Saturday, November 18, 2017

ड्रायव्हर....

ड्रायव्हर....
शिंगटेआण्णा म्हणजे अफलातून माणूस! हवाई दलात शिपाई म्हणून पंधरा वर्षाची नोकरी करून आण्णा रिटायर झाला आणि एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीमधे ड्रायव्हर म्हणून सरकारी खात्यात चिकटला.
सगळ्याच सरकारी खात्यात मुख्य अधिकाऱ्यांच्या ड्रायव्हरचा फारच रूबाब असतो. अधिकारी कधीच त्याच्या ड्रायव्हरला दुखावत नाही, त्याची बरीच कारणे असतात! त्यातले महत्वाचे कारण असते ते म्हणजे साहेब दिवसभरात कुठे कुठे फिरला, कुणाकुणाला भेटला हे सगळ फक्त त्याच्या ड्रायव्हरलाच माहीत असते आणि त्यातली काही ठिकाणे साहेबाला कुणाला समजू द्यायची नसतात! आपली गुपिते ड्रायव्हरने कुणाला सांगू नयेत म्हणून मग साहेब लोक आपल्या ड्रायव्हरला खूप जपतात, विश्वासात घेतात! साहेबाची अशी बरीच खाजगी गुपिते ड्रायव्हर स्वत:जवळ बाळगत असल्यामुळे साहेब लोक आपल्या ड्रायव्हरला वचकून असतात.
तर आपला हा शिंगटेआण्णाही अशाच एका बड्या अधिकाऱ्याच्या दिमतीला ड्रायव्हर म्हणून काम करायचा. साहेबाचा जवळचा माणूस म्हणून त्याला अख्ख्या खात्यात सगळे टरकून असायचे.मुळात आण्णा दिसायला एकदम गोरागोमटा होता शिवाय एक्स सर्व्हीसमन असल्याने त्याचे राहणीमान कडक होते.दररोज गुळगुळीत दाढी करून कडक इस्त्रीचा सफारी घातलेल्या आण्णाची छाप समोरच्या माणसावर अशी काही पडायची की कधीकधी साहेबच याचा ड्रायव्हर असावा असे वाटायचे!
एकदा काय झालं, दिल्लीच्या मुख्य कार्यालयातून एक व्हीआयपी अधिकारी इन्स्पेक्शनसाठी पुण्याला यायचा होता.या बड्या अधिकाऱ्याला रेल्वे स्टेशनवर रिसीव्ह करून हॉटेलवर घेवून जायची सूचना साहेबाला मिळाली.ठरलेल्या वेळी शिंगटे आण्णाला घेवून साहेब रेल्वे स्टेशनवर पोहोचले. आण्णाने आज नवीन सफारी घातला होता. 
फलाटावर आण्णा पुढे आणि साहेब मागे असे उभे राहिले.साहेबाच्या हातातला त्या बड्या अधिकाऱ्यासाठी बनवलेला स्वागतफलक आपल्या हातात घ्यायला हवा हे आण्णा विसरून गेला. 
गाडी फलाटावर आली. तो बडा अधिकारी फलाटावर उतरला.आल्या आल्या त्याने कडक सफारीतल्या आण्णाशी हस्तांदोलन केले.आपली व्हीआयपी सुटकेस त्या अधिकाऱ्याने आण्णाच्या साहेबाच्या हातात दिली! हे एवढे पटकन झाले की साहेबाला काही बोलायचे सुचलेच नाही.आण्णाने साहेबाच्या हातातली सुटकेस पटकन काढून घेतली आणि स्टेशनबाहेरच्या गाडीत ड्रायव्हरसीटवर जावून बसला!
दोन्ही अधिकारी कानकोंडे होत काही न बोलता गाडीत येवून बसले.
आण्णाने साहेबाच्या तोंडाकडे बघायचे टाळत हॉटेलकडे गाडी पिटाळली. 
दुसऱ्या दिवशी साहेबाने आण्णाला यापुढे दररोज खाकी युनिफॉर्म घालायचा आदेशच काढला!
...... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, November 8, 2017

चणे दात आणि आपण ...

