Sunday, December 11, 2016

एका जिध्दीची कहाणी

  एका जिद्धीची गोष्ट...
       ही गोष्ट एकोणिसशे एकोण्णवदची आहे.माझ्या टेलिफोन इन्स्पेक्टर या पदावर झालेल्या  प्रमोशननंतर  मला मुंबईत बांद्रा येथे सहा महिन्याचे एक ट्रेनिंग पुर्ण करावे लागणार होते. खात्यातर्फे आमची  या ट्रेनिंगच्या काळात रहाण्याची सोय सहारा येथील खात्याच्या क्वार्टर्समधे केलेली होती.
  चार जणात आम्हाला दोन बेडरूमची एक क्वार्टर रहायला  दिलेली होती. मला ज्या क्वार्टरमधे जागा मिळाली होती  तेथे माझ्याबरोबर एक सिल्वराज नावाचा तामीळभाषीक व्यक्ती रहाणार होता. टिपिकल मद्रासी असलेल्या या सिल्वराजला फक्त  तामीळ भाषा  व काही प्रमाणात इंग्रजीशिवाय  कोणतीच भाषा येत नव्हती.
     सिल्वराजला हिंदी भाषेचा किंचितही गंध नव्हता त्यामुळे त्याच्याशी संवाद साधणे आम्हालाच काय; पण बांद्रा ट्रेनिंग सेंटरच्या इन्स्ट्रक्टर लोकांनाही अवघड जात होते.त्यात तो नेमका माझा रूममेट होता, त्यामुळे त्याला माझ्याशी आणि मला त्याच्याशी बोलणे अगदी  आवश्यकच  झाले होते!.
    तो त्याच्या त्या तामीळी हेलात व मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत मला सतत काहीतरी विचारत राहायचा आणि मी माझ्या मराठी स्टाईल इंग्रजीत त्याची उत्तरे द्यायचा प्रयत्न करायचो!
    लवकरच अशा तोडक्या मोडक्या का होईना होणाऱ्या संवादामुळे आम्ही दोघे चांगले मित्र झालो.त्याला उत्तम तांत्रिक ज्ञान होते;पण भाषेची समस्या त्याला चांगलीच सतावत होती.त्याचे प्रमोशन हे महाराष्ट्र सर्कलच्या वेकन्सी साठी होते त्यामुळे ट्रेनिंग नंतर त्याला  महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यात राहून काम करावे लागणार होते!
     याला मराठी वा हिंदी शिकल्याशिवाय महाराष्ट्रात कसे काय काम करता येणार? तो पब्लिकशी कसा बोलेल? बोलताना काय काय मजेशीर प्रसंग घडतील? यावरून सगळे ट्रेनीज त्याची चेष्टा करायचे आणि खो खो हसायचे. त्याला आमची भाषाच समजत नसल्याने   केलेली मस्करीही त्याला समजायची नाही, आणि तोही आम्ही हसतोय ते पाहून काहीतरी जोक झाला असेल असं समजून हसायचा!
     एकदा ट्रेनिंग सेंटरच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्याला भर क्लासमधे येवून हिंदी येत नाही यावरून  भरपूर फायरिंग केले.ते त्याला चांगलेच फटकारत होते...
" इफ यू आर नॉट एबल टू  अंडरस्टॅन्ड लोकल लॅंग्वेज; देन हाऊ यू कॅन वर्क इन व्हिलेज? यू मस्ट लर्न हिंदी, ऑदरवाईज यू विल बी सेंट बॅक टू चेन्नई ऑन युवर ओरिजनल पोस्ट, यू विल नॉट गेट प्रमोशन!"
