Thursday, October 17, 2019

माझी व्यसन मुक्ती

संतोषजींच्या गुटकामुक्तीच्या पोस्टनंतर अनेकजण आपल्या व्यसनांवर लिहिण्यासाठी प्रेरित  झालेले दिसताहेत.
    माझ्या लहानपणी गावात हातभट्टी होती तसेच देशीचेही एक दुकान होते. गावात बोटावर मोजण्याएवढ्या व्यक्ती सोडल्या तर अख्ख्या गावात दारू आणि गांजाने धुमाकूळ घातलेला होता! शाळेचे काही  मास्तरच माझ्या वर्गातल्या  थोराड विद्यार्थ्याना हाताशी धरून भर शाळेत नशापाणी करत असायचे! त्या वातावरणात दारू चाखून बघावी किंवा चिलमीचा एक झुरका मारून बघावा असे कधीच वाटले नाही,  याचे कारण अगदी लहान वयात झालेली पुस्तकांशी गट्टी हे तर  असावेच, पण याबरोबरच माझ्या आजूबाजूला दारूच्या व्यसनामुळे अनेक संसारांची चाललेली ससेहोलपट मी  अगदी जवळून पहात असल्यामुळे संवेदनशील मनावर झालेला परिणाम हे कारण सुद्धा असावे!
    पुढे पुण्यात आल्यावर झोपडपट्टीत रहात होतो.अमली पदार्थ ते वेश्यागमनापर्यंतची सगळ्या प्रकारची व्यसने मुक्तपणे करणारे अनेक मित्र दररोज  संपर्कात होते, मनात आलं असतं तर एका क्षणात त्यांच्याप्रमाणे वागू शकलो असतो,पण ईश्वराने तशी कधी बुद्धी दिली नाही! माझ्या जीवनातला हा एक मोठा चमत्कार म्हणावा लागेल!
    नोकरीत अधिकारी झाल्यावर खूप आग्रह करूनही हा बाबा बधत नाही हे बघून एका पार्टित माझ्या साहेबाने लिम्कामध्ये जीन  मिसळून पाजली होती.हा प्रकार थोड्या वेळातच माझ्या लक्षात आला आणि मी पार्टि सोडून निघून आलो!त्यानंतर एकाही ओल्या पार्टीला मी कधी गेलो नाही.
   आता कुणी म्हणेल "आयुष्यभर  एकही व्यसन  केले नाही?"  "ही कसली  जिनगागी?"  कुणाला काहीही म्हणूदे,मी आहे तो असाच आहे.
   व्यसन करणे म्हणजे आयुष्यातली मजा असेल तर जीवनभर असली मजा मी केली नाही याचा मला सार्थ अभिमान आहे!
    "पान बिडी सिगरेट तमाकू ना शराब, हमको तो नशा है मोहब्बत का जनाब!"
   हो , स्नेहाची माणसं जोडायचं व्यसन मात्र लागलंय आणि मनापासून जपतो आहे!
   ..... प्रल्हाद दुधाळ. (17/10/2019)

