Tuesday, December 21, 2021

प्रेम करूया स्वतःवर...

प्रेम करूया स्वतःवर.... स्वतःबद्दल काही ना काही तक्रारी असलेल्या अनेक व्यक्ती आपल्या अवतीभवती आपण बघत असतो... कुणाला त्यांचा जन्म गरीब घरात झाला याचा खेद असतो,कुणाला आपला रंग गोरा नाही म्हणून दुःख असते तर कुणी अजून काही ना काही कारणाने स्वतःला कमनशिबी समजत असतो.... खरं तर सृष्टीने माणसाला खूप काही दिलेले असते;पण अनेकांना त्याची जाणीवच नसते. पायी चालणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडे सायकल नाही म्हणून दुःख वाटते तर ज्याच्याकडे सायकल आहे तो बाईक नाही म्हणून चिडचिड करत जगत असतो. बाईक असणारा कार नाही म्हणून रडत असतो.प्रत्येकाला आपल्याकडे जे आहे याबद्दल काहीच वाटत नाही परंतु जे नाही त्याचे मात्र दुःख असते!अशी छोट्या छोट्या दुःखांची गाठोडी बाळगत माणूस जगत असतो. तशा अर्थाने माणूस कधीच जीवनाच्या कोणत्याच आघाडीवर समाधानी नसतो.त्याची हाव कधीच संपत नाही आणि मग तो स्वतःचा द्वेष करायला लागतो... माझं नशीबच फुटकं, मी असा असतो तर यंव केलं असतं आणि तसा असतो तर त्यांव केलं असतं असा बडबडत रहातो.स्वतःला,ज्या कुटुंबात जन्म घेतला त्या कुटुंबाला,समाजाला, देशाला दोष देत रहातो. याचे कारण माणसाला त्याच्यातल्या सामर्थ्याची जाणीव नसणे हे आहे.स्वतःवर, स्वतःच्या आयुष्यावर प्रेम नसणारी अशी अनेक माणसे आपण आजूबाजूला वावरत असलेली पाहतो. खरं तर प्रत्येक व्यक्ती जन्मत: खूप गुणांनी परिपूर्ण असते, प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठली ना कुठली उपजत कला असते, कुणी गाण्याचा गळा घेऊन आलेला असतो,कुणी चित्रकलेत पारंगत असतो... आपल्याला आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टींचे वरदान मिळालेले असते.आपल्याकडे खूप अंगचे गुण असतात,आजूबाजूला अनेक गुणवान माणसे असतात पण आपल्याला याची जाणीवच नसते आपल्याला असलेल्या अनुकूल परिस्थितीचे भान नसते आणि आपण या गोष्टींबाबत कधी गंभीरही नसतो.आपले सगळे लक्ष आसपासच्या सकारात्मक बाबींपेक्षा नकारात्मक गोष्टींकडे एकवटलेले असते.अशा नकारात्मक मनस्थितीचा एकूण जगण्यावरच वाईट परिणाम होत रहातो कलागुणांची,सृष्टीने भरभरून दिलेल्या वरदानांची त्या त्या व्यक्तीला जाणीव नसते त्यामुळे प्रथम प्रत्येकाने स्वतःला ओळखायला हवे.यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा वास्तव स्वीकार! यासाठी प्रत्येकाने आपले सामर्थ्य ओळखायला हवे.. "मी जसा आहे, जेथे आहे तसा स्वतःचा स्वीकार करतो.मी सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करतो, माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे" अशी भावना जोपासली तरच प्रत्येकजण स्वतःला ओळखू शकेल... 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...' मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले हे गीत मला त्यामुळेच खूप म्हणजे खूप आवडते. माणूस संवेदनशील कधी असतो? माणसाच्या हृदयात करुणा दयाभावना कधी जिवंत असते? माणूस स्वतःवर प्रेम करत असेल तरच तो इत्तरांप्रती प्रेमळ वागू बोलू शकतो. संवेदनशीलता हा प्रेमळ, दयाळू व्यक्तीचा स्थायीभाव असतो,असायला हवा... एकदा का स्वतःवर प्रेम करता आले की माणूस आयुष्यातले छोटे छोटे क्षण साजरे करायला लागतो.त्याच्या मनात सतत असेच विचार येतात.... असे मिळाले आनंदी मानव जीवन कोमल हृदय संवेदनशील सुमन! ब्रम्हांडाने दिले मनोभावे जे मागिले सुबुद्धी समृद्धी अन नियमित धन! गर्द ही हिरवाई पाणी हवा मोकळी आरोग्यसंपदा अशी मिळाली कायम! माणुसकीचा अती सुंदर हा वारसा जाणू शकतो परपीडा दु:खी मन! माया ममता साथ ही जिवलगांची कोण पेरते जीवनी प्रसन्न हे क्षण! भल्याबुऱ्या प्रसंगी अचानक त्या शक्ती मिळते मम मनास कोठून? सृष्टीचक्र नियतीचे अविरत फिरते कधी इंद्रधनुचा देखावा विलक्षण! अबोध अशा त्या शक्तीला त्या सृष्टीला सांज सकाळी कृतज्ञतापूर्वक वंदन! तेव्हा प्रेम करायला हवे स्वतःवर आणि इत्तरांवरही! .....© प्रल्हाद दुधाळ.पुणे 9423012020

No comments:

Post a Comment