Tuesday, December 17, 2019

एक आनंदानुभव

#कुबेरदिवाळीअंक 2019
     दुपारनंतर गणेश कलाक्रीडा मंदिरात लागलेल्या फर्निचर प्रदर्शनाला गेलो होतो.तेथील एक एक स्टॉलवर फिरत असताना खिशात मोबाईल वाजत होता;पण माझ्या ते लक्षात आले नाही.घरी येऊन मोबाईल बघितल्यावर लक्षात आले की एका अनोळखी नंबरवरून तीनवेळा मिसकॉल येऊन गेला आहे."एवढं तातडीने कुणी फोन केला असेल? "
असा विचार करून मी घाईघाईने त्या नंबरवर कॉल केला .....
  फोनला उत्तर मिळाले आणि मी काही बोलण्यापूर्वीच समोरच्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केली...
"नमस्कार दुधाळ साहेब,आत्ताच कुबेर नावाच्या दिवाळी अंकात तुमची 'कवडसा'ही कथा वाचली.मला कथा खूप आवडली आपल्याला लगेच प्रतिक्रिया द्यावीशी वाटली म्हणून फोन केला होता."
समोरची व्यक्ती उत्साहात मला बोलण्याची संधी न देता बोलत होती!
"खूप खूप धन्यवाद सर,आपण कोण बोलताय?" संधी मिळताच मी चॊकशी केली.
"ओह्ह ,कधी एकदा कथेबद्दल सांगतो असं झालं होतं,गडबडीत माझी ओळख द्यायची राहूनच गेली की!बाय द वे,मी डॉक्टर रानडे बोलतोय दिघीहून...."
"सर थँक यू आवर्जून फोन केल्याबद्दल,तुम्ही कुबेर मेम्बर आहात का?"
"नाही नाही,आमच्या शेजारी एक दरेकर मॅडम राहातात त्यांनी कुबेर दिवाळी अंकाबद्दल शिफारस केली होती म्हणून आवर्जून मी अंक विकत घेतला आणि वाचून काढला! फारच सुंदर अंक झालाय! छान दर्जेदार असं काही वाचनाचा अनुभव मिळाला कुबेरमुळे!"
डॉक्टर रानडे कुबेर दिवाळी अंक आणि त्यातील साहित्याचे भरभरून कौतुक करत होते आणि माझ्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं वाटत होतं!
डॉक्टर रानडे पुढे बोलत होते....
" दुधाळ साहेब तुम्हाला चालणार असेल तर एक विचारायचं होतं....."
"विचारा न सर...."
" तुमच्या 'कवडसा' या कथेतल्या नायिकेबद्दल एका शब्दात काय सांगू शकाल?"
त्यांचा तो प्रश्न अनपेक्षित होता.मी थोडा विचारात पडलो ....
" त्या नायिकेबद्दल एकाच शब्दात सांगायचं तर 'दुर्दैवी' असे वर्णन मी करेल!"
" छान, तुम्ही कथेचा शेवट सकारात्मक केलात ते फार महत्वाचं आहे;पण अशा दुर्दैवी मूड स्विंगचा आजार असलेल्या मुलीला या फेऱ्यातून बाहेर काढणारी व्यक्ती भेटणे तसं प्रत्यक्षात खूप अवघड आहे,हो ना?"
" हो सर,प्रत्यक्षात अशा व्यक्ती खूप कॉम्लेक्स स्वभावाच्या असतात त्यामुळे अशा व्यक्तीपासून सगळे लांब पळतात;पण मला अशा व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण येऊ शकतो असा सकारात्मक संदेश द्यायचा होता!"
" बाय द वे तुम्ही सायकॉलॉजी शिकलाय का? कारण त्या नायिकेच्या तशा स्वभावामागील कारणमीमांसा,नकळत मनावर झालेला खोल परिणाम,एकंदरीत जगावरचा राग हे सगळं छान व्यक्त झालयं! " रानडे सर.
" सर सायकॉलॉजीचे शिक्षण असे नाही;पण मला त्या दृष्टीने माणसं वाचायची आवड आहे आणि अशी माणसे त्यांचे स्वभाव, विचार माझ्या लिखाणात डोकावतात."
माझ्या कथेतली पात्रं,प्रसंग,कथेची मांडणी याचं व्यवस्थित रसग्रहण रानडे सरांनी केलं होतं!माझ्यासारख्या नवख्या कथाकाराला त्यांनी दिलेली दाद खूपच आनंददायी होती.
 तब्बल पंधरा मिनिटे आम्ही बोलत होतो.कुबेर समूह, कुबेर फौंडेशन,समूहातर्फे चालविण्यात येणारे उपक्रम,कुबेर संमेलन याबाबत मी त्यांना माहिती दिली.अशा आगळ्या वेगळ्या समूहाबद्दल आणि समूहातील लेखक कवींच्या साहित्याने नटलेल्या सर्वांगसुंदर  दिवाळी अंकाबद्दल त्यांनी खूप कौतुक केले आणि कुबेर लेखकांना मनापासून शुभेच्छा दिल्या....
 कुबेर  समूह जनसामान्यांच्या मनावर आपलं नाव कोरतोय याचा प्रचंड आनंद आहे ....
.......प्रल्हाद  दुधाळ

ऐकूनही घ्या की राव !

ऐकूनही घ्या की राव!

         माझ्या ऑफिसमध्ये एक सहकारी होता अनेकदा काही ना काही कामाच्या निमित्ताने त्याच्याशी बोलावे लागायचे.त्याच्याशी बोलणे सुरू केले की मी माझे पहिले वाक्य संपवायच्या आतच जसं  काही त्याला मला काय म्हणायचंय ते सगळं आधीच माहीत आहे असं गृहीत धरून माझं बोलणं मधेच थांबवून तो सुरू व्हायचा.फक्त माझ्यासारख्या सहकारी व मित्रांशीच नाही तर त्याचा  बॉस किंवा हाताखाली काम करणाऱ्या प्रत्येकाशी बोलताना त्याचं वागणं असंच असायचं! 
    थोडक्यात त्याला समोरच्याचं बोलणं ऐकून घेण  बिलकूल मान्य नव्हतं! त्याच्या अशा वागण्यामुळे हळूहळू मी त्या व्यक्तीशी कामापुरताच संबंध ठेऊ लागलो.तो समोर असताना सहसा कुणी विषय वाढवायच्या फंदात पडायचं नाही कारण त्या संवादाचा शेवट नेहमी एकतरफी विसंवादात होणार हे निश्चित असायचं.पुढे पुढे मीसुध्दा त्याच्याशी बोलणेच नको असा विचार करुन त्याला टाळायला बघायचो.
     आपल्या  अवतीभवती अशा अनेक व्यक्ती वावरत असतात, ज्यांना समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेणे जमत नाही.जगातल्या कोणत्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान आपल्याला असल्याचा समज (खरं तर गैरसमज) अशा व्यक्तीला असतो. बोलणे ही एक कला आहे हे नक्कीच;पण त्याहीपेक्षा ऐकून घेण्याची कला महत्वाची आहे असे मला वाटते! 
        समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण म्हणणे ऐकून न घेता त्याला मधेच थांबवून आपले अर्धवट माहितीवर आधारित मत इत्तरांवर लादण्याची ही सवय अशा व्यक्तीला समाजापासून दूर करते.तडकाफडकी तोडायला जमत नाही म्हणून दोन चार वेळा लोक अशा व्यक्तीला सहन करतात;पण लवकरच अशा व्यक्तीला त्याला नकळत टाळणे सुरू होते.
      दोन व्यक्तीमधील खऱ्या अर्थाच्या सुसंवादासाठी दोघांचीही एकमेकांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेण्याची मानसिक तयारी असायला हवी अन्यथा असा one way संवाद त्या व्यक्तींमध्ये गैरसमज रूजवतो.दुसऱ्या व्यक्तीला बोलूच न देणे आणि आपले म्हणणे इतरांनी ऐकून झाले की संवादाची खिडकी बंद करुन नामानिराळे होण्याची सवय म्हणजे एक प्रकारची मानसिक विकृती आहे असे मला वाटते!
    आपल्या व्यावसायिक, सामाजिक वा कौटूंबिक जीवनात संवाद साधताना  समोरच्या व्यक्तीचे म्हणणे त्याला मधेच कोणताही अडथळा न आणता ऐकून घेणे आवश्यक आहे.अगदी वादाचा मुद्दा असला तरी किंवा टोकाची मतभिन्नता असली तरी समोरच्या व्यक्तीची बाजू शांतपणे ऐकून घेण्याची सवय नक्कीच नातेसंबंधात येणारी संभाव्य कटूता टाळू शकेल असे मला मनापासून वाटते. प्रत्येक गोष्टीची एक निश्चित अशी दुसरी बाजू असते;ती  बाजू योग्य आहे की अयोग्य आहे हा नंतरचा मुद्दा आहे;पण ती दुसरी बाजू किमान ऐकून घेतली गेली तरी माणसा माणसातील अहंकारापोटी होणारे टकराव कमी करू शकतील.सुसंवादासाठी एकमेकांशी संपर्कांचा दरवाजा कायम उघडा असला तर नातेसंबंधात दुराव्याची शक्यता निश्चितच काही प्रमाणात का होईना पण कमी होऊ शकेल. थोडीशी सहनशीलता ठेवून समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेण्याची सवय नसेल तर प्रयत्नपूर्वक ती सवय लावून घ्यायला हवी.
   आनंदी जीवनासाठी निश्चितच हे आवश्यक आहे! 
 तुम्हाला काय वाटतं?
......प्रल्हाद दुधाळ . 9423012020.