लकडी पुल... एक आठवण

लकडी  पुलावरून आता दुचाकीला परवानगी  दिल्याचे वाचले आणि माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा आठवला. ते 1992-93 साल असावं. मी माझ्या आयुष्यातली पहिली स्कुटर-बजाज कब खरेदी केली. मी तोपर्यंत स्कुटर चालवायला शिकलो नव्हतो. तर झाले काय की  पहिल्याच दिवशी थोडी प्रॅक्टीस केली आणि सौ.ला मागे बसवून कार्पोरेशन मार्गे जंगली महाराज रोडने पुन्हा स्वारगेटकडे निघालो. डेक्कनवरून दुचाकीला बंदी असलेल्या लकडी पुलावरून स्कुटर चालवत अलका चौकाकडे निघालो आणि नेमकं व्हायचं तेच झालं....
   पूल  ओलांडल्याबरोबर  डाव्या बाजूला चौकीच्या समोरच सहा ट्रॅफिक पोलीस उभे! एकाने अडवलं आणि माझ्या स्कुटरची चावी ताब्यात घेतली. गाडी बाजूला घेऊन, सौ.ला तिथंच उभं  करुन    मी प्रश्नार्थक चेहरा घेऊन त्या पोलिसांकडे गेलो....
" साहेब काय झालं?"
त्या पोलिसाने मला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं...
"स्कुटर नवीन का? "
 " हो साहेब..."
 " लायसन  बघू... "
 मी माझं लायसन्स त्याच्या हातात दिलं  त्यानं  ते शांतपणे त्याच्या वरच्या खिशात टाकलं ! आता बाकीचे पाचही जण माझ्याजवळ  आले.
"पुण्यात कधीपासून राहाता? " एकाने मला तिरकस  प्रश्न विचारला....
" पंधरा वर्षें... "
मी खरं  ते सांगितलं..
" या पुलावर स्कुटरला बंदी आहे माहीत  नाही का?"
आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला! खरं तर माझं शिक्षण आबासाहेब गरवारे कॉलेजात झालेलं आणि लकडी पुलावर दुचाकीला बंदी आहे हेही मला माहीत होतं, पण नवीन स्कुटरवर फेरफटका मारायच्या नादात मी  ते साफ विसरून गेलो होतो!
"नाही हो, मला माहीत नव्हतं!आज तर स्कुटर घेतलीय मला कसं  काय माहीत असणार? "
मी माझ्या चुकीचं  समर्थन करू  पहात होतो....
"चला,  दोनशेची पावती फाडा...."
"जाऊ द्या ना माहीत नव्हतं  म्हणून चूक झाली..."
मी विनवणीचा सूर आळवला...
"ते काही नाही पावती फाडावी लागेल...."
दुसऱ्या  पोलिसाने आता घटनेचा ताबा घेतला होता....
काही तरी तोडगा निघून चहापाण्याची तरी सोय करायचा इरादा सहाही  चेहऱ्यावर मी वाचला....
मी पवित्रा  बदलायचं  ठरवलं...
" एक काम करा, माझ्यावर रीतसर  खटला दाखल करा,मला ही केस लढवायची आहे! तुम्ही सहाजण इथे आडबाजूला उभे राहून सावज पकडताय काय? मी वकील देऊन केस लढवणार! तुम्हाला खरंच सेवा करायची असती तर एकजण  पुलाच्या त्या  टोकाला  उभा राहिला असता,  मला तिथेच सांगितल असतं  की हा पूल दुचाकीला बंद आहे  तर मी पुलावर  आलोच नसतो, पण तुम्ही सहा सहा जण बकरे पकडायला दबा धरून  बसलात! तुम्हाला कुठे सही पाहिजे असेल ती घ्या...
 आता तुम्ही खटला भरा माझ्यावर!
तसें माझे पन्नास हजार गेले तरी चालतील,पण मी आता दोनशे भरणार नाही!"
माझा तो पवित्रा त्यांना बहुतेक अनपेक्षित होता!
" अरे काय लावलाय खटला भरा, खटला भरा म्हणून..."
मी पुन्हा पुन्हा त्यांना खटला भरण्याबद्दल सांगत राहिलो...
शेवटी पहिला पोलीस  माझ्याकडे आला....
" फार शहाणे आहात!पक्के पुणेकर दिसताय! पुन्हा चूक करू नका,  हे घ्या.... "
वैतागून  त्याने माझे लायसन्स  आणि स्कुटरची चावी माझ्या हातात कोंबली....
मी स्कुटरला किक मारली,  सौ.मागे बसली, कुत्सितपणे मी एकदा सहाही जणांकडे पाहिले आणि गियर टाकून स्पीड घेतला....
  ..... प्रल्हाद दुधाळ.(17/10/2019

Wednesday, October 16, 2019

निवडणूका आणि मी ...