चणे  दात आणि आपण ...
      आमच्या शेजारच्या सोसायटीत घोलपकाका रहातात.एकदम उत्साही व्यक्तीमत्व लाभलेल्या या फक्त सत्त्याऐंशी वर्षे वयोमान असलेल्या तरूणाशी गप्पा मारणे म्हणजे  माझ्यासाठी प्रचंड आनंददायी अनुभव असतो.अशा वयाने जेष्ठ व सर्वार्थाने अनुभवी लोकांशी मैत्री करायला मला मनापासून आवडते. वेळ मिळाला की या माझ्यापेक्षा तब्बल तीस पावसाळे जास्त पाहीलेल्या मित्राशी संवाद साधण्याची संधी साधायचा माझा प्रयत्न असतो. जवळ जवळ तीस वर्षापूर्वी एका सरकारी खात्यातून  वरिष्ठ अधिकारी पदावरून रिटायर झालेल्या घोलप काकांची तब्बेत तशी एकदम ठणठणीत दिसत असली तरी वयपरत्वे त्यांच्या हिंडण्याफिरण्यावर मर्यादा आलेल्या आहेत.काकू होत्या तोपर्यंत तसा त्यांना काहीच प्रश्न नव्हता;पण आता सुनामुले अगदी कितीही काळजी घेत असले तरी काका मानसिकदृष्ट्या थोडे एकटे पडले आहेत.बोलताना तसे ते जाणवू देत नसले तरी त्यांचा एकटेपणा लपत नाही.
  असाच एका रविवारी काका माझ्याशी गप्पा मारत होते......म्हणजे, ते बोलत होते आणि मी फक्त ऐकत होतो ....
"आमच्या पिढीचे प्रश्नच वेगळे होते. जीवनातल्या प्राथमिकता आजच्यापेक्षा भिन्न होत्या,आपल्याला रिटायर झाल्यावर आयुष्यभर पेंशन मिळत राहील म्हणून त्या काळात खाजगी क्षेत्रात भरपूर पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध असूनही सुरक्षित  सरकारी नोकरीला मी चिकटून राहीलो.लग्न झाले, मग नवा संसार, मुलांचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण असे चारी बाजूंनी खर्चच खर्च आ वासून उभे असायचे. सरकारी नोकरीत पगार तसा अत्यंत तुटपूंजा होता.महिना अखेरपर्यंत खर्चांची तोंडमिळवणी करता करता अक्षरश: नको नको व्हायचं.त्या काळी शॉपींग,हॉटेलिंग पिकनिक, नाटकसिनेमा या गोष्टी आमच्या शब्दकोशातच नव्हत्या.सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या निभावता निभावता आयुष्यातील सगळी उमेदीची वर्षे भरकन उडून  गेली आणि  रिटायरमेंट कधी समोर आली ते समजलेच नाही!"
 "रिटायर झालो, मिळालेल्या पैशात नडीअडीला काढलेलं तसचं घराचं उरलेलं कर्ज फेडलं आणि दर महिन्याला मिळणाऱ्या पेंशनवर उदर्निर्वाह सुरू झाला.मुलांची लग्नकार्ये होता होता पासष्टी कधी ओलांडली ते कळलेच नाही.आता बास झाली पळापळ, जरा स्वत:च्या आयुष्यातील राहून गेलेल्या हौशीमौजी करू म्हणे  म्हणेपर्यंत  नातवंडासाठी वेळ काढावा लागला आणि छंद व आवडी बाजूला पडले."
 " पंचाहत्तर वर्षाचा झाल्यावर सरकारी नियमांनुसार पेंशन वाढली, पुन्हा ऐंशी व पंचाऐंशी वय झाल्यावर पेंशनचा आकडा वाढतच राहिला.वेतन आयोग लागू झाला आणि बँकेतल्या शिलकीचा आकडा अजूनच फुगला.आता तर रिटायर होताना जेवढा पगार मिळायचा त्याच्या दुप्पट रक्कम दरमहा बॅंकेत जमा होते आहे,आज माझ्याकडे भरपूर पैसा  आहे; पण या वयात  तो खर्च करायची उमेद वा उत्साह उरलेला नाही नाही. कुठे फिरायला बाहेर पडावं तर  या वयात प्रवासही झेपत नाही! ज्यांच्यासाठी एवढा आटापिटा केला त्या मुलाबाळांनाही माझ्याकडच्या पैशाची आज तरी गरज वाटत नाही!" घोलप काकांचे डोळे भरून आले होते.
      काय असत ना? आयुष्यभर नोकरी एके नोकरी माणूस करत रहातो, प्रमोशन पगारवाढ याच्या चक्रात अडकतो,आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्याच्या नादात आवश्यक असलेल्या खर्चालाही कात्री लावत पैसा साठवतो आणि त्याचे स्वत:साठी जगणे राहूनजाते.जेव्हा खऱ्या अर्थाने उपभोगाचे वय असते तेव्हा स्वत:च्या आवडीनिवडीला फाटा देवून डोळ्याला झापडं लावून शर्यत लावल्यासारखा माणूस पळत राहतो.अगदी रिटायरमेंटचा क्षण समोर येईपर्यंत त्याला ‘एक दिवस या सगळ्या व्यापांतून बाहेर पडावे लागणार आहे या वास्तवाची जाणीवच नसते!
जेव्हा हे सगळं लक्षात येइपर्यंत ना उमेद राहीलेली असते ना उपभोगाचे वय!
"दात असतात तेव्हा चणे घ्यायची परिस्थिती नसते आणि आता भरपूर चणे  समोर पडलेले आहेत; पण ते चावून खायला आता तोंडात दातनाहीत!"
थोडक्यात काय की,
आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की पैसा कितीही आला तरी त्याची हाव मरेपर्यंत संपत नाही! आपण जे काही कमावतो ना,त्याचा योग्य वयात योग्य प्रमाणात उपभोगही घेता यायला हवा!
अन्यथा, सगळच व्यर्थ!,
बरोबर ना?
...........प्रल्हाद दुधाळ.