Saturday, December 7, 2019

सेवानिवृत्ती निमित्ताने मनोगत

रिटायरमेंट 
        बीएसएनएल पुणेच्या वतीने नुकताच   ऑफिशिअली रिटायरमेंट फंक्शनमध्ये मला माझ्या स्वेच्छा निवृत्ती निमित्ताने सन्मानपत्र देण्यात. या प्रसंगी मी व्यक्त केलेले मनोगत..... 

सर्वांना नमस्कार.... 
सर्वप्रथम आज रिटायर होणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकार्याना तसेच पुढच्या काही महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या सर्वाना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
   मी  पुणे टेलीफोन्समध्ये 28 डिसेंबर 1982 रोजी टेलिफोन ऑपरेटर म्हणून कॅंटोन्मेंट एक्सचेंज टेस्टींग सेक्शन येथे नोकरी सुरू केली.त्यावेळी मी बीएस्सी च्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो;पण शिक्षण पूर्ण करण्यापेक्षा नोकरी करणे आवश्यक झाल्याने मी ही नोकरी पत्करली होती.
    पुढे नाईट शिफ्ट करून मी माझे शिक्षण पूर्ण केले. आज सांगायला हरकत नाही की मी टेलिफोन खात्यात येईपर्यंत टेलिफोनवर एकदाही बोललो नव्हतो!सिलेक्शन झाल्यावर स्वारगेट एस टी स्टॅण्डवर एक कॉईन बॉक्स होता तेथे जाऊन टेलीफोनमध्ये कुठून बोलायचे आणि कुठून ऐकायचे असते ते बघितल्याचे आजही आठवते!असो...
   टेलिफोन खात्यात आल्यावर पहिला शब्द शिकवला गेला तो  'नमस्कार', हा! .'अहर्निश सेवामहे'  हा वसा इथल्या ट्रेनिंगमध्ये दिला गेला आणि जवळ जवळ अडतीस वर्षे तो वसा मी प्रामाणिकपणे निभावू शकलो याचा खूप आनंद आहे. आज दोनतीन वर्षांपूर्वीच ठरवल्याप्रमाणे स्वेच्छेने निवृत्त होताना पुणे टेलीफोन्स आणि पुढे बीएसएनएल मध्ये निभावलेल्या विविध जबाबदार्याचा सगळा चित्रपट समोर उभा आहे....
   या खात्याने मला खूप काही दिले, पद,पैसा, प्रतिष्ठा आणि समाजात पत याबरोबरच मला सर्वांगीण प्रगती करण्याची संधी दिली.देशात कदाचित हे एकमेव डिपार्टमेंट असेल जिथे तुमची इच्छा असेल तर अभ्यास करून,परीक्षा देऊन तुम्ही प्रमोशन्स घेऊ शकत होता,  आणि मला तशी संधी मिळाली.पहिल्या पाच वर्षातच मी फोन इन्स्पेक्टर या पदाची स्पर्धापरीक्षा पास झालो आणि 1989 ते 1996 या काळात फोन इन्स्पेक्टर म्हणून संपूर्ण कार्यक्षमतेने काम केले.कॅंटोन्मेंट एक्स्चेंज विभागात  उत्कृष्ट काम केल्याचे फळ म्हणून मला 1993 सालचा संचार सारथी हा बहुमान  मिळाला.प्रथमच एक्स्टर्नल विभागात  हा पुरस्कार दिला गेला होता! 
    1996 ते 2004 या काळात मी जेटीओ म्हणून RTTC , वाकड,  सांगवी तसेच साळूंके विहार इत्यादी विभागात काम केले.अनेक आव्हाने पेलत मी या विभागात मला दिलेली जबाबदारी पार पाडली. सांगवीत तीन वर्षात तीनशे किलोमीटर केबल टाकून मागितल्याबरोबर टेलिफोन कनेक्शन देण्याची व्यवस्थ्या करण्यात माझी महत्वपूर्ण भूमिका होती याचा आनंद आहे.याच विभागात एका आठवड्यात 467 टेलिफोन कनेक्शन देण्याचा विक्रम आमच्या टीमच्या नावावर नोंदवला गेला आणि त्याबद्दल ऍप्रिसिएशनही  मिळाले.
   पुढे एसडीई म्हणून भोर ग्रुप , बाजीराव रोड ग्राहक सेवा केंद्र , सेल्स मार्केटिंग अशा विविध विभागात उल्लेखनीय जबाबदाऱ्या मी निभावल्या.
2009 ते 2012 या काळात बीएसएनल सातारा येथे युएसओ सेक्शनचे काम पाहिले आणि फेब्रुवारी 2012 ते जुलै 2018 या काळात आयटीपीसी पुणे प्रशासन विभागात आणि शेवटचे दिड वर्ष बीएसएनएल पुणे च्या स्टाफ सेक्शन येथे कार्यरत होतो.
    मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला  इंटर्नल ,एक्स्टर्नल ,प्लॅनिंग, केबल कन्स्ट्रक्शन,सी एस सी, सेल्स मार्केटिंग, ट्रेनिंग सेंटर, युएसओ, वेल्फेअर, प्रशासन आणि स्टाफ अशा विविध विभागात अनेक महत्वाच्या पदांवर  काम करण्याची संधी मिळाली.
पगार मिळतो म्हणून सगळेचजण काम करतात,  पण कामात मिळणाऱ्या समाधानासाठी आपले काम संपूर्ण कार्यक्षमतेने केल्यानंतर जो अवर्णनीय आनंद मिळतो तो आनंद मला माझ्या पूर्ण नोकरीच्या काळात मिळाला.
   आपले कर्तव्य बजावत असतानाच या डिपार्टमेंटमध्ये मला ट्रेड युनियनमधील एक कार्यकर्ता म्हणूनही ओळख मिळाली.सुरुवातीला एनएफपीटीई संघटनेत ब्रँच लेव्हलला  आणि प्रमोशननंतर एस एन इ ए पुणे या संघटनेत खजिनदार म्हणून उल्लेखनीय असे काम करण्याची संधी मला मिळाली.
   पुणे टेलीफोन्स तर्फे त्या काळी घेतल्या जाणाऱ्या गरवारे करंडक एकांकिका स्पर्धेत सलग पाच वर्षे मला एकांकिकेत छोट्यामोठया भूमिका करण्याची संधीही मिळाली.या निमित्ताने स्टेजवर अभिनयाची हौसही भागवली गेली.
    पुणे टेलिकॉमचे मुखपत्र सिंहगड तसेच सह्याद्री,सातारा टेलिकॉमचे अजिंक्यतारामध्ये माझ्या कविता नेहमी प्रसिद्ध व्हायच्या.हिंदी  पखवाडा तसेच सतर्कता सप्तांहात घेतल्या गेलेल्या स्पर्धात माझ्या निबंधाना अनेक बक्षिसे मिळालेली आहेत.माझे दोन कविता संग्रह आणि एक वैचारिक लेखांचा संग्रह अशी तीन पुस्तके प्रसिद्ध झालीत आणि या क्षेत्रात अजून काही भरीव करण्याचा प्रयत्न आहे.
माझ्या या संपूर्ण प्रवासात मला अत्यंत चांगले अधिकारी लाभले.एक जबाबदार कार्यक्षम अधिकारी म्हणून माझे नाव झाले ते केवळ माझ्या हाताखाली काम केलेल्या कार्यक्षम कर्मचारी व माझ्या सहकारी अधिकारी मित्रांमुळेच! त्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना खूप खूप धन्यवाद! फिल्डमध्ये काम करत असताना बारा बारा तास घराबाहेर रहावे लागायचे त्यामुळे घराकडे दुर्लक्ष व्हायचे पण याबद्दल कुठलीही तक्रार न करता माझी पत्नी स्मिता हिने स्वतःची स्टेट गव्हर्मेंटची नोकरी करुन घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या निभावल्या. तिच्या साथीमुळेच मी आज जो काही आहे तसा आहे. माझा विवाहित मुलगा त्याच्या कुटूंबाबरोबर अमेरिकेत आहे. सर्व आघाड्यांवर अत्यंत यशस्वी समाधानी जीवन आज आम्ही जगतो आहोत याचे सर्व श्रेय्य अर्थातच बीएसएनएलने दिलेल्या आर्थिक व मानसिक आधारामुळे! यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो!
शेवटी जाता जाता माझी एक कविता..... 
काही असे, काही तसे, जगलो असे, जमले जसे!
हात कधी पसरला नाही, पडले मनासारखे फासे, 
जगलो असे जमले जसे!
गरिबीची लाज नाही, श्रीमंतीचा माज नाही, 
सरळ मार्ग सोडला नाही, टाकले नाही घेतले वसे, 
जगलो असे जमले जसे!
हवेत इमले बांधले नाही, मृगजळामागे धावलो नाही, 
शब्दांत कधी सापडलो नाही, झाले नाही कधीच हसे, 
जगलो असे जमले जसे!
भावनेत कधी वाहिलो नाही, वास्तवाला सोडले नाही, 
विवेकाला तोडले नाही, वागलो कधी जशास तसे, 
जगलो असे जमले जसे!
वावगा कधी हट्ट नाही, तडजोडीला ना नाही, 
उगा रक्त आटवले नाही, सजवले क्षण छोटे छोटेसे 
जगलो असे जमले जसे!
  पुन्हा एकदा सर्वांचे आभार....
बी एस एन एल ला पुन्हा गतवैभव लाभो या सदिच्छेसह मी माझे मनोगत संपवतो.....
  धन्यवाद!