निवडणूका आणि मी ...
लहानपणी कळायला लागलं तेव्हाची पहिली निवडणूक आठवते. ती बहुतेक जिल्हा परिषदेची निवडणूक असावी. ट्रकमागे ट्रक भरून माणसं यायची,  प्रत्येकाच्या खिशाला एक रंगीत चित्र लावलेलं असायचं,  हातात पक्षाचे झेंडे असायचे.कुणीतरी  एकजण घोषणेचा अर्धा भाग म्हणायचा आणि ती घोषणा पूर्ण करण्यासाठी ट्रकमधली बाकी माणसं  अगदी बेंबीच्या देठापासून ओरडायची! पंधरावीस मिनिटात अख्या गावात घोषणांचा धुराळा उडवून या गाड्या पुढच्या गावाला जायच्या! दुसऱ्या दिवशी दुसरे लोक यायचे आणि घोषणा देत रान उठवायचे! त्या वयात हे नक्की  काय चाललंय हे मुळीच समजत नव्हतं.शाळेत नागरिकशास्र शिकायला लागल्यावर या  लोकशाहीच्या उत्सवाची थोडीफार ओळख झाली.मला जी पहिली निवडणूक आठवते त्यातल्या एका उमेदवाराचे नाव बहुतेक ज्ञानेश्वर खैरे होते, ते  पुढे आमदार होते... त्यांचं चिन्ह होतं बहुतेक बैलजोडी! पुढे थोडी प्रगल्भता आल्यावर त्या  घोषणा देण्याऱ्या गर्दीत मीही मित्रांबरोबर सामील झालो.आमचा तालुका त्यावेळी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला होता. "चिमासाहेब बाळासाहेब मुळीक" यांच्यासाठी दिलेल्या घोषणा  चांगल्याच आठवतात.अनेक वर्षें  समाजवादी पक्ष या एकाच पक्षाचे आस्तित्व आमच्या भागात जाणवायचं!दादा जाधवराव हे  एकच आमदार कित्येक  निवडणूका जिंकत होते! काँग्रेसच्या चरखा वा बैलजोडी यापेक्षा झाड आणि पुढे नांगरधारी शेतकरी ही चिन्हेच आमच्या भागात जास्त प्रसिद्ध होती असे आठवते.अर्थात विद्यार्थी दशेत असल्याने राजकारणातलं काही कळायचं ते वय आणि तेव्हढी   समजही नव्हती. ग्रामपंचायतीच्या रेडिओवरून ज्या बातम्या ऐकायला मिळायच्या तेवढंच अख्ख्या गावाचं ज्ञान असायचं!  आणीबाणी नंतरची निवडणूक आणि जनता दलातल्या नेत्यांची भाषणे मात्र खूप मन लावून ऐकली होती शिवाय ते वयही संस्कारक्षम होते त्यामुळे असेन, पण स्वतःची अशी काही राजकीय मते बनायला लागली होती.वृत्तपत्रे वाचून व बातम्यांचे विश्लेषण करून एव्हाना  कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे समजायला लागलं होतं.कॉलेज जीवनात असताना काही मित्रांच्या संगतीने थोडे दिवस राष्ट्र सेवा दलात काम करत होतो.काँग्रेस हॉलवर संत्र्यामंत्र्याच्या पुढे पुढे करुन  काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी  लोक कोणत्या थरापर्यंत जातात हे त्या काळात अगदी जवळून बघायला मिळालं.नंतर  समाजवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून एक विधानसभा आणि एक मनपा निवडणुकीत कामही केलं!एक मात्र खरं आहे मी मनापासुन  तिथे रमत नव्हतो!
     दरम्यानच्या काळात मला  सरकारी नोकरी लागली आणि सीसीएस कंडक्ट रूल वाचला. नियमाप्रमाणे सरकारी नोकर म्हणून आता आपण राजकीय पक्ष सोडा आपलं साधं  राजकीय मतही व्यक्त करू शकत नाही याची जाणीव झाली! आपसूक त्या गोष्टींपासून  दूर झालो...
       नंतर  मात्र इमानेइतबारे मी एक सुजाण नागरिक म्हणून माझा गुप्त मतदानाचा अधिकार बजावत असतो!
नो पॉलिटिक्स, काय!   
 .... प्रल्हाद  दुधाळ.

Sunday, August 4, 2019

आठवणींच्या पोतडीतून ....

आठवणींच्या पोतडीतून ....
 १९७६ चा तो असाच जुलै महिना होता . मी नुकताच लोणंद येथील मालोजीराजे विद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता.मला खरं तर अजूनही पॉलिटेक्निकला प्रवेश मिळेल याची आशा होती त्यामुळे अकरावी सायन्स वर्गात अजून लक्ष लागत नव्हतं .जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात डिप्लोमाकरीता चांस कॉल येतात असे ऐकले होते;पण मला मात्र अजून त्याबद्दल काहीच समजले नव्हते.पावसाने संततधार धरली होती आणि नीरा नदीला महापूर आला होता. पुणे आणि सातारा जिल्ह्याला जोडणारे सगळे पूल पाण्याखाली गेले होते त्यामुळे माझं गाव आणि लोणंद यांचा संपर्क तुटला होता.एस टी वाहतुकीची सेवा संपूर्णपणे  बंद झाली होती .पूर्ण आठवडा हेच चित्र होते. पाऊस कमी झाला आणि नदीचे पाणी जवळ जवळ दहा दिवसांनी ओसरले.त्यानंतर एक दिवस माझा भाऊ एक पत्र घेवून धावतपळत माझ्याकडे आला .पत्र वाचले आणि मला रडूच फुटले.....
 तो माझ्या डिप्लोमा प्रवेशाचा चांस कॉल होता आणि त्या पत्रातील मजकूर असा होता की "मी चार तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करावा अन्यथा पुढच्या उमेदवाराला ती जागा बहाल करण्यात येईल!" आज दहा तारीख उलटून गेली होती; हातातोंडाशी आलेला घास जाणे म्हणजे काय असते याचा हा आयुष्यातला मोठा धडा होता. माझा डिप्लोमा प्रवेश निरेच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला होता!
त्यातूनही काही चमत्कार होईल अशी आशा होती म्हणून कराड पॉलिटेक्निक गाठले;पण वेळ गेलेली होती....
....प्रल्हाद दुधाळ.