   हे फायरिंग सिल्वराजच्या चांगलेच जिव्हारी लागले होते.त्या दिवशी  तो रात्रभर खूपच अस्वस्थ होता. सकाळी मी त्याला समजावले ..
" यू कॅन लर्न हिंदी इजिली, डोंट टेक टेंशन,व्हाटएव्हर आय कॅन डू फॉर यू,आय विल हेल्प यू फॉर द सेम !"
  मी दिलेल्या मानसिक आधाराने तो थोडा शांत झाला.
       दुसऱ्या दिवशी तो मला घेवून मुंबईच्या फोर्ट एरियात गेला.त्याने पुस्तकांच्या दुकानातून व फुटपाथवरून माझ्याशी सल्लामसलत करून हिंदीची अगदी प्रायमरी लेवलची व  देवनागरी लिपीच्या अक्षरओळखीपासूनची पुस्तके खरेदी केली.हिंदी अंकलिपी,इंग्रजी ते हिंदी दररोजच्या वापरातला शब्दकोश तसेच सोप्या सोप्या भाषांतराची तसेच चित्ररूप गोष्टींची अशा भरपूर पुस्तकाची खरेदी त्याने त्या दिवशी केली!
   दुसऱ्या दिवशी त्याने ट्रेनिंग क्लासमधे समोर जाऊन डिक्लेअर केले ...
" लिसन, आय टेल यू विथ चॅलेंज दॅट- आय विल स्पिक फ्ल्युएंट हिंदी विथिन ए मंथ!"
सगळा क्लास त्याच्या त्या चँलेंजने चिडीचूप झाला....
    आणि मग सिल्वराजने ट्रेनिंगचा अभ्यास सोडून रात्रंदिवस फक्त हिंदीच शिकायचा ध्यास घेतला. क्लासमधे भेटेल त्याला इंग्रजी शब्दांचे हिंदी प्रतिशब्द,त्या शब्दांचे वाक्यात उपयोग इत्यादी गोष्टी विचारत होता.जे काही समजेल ते आत्मसात करत होता.प्रश्न विचारून विचारून त्याने मला आणि बाकी रूम पार्टनर्सना अगदी भंडावून सोडले होते...
   खरं सांगतो ,त्याच्या त्या इंग्लिश टू हिंदी आणि हिंदी टू इंग्लिश कसरतीमुळे मलाही दोन्ही भाषांचा चांगलाच सराव झाला!
     पंधरावीस दिवसातच तो दिसेल त्याच्याशी मोडके तोडके हिंदी बोलू लागला.
     एकेकाळी हिंदीचा बिल्कूल गंध नसलेला सिल्वराज लवकरच चांगले हिंदी बोलू लागला, समजू लागला.त्याची ती जिध्द खरच वाखाणण्याजोगी होती!
    कमाल म्हणजे ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी  सिल्वराजने चक्क हिंदीतून आपले मनोगत व्यक्त केले!
   ट्रेनिंग सेंटरच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्याच्या या प्रगतीचे खास कौतुक केले!
         पुढे त्याचे पोस्टींग गोव्यात झाले.पाचेक वर्षे तो महाराष्ट्र सर्कलमध्ये राहीला आणि पुढच्या प्रमोशनच्या वेळी तामिळनाडूला बदली घेवून गेला....
    त्याच्याशी पुढे संपर्क राहिला नाही;पण जिद्ध असेल तर माणसाला अशक्य काहीच नाही याचं जितंजागतं उदाहरण म्हणून सिल्व्हराज कायमचा लक्षात राहिला...
    ©प्रल्हाद दुधाळ.

