Wednesday, December 8, 2021

पन्नास वर्षे पुढे..

पन्नास वर्षे पुढे... पन्नास वर्षांपूर्वीच्या जगात आणि आजच्या जगात जमीन अस्मानाचा फरक आहे. गेल्या पाच दशकांत जगातील उपलब्ध तंत्रज्ञानात शेकडोपट प्रगती झाली आहे.सोयी सुविधांमध्ये कैक पटीने सुधारणा झाली आहे. मानवी बुद्धिमत्तेने अनेक चमत्कार घडवून पन्नास वर्षात विज्ञान तंत्रज्ञानात कल्पनातीत गोष्टी घडलेल्या आमच्या पिढीने प्रत्यक्ष पाहिले अनुभवले आहे ... एक विचार सहजपणे मनात डोकावून गेला.... मला दिव्य दृष्टी मिळून पन्नास वर्षानंतरचे जग बघता आले तर? नक्की कसे असेल हे जग? मी विचारांनी त्या जगात पोहचलो....मी पाहिले.... आता जगात तंत्रज्ञानाने अत्युच्च पातळी गाठली आहे.लोकांना आता संभाषण करण्यासाठी बोलणे लिहिणे किंवा वेगळ्या कोणत्याही मीडियाची गरज भासत नाही. अती विकसीत सूक्ष्म लहरींच्या जोरावर माणूस एका मनातील संदेश दुसऱ्या मनात केवळ विचार करून पाठवू शकतो.आज असलेल्या स्मार्ट फोनच्या जागेवर अदृश्य असे स्मार्टफोन जे नजरेने दिसत नाहीत विकसित झाले आहेत.ज्याला संदेश पाठवायचा आहे त्याचा फक्त चेहरा नजरेसमोर आणला तरी त्याच्या संवेदन यंत्रणेला नोटिफिकेशन जाते आणि समोरच्या व्यक्तीकडून तो कोडेड संदेश स्विकारला किंवा नाकारला जातो. एकाच्या मनातील गोष्ट दुसऱ्याला अगदी मायक्रो सेकंदात पोहोचते. सूक्ष्म लहरीवर आधारीत अशी मेट्रो सेवा शहरांतर्गत वाहतुकीसाठी वापरली जाते पूर्वी ज्या प्रवासाला तास दोन तास लागायचे त्यां प्रवासाला आता केवळ पाच दहा मिनिटे लागतात.रस्त्यांवर आता अजिबात ट्रॅफिक नसते. प्रदूषण नामशेष झाले आहे.सर्व यंत्रणा आता अत्याधुनिक झाल्या आहेत त्यामुळे माणसा माणसात बोलणे भेटणे या गोष्टी इतिहास जमा झालेल्या आहेत. एका संदेशावर आता सरकारी कामे होतात.कुठल्याही कामासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत.केवळ एका संदेशावर तुम्हाला तुमचे काम करून घरपोहच मिळते. कुटुंब व्यवस्था, लग्नसंस्था, सणसमारंभ आता इतिहासजमा झालेले आहे .आता केवळ लिव्ह इन रिलेशनचा जमाना आहे.आता कुणीही कुठल्या नात्यात स्वतःला बांधून घेत नाही आणि बांधत नाही.आता केवळ शुध्द व्यवहारावर जग चालते मूल पाच वर्षाचे झाले की आई बापाला सोडून स्वतंत्र राहायला लागते त्याची सगळी जबाबदारी सरकार घेते. या जगात भावनेला थारा नाही. सर्व गोष्टी मायक्रो रोबोट करतात. माणसे केवळ यंत्रवत व्यवहार करतात. आता जगात कोणतीही नाती खरी नसतात.आभासी नात्यामुळे कोणीही कुणाशी भावनिक दृष्ट्या जोडलेला नसतो. खरी नातीच नसल्याने वाद भांडण तंटे रुसवे फुगवे असल्या गोष्टी नाहीत.जगाला अभिप्रेत असलेल्या आदर्श जगात आता माणूस रहातो आहे....एकदम शांत....निवांत... नो कलकलाट... नो गोंधळ.... " ए मूर्खा दिसत नाही का, का धक्के मारत चालतोय? दिवसा घेतली की काय?" कुणाला तरी माझा धक्का लागला आणि त्याच्या आवाजाने मी भानावर आलो.... त्या जगात पोहोचायला अजून पन्नास वर्षे आहेत तर.... जाऊ दे तोपर्यंत आहे तेच खरे जीवन.... © प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

No comments:

Post a Comment