हरवलेल्या मित्रांसाठी....

हरवलेल्या मित्रांसाठी....
   आज वैश्विक मैत्रीदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या घेतल्या जात आहेत. पाश्चात्य संस्कृतीला कितीही नावे ठेवली जात असली तरी त्यांची वेगवेगळ्या नात्यांचा सन्मान करणारे  हे वेगवेगळे "डे" ज साजरे करायची पध्दत नक्कीच स्तुती योग्य आहे! आजच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात असे डेज आता खूप महत्त्वाचे वाटतात!
    वेगवेगळी समाज माध्यमे आज मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत आणि या माध्यमामुळे एक छान सोय झाली आहे ,प्रत्यक्ष न पाहता, न भेटतासुध्दा अनेक लोकांचा एकमेकाप्रती स्नेहभाव व्यक्त करण्याची, मैत्री जोपासण्याची एक उत्तम सोय या माध्यमातून हाताशी आली आहे! त्यातूनच अनेक अनोळखी व ओळखीच्या मनामनात एक स्नेहसेतू उभारला जातो आहे ही नक्कीच आजच्या समाजासाठी चांगली गोष्ट आहे.
  आज वयाच्या पन्नाशीच्या पुढे असणाऱ्या पिढीसाठी हे एक उत्तम वरदान आहे.शाळा कॉलेजमधल्या अनेक घट्ट मित्रमैत्रीणी फेसबुक, ट्विटर, व्हाटस्आप अशा माध्यमातून एकत्र येत आहेत. त्या निमित्ताने त्या मोरपंखी दिवसांच्या आठवणीना उजाळा मिळतो आहे.
   खरं तर आज  एका घरात, शेजारी असलेल्या लोकांचा एकमेकांशी संवाद हरवलेला असताना असे चार क्षण ऑनलाईन का होईना; पण आपल्या त्या त्या काळातल्या मित्र मैत्रीणीसोबत गुजगोष्टी करायला मिळणे ही या लोकांसाठी सुवर्णसंधीच आहे असे मला वाटते. भौतिक सुखांच्या गर्दीत आज नाती हरवली आहेत.कुणालाही कुणासाठी वेळ देता येत नाही.पिढ्यापिढ्यातले वैचारिक अंतर वाढले आहे.अनेकांची संवादाची भूक आतल्या आत दाबली जात असताना या आभासी का होईना माध्यमामुळे हरवलेले मैत्र जपले जाते आहे ही गोष्ट मला वाटते खूप महत्त्वाची आहे .या माध्यमातून पुन्हा जोडलेली मैत्री ही केवळ आभासी पातळीवर न ठेवता प्रत्यक्षात भेटून या स्नेहसेतूचे रूपांतर एखाद्या सामाजिक चळवळीत व्हायला हवे .आज सामाजिक व आर्थिक सुस्थितीत असलेल्या समाजातील घटकांनी आपल्या त्या त्या काळातल्या घट्ट मैत्रीच्या धाग्याला अजून घट्ट करून यथाशक्ती मानसिक आधार व मार्गदर्शन व गरज असेल तेथे शक्य तेवढी आर्थिक स्वरूपाची मदतही करायला हवी.श्रीकृष्ण-सुदामा मैत्रीची कथा आपण अगदी भक्तीभावाने वाचतो व ऐकतो आणि मैत्रीचे गोडवे गातो .
 बघा, तुम्ही जर थोडेफार तशा कृष्णपदापर्यंत पोहोचले असाल तर तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या हरवलेल्या सुदामास नक्की शोधा... कदाचित त्याला तुमच्या मदतीची गरज नसेलही;पण आपली आठवण ठेवून हा मित्र पुन्हा एकदा समोर आलाय आणि तोही केवळ बालपणीची मैत्री जोपासण्यासाठी! त्या मित्राचे सोडा;पण यातून तुम्हाला किती आनंद मिळेल याचा विचार करा....
     जगण्याच्या बेफाम लढाईत आज  अशा कुठे कुठे हरवलेल्या मित्र मैत्रीणीनाही ...
मैत्री दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
.... प्रल्हाद दुधाळ.(४/८/२०१९)

