंतचा प्रवास केलेला होता आपले करियर घडवत असताना सुरवातीला शिक्षणातले अव्वल स्थ्यान व नंतर नोकरीत प्रमोशन मागे प्रमोशन मिळवत राहीले. आपल्याला आयुष्यात जे मिळवायला प्रचंड सायास करावे लागले तसे आपल्या एकुलत्या एक मुलाच्या बाबतीत घडायला नको, त्याला हवे ते व हवे त्या प्रमाणात मिळायला हवे या ध्यासाने त्यानी प्रचंड पैसा व प्रतिष्ठा मिळवली. मुलाला उच्च शिक्षण दिले. त्याला उत्तम नोकरीही मिळाली. लग्न झाल्यावर मात्र तो यांच्याबरोबर न रहाता वेगळा रहातो. शामरावानी  मुलाच्या व कुटूंबाबाबत जे अपेक्षिले होते ते घडले नव्हते.आता रिटायर झाल्यावर रिकामे झाल्यावर काय करायचे वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांना सतावतो आहे कधी नव्हे तो चिडचिड होते आहे. त्यातच बीपी आणि शुगर वाढली आहे.आपण केलेले कष्ट, घडवलेले करियर या गोष्टी आता त्यांना व्यर्थ वाटताहेत. निराशेने ते ग्रासले आहेत.
      आज जे लोक पन्नाशीसाठीत आहेत त्याच्यातील बहुसंख्य लोकांनी स्वत:चे शिक्षण व करियर घडवताना प्रचंड कष्ट उपसले आहेत.आपला मार्ग आपणच निवडताना त्यापोटी येणारे यश अथवा अपयशाची जबाबदारीही  त्यांनी  स्वत: घेतली आहे.आपण करू किंवा म्हणू तेच खर या विचारप्रवृत्तीचे मूळ त्याच्या एकला चलोरे पद्धतीच्या जीवनप्रवासात आहे.या पिढीला ना मनाजोगता पैसा खर्च करता आला ना आजच्यासारख्या सुखसुविधा उपभोगता आल्या.त्यामुळेच असेल पण आजपण त्याला आपण कष्टातून उभारलेल्या विश्वाच्या अस्तित्वाची काळजी आहे.मिळवले ते चुकून हातातून निसटून तर जाणार नाही ना? हा विचार त्याला या वयात जास्त छळतो आहे त्यातूनच कौटूंबिक समस्या, कलह अथवा आजारपणे आली की त्याच्या चिडचिडेपणात भर पडते आहे.आपल्या मुलाबाळांसाठी आपण एवढे केले पण त्याची म्हणावी तशी कुणाला जाणीव नसल्याची भावनाही त्याला त्रास देते.ज्या लोकांनी आयुष्यात फक्त  आपली नोकरी धंदा व पैसा कमावणे यालाच महत्व दिले,  कोणतेही छंद जोपासले नाहीत, माणसे जोडली नाहीत,साहित्य कलेत जे कधी रमले नाहीत त्यांना आयुष्याच्या या टप्प्यावर एकटेपणा प्रचंड त्रास देतो.तो चिडचिडेपणा हा त्याने ज्या पद्धतीने जीवन जगले त्याचा परिपाक आहे.
काय वाटते आपल्याला?
..... प्रल्हाद दुधाळ.