Wednesday, July 6, 2016

मोबाईलची घाई नको ग बाई

मोबाईलची घाई नको ग बाई ....
      मागच्या आठवड्यात एका दुकानासमोर उभा होतो.एक काका दुकानदाराला आपल्या मुलाबद्दल सांगत होते-

"माझा  मुलगा फक्त चार वर्षांचा आहे  पण फारच हुशार आहे बर का! तो मोबाईलवरचे सगळे गेम खेळतो.फोटोसुध्दा काढतो, एवढेच काय मोबाईल मधले  सैराटचे “झिंगाट” गाणे सुध्दा त्याला  लावता येते! काय नाचतो तो त्या गाण्यावर ,एकदम झिंगाट !"
मोबाईलबाबत आपल्या पाल्याचे असे कौतुक अनेक पालक अगदी  उत्साहात करत असतात.आपला मुलगा किंवा मुलगी मोबाईल किंवा कॉंप्युटर वा लॅपटॉप अगदी लहान वयातही सफाईदारपणे वापरू शकतो याचा आजकालच्या पालकांना नको इतका अभिमान वाटत असतो! ते काका सांगत होते ते बरोबरच होते.आजच्या काळात अगदी  लहान वयातही  नव्या तंत्रज्ञानाविषयी मुलांना खूप समज आहे.अनेक पालक आपल्या  पाल्याला आवर्जून या वस्तू घेवून देतात! पण खरच अशा लहान वयात मुलांच्या हातात असा आधुनिक सुविधा असलेला मोबाईल देणे बरोबर आहे का? मोबाईल हे साधन माहितीच्या दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरलेले असले तरी लहान मुलावर त्याचे वाईट परिणाम होताना दिसत आहेत. ज्या वयात मुलांनी विविध संस्कारक्षम गोष्टी, कथा ऐकायच्या,अभ्यास करून चांगले मार्क मिळवायचे आपल्या भविष्यातील आयुष्याचा पाया पक्का करायचा त्या वयात मुले चित्रपटांमधील उडती गाणी ऐकताना-पाहताना दिसतात.गेम खेळताना दिसतात.मुलांना एक वेळ कविता पाठ नसतील; पण चित्रपटांची गाणी तोंडपाठ असतात. मोबाईलवर ही गाणी सातत्याने ऐकल्यामुळेच हे घडते.मोबाईल वापरामुळे मुलांच्या अभ्यासावर तर परिणाम होतोच पण त्यांच्या आरोग्यावर व एकंदरीत व्यक्तिमत्वावर अत्यंत दुरगामी वाईट परिणाम होवू शकतात हे पालकांना कळायला हवे. मोबाईलचे डोळ्यांना दिसणाऱ्या या दुष्परिणामाशिवाय इत्तर अनेक वाईट परिणाम आहेत.
 मोबाईल फोनचे धोके : तुम्ही सिगारेट, तंबाखूची जाहिरात पाहिलीत का? त्यावर स्पष्ट लिहिले आहे की, ‘सिगारेट, तंबाखूमुळे कॅन्सर होतो.’ तशीच आता मोबाइल वापरणार्‍यांसाठीही सुचना देण्याची वेळ आली आहे, एवढे मोबाईलचे गंभीर दुष्परिणाम होत आहेत आणि वयाच्या सोळा वर्षापर्यंत हे दुष्परिणाम दुप्पट वेगाने घातक आहेत!   मोबाइलच्या माध्यमातून उत्सर्जक किरणे म्हणजे रेडिएशनचा शरीरावर  खूपच वाईट परिणाम होतो  या दुष्परिणामाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ फार चिंतित आहेत.