Thursday, December 8, 2016

एका फोटोचा किस्सा .

एका फोटोचा किस्सा ....
आज सकाळी सकाळी मोबाईलवर एक कॉल आला. अनोळखी नंबरवरून तो आला होता.
मी फोन घेतला " हॅलो"
" आपण प्रल्हाद दुधाळ बोलताय का?"
" हो आपण कोण?"
" मी xxx मासिकाचे जुने अंक चाळत होतो त्यात तुम्ही लिहिलेली " ठेविले अनंते" ही कथा वाचली. छान लिहिली आहे."
" धन्यवाद." मी आभार मानले.
" मला सांगा, ही काल्पनिक कथा आहे की खरचं घडलेली आहे?"
" मी शाळेत असताना अशी घटना घडली आहे त्यामुळे ती सत्यकथाच आहे पण थोडाफार मसाला लावून व स्थळ व नावे बदलून ती लिहिली आहे ." मी.
" खूप छान उत्कंठावर्धक कथा आहे तुमची! शेवट तर एकदम कलाटणी देणारा आहे. तो किर्तनकार दरोडेखोरांना सामील म्हणजे खरचं अध्यात्माला काळीमाच की!"
" धन्यवाद, आपण आवर्जून प्रतिक्रिया कळवलीत,खूप आनंद झाला, मी खूप आभारी आहे आपला."
" छानच आहे कथा,  बरं आता मला अजून एक सांगा, कथेच्या बाजूला तुम्ही फोटो छापला आहे तो तुम्ही कोठून घेतलाय?"
" कथेवर ना माझाच  फोटो आहे की ?"
" तो नाही हो, तो दुसरा फोटो म्हणतोय मी!"
" तो किर्तनकाराचा का? तो मी नाही दिलेला,कथेला साजेसा म्हणून संपादकानी निवडला असेल तो, किंवा  गूगलवरून घेतला असेल, का हो?"
" काही नाही, मी एक किर्तनकार आहे  आणि काही महिन्यांपुर्वी माझा बालगंधर्वमधे किर्तनाचा कार्यक्रम झाला होता , त्या वेळचा माझा फोटो आहे तो! थोडा अस्पष्ट करून तो घेतलाय त्यामुळे इत्तराना समजणार नाही पण माझा फोटो मी ओळखारच ना !"
एकंदरीत मोठाच  प्रॉब्लेम झाला होता.आता काहीतरी सारवासारव तर करायलाच हवी होती. मी थोडा दिलगिरीचा सुर लावला ...
" बाप रे, तो तुमचा फोटो आहे! तुम्ही हर्ट झाला असाल तर संपादकांच्या वतीने मी माफी मागतो, पण मला वाटते की त्यांचाही हेतू वाईट नसावा, कथेला पुरक म्हणून कीर्तनकाराचे  एक चित्र एवढाच त्या फोटोला अर्थ आहे शिवाय त्या फोटोतला चेहरा एकदम अस्पष्ट आहे ."
" नाही ते ठिक आहे. दिलगीरी नको , माझा फोटो कितीही अस्पष्ट असला तरी मला ओळखता येणारच ना ! फोटो  पाहून प्रथम मला वाटले की तुम्ही माझ्यावर लेख लिहिलाय,पण प्रत्यक्षात ही वेगळीच कथा निघाली! बाय द वे पुस्तक बिस्तक छापलय की नाही कथांच ?"
" दोन कविता संग्रह झालेत बघू भविष्यात कथासंग्रहही होईल!"
" तुम्हाला शुभेच्छा, बर झाल त्या निमित्ताने ओळख झाली, बाय द वे मी कीर्तनकार देव , सेव करून ठेवा नंबर"
" हो सर, धन्यवाद!"
यापुढे असा कुणाचा फोटो वापरायचा तर विचार करायला हवा !
 तो माणूस चांगला होता म्हणून ठिक,नाही तर ....

..... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, November 30, 2016

नोटबंदीचे टेंशन .

काल एका नातेवाईकाच्या घरी गेलो होतो. त्यांची इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेली मुलगी घरीच होती.तिच्याबरोबर एक मैत्रिणही होती.
" काय मग संपली का परिक्षा? कसे होते पेपर्स?"
मी चौकशी केली.
" हो काका आजच शेवटचा पेपर झाला. एकदम छान झाले पेपर!"
" छान, आणि ही मैत्रीण का?"मी तिच्या मैत्रिणीबद्द्ल विचारले.
" जी हा अंकल हम दोनो एक ही क्लास मे पढते है." ती उत्तर भारतीय मुलगी बोलली.
" आपकी कैसी रही परिक्षा?"
" क्या कहे अंकल पुरी परिक्षा अलग से टेंशन मे गयी!"
" क्यों, स्टडी नही किया था क्या?"
" वो बात नही अंकल, पेपर्स तो अच्छे लिखे है लेकीन इस दौरानही पाचसो हजारके नोट बंद हुये ना उसकी वजहसे स्टडी छोडके अलगही समस्या झेलनी पडी!"
" क्यों , क्या हो गया?"
" अंकल ऐसा हूआ की महीने के खर्चे के लिये पापाने पाच हजार बॅंक खाते मे भेज दिये थे. सात तारीख को मैने एटीएमसे पैसे निकाले सब पाचसो के नोट थेआठ तारीख को नोट बंद हो गये और चाय मिलना भी मुश्किल हो गया! पाचसो के  नोट पर्स मे थे लेकिन खर्चा कर नही कर पाये.चाय नही, खाना नही उपर से परिक्षा चालू थी, बॅंक मे भी जाये तो कैसे जाये,और खाली पेट स्टडी करना भी मुश्किल हो गया!" तिला रडू फुटले.
डोळे पुसतच ती पुढे सांगू लागली.
" श्वेता ने मेरी हालत देखी और तबसे वह मुझे अपने घर लेकर आयी, यह फ्रेंड नही रहती तो मेरा क्या होता भगवान ही जाने!"
तिच्या शब्दा शब्दात कृतज्ञता भरली होती.
नोटाबंदीच्या या परिणामाबद्द्ल कधी विचारच मनात आला नव्हता!
मी निशब्द झालो ...
...
... प्रल्हाद दुधाळ.

Friday, November 25, 2016

देश बदल रहा है.....