Wednesday, October 18, 2017

मला बोनस नको!

मला बोनस नको!
दसरा दिवाळी जवळ आली की पुर्वीच्या काळी खाजगी क्षेत्रातल्या कामगारांमधे " या वर्षी बोनस किती मिळणार?"  याची चर्चा सुरू व्हायची.अपेक्षित आकडा बोनस म्हणून मिळणार नसला तर कामगार युनियनकडून आंदोलनाचे बिगूल वाजायचे काही वेळा संपाचे हत्यारही वापरले जायचे.व्यवस्थापन आणि कामगार नेत्यांत चर्चा झडायच्या आणि शेवटी बहूतेक ठिकाणी सन्मान्य तोडगा निघायचा.बोनस मिळाला की कामगार खूष असायचे आणि दिवाळीचा आनंद दुप्पट व्हायचा! आम्ही पडलो  सरकारी नोकर त्यामुळे बोनस मिळायचा प्रश्नच नव्हता.आमची दिवाळी फेस्टीवल ॲडव्हांसवर साजरी व्हायची. काही वर्षे गेली आणि सरकारी क्षेत्रातल्या रेल्वे पोस्ट आणि टेलिफोन खात्यासारख्या खात्यात  काही प्रमाणात बोनस मिळायला लागला.
    जेव्हा आमच्या खात्यात पहिल्यांदा बोनस जाहीर झाला  तेव्हा आता आपली दिवाळीही अगदी खाजगी क्षेत्रातल्या कामगारांएवढी नाही तरी पुर्वीपेक्षा जास्त आनंदाची होणार या विचाराने सरकारी नोकरही खुष झाले.
     बोनस मंजूर झाला आणि दसऱ्याच्या आधी त्याचे वाटप करावे असा आदेशही निघाला. या बातमीने आमच्या खात्यातल्या कर्मचाऱ्यांत चैतन्य पसरले. बोनसच्या रकमेत काय खरेदी करायची याची स्वप्ने रंगवली जाऊ लागली. खरे तर मिळणारी रक्कम फार मोठी नव्हती पण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानण्याचा तो काळ होता. आमचे  एक  सुपरवायझर सोडून आमच्या ऑफिसातील सगळेजण बोनस मिळणार म्हणून  आनंदात होते. हे सुपरवायझर मात्र म्हणत होते ..
" मी सरकारी नोकर आहे आणि मी जे काम करतो त्याचा मला पगार मिळतो, जो पगार मिळतो तो पुरेसा आहे.मी बोनस घेणार नाही!"
  ते फक्त बोलले नाहीत तर खरचं त्यांनी बोनसची रक्कम स्वीकारली नाही!
   अशीही भेटली माणसे!
... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, September 20, 2017