Thursday, August 1, 2019

प्रेमळ

" ए मूर्खा तुला काय कळतं की नाही, ठेव ते बाजूला!"
" जरा म्हणून अक्कल नाही..."
" ये म्हाताऱ्या जरा ऐक की ..."
" चल हो बाहेर सगळी वाट लावली .."
" अरे नीट खा की सगळं कपड्यावर सांडवल की. .."
"चल उरक की लवकर..."
 दररोज सकाळी ऑफिसला जायची गडबड एका बाजूला चालू असताना खालच्या मजल्यावरच्या फ्लॅट मधून तावा तावात चालू असलेली जुगलबंदी अगदी नको नको म्हणत असताना कानावर आदळत असते, आता या गोष्टीची इतकी सवय झालीय की एखाद्या दिवशी आवाज आले नाही तर चुकल्या चुकल्या सारखं वाटतं...
या जुगलबंदीत फक्त काकूंचा आवाजच टिपेला गेलेला असतो.काका मात्र अगदी हळू आवाजात वाद घालत असतात;पण ते जे काही बोलत असावेत ते असे असावे की त्याने काकूंचा पारा अजूनच वाढलेला असतो, निदान आवाजाच्या टीपे वरून तरी तस वाटत रहातं!
   या दरम्यान माझी सौ.नेमकी किचन मध्ये असते आणि खालच्या किचनमध्ये चालू असलेली ही जुगलबंदी माझ्यापेक्षा तिला जास्त स्पष्टपणे ऐकू येते.
सुरूवात झाली की सौ.मला हमखास हाक मारुन सांगते...
" झाली बघा सुरू जुगलबंदी!"
मग मीही तिला चिडवत ऐकवतो...
" बघ ऐकून ऐकून तू ही माझ्याशी म्हातारपणी असं वागू नको म्हणजे झालं!"
  ऑफिसला जायची  गडबड असते त्यामुळे तपशिलात कधी गेलो नाही; पण हेच काका काकू मला सोसायटीत फिरताना दिसले की ते भांडणारे दोघे हेच का असा प्रश्न पडावा! कारण काकू हाताने काठी टेकवत टेकवत पुढे चाललेल्या असतात आणि काका अगदी हळू हळू त्यांच्या मागे मागे चालत चाललेले असतात....
  एक दिवस सुट्टी घेतली होती त्यामुळे निवांत बसलो होतो.आणि अचानक ती जुगलबंदी चालू झाली. माझं कुतूहल मला शांत बसून देत नव्हतं,त्यामुळे मी खालच्या फ्लॅट मध्ये डोकावल, आणि पहातच राहीलो...
   नुकतंच काका अंघोळ करून आलेले असावेत आणि काकू टॉवेलने त्यांचे डोके पुसून देत होत्या! एका बाजूला त्यांची तोडाची टकळी चालू होती. ...
   " अरे बहिर्या जरा डोकं खाली घे की, आणि लगेच तो पोहे खाऊन घे मग फिरायला जाऊ! ये येड्या ऐकतोय ना?"
तो त्यांचा "सुसंवाद" ऐकून मला खूप  हसू आलं!मी तेथून काढता पाय घेतला..
   या जोडप्याबद्दल कुतूहल होत त्यामुळे शेजाऱ्या बरोबर थोडी चर्चा केली...
  या दोघांचे एके काळी जवळच्या तालुक्यात प्रचंड कमाई असलेले दुकान होते.वय झाल्यावर ते दुकान विकून आपल्या एकुलत्या एक मुलाबरोबर ते कोथरुड येथे मोठा बंगला घेवून राहायला आले .मुलाचे लग्न थाटात झाले .मोठ्या घरातुन आलेल्या सुनेने सासूच्या फटकळ बोलण्यावरून भांडण सुरू केले आणि दररोज कटकट नको म्हणून मुलाने आपल्या आई बापाला या फ्लॅट मध्ये आणून ठेवले आहे .काकूंचे गुढगे गेलेत तर काकांना दिसण्याचा आणि ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे.आपल्या तरुणपणी प्रेमविवाह करून शून्यातून आपलं विश्व साकारणारे हे दोघे आज एकमेकांना छान सांभाळून घेत आनंदाने जगताहेत.एकमेकांच दुखलं खुपल तर एकमेकांची काळजी घेतात . नियमित फिरणे आहार विहार या बाबतीत जागरूक असलेलं हे जोडपं आपली नवी इनिंग मस्त जगताहेत! 
  आणि हो... ती सकाळी सकाळी चालू असलेली जुगलबंदी म्हणजे त्या दोघांचा अगदी नेहमीचा "प्रेमळ" संवाद असतो ...!
..... @प्रल्हाद दुधाळ.