देश बदल रहा है.....
सकाळी सकाळी ऑफिसला जायची गडबड होती.घराबाहेर पडणार होतो तेव्हढ्यात दररोज गाडी पुसणारा अर्जुन दारात आला.दररोज पार्किंग मधील गाड्या पुसायचे काम तो करतो व महिन्याला ठरलेली रक्कम घेवून जातो.
" साहेब या महिन्याचे पैसे द्या ना."
नोटाबंदी झाल्यापासून अशी किरकोळ देणी देणे फारच अवघड झाले आहे.काटकसरीने दिवस काढणे चालू आहे त्यामुळे त्याला आता काय सांगायचे हा प्रश्नच पडला होता.
"अरे शंभर पन्नासच्या नोटा नाहीत,दोन हजाराचे सुट्टे आहेत का?"
"नाही हो साहेब."
"बर मग बँकेत अकाऊन्ट असेल ना, त्याचा नंबर दे,आजच तुझ्या खात्यावर साडेचारशे रुपये ट्रान्स्फर करून टाकतो ."
" साहेब सुट्टे नाहीत तर पेटीएम आहे का तुमचे?"
" तुझ्याकडे आहे का पेटीएम?" मी आश्चर्याने त्याला विचारले.
" हो साहेब आहे ना, करा पेटीएमने पेमेंट,चालेल मला."
" सांग तुझा मोबाईल नंबर."
त्याने मला त्याचा मोबाईल नंबर दिला मी माझ्या वालेट मधे त्याचा नंबर टाकला आणि दोन मिनिटाच्या आत त्याच्या वालेटमधे पैसे जमा झाले!
खरंच नोटाबंदी करायला हवी होती का नव्हती याच्यावर कितीही मतमतांतरे असोत,त्या वादात मला पडायचे नाही पण त्या निमित्ताने गाड्या धुणारा कष्टकरी अर्जुन पेटीएमने त्याची मजुरी स्वीकारू लागलाय!
हा बदल नक्कीच महत्वाचा आहे!
बदल नक्कीच होतो आहे!
काय वाटतंय तुम्हाला?
................ प्रल्हाद दुधाळ.

Monday, November 21, 2016

भुताटकी.

भुताटकी.

       ते १९८३ साल होते.टेलिफोन खात्यात त्या काळी टेलिफोन ऑपरेटर म्हणून मी नोकरी करत होतो.वेगवेगळ्या शिफ्टमधे ड्युटी करावी लागायची.मी नोकरी करून शिकतही होतो त्यामुळे जास्त करून दुपारची किंवा रात्रीची शिफ्ट करायचो.त्या काळी आजच्या सारखी एसटीडी वा मोबाईलची सोय नव्हती त्यामुळे ट्रंककॉलचे बुकिंग करूनच बाहेरगावी बोलायला लागायचे आणि हे ट्रंक टेलिफोन एक्स्चेंज मी जेथे काम करायचो त्याच बिल्डिंगमध्ये होते.विशेष म्हणजे या ट्रंकएक्स्चेंजमधे सगळ्या शिफ्टमध्ये फक्त लेडीज टेलिफोन ऑपरेटर्सच काम करायच्या.रात्रंदिवस तेथे ट्रंककॉल लावून द्यायचे काम चालू असायचे.रात्री बारा वाजता ड्युटी संपणाऱ्या लेडीजसाठी त्याच बिल्डींगमधे रात्री झोपण्याची सोय केलेली होती.रात्री बारानंतरसुध्दा सुमारे शंभरेक लेडीज तेथे काम करायच्या.

       एक दिवस आवई उठली की या ट्रंक एक्स्चेंजमधील मागच्या बाजूला रात्रीच्या वेळेस भूत दिसले!त्या रात्री ड्युटीवर असलेल्या दोनतीन लेडीजना ते भूत दिसले होते आणि भूत बघून त्या एवढ्या घाबरल्या की त्यातली एक तापाने आजारी पडली.बाकीच्या “आम्ही आता नाईट ड्युटी करणारच नाही” असे म्हणू लागल्या.दुसऱ्या दिवशीही भूत दिसल्याचे अजून काही लेडीज सांगायला लागल्या त्याही खूप घाबरलेल्या होत्या. आठवडाभरात या भूताच्या अफवेने स्टाफमधे घबराट पसरली.ज्यांना नाईट ड्युटी लागेल त्या लेडीज कामावर गैरहजर राहू लागल्या.रात्रीच्या ट्रंककॉल्सवर याचा परिणाम व्हायला लागला.”भूतबीत काही नसते!” असे एरवी छातीठोकपणे सांगणाऱ्या अनेक लेडीज घाबरून नाईट ड्युटीपासून लांब पळायला लागल्या.दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत राहिले. रात्रंदिवस तेथे कडक सिक्युरिटी व्यवस्था असूनही नाईट ड्युटी करायला कुणी तयार होत नव्हते.