अनेक रिसर्च प्रोजेक्ट यावर कसून संशोधन करीत आहेत व त्याची माहिती जगासमोर ठेवत आहेत. धोक्याच्या इशार्‍याची घंटा वाजवत आहेत. लहान मुलांसाठी हे High Frequency Electro Magnetic field (PEMF) मेंदूसाठी व रक्तासाठी फारच हानिकारक असतात. याच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी,टेंशन, निद्रानाश व कानाच्या पडद्यावरही  वाईट परिणाम होतो.
  फिनलॅँड रेडिएशन अ‍ॅँड न्यूक्लियर सेफ्टी अथोरिटीच्या अहवालानुसार मोबाईल अतिवापरामुळे मानवी शरीरातील पेशी सुकण्यास सुरुवात झाली आहे. त्या आकसून जात आहेत. संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे की हे पेशीमधील प्रोटीन वाढवते व ते पेशी खराबीचे एक लक्षण आहे. मोबाइल फोन कानाजवळ ठेवल्यामुळे त्यातून निघणार्‍या रेडिओ लहरी डोक्यात शिरतात. त्यामुळे त्याभागातील उष्णतापमान वाढते व लोकल ब्लडफ्लो वाढतो. त्यामुळे अ‍ॅल्बुनिन रक्तवाहिनीतून निघून मेंदू पेशीत व पेशीजलात येतो. मोटोरोला कंपनीने सांगितले की रेडिएशन जास्त प्रमाणात की पॅड व माउथ पीसमधून पाझरत असते. हेच रेडिएशन मेंदूपेशींमध्ये जबरदस्तीने घुसतात. डोळे, कान या पेशीत शिरतात. डोळे व कान यातील पेशी सूक्ष्म व नाजूकपेशी असतात. मायक्रोव्हेवना अत्यंत संवेदनशील असतात.लहान मुलांच्यात तर त्याचा भयानक परिणाम होतो. उत्सर्जक किरणे लिव्हर, मूत्रपिंडाकडे जातात.छातीजवळ, खिशात किंवा पॅँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलमधील  किरण उत्सर्जनामुळे अवयव खराब होतात. ज्या कानाला मोबाइल ठेवता त्या बाजूला ट्यूमर होण्याचा धोका खूप आहे.
रेडिएशनमुळे मेंदू पेशींमध्ये संवेदना वाहून नेण्याची क्षमता असुरक्षित : रेडिएशनमुळे मेंदू पेशींमध्ये संवेदना वाहून नेण्याची क्षमता असुरक्षित होते. पेशीची कार्यक्षमता कमी होते.त्याशिवाय थकवा, गळावट, झोपेतील अनियमितता, लक्ष न लागणे, एकाग्रतेचा अभाव, पटकन प्रतिक्रया न निर्माण होणे,डोकदुखी, बैचनी, अशक्तपणा, हृदयात धडधडणे, रक्तदाब वाढणे इत्यादी लक्षणे दिसतात.
स्मरणशक्ती कमी होते : स्पॅनिश शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये चिडचिडपणा, मूड बदलणे वाढते व ते डिप्रेशनकडे जातात. त्यांची वागणूक व शिकण्याची क्षमता मंदावते, कमी होते. त्यामुळे  खोडकर, हट्टी मुलांना मोबाइल देताना पालकांनी काळजी घ्यावी. जी मुले सातव्या महिन्यात जन्मलेली आहेत, त्यांना बालपणात व नंतर मोबाइल देताना पालकांनी जास्त काळजी घ्यावी.