आनंदी वाटा

   आनंदी  वाटा.
    धैर्यशील पवार-एक  उमद व्यक्तीमत्व होत.एका खाजगी कंपनीत व्यवस्थ्यापक म्हणून त्यांनी इमानेइतबारे नोकरी केली आणि मागच्या वर्षी सेवानिवृत्त झाले. आपलं काम भले आणि आपण भले या वृत्तीने त्यांनी आपले आत्तापर्यन्तचे आयुष्य जगले होते.
     सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडलेले पवार साहेब संध्याकाळी आठनंतरच घरी यायचे.बऱ्याचदा गुरूवारी सुट्टीच्या दिवशीही त्यांना कंपनीत जायला लागायचे. रिटायर होईपर्यंत त्यांनी नेहमीच आपल्या कामाला प्राथमिकता दिली.घरात त्यांची बायको सगळ सांभाळून घ्यायची.घरातल्या कुठल्याच गोष्टीत पवार साहेबांची इन्व्हाल्वमेंट नसायची.एकुलत्या एका मुलाच्या शाळेतही ते ना कधी पालक मिटींगला गेले ना कधी कौतुकाने त्याच्या शाळेच्या गैदारिंगला हजेरी लावली. कुठल्याही नातेवाईकाच्या लग्न बारसेच काय पण कुणाच्या मयतीला जाणेही त्यांना उभ्या आयुष्यात जमले नव्हते.या सगळ्या आघाड्या त्यांची पत्नी अगदी लीलया पेलायची.मुलाच्या वाढदिवसालाही ते कसेबसे पोहोचायचे.मुलगा लहान होता तोपर्यंत ठीक होत पण मोठा झाल्यावर आपल्या वडीलांची अशा प्रसंगी असलेली अनुपस्थिती त्याला बोचायची.यावरून बरेचदा त्याने वडीलांशी अबोलाही धरला होता: पण पवार साहेबांच्या लेखी अशा गोष्टीना फारसे महत्व नव्हते.कमालीचे वर्कहोलिक असलेले पवारसाहेब रिटायर झाल्यावर मात्र काहीच काम उरले नसल्याने कासावीस झाले.आत्तापर्यंतच्या आयुष्यात त्यांना कुणाचीच गरज भासली नव्हती.फारसे मित्रही त्यांना जोडता आले नव्हते.कुणा नातेवाईकाशीही त्यांची कधी जवळीक नव्हती आणि घरात त्यांचे नसणे तर कुटुंबीयांना अंगवळणीच पडलेले होते त्यामुळे आपल्या मोकळ्या वेळेचे आता करायचे काय हा प्रश्न पवार साहेबांसमोर आ वासून उभा होता. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी घरात बसून काढले पण बसल्या बसल्या घरातल्या नको त्या गोष्टीतली त्यांची लुडबूड त्यांच्या पत्नीला त्रासदायक व्हायला लागली.बाहेर फिरायला जायला लागले तर एकटेच वेड्यासारखे तरी किती फिरणार? अवघ्या महिनाभरात ते रिटायर लाईफला कंटाळले.काम एके काम असे आयुष्य जगल्याने आपण आयुष्यात काय काय गमावले आहे याची आता त्यांना जाणीव झाली.आयुष्यात पैसा मिळवणे भरपूर काम करणे यालाच आपण आनंद मानत आलो.कुठलाही छंद जोपासला नाही,वर्तमानपत्रसुध्दा धडपणे वाचले नाही,बायकोमुलाबरोबर कधी कुठे फिरायला गेलो नाही.कधी निवांतपणे घरी टीव्ही सुध्दा बघितला नाही.अत्यंत एकसुरी आयुष्य जगलो याचा पवारसाहेबांना आता पश्चाताप होत होता;पण वेळ निघून गेली होती!
   आता मात्र पवार साहेबांनी स्वत:ला बदलायचं ठरवलं.जे झालं ते गेलं,एक नवी सुरुवात करायचा संकल्प केला.सोसायटीतल्या लोकांशी ते स्वत:हून बोलायला लागले.बायको व मुलाशी आपुलकीने बोलायला लागले.नातेवाईकाना भेटून त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली.कॉलेजात असताना ते कैरम व चेस खेळायचे.आता पुन्हा त्यांनी ते खेळ खेळायला सुरुवात केली.आयुष्यात जे जे करायचे राहून गेले आहे ते आता जमेल तसे करायचे असा त्यांनी संकल्प केला.आता पवार साहेब आनंदी जीवन जगत आहेत.
      बऱ्याच लोकांच असंच असतं....
      एका ठराविक वयानंतर माणसाला एका क्षणी असं वाटू लागतं की आजपर्यंत आपण जशा प्रकारे जगलो,जे काही केले वा करतो आहोत, ते सगळं निरर्थक आहे. जीवनातला अत्यंत महत्वाचा कालावधी आपण नको त्या गोष्टींमधे अडकून वाया घालवल्याची प्रखर जाणीव होते. अशावेळी आयुष्य अत्यंत निरस वाटायला लागतं, " का आणि कशासाठी एवढा अट्टाहास केला?" ही भावना मनात प्रबळ व्हायला लागते, आणि हाच तो क्षण असतो स्वत:ला सावरण्याचा, स्वत:ला समजावण्याचा-
     " अरे बाबा, ज्यात तू आनंद शोधत होतास, तेथे तो नाहीये!". हाच क्षण असतो स्वत:ला नव्याने ओळखण्याचा.
      ज्याला हे जमेल तो निश्चितच पुन्हा नवी सुरूवात करू शकतो! एकदा का हे जमायला लागलं ना की माणसाला कोणाच्याही बेगडी आधाराची गरज उरत नाही. आनंदी जीवनाच्या लाखो वाटा त्याच्या स्वागताला सज्ज असतात!
                                                                    .... प्रल्हाद दुधाळ.