प्रल्हाद दुधाळ 
एस डी ई  बी एस एन एल
 9423012020

Monday, December 2, 2019

आज आत्ता लगेच

   आज आत्ता लगेच!

     काही काळासाठी माझी साताऱ्याला बदली झाली होती.तेथे माझ्याकडे रिटायरमेंटसाठी थोडेच दिवस बाकी असलेले एक असिस्टंट होते.माझ्या कामात मला हवी ती कारकूनी स्वरूपाची मदत करायचे काम त्यांच्याकडे होते.एका बाजूला आम्ही ऑफिसचे काम करत करत गप्पाही चालू असायच्या.माझ्यापेक्षा आठ नऊ वर्षे वयाने जेष्ठ असलेले हे गृहस्थ्य मला मदत करता करता माझ्यातल्या गुणदोषांवरसुद्धा स्पष्टपणे बोट ठेवायचे.मला त्यांचे ते स्पष्ट बोलणे सुरवातीला खटकत होते;पण नंतर त्या गोष्टी मला आवडायला लागल्या.सहसा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याची खोटी खोटी स्तुती करून हरबऱ्याच्या झाडावर चढवण्याचा लोकांचा प्रयत्न असतो;पण ही व्यक्ती वडीलकीच्या नात्याने मला काही सांगत असेल तर ते माझ्यासाठी चांगलेच आहे असा मी विचार करायला लागलो.त्यांनी माझ्यातला एखादा दोष सांगितला की मी आत्मपरीक्षण करणे सुरू केले आणि लक्षात आले की त्यांचे माझ्याबद्दलचे निरीक्षण अगदी योग्य असते!
      एकदा एक महत्वाचा रिपोर्ट आठवडाभरानंतर मुंबईतील आमच्या सर्कल कार्यालयाला पाठवायचा होता आणि त्यासंबंधीची माहिती गोळा करण्यासाठी ते मला मदत करत होते.एखादे काम हातात घेतले की आज त्यातले किती काम आजच संपवायचे हे मी आदल्या दिवशीच ठरवलेले असायचे.दुसऱ्या दिवशी काम सुरू केले की ते संपेपर्यंत मला चैन पडायचे नाही.एक प्रकारे मी वर्कहोलिक होतो कामाच्या नादात मी डबा खाणेही विसरायचो.एकही ब्रेक न घेता मी त्या दिवशी काम करत होतो.माझे असिस्टंट चहाच्या वेळेला चहा घेऊन आले.जेवण्याच्या सुट्टीत घरी जाऊन जेवण करून आले चार वाजता पुन्हा चहाला निघाले जाताना त्यांनी मला चहाला त्यांचेबरोबर चालण्याचा आग्रह केला;पण माझ्या डोक्यावर आजचे ठरवलेले काम आजच पूर्ण करायचे भूत स्वार झालेले होते त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.ते चहा घेऊन आले आणि आल्याबरोबर त्यांनी सरळ माझ्या पीसीचा पॉवर सप्लाय बंद केला! मला त्यांचा खूप राग आला होता;पण त्यांच्या जेष्ठतेकडे बघून गप्प बसलो.माझ्या चेहऱ्यावरचा राग त्यांना दिसला होता,त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी मला सुनावले ....
"सर, ही काय पध्द्त आहे का? पाहिजे तर माझ्यावर ऍक्शन घ्या;पण मी हे खपवून घेणार नाही!"
माझे नक्की काय चुकलंय हे तोपर्यंत माझ्या लक्षात आलं नव्हतं;पण त्यांनी माझा टिफिन माझ्यासमोर धरला तेव्हा माझ्या लक्षात आले.'कामाच्या गडबडीत मी माझा टिफिन खाल्ला नव्हता!"
"सर मला सांगा खाणे पिणे सोडून सलग करण्याएवढे हे काम महत्वाचे आहे का?हातात पुढचा अख्खा आठवडा आहे हे काम पूर्ण करायला! मग हातातलं सगळं काम आजच संपवायचा अट्टाहास कशासाठी? तुम्ही खूप चांगले अधिकारी आहात,तुमचा स्वभाव छान आहे;पण काम संपवण्यासाठी जेवणखाण सोडायची सवय मात्र मला मुळीच आवडत नाही!"
 मी भानावर आलो,ते बोलत होते त्यात तथ्य होतं! माझ्या जवळ जवळ तीस वर्षाच्या सेवेत माझ्यात असलेल्या या दोषावर कुणी बोट  ठेवलेच नव्हते. मी त्यांच्या हातातला माझा टिफिन घेतला आणि काहीही न बोलता जेवायला सुरुवात केली.
    मग मी विचार करायला लागलो आजपर्यंत आजचे काम आजच करायच्या अट्टाहासामुळे स्वतःचे किती नुकसान करून घेतले असेल?
   माझ्या त्या जेष्ठ मित्रामुळे मला माझ्यातल्या त्या दोषांची जाणीव झाली ज्याला आत्तापर्यंत मी माझा गूण  समजत  होतो! या माझ्यातल्या उणिवेवर मी खूप विचारमंथन केले आणि मग अनेक गोष्टींचा नव्याने उलगडा झाला....
    आपण आपल्याकडे असलेल्या कामाचा नको इतका बागुलबुवा केलेला असतो.आजचे सगळे काम आजच संपवून समोरचा कामाचा ट्रे रिकामा करायची घाई आपल्याला झालेली असते पण तो ट्रे कधीच रिकामा होत नाही.जेवढ्या गोष्टी तुम्ही हातावेगळ्या केलेल्या असतात तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा जास्तच कामे तुमच्या ट्रेमध्ये येऊन पडलेली असतात त्यामुळे व्यावसायिक जीवनात किंवा वैयक्तिक आयुष्यातही सगळी कामे आज आत्ता लगेच संपवायचा अट्टाहास करण्यात काहीच अर्थ नाही! अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्यासमोर असलेल्या कामांच्या ढिगाऱ्यातली फार थोडी कामे ही 'अत्यावश्यक  वा तातडीची 'असतात! शेकडा नव्वद टक्के कामे कामातला आनंद उपभोगत,हसत खेळत करण्यासारखी असतात.कुणी महात्म्याने म्हटले आहे की 'पाटातून वहात असणारे  पाणी हे शेती पिकवण्यासाठी सोडलेले आहे आणि ते त्याचसाठी वापरले जावे;पण त्या वाहणाऱ्या पाटावर जर कारंजे उडवले फुलझाडे लावली तर त्या पाटावर कितीतरी सौदर्य फुलवता येईल!'
     आपल्या दैनंदिन कामातून आपल्याला जगण्यासाठी आवश्यक अशी रोजीरोटी मिळत असते हे खरे आहे;पण फक्त काम आणि कामच करत राहिलो तर ज्या आनंदी व सुखी जीवनासाठी हा सगळा खटाटोप चाललाय तो आनंद उपभोगणार कधी? काळ कोणासाठी थांबत नाही. तुमच्या समोर पेंडिंग कामाचा ट्रे कायमच भरलेला असणार आहे,तुम्ही अगदी मरेपर्यंत तो उपसत राहिला तरी त्यात बरेच करण्यासारखे पेंडिंग असणार आहे तेव्हा वेळीच समोरचे सगळे काम आज आत्ता व लगेच संपवण्याचा अट्टाहास सोडा. जीवनात पैशापेक्षा धनदौलतीपेक्षा खूप महत्वाच्या गोष्टी तुमची वाट पाहात आहेत त्यातला आनंद उपभोगा, स्वतःसाठी,मुलाबाळांसाठी,मित्रांसाठी वेळ काढा कामाच्या वेळी काम करा आणि जीवनात आनंद उपभोगण्यासाठी जो वेळ आहे त्याचा समतोल ठेवा!
    जिंदगी हासणे गाणे के लिये भी है! हो ना ?