तर अशा प्रकारे मोबाईल लहान मुलांसाठी घातक तर आहेच पण मोठया माणसांसाठीसुध्दा याचा अतिवापर धोक्याचा आहे. त्यामुळे -----

वाटला जरी जरूरी वापरावा तो जपून

वेड त्याच लागल की,अभ्यासाचं खर नाही....

व्हिडीओ गाणी गेम सिनेमा वाटे जरी भारी  

बालपणी मोबाईलची घाई नको ग बाई....
      --्--- प्रल्हाद  दुधाळ
   (नातवाला लिहून दिलेला निबंध)

Sunday, July 3, 2016

आठवणीतला एक पाऊस

आयुष्यात अक्षरशः छपन्न  पावसाळे पाहीले आहेत! कारण माझे वय  छपन्न  वर्षे आहे! आठवणीतले पावसाळे आणि पावसाच्या भरपूर आठवणी आहेत. एक आठवण मात्र अशी आहे  ती आठवली की मी माझ्यावरच हसतो. मी अकरावीला लोणंद  जि सातारा येथे शिकत होतोआता ऐकायला जरा वेगळे वाटेल पण हे खरे आहे की मी चारेक वर्षाचा असताना पोहायला शिकलो होतो पण सायकल चालवायला मात्र अकरावीत असताना म्हणजे सतराव्या वर्षी शिकलो! तर झाले काय की मी भाड्याने सायकल घेवून तेथून पाचेक किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीवर बहीण रहायची तिच्याकडे निघालो होतो . जून ची सुरूवात होती, तसे पावसाचे चिन्ह  दिसत नव्हते . तो रस्ता म्हणजे जेमतेम पायवाटच होती. मी नुकताच सायकल चालवायला शिकलो होतो त्यामुळे बिचकत बिचकत चाललो होतो. जेमतेम दोनेक किलोमीटर गेलो असेल,जोरदार वारा सुटला आणि पाठोपाठ टप्पोर्या थेंबांचा वादळी पाऊस सुरू झाला! आजूबाजूला अजिबात वस्ती नव्हती. मी हातात सायकल धरून चालायला लागलो, वरून पाऊस झोडपत होता. अचानक जोरात वारा आला आणि माझ्या हातातली सायकल वाऱ्याने लांब जावून पडली! .मी पळत जावून सायकल पकडली ,उभी केली, पुन्हा जोरात वादळ आले पुन्हा सायकल लांब बांधाच्या पलिकडे पडली. मी सायकल उचलून वाटेवर आणायचो,परत ती हवेने लांब जावून पडायची असे पाच सहा वेळा झाले! वरून पावसाच्या धारांचा मार बसत होता .दोन तीन वेळा मी सुध्दा धडपडलो!हाताचे कोपरे व घुडगे चांगलेच सोलपटले  होते! ही झटापट चांगली अर्धा तास चालली होती !हा वळवाचा पावूस आला तसा अचानक गेला, पुन्हा लख्ख उन पडले . मी कसाबसा सायकल हातात धरून वस्तीपर्यंत पोहोचलो. तिथे पावसाचा टिप्पुस नव्हता! त्या अर्ध्या तासात माझी  जी त्रेधातिरपीट झाली  ती बघायला कुणीच  नव्हते त्यामुळे हायापायाला काय लागले  ते सागणेही  अवघड झाले होते . ही घटना आठवली की मला  हसू  येते !
.....प्रल्हाद दुधाळ 

Thursday, June 30, 2016

समजूत .

