Monday, November 22, 2021

विवेक...एक विचार

विवेक विवेक म्हणजे नक्की काय? मला असे वाटते विवेक म्हणजे सारासार तारतम्य! जीवनातल्या चांगल्या आणि वाईटात फरक करण्याची हातोटी! योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची माणसाची क्षमता म्हणजेही विवेकच! हा विवेक ज्याच्या अंगी आहे त्याला आयुष्यात सहसा अपयशाचा सामना करावा लागत नाही,कारण ज्या गोष्टीत यश मिळेल असेच काम हातात घ्यायची सारासार बुद्धी त्या व्यक्तीला अंगी असलेल्या विवेकामुळे लाभलेली असते. ज्यांच्या अंगी विवेक असतो त्या व्यक्तींच्या अंगी प्रचंड सहनशीलता असते कारण विवेक जागा ठेऊन निर्णय घेताना खूप संयम ठेवावा लागतो. माणसाच्या आयुष्यात त्याला अनेक चढउतारांचा संकटांचा सामना करावा लागतो.अनेकदा मानसिक परिस्थिती दोलायमान असते.कधी कधी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर माणसाला लढावे लागते.प्रचंड कष्ट करावे लागतात.हे कष्ट कधी अंगमेहनत स्वरूपात असतात तर कधी ही बौद्धीक स्वरूपाची मेहनत असते. अनेकदा निर्णय घेताना त्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी त्या व्यक्तीवर असते अशावेळी खरा विवेकाचा कस लागतो .कधी निर्णय घेताना निती अनितीचा प्रश्नही असतो त्यावेळी तर निर्णय घेताना नुसते बुध्दीचे काम नसते तर संबंधित लोकांच्या सामाजिक व मानसिक स्तरावर होणाऱ्या परिणामांचा विचार होणेही आवश्यक असते.अशावेळी सदविवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावे लागतात. भले काय बुरे काय, काय केले तर काय होईल.निर्णयाचे चांगले परिणाम काय आहेत, वाईट परिणाम काय आहेत,कोण आनंदी होईल, कुणाला त्रास होईल, कोण दुखावले जाईल आणि या सगळ्यांच्या संभाव्य प्रतिक्रिया काय असतील? त्या प्रतिक्रियांचे काय पडसाद उमटू शकतात? त्याचे समाजावर किंवा कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम लगेच किंवा कालांतराने दिसतील इथपर्यंत लांबवर विचार करण्याचे तारतम्य केवळ विवेकाने साधता येते .... थोडक्यात काय माणसाच्या जीवनात विवेक या गुणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जगताना रात्रंदिवस हर क्षणाला हा विवेक जागा ठेवावा लागतो.त्यातल्या त्यात आनंदी जीवनासाठी हे तारतम्य किंवा विवेक खूपच महत्त्वाचा आहे? बरोबर ना? © प्रल्हाद दुधाळ 9423012020

No comments:

Post a Comment