विचारांचा गुंता.
सर्वसाधारणपणे माणूस आपल्या
स्वत:च्या मनात काय चालले आहे याचा सुगावा
कोणालाही लागू देत नाही.अगदी जिवाभावाच्या जवळच्या माणसालाही आपले मनातले विचार कळू नयेत अशी तो खबरदारी घेत रहातो.अशा वेळी काही अपवादात्मक
परिस्थिती सोडली तर अशा वागण्यामागे इत्तरांसमोर आपला मानसिक कमकुवतपणा उघड होऊ
नये यासाठीच त्याची ही सर्व धडपड चालत असावी!
खर तर माणसाच्या मनात येणारे
चांगले वाईट विचारच बऱ्याच प्रमाणात त्याचे व्यक्तीमत्व घडवित असतात. त्यामुळेच तामसी
विचाराचा माणूस वागताना कायम विचित्र आक्रस्ताळेपणा करतो! अशी व्यक्ती कायमच दिसायला
उग्र व रागीट असते, तर प्रत्येक बाबीचा शांतपणे विचार करणारा माणूस वागायला बोलायला
शांत असतो! अशा माणसाचे व्यक्तीमत्वही सौम्य शालीन व प्रसन्न असते. माणूस ज्या व जशा
प्रकारचा विचार करतो तशा प्रकारचेच वागायला लागतो.चुकीचे विचार सतत मनात घोळवत
बसलेली व्यक्ती चुकीचेच वागायची शक्यता अधिक असते! त्यामुळे आपल्याच विचारात आत्म मग्न
रहाणाऱ्या व्यक्ती शेवटी मानसिक विकारांनी ग्रस्त होऊ शकतात! मानवी मन हे एक
अतर्क्य असे कोडे आहे. मानवी मनात कायम एक विचारांची गुंतावळ ठाण मांडून बसलेली
असते. मुद्देसूद विचारांची देणगी लाभलेला माणूस हा गुंता सहजपणे सोडवतो व योग्य
पद्धतीने आपले आयुष्य जगत असतो पण सगळ्यांनाच हे जमत नाही बहुतेकांना हे विचाराचे
गुंते सुटता सुटत नाहीत आयुष्यभर अशा व्यक्ती एकामागोमाग येणाऱ्या या
गुंतावळीमध्ये अडकून पडतात आणि मग त्यांचे आयुष्यही गुंतागुंतीचे होऊन जाते! मला
वाटते की ही परिस्थिती मानवनिर्मित आहे.या सृष्टीमध्ये सर्व प्राणीमात्रांमध्ये फक्त
मानवालाच कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी लाभलेली आहे व या बुद्धीच्या जोरावर तो
कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो! मग तरीही काही माणसांना अशा वैचारिक गुंत्यांचा
सामना का करावा लागतो? मला वाटते याला कारण आहे माणसातला प्रचंड अहंकार! विचार
व्यक्त करण्यापेक्षा,समस्यांची चर्चा करण्यापेक्षा तो आत्मप्रौढीला नको तेव्हढे महत्व
देऊन कुणासमोरही व्यक्त होणे नाकारतो! “ मी स्पेशल आहे, मला कुणाला विचारायची गरजच
नाही ,मी एकटा निर्णय घ्यायला समर्थ आहे, होईल ते
बघू पण कुणापुढे झुकणार नाही,ई ई”. अशा प्रकारच्या त्याच्या ताठर
वैचारिकतेमुळे व योग्य वेळी योग्य व्यक्तींशी चर्चा व विचारविनिमय न केल्यामुळे
माणूस अशा अडचणीत सापडत असावा.
आपणास माहीत आहे की, या जगातली
प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे त्याचप्रमाणे त्याचे व्यक्तीमत्व ,त्याची विचारशक्ती,
विचारसरणी वेगवेगळी असू शकते.मग प्रत्येकजण योग्य दिशेनेच विचार कसा काय करू शकेल?