Monday, September 18, 2017

गोष्ट स्वप्नपुर्तीची....

गोष्ट स्वप्नपुर्तीची....
गोष्ट एकोणीसशे शहात्तर सालातली आहे,नुकताच मी शालांत परीक्षा उतीर्ण झालो होतो. त्या काळी आमच्या गावाच्या जवळपास कोठेही पुढच्या शिक्षणाची सोय नव्हती,त्यामुळे यापुढे शिक्षणासाठी पुण्याला जायचं आणि किमान इंजीनारिंगची पदवी वा पदविका घ्यायची असे स्वप्न मी पहात होतो!
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती त्यामुळे हे स्वप्न कितीही आकर्षक वाटत असले तरी कुणाचेतरी आर्थिक पाठबळ व मानसिक आधार मिळाला तरच प्रत्यक्षात येणार होते! त्याकाळी आजच्यासारखी उदंड खाजगी कॉलेजेस नव्हती.पदवी अथवा पदविकेसाठी शासकीय संस्थेमधेच प्रवेश मिळवायला लागायचा आणि ते तेव्हढे सोपे नव्हते.पदविकेसाठी प्रवेशसंख्या अत्यंत मर्यादित असायची. मला कसेही करून इंजिनिअरिंग पदविकेला प्रवेश मिळवायचा होता. मी इकडून तिकडून माहिती गोळा केली आणि शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेशासाठी अर्ज केला.मला शालांत परीक्षेला चांगले मार्क्स होते त्यामुळे पदविकेला प्रवेश मिळायची खात्री वाटत होती.प्रवेशाची यादी लागायला बरेच दिवस अवधी होता त्यामुळे अर्ज करून मी परत गावाला गेलो.साधारण एकदीड महिना गेला तरी प्रवेशासंबंधी काहीच समजले नाही.गावात टेलिफोनची सुविधाही नव्हती.प्रवेशासंबंधात पोस्टाने कळविले जाईल असे अर्ज स्वीकारताना मला सांगण्यात आले होते,त्यामुळे दररोज नेमाने पोस्टमनकडे चोकशी करत होतो.चोकशीसाठी प्रत्यक्ष पुण्याला जाणे आर्थिक कारणाने शक्य नव्हते.
त्या वर्षी जुलै महिन्यात प्रचंड पाऊस पडत होता.सगळ्या ओढ्यांनाल्यांना पूर आलेला होता, रस्ते वाहून गेले होते.गावाकडे येणारी एस.टी.ची बसही चारपाच दिवस गावाकडे फिरकली नव्हती! आठवडाभरानंतर एकदाचा पाऊस थांबला.
एक दिवस पोस्टमनने शासकीय तंत्रनिकेतनकडून आलेले पत्र घरी दिले,नेमका त्या दिवशी मी अकरावीच्या प्रवेशासाठी विसेक किलोमीटर अंतरावरच्या दुसऱ्या गावाला गेलो होतो. त्या दिवशी मी तिकडेच बहिणीच्या घरी मुक्काम केला.तिसऱ्या दिवशी परत घरी आल्यावर मला ते पत्र मिळाले.माझा आनंद गगनात मावत नव्हता!
शासकीय तंत्रानिकेतनकडून माझ्या प्रवेशासंबधीचे ते पत्र होते!