Tuesday, October 22, 2019

पार्सल...

    पंधरा दिवसापूर्वी युनिक इंटरनॅशनल एक्स्प्रेस या कुरियर कंपनीकडून त्यांच्या मार्केटिंग पॉलिसीचा भाग म्हणून 'मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही दिवाळी फराळ परदेशात पाठवायचा आहे ना?' याची चाचपणी कम आठवण करून देण्यासाठी म्हणून फोन आला आणि "अरे हो, दिवाळी जवळ आली की!" याची जाणीव झाली....
    माझा मुलगा,सुनबाई आणि छोटा नातू मागच्या वर्षी मे  महिन्यापासून मुलाच्या नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत रहात आहेत.मागच्या वर्षी दिवाळीला त्यांच्यासाठी फराळ आणि कपडे पाठवायचे ठरवले खरे,पण त्यासाठी काय प्रोसिजर असते कुणाला संपर्क करायचा याबद्दल मी अगदीच अनभिज्ञ होतो.आपली नोकरी भली आणि आपण भले अशा मर्यादित जगतात वावरत असल्याने अशा अवांतर बाबींचे ज्ञानार्जन कधी केलेच नव्हते!
   खरं तर आजूबाजूला अनेकांची मुले शिकायला वा नोकरीच्या  निमित्ताने परदेशात होती,पण मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे असेल,परदेशात पार्सल कसे पाठवायचे याबद्दल मी संपूर्णपणे अज्ञानी होतो!आता ती गरज झाली होती....
    बरीच चौकशी केल्यावर,  इंटरनेटवर धांडोळा घेतल्यावर लक्षात आलं की 'अशी सेवा देणाऱ्या खूप कंपन्या आहेत की!' मग त्या त्या कंपन्यांचे रिव्ह्यू वाचून मी एक कंपनी निवडली.या सिझनला चक्क मंगल कार्यालय घेऊन ही कंपनी दरवर्षी आपल्या ग्राहकांना दिवाळी फराळ व भेटवस्तू परदेशी पाठवण्यासाठी मदत वा आपला व्यवसाय करत असते!
     तर या कंपनीची सेवा घेऊन मागच्या वर्षी मी फराळ पाठवला होता आणि याही वर्षी तो पाठवण्याची आगावू आठवण करून दिल्याने मीही तयारीला लागलो.....
    मला पाठवायच्या होत्या त्या वस्तू घेऊन काल दुपारी मी त्या कार्यालयात गेलो तर तेथे मागच्या वर्षीपेक्षा खूपच गर्दी दिसत  होती.किमान तास दीड तास तरी इथे लागणार होता.मग तिथले सोपस्कार करता करता माझ्यासारख्याच काऊंटरवर जाण्याची वाट पहात असलेल्या लोकांचे निरीक्षण मी सुरू केले, काही लोकांशी बोललोही....
    त्यातल्या अनेकांची मुले शिकण्यासाठी परदेशात गेलेली  होती. पहिल्यांदाच जे लोक पार्सल पाठवणारे होते ते त्यांच्या देहबोलीवरून सहज ओळखता येत होते....
   काही लोकांची मुले एमएस करुन नुकतीच तिथे सेट झालेली होती त्यांच्या हालचालीत एक प्रकारचा अभिमान व आत्मविश्वास जाणवत होता. काहींची मुले नुकतीच ग्रीनकार्ड होल्डर होऊन तिथले  रहिवासी झाले होते, अशांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलांच्याप्रती अभिमान आणि कर्तव्यपूर्तीचे समाधानही ओसंडत होते!
  मात्र ज्यांची मुले वर्षानुवर्षे तिकडचीच झालेली होती आणि ते  परत येण्याची शक्यता धूसर  झालेली होती अशा परदेशस्थ्य मुलांचे पालक जे आता बऱ्यापैकी वयस्कर झालेले होते त्यांच्यात एक दोनच पालकांनी वास्तव मनापासून  स्वीकारलेले दिसत होते.व्यावहारिक अपरिहार्यतेची जाणीव त्यांना होती मात्र अनेकांच्या  चेहऱ्यावर एक वेदनामिश्रित हतबलता वाचता येत होती!फराळ पाठवण्याच्या माध्यमातून ते आपली मुले वा नातवंडे यांच्यातला नात्यांचा धागा जपण्यासाठी धडपडताना दिसत होते!
  तिथे वाट पहाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरच्या  त्या विविध भावभावना वाचणे हा एक वेगळाच अनुभव होता!
   "टोकन नंबर एकशे चाळीस" माझे टोकन पुकारले गेले आणि मी माझ्या वस्तूंच्या बॅगा सावरत पुढे सरकलो.....
   .... प्रल्हाद दुधाळ.