म्हणजेच मनात आलेला विचार योग्य आहे की नाही हे ठरविण्यासाठी तो विचार कुणाबरोबर
तरी शेअर करणे आवश्यक आहे. आपली जीवाभावाची माणसे, आपले कुटुंबीय,आपले हितचिंतक,
मित्र यांच्यासमोर मनातल विचार व्यक्त केले,त्यावर सखोल चर्चा केली तर हे विचार
बरोबर आहेत की चुकीचे आहेत याचे मूल्यमापन होऊ शकते. यामुळे चुकीच्या निर्णयापायी होणाऱ्या संभाव्य परिणामांची तीव्रताही कमी करता येऊ शकेल वा असे नुकसान टाळता येईल.यासाठी
आवश्यकता आहे ती विचारांच्या देवाणघेवाणीची,योग्य सल्ला-मसलीतीची. दिलखुलास चर्चा
करून तसेच योग्य तेथे योग्य त्या विषयातल्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन निर्णय
घेतले तर आयुष्यातले बरेचसे अपयशाचे प्रसंग कमी करता येऊ शकतात!
जीवनातल्या अनेक छोट्या
मोठ्या समस्यांवर चर्चा व संबंधितांशी केलेला विचारविनिमय हा रामबाण उपाय आहे.अशा
चर्चांमधून जो योग्य असेल असाच निर्णय सुचविला
जाईल योग्य सल्लाही मिळेल ,पण तो स्वीकारण्यास आवश्यक असलेली स्वभावातली लवचिकता व
तडजोडीची तयारी मात्र संबंधित व्यक्तीने दाखवायला हवी .
तर अशा प्रकारे सर्वसमावेशक विचारविनिमय व
चर्चेअंती घेतलेला कुठलाही निर्णय सहसा चुकीचा ठरत नाही,कारण चर्चा होताना संबंधित
विषयांवर सर्व बाजूनी विचारांची देवाण
घेवाण होते, त्या विचारांचे होणारे चांगले वाईट परिणाम तपासले जातात.भविष्यातल्या
परिणामांचाही उहापोह होतो व मगच सर्वमान्य असा निर्णय घेतला जातो.योग्य काय अयोग्य
काय हे सर्वांच्या समोर येते. संभाव्य निर्णयामुळे होणारे फायदे व तोटे याविषयी
सविस्तरपणे चर्चा झालेली असते त्यामुळे आपसूकच योग्य त्या दिशेने कार्यवाही
होते.आधी असलेला वैचारिक गोंधळ संपल्यामुळे मने साफ होतात. मनामनात विश्वासाचे बंध
तयार होतात व मानसिकसुरक्षा मिळाल्यामुळे माणूस आनंदी रहातो.मनावर कुठलाही ताण
रहात नाही .त्यामुळे माणसाने नेहमी आपल्या मनात आलेले विचार योग्य ते सहकारी व
कुटुंबियांसमोर व्यक्त करायला हवेत! त्यावरच्या सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकून
घ्यायला हव्यात.योग्य मतांचा व विचारांचा आदर करून कार्यवाही करायला हवी.प्रत्येक
समस्येवर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढायची सवय प्रत्येकाने लावायला हवी. अशा
चर्चेमधून कधी कधी समोरच्या व्यक्तीलाही तशाच प्रकारची मदत हवी असल्याचे जाणवते त्यावेळी
त्याने मांडलेल्या विचारांवर/समस्यांवर आपले अभ्यासपूर्ण मतही द्यायला हवे! योग्य
असेल तेथे वैचारिक मदत द्यायला हवी. अश्या
प्रकारे जेंव्हा क्रमाक्रमाने प्रथम वयक्तिक पातळीवर,कौटुंबिक पातळीवर, नंतर गावपातळीवर,सामाजिक
पातळीवर व शेवटी वैश्विक पातळीवर असे चर्चेअंती निर्णय घेतले जातील तेंव्हा मतभेद
व द्वेष अजिबात रहाणार नाहीत मग माणसाचे हे जगणे सुंदर व्हायला कितीसा वेळ लागेल?.
.........प्रल्हाद
दुधाळ.