मी घाईघाईने पत्र उघडले,माझ्या पदविका प्रवेशासाठीचा तो “चान्स कॉल'' होता!
मी ते पत्र पुन्हा नीट वाचले.पत्रातील मजकुराप्रमाणे दिलेल्या तारखेच्या आत मी प्रवेशासाठी संपर्क साधायचा होता,तसेच प्रवेश फी भरून प्रवेशाचे इत्तर सोपस्कार पूर्ण करायचे होते.पुढे एक सूचनाही दिलेली होती की दिलेल्या वेळेत हे सोपस्कार पूर्ण न केल्यास माझ्याऐवजी माझ्यानंतर वेटिंग लिस्टमधील पुढच्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार होता! पत्रावरची तारीख पुन्हा पाहिली आणि मला रडूच कोसळलं! प्रवेशाचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्याची शेवटची तारीख उलटून वर एक आठवडा झाला होता!
माझ इंजिनिअर व्हायचं स्वप्न धुळीला मिळालं होते!
आयुष्यातली एक अत्यंत अनमोल अशी संधी हुकली होती! थोड्याच वेळात मी स्वत:ला सावरले, कारण रडून काहीच उपयोग नव्हता.
याबाबतीत मदत वा मार्गदर्शन करेल असे कुणीही ओळखीचे नव्हते.मुळात त्याकाळी अख्ख्या गावातून दोनतीन लोकच पदवीपर्यंत शिकले होते आणि ते सगळेजण शहरात रहात होते.
मला खूप वाईट वाटत होते,कारण त्या काळी इंजीनारिंग पदविकाधारकाला शासकीय व खाजगी क्षेत्रात भरमसाठ संधी उपलब्ध होत्या! पण आता विचार करून फायदा नव्हता.
पुढे काहीतरी करणे भाग होते.
नातेवाईकांचा आधार घेवून शेजारच्या गावी अकरावीला प्रवेश घेतला.अकरावी झाली, नंतर बारावीसाठी अजून दुसऱ्या गावाला गेलो. कसाबसा बारावी पास झालो.
पुढे पुण्यात बी एस्सीला प्रवेश घेतला.दुसऱ्या वर्षात शिकत असतानाच टेलिफोन खात्यात नोकरी लागली. मग नोकरी करता करता पदवी मिळवली.खात्याअंतर्गत प्रमोशनसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धापरीक्षा देत देत एकदाचा “इंजिनिअर” झालो.
आपण इंजिनिअर व्हायचं हे माझे स्वप्न उशिरा का होईना पण आता साकार झाले होते!
आता माझ्या ऑफीसच्या केबिनबाहेर लावलेल्या पाटीवरच्या नावासमोर ‘उपविभागीय अभियंता’ हे पद लावत असलो तरी असे पुन्हा पुन्हा वाटत रहाते की त्यावेळी ‘ती’ संधी जर साधता आली असती तर आयुष्यात अजून खूप मोठा पल्ला गाठता आला असता!
आजच्या अभियंता दिनाच्या सर्व क्षेत्रातल्या अभियंत्यांना खूप खूप शुभेच्छा!
. ....प्रल्हाद दुधाळ.पुणे (९४२३०१२०२०)