“रात्री साडेबाराच्या सुमारास एक प्रचंड मोठी सावली मागच्या कायमच्या बंद असलेल्या खिडक्यांच्या दुधी काचांवरून पुढे पुढे सरकत जाते,ती सावली एवढी मोठी असते,की एक्स्चेंजमधे काम करणाऱ्या लेडीजची घाबरून घाबरगुंडी उडायची.आपले काम सोडून त्या दुसऱ्या खोलीत निघून जायच्या.रात्र रात्र थरथरत बसून राहायच्या.मागच्या बाजूला एक जुना पारशी माणसाचा बंगला होता.त्या बंगल्यात कित्येक वर्षापासून कुणी रहात नव्हते.त्या बंगल्यात भुताटकी आहे अशी चर्चा आधीपासून होत होतीच आणि सध्या रात्री दिसणाऱ्या या कथित भूतामुळे तर त्या भुताटकीच्या चर्चेला अजूनच घबराटीचे स्वरूप आले होते. एक्स्चेंजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्टाफला “असे काही नसते” हे समजावण्याचा प्रयत्न केला; पण स्टाफ ऐकायच्या मनस्थितीत नव्हता.

”ही भुताटकी बंद झाल्याशिवाय आम्ही कुणीही नाईट ड्युटी करणार नाही असे लेडीज म्हणू लागल्या.रात्रीच्या वेळचे अर्जंट व लायटनिंग ट्रंककॉलसुध्दा लागणे बंद झाले. या बद्दलच्या तक्रारी दिल्लीपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या.

शेवटी असे ठरले की रात्री चार पाच पुरूष कर्मचारी ट्रंकएक्स्चेंजमधे थांबून तथाकथीत भुताटकीची खातरजमा करतील व रिपोर्ट देतील.

दुसऱ्याच रात्री या भुताटकीची खातरजमा करायचे ठरले.मीसुध्दा त्या गृपमधे थांबलो.रात्री बारा वाजले आणि आम्ही त्या खिडक्यांकडे नजर लाऊन बसलो. तसे आम्हीही थोडे घाबरलेलो होतो; पण उसने अवसान आणून त्या भुताची वाट पहात होतो.रात्रीचे साडेबारा होवून गेले तरी भूत काही आले नाही.आता आम्ही त्या घाबरणाऱ्या बायकांची आपापसात चर्चा व टिंगलटवाळी करायला लागलो.

”भुताटकी वगैरे काही नसते.मनाचे खेळ असतात,त्या बायकाना नाईट ड्युटी नको म्हणून बहाणा करत असतील!” 
"नाटक करताहेत",अशी टवाळी करू लागलो.रात्रीचा एक वाजला आणि अचानक प्रचंड मोठी सावली एका खिडकीच्या काचेवर दिसली! या खिडक्या उघडणाऱ्या नव्हत्या त्यामुळे कसली सावली आहे ते बघणेही शक्य नव्हते.हळूहळू ती सावली पुढे पुढे सरकायला लागली,आता ती पुढच्या खिडकीवर दिसायला लागली.मोठ्ठे केस पिंजारलेले डोके त्या सावलीत दिसत होते! आता मात्र आमच्यातले एकदोघे घाबरले होते.मागच्या बाजूला जाणे लगेच शक्य नव्हते.पुढच्या रस्त्यावर जावून बिल्डिंगला वळसा घालायचे आम्ही ठरवले आणि अंधारात तसे गेलोही; पण त्या पडीक बंगल्याच्या आवारात प्रचंड गवत वाढलेले होते आणि माणसांचा वावर नसलेल्या त्या बंगल्यात जायचे आम्हाला डेअरिंगही झाले नाही त्यामुळे आम्ही परत आलो.आत असलेले आमचे साथीदार प्रचंड घाबरलेले होते. त्यांचे म्हणणे होते की ती प्रचंड सावली सगळ्या दाही खिडक्यांवर नंतर दिसून दिसेनाशी झाली.त्या दिवशीची मोहीम अर्धवट सोडून आम्ही निघून गेलो. दुसऱ्या दिवशीही खात्री करायची असे ठरवले गेले त्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीने एका खिडकीची काच थोडी फोडायचे ठरले.दुसऱ्या दिवशी जेथून नीट दिसेल अशा ठिकाणच्या खिडकीच्या काचेचा खालचा कोपरा आम्ही फोडला. दिवसा उजेडी मागच्या बंगल्याचे निरीक्षण केले व कुठल्या बाजूने बंगल्याच्या परिसरात शिरता येईल याचाही अंदाज घेतला.त्या रात्री अजून दोघेजण आमच्यात सामील झाले आज हे भूत बघायचेच असे आम्ही ठरवले होते! 