Thursday, October 17, 2019

माझी व्यसन मुक्ती

संतोषजींच्या गुटकामुक्तीच्या पोस्टनंतर अनेकजण आपल्या व्यसनांवर लिहिण्यासाठी प्रेरित  झालेले दिसताहेत.
    माझ्या लहानपणी गावात हातभट्टी होती तसेच देशीचेही एक दुकान होते. गावात बोटावर मोजण्याएवढ्या व्यक्ती सोडल्या तर अख्ख्या गावात दारू आणि गांजाने धुमाकूळ घातलेला होता! शाळेचे काही  मास्तरच माझ्या वर्गातल्या  थोराड विद्यार्थ्याना हाताशी धरून भर शाळेत नशापाणी करत असायचे! त्या वातावरणात दारू चाखून बघावी किंवा चिलमीचा एक झुरका मारून बघावा असे कधीच वाटले नाही,  याचे कारण अगदी लहान वयात झालेली पुस्तकांशी गट्टी हे तर  असावेच, पण याबरोबरच माझ्या आजूबाजूला दारूच्या व्यसनामुळे अनेक संसारांची चाललेली ससेहोलपट मी  अगदी जवळून पहात असल्यामुळे संवेदनशील मनावर झालेला परिणाम हे कारण सुद्धा असावे!
    पुढे पुण्यात आल्यावर झोपडपट्टीत रहात होतो.अमली पदार्थ ते वेश्यागमनापर्यंतची सगळ्या प्रकारची व्यसने मुक्तपणे करणारे अनेक मित्र दररोज  संपर्कात होते, मनात आलं असतं तर एका क्षणात त्यांच्याप्रमाणे वागू शकलो असतो,पण ईश्वराने तशी कधी बुद्धी दिली नाही! माझ्या जीवनातला हा एक मोठा चमत्कार म्हणावा लागेल!
    नोकरीत अधिकारी झाल्यावर खूप आग्रह करूनही हा बाबा बधत नाही हे बघून एका पार्टित माझ्या साहेबाने लिम्कामध्ये जीन  मिसळून पाजली होती.हा प्रकार थोड्या वेळातच माझ्या लक्षात आला आणि मी पार्टि सोडून निघून आलो!त्यानंतर एकाही ओल्या पार्टीला मी कधी गेलो नाही.
   आता कुणी म्हणेल "आयुष्यभर  एकही व्यसन  केले नाही?"  "ही कसली  जिनगागी?"  कुणाला काहीही म्हणूदे,मी आहे तो असाच आहे.
   व्यसन करणे म्हणजे आयुष्यातली मजा असेल तर जीवनभर असली मजा मी केली नाही याचा मला सार्थ अभिमान आहे!
    "पान बिडी सिगरेट तमाकू ना शराब, हमको तो नशा है मोहब्बत का जनाब!"
   हो , स्नेहाची माणसं जोडायचं व्यसन मात्र लागलंय आणि मनापासून जपतो आहे!
   ..... प्रल्हाद दुधाळ. (17/10/2019)

लकडी पुल... एक आठवण

लकडी  पुलावरून आता दुचाकीला परवानगी  दिल्याचे वाचले आणि माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा आठवला. ते 1992-93 साल असावं. मी माझ्या आयुष्यातली पहिली स्कुटर-बजाज कब खरेदी केली. मी तोपर्यंत स्कुटर चालवायला शिकलो नव्हतो. तर झाले काय की  पहिल्याच दिवशी थोडी प्रॅक्टीस केली आणि सौ.ला मागे बसवून कार्पोरेशन मार्गे जंगली महाराज रोडने पुन्हा स्वारगेटकडे निघालो. डेक्कनवरून दुचाकीला बंदी असलेल्या लकडी पुलावरून स्कुटर चालवत अलका चौकाकडे निघालो आणि नेमकं व्हायचं तेच झालं....
   पूल  ओलांडल्याबरोबर  डाव्या बाजूला चौकीच्या समोरच सहा ट्रॅफिक पोलीस उभे! एकाने अडवलं आणि माझ्या स्कुटरची चावी ताब्यात घेतली. गाडी बाजूला घेऊन, सौ.ला तिथंच उभं  करुन    मी प्रश्नार्थक चेहरा घेऊन त्या पोलिसांकडे गेलो....
" साहेब काय झालं?"
त्या पोलिसाने मला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं...
"स्कुटर नवीन का? "
 " हो साहेब..."
 " लायसन  बघू... "
 मी माझं लायसन्स त्याच्या हातात दिलं  त्यानं  ते शांतपणे त्याच्या वरच्या खिशात टाकलं ! आता बाकीचे पाचही जण माझ्याजवळ  आले.
"पुण्यात कधीपासून राहाता? " एकाने मला तिरकस  प्रश्न विचारला....
" पंधरा वर्षें... "
मी खरं  ते सांगितलं..
" या पुलावर स्कुटरला बंदी आहे माहीत  नाही का?"
आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला! खरं तर माझं शिक्षण आबासाहेब गरवारे कॉलेजात झालेलं आणि लकडी पुलावर दुचाकीला बंदी आहे हेही मला माहीत होतं, पण नवीन स्कुटरवर फेरफटका मारायच्या नादात मी  ते साफ विसरून गेलो होतो!
"नाही हो, मला माहीत नव्हतं!आज तर स्कुटर घेतलीय मला कसं  काय माहीत असणार? "
मी माझ्या चुकीचं  समर्थन करू  पहात होतो....
"चला,  दोनशेची पावती फाडा...."
"जाऊ द्या ना माहीत नव्हतं  म्हणून चूक झाली..."
मी विनवणीचा सूर आळवला...
"ते काही नाही पावती फाडावी लागेल...."
दुसऱ्या  पोलिसाने आता घटनेचा ताबा घेतला होता....
काही तरी तोडगा निघून चहापाण्याची तरी सोय करायचा इरादा सहाही  चेहऱ्यावर मी वाचला....
मी पवित्रा  बदलायचं  ठरवलं...
" एक काम करा, माझ्यावर रीतसर  खटला दाखल करा,मला ही केस लढवायची आहे! तुम्ही सहाजण इथे आडबाजूला उभे राहून सावज पकडताय काय? मी वकील देऊन केस लढवणार! तुम्हाला खरंच सेवा करायची असती तर एकजण  पुलाच्या त्या  टोकाला  उभा राहिला असता,  मला तिथेच सांगितल असतं  की हा पूल दुचाकीला बंद आहे  तर मी पुलावर  आलोच नसतो, पण तुम्ही सहा सहा जण बकरे पकडायला दबा धरून  बसलात! तुम्हाला कुठे सही पाहिजे असेल ती घ्या...
 आता तुम्ही खटला भरा माझ्यावर!
तसें माझे पन्नास हजार गेले तरी चालतील,पण मी आता दोनशे भरणार नाही!"
माझा तो पवित्रा त्यांना बहुतेक अनपेक्षित होता!
" अरे काय लावलाय खटला भरा, खटला भरा म्हणून..."
मी पुन्हा पुन्हा त्यांना खटला भरण्याबद्दल सांगत राहिलो...
शेवटी पहिला पोलीस  माझ्याकडे आला....
" फार शहाणे आहात!पक्के पुणेकर दिसताय! पुन्हा चूक करू नका,  हे घ्या.... "
वैतागून  त्याने माझे लायसन्स  आणि स्कुटरची चावी माझ्या हातात कोंबली....
मी स्कुटरला किक मारली,  सौ.मागे बसली, कुत्सितपणे मी एकदा सहाही जणांकडे पाहिले आणि गियर टाकून स्पीड घेतला....
  ..... प्रल्हाद दुधाळ.(17/10/2019

Wednesday, October 16, 2019

निवडणूका आणि मी ...