Friday, September 8, 2017

नसतेस घरी तू जेंव्हा.......

       नसतेस घरी तू जेंव्हा.......

       तिची आणि माझी गाठ नियतीने बांधलेली होती म्हणूनच आम्ही दोघे एकमेकांच्या आयुष्यात आलो असेच म्हणावे लागेल! एकोणीसशे पंच्याऐशी साल होते,मी नोकरीला लागून चारेक वर्षे झाली होती.
  एक दिवस आमच्या साहेबांनी अचानक मला त्यांच्या केबीनमधे बोलावले.साहेबांकडे जाण्याचा माझा कधी संबंध आलेला नव्हता, त्यामुळे थोडा बिचकतच केबीनमधे मी प्रवेश केला.माझ्या आधी तेथे दोन वयस्कर गृहस्थ बसले होते.साहेबांनी त्यांची माझ्याशी ओळख करून दिली.नमस्कार वगैरे झाले.मी दोघांनाही ओळखत नव्हतो!
   झाले होते असे की, आता मी लग्न करणार असेल असे गृहीत धरून आमच्या साहेबांनी त्यातल्या एका गृहस्थाची मुलगी लग्नासाठी  मला सुचवली. साहेबांचे म्हणणे होते की मी त्या मुलीला पाहायचे आणि पसंती कळवावी.हा मला साहेबांनी दिलेला आदेशच होता! खरं तर तोपर्यंत मी माझ्या  लग्नाचा बिल्कूल विचार केलेला नव्हता.त्याची माझी स्वत:ची अशी काही  कारणेही होती.नुकतीच मी पंचविशी पार केलेले होती.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून माझा इथपर्यंतचा प्रवास झालेला होता.माझे वडील मी आठवीत असतानाच वारले होते आणि माझ्या आईने मोठ्या कष्टाने मला वाढवले होते.घरची थोडी शेती होती, ती सावकाराकडे गहाण पडलेली होती,ती सोडवायची होती.गावात एका खोपटात रहात होतो तेथे एखादी खोली बांधायची होती.भावांना मदत करायची होती .मी पुण्यात झोपडपट्टीत दहा बाय बाराच्या खोलीत एका  भावाच्या आसऱ्याला रहात होतो.एक सायकल आणि दोनचार  कपडयाचे गाठोडे, हीच काय ती माझी मालमत्ता होती! अशा परिस्थितीत मी लग्न करण्याचा विचार करणे अशक्यच होते, पण साहेबांनी आणलेले ते स्थळ तर बघावे लागणार होते! त्याना नाही कसे म्हणणार,नाही का?
  तर....नंतरच्या रविवारी एका जवळच्या मित्राला सोबत घेवून मी मुकूंदनगर भागात माझ्या आयुष्यातल्या पहिल्या मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला गेलो.मुलगी पाहिली ती मला शोभेल अशीहोती. राज्य सरकारी महामंडळात ती नोकरीला होती.त्यांचे घर म्हणजे एक सरकारी क्वार्टर होती.घरात फ्रीज,टीव्ही सारख्या सर्व सुखसुविधा होत्या.एकंदरीत ते उच्च मध्यमवर्गीय कुटूंब होते.त्यांच्यासमोर  मी सर्वच आघाड्यांवर अगदीच किरकोळ होतो.पोहे चहा घेतला, जुजबी प्रश्नोत्तरे झाली आणि तेथून बाहेर पडलो.मला  मुलगी पसंत जरी असली तरी आपल्यासारख्या फाटक्या माणसाला ही माणसे आपली मुलगी कशाला देतील ? मला तरी ते सर्व अशक्य कोटीतले वाटत होते! मी ते सर्व विसरून गप्प बसणे पसंत केले.
   आठ दहा दिवसातच आमच्या साहेबांनी परत केबीनमधे बोलावले.त्या मुलीचे वडील आणि आमच्या साहेबांचे मित्र असलेले ते दोघेजण पुन्हा माझ्याकडे आले होते. मी मुलगी बघून आलो पण त्यांना काहीच सांगितले नाही म्हणून साहेब माझ्यावर रागावले.मी शांतपणे ऐकून घेतले.मी साहेबांना व त्या दोघांना माझी सगळी परिस्थिती, माझ्यावर असलेल्या प्रचंड जबाबदाऱ्या, माझा तुटपुंजा पगार व मला पुढच्या आयुष्यात कसा खडतर प्रवास करावा लागणार आहे वगैरे अडचणी समजावून सांगितल्या.माझे बोलणे त्यानी अगदी शांतपणे ऐकून घेतले आणि मला सांगितले की "आम्ही तुमची सर्व माहिती आधीच काढली आहे तरीही तुमचे स्थळ आम्हाला पसंत आहे! तुम्हाला जर मुलगी पसंत असेल तर पुढचा विचार करू नका ती तुम्हाला आयुष्यभर साथ देईल.आज तुमच्याकडे काहीही नसले तरी तुम्ही कर्तुत्वाने मोठे होणार हे नक्की आहे!