दुसऱ्या रात्री आम्ही रात्रभर त्या खिडक्यांकडे बघत बसलो; पण भूत आलेच नाही! काल जे पाहिले ते खरे की आज?, आम्ही सगळे चांगलेच बुचकळ्यात पडलो होतो.रात्रभर जागरण झाले होते.तिसऱ्या दिवशी परत प्रयत्न करू असे ठरवून आम्ही आपपल्या घरी गेलो.

तिसऱ्या रात्री पुन्हा आम्ही भूतासाठी सापळा लावला.रात्री एकच्या सुमाराला पहिल्या खिडकीवर ती अजस्र सावली पडली आणि आम्ही सावध झालो.एकजण फुटलेल्या काचेतून बाहेर बघत होता पण त्याला पहिल्या खिडकीच्या समोरचा भाग दिसत नव्हता.ती सावली हळूहळू पुढे सरकायला लागली साधारण चवथ्या खिडकीवर आल्यावर ती सावली आली आणि फुटलेल्या काचेसमोर असलेला आमचा सहकारी अचानक खो खो हसायला लागला.त्याने दुसऱ्या सहकाऱ्याला त्या अरुंद फटीतून पहायला सांगितले त्याने बाहेर बघितले आणि तोही हसायला लागला.एकेक करून आम्ही सर्वांनीच ते बाहेरचे दृश्य पाहिले आणि पोट धरधरून सगळेजण हसायला लागलो कारण भूत भूत म्हणून सगळे ज्या सावलीला घाबरत होते ती एका वेडसर दिसणाऱ्या बाईची सावली होती! एरवी ही बाई पुणे स्टेशनवर कायम फिरत असलेली प्रत्येकाने पाहिलेली होती! केस पिंजारलेली, अंगावरच्या कपड्याचे भान नसलेली व कायम काही ना काही बडबडत हातवारे करत ती तिथे फिरत असायची!

आम्ही लगेच त्या बंगल्याकडे गेलो.आम्ही बंगल्यात भूत येते असे समजत होतो मात्र सत्य वेगळेच होते.त्या पारश्याच्या बंगल्याच्या कंपाऊंडला लागून एक पायवाट होती त्या पायवाटेवर लोक कचरा टाकायचे तिथे कचऱ्यात टाकलेले अन्न खायला ही बिचारी वेडी बाई तिथे येत असावी,कारण आम्ही गेलो तर ती त्या कचऱ्यात पडलेले अन्न अधाशा सारखी वेचून खात होती! ती जेंव्हा कधी इकडे यायची तेंव्हा पलीकडे असलेल्या पुना क्लब ग्राउंडवर लावलेल्या प्रखर दिव्यांमुळे तिची सावली ट्रंक एक्स्चेंजच्या खिडकीवर पडायची ती जसजशी पुढे पुढे जायची तिची मोठी मोठी होत जाणारी सावली पुढच्या खिडक्यांवर पडायची आणि आतल्या काम करणाऱ्या बायकांसाठी ती भुताटकी ठरत होती!

सगळ्या गोष्टी समजल्यानंतर मात्र त्या गोष्टीवरून त्या घाबरणाऱ्या स्टाफची बरेच दिवस बाकीचा स्टाफ टिंगल करायचा! 
............... @.प्रल्हाद दुधाळ.

Monday, November 7, 2016

शिक्षा.

शिक्षा.
आज मला विजू जवळ जवळ पंधरा वर्षानंतर भेटला.

त्याला बघितले आणि मला तीस वर्षापूर्वी घडलेला एक किस्सा आठवला.