निवडणूका आणि मी ...
लहानपणी कळायला लागलं तेव्हाची पहिली निवडणूक आठवते. ती बहुतेक जिल्हा परिषदेची निवडणूक असावी. ट्रकमागे ट्रक भरून माणसं यायची,  प्रत्येकाच्या खिशाला एक रंगीत चित्र लावलेलं असायचं,  हातात पक्षाचे झेंडे असायचे.कुणीतरी  एकजण घोषणेचा अर्धा भाग म्हणायचा आणि ती घोषणा पूर्ण करण्यासाठी ट्रकमधली बाकी माणसं  अगदी बेंबीच्या देठापासून ओरडायची! पंधरावीस मिनिटात अख्या गावात घोषणांचा धुराळा उडवून या गाड्या पुढच्या गावाला जायच्या! दुसऱ्या दिवशी दुसरे लोक यायचे आणि घोषणा देत रान उठवायचे! त्या वयात हे नक्की  काय चाललंय हे मुळीच समजत नव्हतं.शाळेत नागरिकशास्र शिकायला लागल्यावर या  लोकशाहीच्या उत्सवाची थोडीफार ओळख झाली.मला जी पहिली निवडणूक आठवते त्यातल्या एका उमेदवाराचे नाव बहुतेक ज्ञानेश्वर खैरे होते, ते  पुढे आमदार होते... त्यांचं चिन्ह होतं बहुतेक बैलजोडी! पुढे थोडी प्रगल्भता आल्यावर त्या  घोषणा देण्याऱ्या गर्दीत मीही मित्रांबरोबर सामील झालो.आमचा तालुका त्यावेळी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला होता. "चिमासाहेब बाळासाहेब मुळीक" यांच्यासाठी दिलेल्या घोषणा  चांगल्याच आठवतात.अनेक वर्षें  समाजवादी पक्ष या एकाच पक्षाचे आस्तित्व आमच्या भागात जाणवायचं!दादा जाधवराव हे  एकच आमदार कित्येक  निवडणूका जिंकत होते! काँग्रेसच्या चरखा वा बैलजोडी यापेक्षा झाड आणि पुढे नांगरधारी शेतकरी ही चिन्हेच आमच्या भागात जास्त प्रसिद्ध होती असे आठवते.अर्थात विद्यार्थी दशेत असल्याने राजकारणातलं काही कळायचं ते वय आणि तेव्हढी   समजही नव्हती. ग्रामपंचायतीच्या रेडिओवरून ज्या बातम्या ऐकायला मिळायच्या तेवढंच अख्ख्या गावाचं ज्ञान असायचं!  आणीबाणी नंतरची निवडणूक आणि जनता दलातल्या नेत्यांची भाषणे मात्र खूप मन लावून ऐकली होती शिवाय ते वयही संस्कारक्षम होते त्यामुळे असेन, पण स्वतःची अशी काही राजकीय मते बनायला लागली होती.वृत्तपत्रे वाचून व बातम्यांचे विश्लेषण करून एव्हाना  कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे समजायला लागलं होतं.कॉलेज जीवनात असताना काही मित्रांच्या संगतीने थोडे दिवस राष्ट्र सेवा दलात काम करत होतो.काँग्रेस हॉलवर संत्र्यामंत्र्याच्या पुढे पुढे करुन  काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी  लोक कोणत्या थरापर्यंत जातात हे त्या काळात अगदी जवळून बघायला मिळालं.नंतर  समाजवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून एक विधानसभा आणि एक मनपा निवडणुकीत कामही केलं!एक मात्र खरं आहे मी मनापासुन  तिथे रमत नव्हतो!
     दरम्यानच्या काळात मला  सरकारी नोकरी लागली आणि सीसीएस कंडक्ट रूल वाचला. नियमाप्रमाणे सरकारी नोकर म्हणून आता आपण राजकीय पक्ष सोडा आपलं साधं  राजकीय मतही व्यक्त करू शकत नाही याची जाणीव झाली! आपसूक त्या गोष्टींपासून  दूर झालो...
       नंतर  मात्र इमानेइतबारे मी एक सुजाण नागरिक म्हणून माझा गुप्त मतदानाचा अधिकार बजावत असतो!
नो पॉलिटिक्स, काय!   
 .... प्रल्हाद  दुधाळ.

Sunday, August 4, 2019

आठवणींच्या पोतडीतून ....

आठवणींच्या पोतडीतून ....
 १९७६ चा तो असाच जुलै महिना होता . मी नुकताच लोणंद येथील मालोजीराजे विद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता.मला खरं तर अजूनही पॉलिटेक्निकला प्रवेश मिळेल याची आशा होती त्यामुळे अकरावी सायन्स वर्गात अजून लक्ष लागत नव्हतं .जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात डिप्लोमाकरीता चांस कॉल येतात असे ऐकले होते;पण मला मात्र अजून त्याबद्दल काहीच समजले नव्हते.पावसाने संततधार धरली होती आणि नीरा नदीला महापूर आला होता. पुणे आणि सातारा जिल्ह्याला जोडणारे सगळे पूल पाण्याखाली गेले होते त्यामुळे माझं गाव आणि लोणंद यांचा संपर्क तुटला होता.एस टी वाहतुकीची सेवा संपूर्णपणे  बंद झाली होती .पूर्ण आठवडा हेच चित्र होते. पाऊस कमी झाला आणि नदीचे पाणी जवळ जवळ दहा दिवसांनी ओसरले.त्यानंतर एक दिवस माझा भाऊ एक पत्र घेवून धावतपळत माझ्याकडे आला .पत्र वाचले आणि मला रडूच फुटले.....
 तो माझ्या डिप्लोमा प्रवेशाचा चांस कॉल होता आणि त्या पत्रातील मजकूर असा होता की "मी चार तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करावा अन्यथा पुढच्या उमेदवाराला ती जागा बहाल करण्यात येईल!" आज दहा तारीख उलटून गेली होती; हातातोंडाशी आलेला घास जाणे म्हणजे काय असते याचा हा आयुष्यातला मोठा धडा होता. माझा डिप्लोमा प्रवेश निरेच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला होता!
त्यातूनही काही चमत्कार होईल अशी आशा होती म्हणून कराड पॉलिटेक्निक गाठले;पण वेळ गेलेली होती....
....प्रल्हाद दुधाळ.

हरवलेल्या मित्रांसाठी....

हरवलेल्या मित्रांसाठी....
   आज वैश्विक मैत्रीदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या घेतल्या जात आहेत. पाश्चात्य संस्कृतीला कितीही नावे ठेवली जात असली तरी त्यांची वेगवेगळ्या नात्यांचा सन्मान करणारे  हे वेगवेगळे "डे" ज साजरे करायची पध्दत नक्कीच स्तुती योग्य आहे! आजच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात असे डेज आता खूप महत्त्वाचे वाटतात!
    वेगवेगळी समाज माध्यमे आज मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत आणि या माध्यमामुळे एक छान सोय झाली आहे ,प्रत्यक्ष न पाहता, न भेटतासुध्दा अनेक लोकांचा एकमेकाप्रती स्नेहभाव व्यक्त करण्याची, मैत्री जोपासण्याची एक उत्तम सोय या माध्यमातून हाताशी आली आहे! त्यातूनच अनेक अनोळखी व ओळखीच्या मनामनात एक स्नेहसेतू उभारला जातो आहे ही नक्कीच आजच्या समाजासाठी चांगली गोष्ट आहे.
  आज वयाच्या पन्नाशीच्या पुढे असणाऱ्या पिढीसाठी हे एक उत्तम वरदान आहे.शाळा कॉलेजमधल्या अनेक घट्ट मित्रमैत्रीणी फेसबुक, ट्विटर, व्हाटस्आप अशा माध्यमातून एकत्र येत आहेत. त्या निमित्ताने त्या मोरपंखी दिवसांच्या आठवणीना उजाळा मिळतो आहे.
   खरं तर आज  एका घरात, शेजारी असलेल्या लोकांचा एकमेकांशी संवाद हरवलेला असताना असे चार क्षण ऑनलाईन का होईना; पण आपल्या त्या त्या काळातल्या मित्र मैत्रीणीसोबत गुजगोष्टी करायला मिळणे ही या लोकांसाठी सुवर्णसंधीच आहे असे मला वाटते. भौतिक सुखांच्या गर्दीत आज नाती हरवली आहेत.कुणालाही कुणासाठी वेळ देता येत नाही.पिढ्यापिढ्यातले वैचारिक अंतर वाढले आहे.अनेकांची संवादाची भूक आतल्या आत दाबली जात असताना या आभासी का होईना माध्यमामुळे हरवलेले मैत्र जपले जाते आहे ही गोष्ट मला वाटते खूप महत्त्वाची आहे .या माध्यमातून पुन्हा जोडलेली मैत्री ही केवळ आभासी पातळीवर न ठेवता प्रत्यक्षात भेटून या स्नेहसेतूचे रूपांतर एखाद्या सामाजिक चळवळीत व्हायला हवे .आज सामाजिक व आर्थिक सुस्थितीत असलेल्या समाजातील घटकांनी आपल्या त्या त्या काळातल्या घट्ट मैत्रीच्या धाग्याला अजून घट्ट करून यथाशक्ती मानसिक आधार व मार्गदर्शन व गरज असेल तेथे शक्य तेवढी आर्थिक स्वरूपाची मदतही करायला हवी.श्रीकृष्ण-सुदामा मैत्रीची कथा आपण अगदी भक्तीभावाने वाचतो व ऐकतो आणि मैत्रीचे गोडवे गातो .
 बघा, तुम्ही जर थोडेफार तशा कृष्णपदापर्यंत पोहोचले असाल तर तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या हरवलेल्या सुदामास नक्की शोधा... कदाचित त्याला तुमच्या मदतीची गरज नसेलही;पण आपली आठवण ठेवून हा मित्र पुन्हा एकदा समोर आलाय आणि तोही केवळ बालपणीची मैत्री जोपासण्यासाठी! त्या मित्राचे सोडा;पण यातून तुम्हाला किती आनंद मिळेल याचा विचार करा....
     जगण्याच्या बेफाम लढाईत आज  अशा कुठे कुठे हरवलेल्या मित्र मैत्रीणीनाही ...
मैत्री दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
.... प्रल्हाद दुधाळ.(४/८/२०१९)

