Monday, November 29, 2021

यंत्र मानव विचार करू लागला तर...

यंत्र मानवाला विचार करता येऊ लागला तर... नुकताच मी एका मॉलमध्ये गेलो होतो तिथे काही कामे यंत्र मानव करताना दिसले.उदाहरणार्थ मी पाहिले की मॉलमधील फरशी साफ करण्यासाठी एक रोबोट अर्थात यंत्रमानव बसवलेला आहे. मी शांतपणे त्या यंत्रमानवाचे काम पहात होतो.तो भिंतीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी सरळ रेषेत चालत तो जमिनीवरचा कचरा स्वाहा करत होता.त्याला सोपवलेली जबाबदारी तो इतक्या इमान इतबारे करत होता की त्याचे ते काम पहातच रहावे असे वाटत होते. सहजच मनात विचार आला की या यंत्रमानवाच्या जागी खराखुरा माणूस असता तर त्याने हेच काम करताना किती चुकारपणा केला असता? त्याच्या मागे एक सुपरवायझर पुन्हा त्या सुपरवायझरचा मुकादम एवढे मनुष्यबळ ठेऊनसुध्दा कामात हलगर्जीपणा झाला असता;पण हा यंत्रमानव त्याला दिलेल्या आदेशाचे किती तंतोतंत आणि शिस्तीने पालन करत होता... माणसाने त्याच्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर असे कितीतरी प्रकारचे यंत्रमानव तयार केले.माणसाचे कष्ट कमी करून सगळी कामे अगदी चुटकीसरशी व्हावीत,मानवी अंगमेहनत कमी व्हावी म्हणून, माणसाच्या बुध्दिवर अकारण पडणारा ताण कमी व्हावा, एकूणच उत्पादन क्षमता वाढावी म्हणून अशा यंत्रमानवांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली.या यंत्रासाठी काही ठराविक प्रोग्राम डिझाईन करून त्याला दिलेल्या ठराविक आदेशप्रणालीच्या भरवशावर माणसाची अनेक किचकट वेळखाऊ कामे सोपी करण्यात माणूस यशस्वी झाला. समजा काही चमत्कार झाला आणि माणसाने तयार केलेले यंत्रमानव विचार करू लागले तर? मी विचार करू लागलो.... शेवटी यंत्रमानव ही मानवाचीच निर्मिती आहे त्यामुळे त्याने बनवलेला यंत्रमानव विचार करू लागला तर तो माणसासारखाच विचार करणार ना? मग सध्या इमाने इतबारे जमिनीची स्वच्छता करणारा यंत्रमानव अचानक माणसासारखा विचार करेल की ' काल तर ही जमीन मी स्वच्छ केली.समोर कचरा किंवा धुळही दिसत नाहीये,मग मी विनाकारण कशाला फिरत राहू? त्यापेक्षा जरा आराम केला तर मालकाला थोडेच समजणार आहे? त्याला विचार करण्याची शक्ती मिळाल्याने स्वतः वेगळ्या पद्धतीने काम करणे सुरू होईल.चुकारपणा् सुरू होईल. यंत्राला माणसाने दिलेली आज्ञावली कुचकामी होऊन तो यंत्रमानव स्वतःच्या विचारप्रणालीवर निर्णय घ्यायला लागेल.' काम करायचे की नाही, आज सुट्टी घ्यायची का, आज थोड्या कमी चकरा मारू ' अशा प्रकारे विचार करून तो मनमानी करायला लागेल. पैसे मोजून घेणारा आणि देणारा यंत्रमानव असाच स्वतःच्या मनाने वागायला लागला तर आर्थिक क्षेत्राचा खेळखंडोबा होऊन जाईल. विविध इंडस्ट्रीजमधील यंत्रमानव जर त्यांना सोपवलेली कामे सोडून स्वतः विचार करून वेगळे वागायला लागले तर उत्पादनांची गुणवत्ता मार खाईल. थोडक्यात यंत्रमानव जित्याजागत्या माणसासारखा विचित्र पद्धतीने वागायला लागेल आणि त्याला बनविण्यासाठीचा माणसाचा उद्देशच निकालात निघेल... यंत्र मानव विचार करायला लागला तर माणसात आणि त्याच्यात फरक रहाणार नाही किंबहुना माणसाला यंत्रमानव आपल्याला वरचढ होतो आहे हे सहनच होणार नाही.मग माणूस आपल्या अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावर यंत्र मानवाचा विनाश घडवून आणेल आणि या बाबतीत मानवाने केलेली प्रगती शून्य होऊन जाईल.... म्हणून माणूस यंत्रमानव त्याच्या आज्ञेप्रमाणे च काम करेल स्वतः विचार करू शकणार नाही याची काळजी घेत आला आहे आणि पुढेही घेत राहील कारण सर्व प्राणिमात्रात मनुष्य हा प्राणी फारच खतरनाक आहे! ©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

No comments:

Post a Comment