    त्याकाळी आमच्या ऑफिसात तो कॅज्युअल मजदूर म्हणून कामाला होता.तो जरी इथे मजूर म्हणून काम करत होता तरी त्याचे रहाणीमान एकदम टापटीप व व्यवस्थित असायचे! तो मुळातच दिसायला गोरागोमटा व देखणा होता शिवाय कायम कडक इस्त्रीचे कपडे तो घालायचा.बोलण्यात एकदम नम्र होता त्यामुळे त्याची कुणाशीही लगेच मैत्री व्हायची.
    तर आमच्या एका अधिकाऱ्यांकडे – नाडगौडा त्यांचे नाव,त्यांच्या ऑफिसात हरकाम्या म्हणून या विजूला ठेवण्यात आले होते.त्याच्या कामात व्यवस्थितपणा असायचा.पोस्टाची कामे,स्टाफला चहापाणी देणे तसेच साहेब सांगेल ती किरकोळ  कामे विजू अगदी प्रामाणिकपणे करायचा.या नाडगौडा यांचे रहाणीमान एकदम साधे होते.अंगावर कायम चुरगळलेले व मळके कपडे घातलेले असायचे.केस अस्ताव्यस्त असायचे. खर तर हे  सरकारी वर्ग दोनचे अधिकारी, पण नाडगौडा अगदीच  अजागळपणे रहात होते. त्यांच्याकडे पाहून त्यांनी कित्येक दिवसात आंघोळ तरी केली असेल का असा प्रश्न पडावा असे त्यांचे राहणीमान होते. सगळे कर्मचारी या गोष्टीवरून त्यांच्या मागे चेष्टेच्या सुरात बोलायचे!
   एकदा  काय झाले की, हेड ऑफिसातून निरोप आला त्या निरोपाप्रमाणे  दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आमच्या दिल्लीच्या ऑफिसातून इन्स्पेक्शनसाठी एक अतिवरिष्ठ अधिकारी रेल्वेस्टेशनवर उतरणार होते आणि त्यांना रिसीव्ह करण्यासाठी नाडगौडा यांनी जायचे होते.
    आपल्याबरोबर एखादा मदतनीस असावा म्हणून नाडगौडा यांनी विजूलाही  दुसऱ्या दिवशी स्टेशनवर बोलावले.
    दुसऱ्या दिवशी सकाळी विजू त्याला सांगितल्याप्रमाणे स्टेशनवर हजर झाला.नाडगौडा साहेब खात्याची गाडी घेवून स्टेशनवर गेले. निर्धारित वेळेवर गाडी आली.सांगितलेल्या बोगीसमोर विजू आणि नाडगौडासाहेब उभे राहिले.त्या बोगीत बहुतेक ते अधिकारी एकटेच उतरणारे प्रवासी होते  त्यांना रिसीव्ह करायला नाडगौडासाहेब आणि विजू दोघेही त्या बोगीकडे धावले.
     ते बडे साहेब खाली उतरले त्यानी  रिसिव्ह करायला आलेल्या त्या दोघांकडे पाहीले. नाडगौडा यांच्या अवतारावरून काही अंदाज बांधला आणि आपल्या हातातली ओडिसी ब्रिफकेस त्यांनी नाडगौडा साहेबांच्या हातात दिली आणि अपटूडेट  पोषाखात असलेल्या विजूसमोर  हस्तांदोलन करायला हात पुढे केला! विजूची फारच पंचायत झाली त्याने नाईलाजाने हात मिळवला आणि नाडगौडा साहेबांकडे हात दाखवला.
" सर, यह हमारे साहब नाडगौडाजी." अशी ओळख करून दिली आणि त्यांच्या हातातली बॅग पटकन स्वत:कडे घेवून खाली मान घालून गाडीच्या दिशेने निघाला.
    काय घोटाळा झालाय ते आलेल्या अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल स्मित झळकले, त्यांनी आता नाडगौडाशी हस्तांदोलन केले. दोघेही गाडीत बसले आणि गाडी इंस्पेक्सन क्वार्टरकडे निघाली.
    कॅज्युअल मजदूर असूनही विजू एकदम टेचात रहातो याचा नाडगौडा साहेबाला फारच राग आला होता!या विजूमुळेच आपल्याबद्दल त्या साहेबाचा गैरसमज झाला आणि आपल्याला मजदुर समजले गेले हे नाडगौडा साहेबाना फारच झोंबले होते! दुसऱ्याच दिवसापासून विजूची बदली स्टोअरमधे हेल्पर म्हणून झाली!
         ........... प्रल्हाद दुधाळ.

Saturday, September 3, 2016

विद्यासागर सर.

कळत-नकळत घडवणारे विद्यासागर सर
- प्रल्हाद दुधाळ, पुणे
शनिवार, 3 सप्टेंबर 2016 - 02:30 AM IST

माणसाच्या जडणघडणीत आई-वडिलांच्या बरोबरीनेच शिक्षकांचेही अत्यंत मोलाचे योगदान असते. त्यातही एखादा शिक्षक किंवा शिक्षिका संपूर्ण आयुष्यभर पुरून उरतील एवढे संस्कार करतात आणि त्या बाई किंवा सरांचे त्या माणसाच्या मनात आयुष्यभरासाठी आदराचे स्थान निर्माण होते. माझ्यावरही अनेक शिक्षकांनी असेच खूप चांगले संस्कार केले. 