Thursday, August 1, 2019

प्रेमळ

" ए मूर्खा तुला काय कळतं की नाही, ठेव ते बाजूला!"
" जरा म्हणून अक्कल नाही..."
" ये म्हाताऱ्या जरा ऐक की ..."
" चल हो बाहेर सगळी वाट लावली .."
" अरे नीट खा की सगळं कपड्यावर सांडवल की. .."
"चल उरक की लवकर..."
 दररोज सकाळी ऑफिसला जायची गडबड एका बाजूला चालू असताना खालच्या मजल्यावरच्या फ्लॅट मधून तावा तावात चालू असलेली जुगलबंदी अगदी नको नको म्हणत असताना कानावर आदळत असते, आता या गोष्टीची इतकी सवय झालीय की एखाद्या दिवशी आवाज आले नाही तर चुकल्या चुकल्या सारखं वाटतं...
या जुगलबंदीत फक्त काकूंचा आवाजच टिपेला गेलेला असतो.काका मात्र अगदी हळू आवाजात वाद घालत असतात;पण ते जे काही बोलत असावेत ते असे असावे की त्याने काकूंचा पारा अजूनच वाढलेला असतो, निदान आवाजाच्या टीपे वरून तरी तस वाटत रहातं!
   या दरम्यान माझी सौ.नेमकी किचन मध्ये असते आणि खालच्या किचनमध्ये चालू असलेली ही जुगलबंदी माझ्यापेक्षा तिला जास्त स्पष्टपणे ऐकू येते.
सुरूवात झाली की सौ.मला हमखास हाक मारुन सांगते...
" झाली बघा सुरू जुगलबंदी!"
मग मीही तिला चिडवत ऐकवतो...
" बघ ऐकून ऐकून तू ही माझ्याशी म्हातारपणी असं वागू नको म्हणजे झालं!"
  ऑफिसला जायची  गडबड असते त्यामुळे तपशिलात कधी गेलो नाही; पण हेच काका काकू मला सोसायटीत फिरताना दिसले की ते भांडणारे दोघे हेच का असा प्रश्न पडावा! कारण काकू हाताने काठी टेकवत टेकवत पुढे चाललेल्या असतात आणि काका अगदी हळू हळू त्यांच्या मागे मागे चालत चाललेले असतात....
  एक दिवस सुट्टी घेतली होती त्यामुळे निवांत बसलो होतो.आणि अचानक ती जुगलबंदी चालू झाली. माझं कुतूहल मला शांत बसून देत नव्हतं,त्यामुळे मी खालच्या फ्लॅट मध्ये डोकावल, आणि पहातच राहीलो...
   नुकतंच काका अंघोळ करून आलेले असावेत आणि काकू टॉवेलने त्यांचे डोके पुसून देत होत्या! एका बाजूला त्यांची तोडाची टकळी चालू होती. ...
   " अरे बहिर्या जरा डोकं खाली घे की, आणि लगेच तो पोहे खाऊन घे मग फिरायला जाऊ! ये येड्या ऐकतोय ना?"
तो त्यांचा "सुसंवाद" ऐकून मला खूप  हसू आलं!मी तेथून काढता पाय घेतला..
   या जोडप्याबद्दल कुतूहल होत त्यामुळे शेजाऱ्या बरोबर थोडी चर्चा केली...
  या दोघांचे एके काळी जवळच्या तालुक्यात प्रचंड कमाई असलेले दुकान होते.वय झाल्यावर ते दुकान विकून आपल्या एकुलत्या एक मुलाबरोबर ते कोथरुड येथे मोठा बंगला घेवून राहायला आले .मुलाचे लग्न थाटात झाले .मोठ्या घरातुन आलेल्या सुनेने सासूच्या फटकळ बोलण्यावरून भांडण सुरू केले आणि दररोज कटकट नको म्हणून मुलाने आपल्या आई बापाला या फ्लॅट मध्ये आणून ठेवले आहे .काकूंचे गुढगे गेलेत तर काकांना दिसण्याचा आणि ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे.आपल्या तरुणपणी प्रेमविवाह करून शून्यातून आपलं विश्व साकारणारे हे दोघे आज एकमेकांना छान सांभाळून घेत आनंदाने जगताहेत.एकमेकांच दुखलं खुपल तर एकमेकांची काळजी घेतात . नियमित फिरणे आहार विहार या बाबतीत जागरूक असलेलं हे जोडपं आपली नवी इनिंग मस्त जगताहेत! 
  आणि हो... ती सकाळी सकाळी चालू असलेली जुगलबंदी म्हणजे त्या दोघांचा अगदी नेहमीचा "प्रेमळ" संवाद असतो ...!
..... @प्रल्हाद दुधाळ.

Monday, May 6, 2019

उपवास आणि चिडचिड...

उपवास आणि चिडचिड ....
काल उपवास आणि चिडचिडचि यासंबंधी  पोस्ट वाचली आणि माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा आठवला....
    त्यावेळी(१९९३) मी फोन इन्स्पेक्टर म्हणून पुण्याच्या कैंप भागातल्या एका विभागाचा इंचार्ज होतो.त्या काळी टेलिफोन म्हणजे सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेली गोष्ट होती .मोबाईल सेवा भारतात आस्तित्वातच नव्हती....
  तर, माझ्या विभागातल्या टेलिफोन कनेक्शनबद्दलच्या तक्रारी, नवीन कनेक्शन देणे याची जबाबदारी माझ्यावर होती.माझ्या परीने ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा माझा प्रयत्न असायचा.येणाऱ्या ग्राहकांशी माझे वागणे, बोलणे तसेच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करायचो.त्यामुळे ग्राहक  तसेच माझ्या हाताखाली काम करणारे कर्मचारी यांच्यात मी खूप पॉप्युलर होतो. कर्तव्यपूर्तीमधले एक वेगळेच समाधान मला त्या काळात मिळत होते....
     अचानक काय झाले माहीत नाही; पण एका गुरूवारी सकाळी सकाळी एक ग्राहक माझ्याकडे आला . रागाने माझ्याशी त्याच्या टेलिफोन बाबत तो तक्रार करत भांडायला लागला आणि मी प्रथमच माझा एरवीचा शांत अवतार सोडून त्याच्या पेक्षा दुप्पट आवाज वाढवून त्याच्याशी वाद घालायला लागलो!
  त्या दिवशी माझ्या स्टाफ बरोबरही मी चिडून बोलत होतो!
दुसऱ्या दिवशी मात्र मी नेहमी सारखा वागत बोलत होतो.
पुन्हा पुढच्या गुरुवारी अगदी तसेच घडले! त्या दिवशीही मी सगळ्यांवर चिडचिड करत होतो. संध्याकाळी माझे कधी नव्हे ते डोके दुखत होते.
नंतरचे सहा दिवस मात्र मी नॉर्मल होतो.असे काय होतेय ते माझे मलाच कळेना. मग दर आठवड्याला असेच घडत राहिले...
   एक दिवस मी गंभीरपणे माझ्या स्वभावात होत असलेल्या त्या एका दिवसाच्या बदलाबद्दल विचार करत बसलो होतो, कारण माझ्या तशा वागण्याचा फटका काही ग्राहक व स्टाफला बसला होता.त्यांची नाराजी मला नंतर चांगलीच जाणवायला लागली होती. विचार करता करता अचानक माझी ट्यूब पेटली ....
   दर गुरूवारी मी कुणीतरी सांगितले म्हणून उपवास धरायला लागलो होतो आणि नेमक्या त्या गुरूवारी माझी पहिल्यांदा चिडचिड झाली होती!!!
   आपली चिडचिड पोटात काही नसल्याने होते आहे आणि दर गुरूवारी वादविवाद व भांडणे सुरु झाली हे लक्षात आल्यावर मात्र मी उपवासाच्या बाबतीत कानाला खडा लावला ते आजपर्यंत!
   आता चिडचिड व्हायला लागली की मी मला भूक तर लागली नाही ना? हे तपासून पोटपूजा करून घेतो....
     ..... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, January 30, 2019

जिद्द...