तुम्हा दोघांच्या पगारात तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाल!" माझा चांगला स्वभाव,माझा निर्व्यसनीपणा व काहीतरी करण्याची जिद्द व मुख्य म्हणजे सरकारी नोकरी या गोष्टी त्या लोकांसाठी महत्वाच्या होत्या! तरीही मला त्या मुलीशी माझ्या परिस्थिती बद्दल बोलणे मला आवश्यक वाटत होते म्हणून मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो व मुलीशीही बोललो. तिनेही मला संपूर्ण साथ देण्याची तयारी दाखवली.तिचे म्हणणे होते की, आपण दोघे एकत्र येवून सगळे प्रश्न सोडवू!” नंतर मात्र मी थोडा गंभीरपणे विचार केला कदाचित नियतीने ही मला देवू केलेली संधी असू शकते.लवकरच दोन्हीकडील वडीलधाऱ्या लोकांच्या सल्ल्याने व आशीर्वादाने माझे लग्न ठरले!
   लग्न झाले आणि आम्ही वडगावशेरी येथे चाळीत एका मित्राच्या शेजारी एक सिंगल खोली भाड्याने घेवून संसार थाटला! सौं.स्मिताचे माझ्या आयुष्यात येणे हा माझ्या आयुष्यात खरोखर टर्निंग पॉईंट ठरला! माझे भाग्य घेऊन ती माझ्या घरी आली असेच मी म्हणेन,कारण त्यानंतर आम्ही एकमेकांना साथ देत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.गावाकडे एक छोटे घर बांधले.गहाण पडलेली शेती सोडवली. सिंगल रूम मधून डबल रूममधे व नंतर चारपाच वर्षातच स्वत:च्या फ्लॅटमधे रहायला गेलो.खात्याअंतर्गत परिक्षा दिल्या व त्यात उतीर्ण होत होत टेलिफोनऑपरेटर या पदावरून आधी टेलिफोन इंस्पेक्टर नंतर कनिष्ठ दुरसंचार अधिकारी व पुढे उपमंडल अभियंता पदापर्यंत पोहोचलो.गरजू नातेवाईकांना आर्थिक मदत करून आपल्याबरोबर त्यांचीही प्रगती कशी होईल हे पाहीले. हे सर्व मी पुढे होवून करत असताना माझी अर्धांगिनी ठामपणे माझी सावली म्हणून माझ्यामागे उभी होती.इथे एक गोष्ट नमुद कराविशी वाटते की,आर्थिक बाबतीत घेतलेल्या एकाही निर्णयावर अगदी एकदाही आमच्यात वाद झाला नाही! माझ्या प्रत्येक निर्णयात ती समर्थपणे माझ्याबरोबर होती. यश जसे वाटून घेत होतो तसेच अपयशही वाटून घेतले.एकुलत्या एक मुलाच्या इंजिनीअर होईपर्यंतच्या सगळ्या परिक्षांच्या वेळी ऑफिसातून रजा घेवून ती त्याला सपोर्ट करत होती.माझे कामाचे स्वरूप असे होते की मला घरी लक्ष देणे अवघड व्हायचे,परंतु या गोष्टीवरून आमच्यात कधीच वाद झाला नाही.प्रत्येक बाबतीत आम्ही चर्चा करून निर्णय घेतले आणि यशाची एक एक पायरी चढत राहीलो. एकमेकांना साथ देताना माणूस म्हणून कधी कधी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो,तडजोडी कराव्या लागतात.तशा तडजोडी आम्हालाही खूप वेळा कराव्या लागल्या पण त्यावर तोंड वाकडे करण्यापेक्षा त्या गोष्टीमधले आव्हान स्वीकारून त्यातला आनंद घेण्यावर आम्हा दोघांचा भर असायचा,आपण जे करतोय ते आपल्या परिवारासाठी करतोय आणि परिवाराचा आनंद तोच आपला आनंद या एकाच ध्यासाने तिने मला व मी तिला साथ देत राहिलो.एवढे मोठे मन असलेली बायको मिळणे ही माझ्यासाठी खरचं भाग्याची गोष्ट होती.माहेर पुण्यातच असल्यामुळे क्वचितच एकमेकांना सोडून आम्ही राहिलो त्यामुळेच “नसतेस घरी तू जेंव्हा ....” हा अनुभव फारसा घेतला नाही पण आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यावर मात्र कधीतरी मनात विचार येतोच ....
तुला वजा केल्यावर....
उमजत नाही,समजत नाही,
असेल कसा तो भविष्यकाळ?
पुढ्यात काय असेल वाढलेले,
तुटली जर वर्तमानाशी नाळ?
अजुनही होते हे मन कातर,
आठवता भेट पहिली वहिली!
 
सात जन्माच्या शपथा हळव्या,
 
झालेली वाट एक ही आपुली!
 
संसारवेल बहरली फुललेली,
अन स्वप्ने सगळी साकारलेली!
आठवते आयुष्याच्या सायंकाळी,
सुखदु:खातली वाट चाललेली!
भयभीत मी, होईल काय माझे,
अर्ध्यावरती साथ सुटल्यावर?
असेल कसले जीवन सखये,
माझ्यातुन तुला वजा केल्यावर?
       
                   ....प्रल्हाद दुधाळ.
                     (९४२३०१२०२०)

                पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाईम्स ५ नोव्हे २०१६