एका अशिक्षित, अल्प-भूधारक शेतकरी कुटुंबातला मी.. आज मी जो काही आहे, तो केवळ मला लाभलेल्या अनेक शिक्षकांनी वेळोवेळी केलेले संस्कार आणि मार्गदर्शनामुळेच! सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची गावात असलेली ‘शेती शाळा परिंचे‘ या शाळेत आणि पुढे रयत शिक्षण संस्थेच्या ‘कर्मवीर विद्यालय परिंचे‘ या माझ्या हायस्कूलमध्ये अनेक चांगले शिक्षक भेटले. त्यांनी मला शालेय अभ्यासक्रम तर शिकवलाच; पण खऱ्या अर्थाने जगणेही शिकवले. आपल्या पगारातून माझी फी भरणारे पडवळ सर मला इथेच भेटले. साहित्य-कला-नाट्याचे बीज माझ्यात रुजवले ते जी. बी. विद्यासागर या माझ्या गुरुंनी.. तसं पाहिलं, तर विद्यासागर सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे. आम्हाला आठवीपासून इंग्रजी हा विषय होता. विद्यासागर सरांनी अशा काही कौशल्याने इंग्रजी शिकवलं, की बस्स! एक-एक शब्द शिकवण्याची त्यांची तळमळ, हातोटी अजूनही लक्षात आहे. ‘थ्रो‘ आणि ‘कॅच‘ शिकवण्यासाठी त्यांनी वर्गात चेंडू आणला होता; तर ‘डान्स‘ शिकवण्यासाठी त्यांनी अक्षरश: नाचून दाखवलं. त्यांनी इंग्रजी विषयात माझी इतकी तयारी करून घेतली, की बोर्डामध्ये इंग्रजीत मी पहिल्या पाचांमध्ये होतो.. विद्यासागर सर इंग्रजी तर चांगले शिकवायचेच; पण मराठी साहित्याचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. आम्हाला इंग्रजी शिकवता शिकवता अनेकदा ते मध्येच मराठी कवितेविषयी बोलायला लागायचे. त्यांचा तो तास म्हणजे माझ्यासाठी अक्षरश: साहित्यिक पर्वणी असायची. त्यांनी अशा मराठीच्या जादा तासात आम्हाला कुसुमाग्रज, बालकवी, विंदा, भा. रा. तांबे, केशवसुत, ग्रेस अशा महान साहित्यिकांच्या अनेक गाजलेल्या कविता रसग्रहणासह शिकवल्या. एखाद्या कथेचा किंवा कादंबरीचा रसास्वाद कसा घ्यायचा, ते आम्ही त्यांच्यामुळे शिकलो. ‘नटसम्राट‘, ‘अश्रूंची झाली फुले‘, ‘एकच प्याला‘सारखी अनेक नाटके सरांना तोंडपाठ होती. ते नाटकाविषयी बोलायला लागले, की असे वाटायचे की आपण नाटकच स्टेजवर पाहतोय. अजूनही ते तास जसेच्या तसे आठवतात. 

विद्यासागर सरांनी शिकवलेलं ‘पृथ्वीचं प्रेमगीत‘, ‘खबरदार जर टाच मारुनी‘ वा ‘जन पळभर म्हणतील हाय हाय‘ यांसारख्या अनेक कविता आजही जशाच्या तशा स्मरणात आहेत. त्या साहित्यसंस्कारांमुळे पुढील आयुष्यात मला वाचनाची प्रचंड गोडी लागली. आपल्या वैयक्तिक आयुष्यात मी पायरी-पायरीने प्रगती साधत राहिलोच; पण लेखन क्षेत्रातही काही ना काही धडपड करत राहिलो. 

आतापर्यंतच्या माझ्या लेखनप्रवासामध्ये दोन कवितासंग्रह, काही कथा आणि लेख प्रसिद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, 2007 मध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या पहिल्या कवितासंग्रहाला विद्यासागर सरांची प्रस्तावना लाभली. गेल्या 30 वर्षांमध्ये त्यांच्याशी संपर्क नव्हता. रयत शिक्षण संस्थेतून ते उपसचिव पदावरून निवृत्त झाले होते. तरीही मी त्यांना भेटून माझी ओळख सांगताच त्यांनी आनंदाने हे काम केले. माझे व्यक्तिमत्व घडण्यात त्यांनी कळत-नकळत केलेले संस्कारच कारणीभूत आहेत, हे सांगायला मला अभिमान वाटतो.