जिद्द....
     मागच्या आठवड्यात मी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी एक शपथ पोस्ट केली होती.खूप जणांना ती पोस्ट खूप आवडली होती.
   अनेक मित्रांनी यापुढे आपणही अन्नाची नासाडी टाळू असे सांगितले.माझ्या एका मित्राने तर ती शपथ खूपच गांभीर्याने घेतली होती....
   आज ऑफिसात एका गृपने संक्रातीच्या निमित्ताने दुपारचे जेवण आयोजित केले होते आणि आम्ही सगळे आमंत्रित म्हणून हजर होतो.जेवणात तीळ पोळी, मसाला भात टॉमॅटो सार असा मस्त मेनू होता. प्रत्येक ताटात खूपच वाढून दिले होते.आपल्याला हे सगळं संपवणं शक्य नाही हे जवळपास प्रत्येकाला माहीत होते;पण आग्रहापुढे कुणाचेही चालत नव्हते. बऱ्याच जणांनी माझ्यासह अगदी नाईलाजाने समोर वाढलेले संपवले.माझा तो मित्र मात्र एका पोळीत आऊट झाला होता. ताटात शिल्लक राहिलेले अन्न कुणाला तरी खायला देऊन ती शपथ पाळायची असे त्याने ठरवले.त्याने तसे बोलूनही दाखवले आणि एका रद्दी न्युज पेपरमध्ये उरलेले अन्न घेवून तो गरजु भुकेलेला माणूस शोधायला तो बाहेर पडला!
 दोनशे मीटर अंतरावर एक भिक्षेकरी नेहमी बसतो हे त्याला माहीत होते.तो त्या चौकात गेला;पण आज नेमका तो भिक्षेकरी गायब होता. मग तो तसाच पुढं चालत राहिला.एक दीड किलोमीटर परिसरात त्याला कुणी गरजु सापडला नाही.एका उभ्या असलेल्या टेंपोच्या सावलीत एक कुत्रे झोपले होते.त्याने शेवटी त्या कुत्र्याला ते अन्न द्यायचा निर्णय घेतला.कुत्र्याला त्याने आवाज दिला." काय कटकट आहे" असा भाव ठेवून कुत्रे महाशयांनी डोळे उघडले.मित्राने उत्साहाने अन्नाचा कागद त्याच्यासमोर ठेवला.कुत्रे महाशयांनी अन्नाकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा झोपून घेतले!पुन्हा प्रयत्न करूनही कुत्रोबाने डोळे उघडायला नकार दिला!
आता मित्राने हार मानली आणि तो कागद उचलून अजून पुढे चालायला लागला.उपाशी माणूस, कुत्रा किंवा कोणताही प्राणी ज्याला हे अन्न खायला देता येईल,असा विचार करत शोधत शोधत तो चांगला दोन किलोमीटर पुढे गेला. अचानक त्याला एक दुसरा कुत्रा दिसला.लगबग करून तो पुढे गेला आणि तो कागद त्या कुत्र्यासमोर ठेवला.कुत्रा थांबला त्याने तो कागद क्षणभर हुंगला आणि मित्राकडे  एक नजरेचा कटाक्ष टाकला आणि सरळ पुढे निघून गेला.
आता मात्र मित्र चांगलाच वैतागला!
"माणूस सोडा, एक साधे कुत्रेही त्याने दिलेले अन्न खायला तयार नव्हते!"
  नाईलाज होवून त्याने तो पेपर पुन्हा उचलला आणि अजून पुढे चालायला लागला.रस्त्याच्या कडेला काही कोंबड्या मातीत चोच मारत होत्या.मित्राला मग कल्पना सुचली आणि पोळीचे छोटे छोटे तुकडे करून तो त्या कोंबड्यांना अन्न भरवत राहीला.
"मी अन्न वाया घालवणार नाही" ही शपथ अशा प्रकारे त्याने एकदाची निभावली!!!
याला म्हणतात जिद्द! हो की नाही?
..... प्रल्हाद दुधाळ.
     ३०/१/२०१९

Thursday, January 24, 2019

मोबाईलची कथा व्यथा

      मोबाईलची कथा व्यथा
       आमच्या बिल्डिंगमध्ये केवळ माझ्या घरात, तोही मी दूरसंचार खात्यात काम करत असल्याने फुकट मिळालेला टेलिफोन होता.बिल्डिंगमधील कुणाला फोन करायचा असला किंवा कुणाचा इनकमिंग कॉल आला तर त्याला बोलावून घेवून परत कॉल करायची मोफत सोय मी करून दिली होती.त्यावेळी मोबाईल सेवा नुकतीच चालू झाली होती इन्कमिंग कॉलला ही आठ रूपये चार्ज होता.आमच्या शेजारी एक व्यापारी राहायचे.त्यांच्याकडे असा मोबाईल होता.एकदा त्यांची बायको एका लग्नाला गेली आणि तेथे अचानक बेशुध्द  झाली.त्याचा फोन लागत नव्हता, त्यामुळे तो निरोप मला माझ्या फोनवर कुणीतरी दिला.ते महाशय नेमके बाहेर गेले होते.त्यांच्याकडे नवा नवा आलेला मोबाईल होता.मी त्यांना मोबाईलवर कॉल करून त्याच्या बायकोबद्दल सांगायचा प्रयत्न करत होतो;पण इन्कमिंगला चार्ज आहे म्हणून बाबा मोबाईलचा कॉल घ्यायला तयारच नाही! तब्बल एक तास मी  प्रयत्न करत होतो;पण त्याने फोन काही घेतला नाही! असा राग आला होता ना!शेवटी मी नाद सोडून दिला...
दुसऱ्या दिवशी कळाले की त्याच्या एका नातेवाईकाने परस्पर याच्या बायकोला हॉस्पीटलमध्ये  एडमिट केले होते ....

कथा कुणाची व्यथा कुणाला!
....प्रल्हाद दुधाळ.

Monday, January 14, 2019

शपथ...

शपथ....
 
   शिक्षिका असलेल्या एका फेसबुक मैत्रिणीचा मेसेज आला की शाळेत तिच्या विद्यार्थ्याना "अन्नाची नासाडी करू नये" अशा आशयाची  एक शपथ द्यायची आहे आणि त्यासाठीचा मजकूर मी लिहून द्यावा.मी प्रयत्न करतो म्हणालो...
 आज ती शपथ लिहून द्यायचा प्रयत्न केला.
मी लिहिलेली ती शपथ जेव्हा पुन्हा वाचली तेव्हा लक्षात आले की अरे; ते विद्यार्थीच का, अशी शपथ तर माझ्यासह प्रत्येकाने घ्यायला हवी ....
बघा जमली का?
 "आम्ही शपथ घेतो की...
- अन्न हे पूर्णब्रह्म आहे आणि या अन्नाचा प्रत्येक कण ही राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे हे मला माहीत आहे .अन्न वाया घालवून या संपत्तीचा मी विनाश करणार नाही व होवू देणार नाही.
- माझ्या ताटात येणाऱ्या अन्नाच्या प्रत्येक घासामागे बळीराजाने केलेल्या अतोनात कष्टाची मला जाणीव आहे. अन्न वाया घालवून बळीराजाच्या त्या कष्टाचा मी अपमान करणार नाही .
- घरात किंवा एखाद्या कार्यक्रमात जेवण करताना भूक असेल एवढेच अन्न मी वाढून घेईन .अन्नाचा प्रत्येक घास मी निर्मिकाने दिलेला प्रसाद म्हणून खाईन.अन्न वाया जाणार नाही याची मी दक्षता घेईन व ईतर लोकांनासुध्दा अन्नाचे महत्त्व समजावून सांगेन
- मला जाणीव आहे की माझ्या देशात अनेक लोकांना खायला पुरेसे अन्न मिळत नाही. माझ्या अवतीभवतीच्या अशा एका तरी उपाशी माणसाला जमेल तेव्हा माझ्या घासातला घास द्यायचा मी प्रयत्न करीन.
- भूक असताना खाणे ही प्रकृती, भूक नसताना खाणे ही विकृती आणि स्वत: अर्धपोटी असताना आपल्यातला अर्धा घास दुसऱ्या गरजूला खायला देणे ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती जोपासण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न करीन."
..... प्रल्हाद दुधाळ.