Monday, May 6, 2019

उपवास आणि चिडचिड...

उपवास आणि चिडचिड ....
काल उपवास आणि चिडचिडचि यासंबंधी  पोस्ट वाचली आणि माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा आठवला....
    त्यावेळी(१९९३) मी फोन इन्स्पेक्टर म्हणून पुण्याच्या कैंप भागातल्या एका विभागाचा इंचार्ज होतो.त्या काळी टेलिफोन म्हणजे सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेली गोष्ट होती .मोबाईल सेवा भारतात आस्तित्वातच नव्हती....
  तर, माझ्या विभागातल्या टेलिफोन कनेक्शनबद्दलच्या तक्रारी, नवीन कनेक्शन देणे याची जबाबदारी माझ्यावर होती.माझ्या परीने ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा माझा प्रयत्न असायचा.येणाऱ्या ग्राहकांशी माझे वागणे, बोलणे तसेच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करायचो.त्यामुळे ग्राहक  तसेच माझ्या हाताखाली काम करणारे कर्मचारी यांच्यात मी खूप पॉप्युलर होतो. कर्तव्यपूर्तीमधले एक वेगळेच समाधान मला त्या काळात मिळत होते....
     अचानक काय झाले माहीत नाही; पण एका गुरूवारी सकाळी सकाळी एक ग्राहक माझ्याकडे आला . रागाने माझ्याशी त्याच्या टेलिफोन बाबत तो तक्रार करत भांडायला लागला आणि मी प्रथमच माझा एरवीचा शांत अवतार सोडून त्याच्या पेक्षा दुप्पट आवाज वाढवून त्याच्याशी वाद घालायला लागलो!
  त्या दिवशी माझ्या स्टाफ बरोबरही मी चिडून बोलत होतो!
दुसऱ्या दिवशी मात्र मी नेहमी सारखा वागत बोलत होतो.
पुन्हा पुढच्या गुरुवारी अगदी तसेच घडले! त्या दिवशीही मी सगळ्यांवर चिडचिड करत होतो. संध्याकाळी माझे कधी नव्हे ते डोके दुखत होते.
नंतरचे सहा दिवस मात्र मी नॉर्मल होतो.असे काय होतेय ते माझे मलाच कळेना. मग दर आठवड्याला असेच घडत राहिले...
   एक दिवस मी गंभीरपणे माझ्या स्वभावात होत असलेल्या त्या एका दिवसाच्या बदलाबद्दल विचार करत बसलो होतो, कारण माझ्या तशा वागण्याचा फटका काही ग्राहक व स्टाफला बसला होता.त्यांची नाराजी मला नंतर चांगलीच जाणवायला लागली होती. विचार करता करता अचानक माझी ट्यूब पेटली ....
   दर गुरूवारी मी कुणीतरी सांगितले म्हणून उपवास धरायला लागलो होतो आणि नेमक्या त्या गुरूवारी माझी पहिल्यांदा चिडचिड झाली होती!!!
   आपली चिडचिड पोटात काही नसल्याने होते आहे आणि दर गुरूवारी वादविवाद व भांडणे सुरु झाली हे लक्षात आल्यावर मात्र मी उपवासाच्या बाबतीत कानाला खडा लावला ते आजपर्यंत!
   आता चिडचिड व्हायला लागली की मी मला भूक तर लागली नाही ना? हे तपासून पोटपूजा करून घेतो....
     ..... प्रल्हाद दुधाळ.