       समजूत .
     काल मुंबईवरून शिवनेरीने पुण्याला परत  चाललो होतो. एकतर पाचची गाडी साडेपाचला लागली. दिवसभर भरपूर फिरणे झाले होते त्यामुळे गाडी सुरू झाली की मस्त ताणून द्यायची असे ठरवले होते. गाडीने सायन ओलाडले होते मी डोळे झाकून झोपेची आराधना सुरू केली.गाडीत एकदम शांतता होती. अचानक माझ्या मागच्या सीटवरील मॅडमचा जोरात बोलण्याचा आवाज आला त्या  मोबाईलवरून कुणाशी तरी बोलत होत्या. मॅडमचा आवाज एवढा मोठा होता की ड्रायव्हर पासून ते अगदी शेवटच्या सीटपर्यंत त्या बोलत असलेला शब्द न शब्द सर्वाना  ऐकू येत होता. माझे  डोळे बंद होते पण कानावर नको म्हटले तरी सगळा संवाद ऐकू येत होता बहूदा त्या आपल्या मावशीबरोबर बोलत होत्या.
" हॅलो मावशी , हो आत्ताच निघाली गाडी ."
" हो आज बरी वाटली पप्पांची तब्बेत. मी डॉक्टरांशी बोलले "
जो संवाद चालला होता त्यावरून मॅडमचे पप्पा हॉस्पिटलमधे ॲडमिट होते आणि त्या नुकत्याच त्याना भेटून आल्या होत्या . दुसऱ्या बाजुकडील बोलणे जरी ऐकू येत नसले तरी मॅडमच्या बोलण्यावरून  गाडीतल्या सर्व प्रवाशांना परिस्थिती कळत  होती. त्या संवादात मला ऐकू  आलेली  काही वाक्ये ...
" हो छान जेवले ते . तीन चपात्या खाल्ल्या त्यांनी आज ! ते स्वत:च म्हणाले मला आता माझ्या पायावर उभे रहायचय ."
" नाही ग डॉक्टर म्हणतात, लगेच पाय कट नको करायला. आधी वाटत होत गॅंगरीन असाव, जखमही चांगली बोट जाईल एवढी आहे म्हणाले .पण बघू अजून आठ दिवस मग ठरवू म्हणाले डॉक्टर !"
" हो ना, खुपच दुर्लक्ष केल त्यांनी स्वत:कडे, एवढी शुगर वाढत चालली होती. पथ्यपाणी मुळी  पाळतच नव्हते. आज म्हटले मी आता काळजी घेईन . कालपर्यंत फक्त एकच चपाती खायचे  आज  त्यांनी तीन चपात्या खाल्ल्या. डाळींबही सोलून मागीतले . खरच पॉजिटीव विचार करायला लागलेत"
" हो आपण प्रार्थना करू महाराजांकडे आपल्या पायावर उभे राहूदे त्यांना!"
" हो ना ,मलाही आतुन वाटतय ते उठतील या दुखण्यातून !"
 " हो , तू ही भेटून ये आनंद होईल पप्पाना ."
 मॅडमच्या बोलण्यातुन सर्व कथानक लक्षात आले होते. मावशींचा फोन झाल्यावर त्यानी मामाला फोन केलापुन्हा तेच  बोलणे तोच दिलाशाचा स्वर ,स्वत:ची समजूत घालत बोलणे. समोरून मिळालेल्या धीराच्या शब्दाने अजून धीराने घेणे.
मॅडम एकापाठोपाठ एक अशा सर्व नातेवाईकांना फोन करून तेच तेच सांगत होत्या. त्याना वाटत असलेला आशावाद पुन्हा पुन्हा गिरवून अधोरेखित करत होत्या ! पुण्यात कोथरूडला पोहोचेपर्यंत त्या अखंड फोनवर अनेकाना तेच तेच सांगत होत्या. मला असे वाटले की त्या स्वत:लाच समजावत होत्या!
त्या कोथरूडला उतरल्या.
मी डोळे न उघडताच प्रार्थना केली ...
" देवा , मॅडमचा आशावाद प्रत्यक्षात येवू दे ,त्यांच्या पप्पाना बरे वाटू दे !"
        ....... प्रल्हाद  दुधाळ.

Thursday, June 23, 2016

पाठराखण ....

पाठराखण ....

  आज माझे वय छप्पनच्या वर आहे.आजपर्यंतच्या जीवनात अनेक आघाड्यांवर वेगवेगळ्या प्रकारची लढाई लढत रहावी लागली.कधी आर्थिक,मानसिक,पारिवारिक वा शाररिक आघाडीवर समस्या येत राहिल्या.तशा तर त्या प्रत्येक सजीवाच्या आयुष्यात येतच असतात! आयुष्याच्या  सुरूवातीला जेंव्हा जेंव्हा  अशा समस्या उभ्या ठाकल्या तेंव्हा मी घाबरून जायचो.वाटायचे आता सगळे संपले, समोर अंधार असायचा.कुणी आपल्याला आधार देईल,खंबीरपणे मागे उभा राहील अशी परिस्थिती बिल्कूल  नव्हती. हताश होवून जे काही होईल ते पहात रहाणे एवढेच काय ते हातात असायचे.अशा वेळी मनाचा तोल ढासलेल व कदाचित  स्वत:च्या जीवाचे काही बरेवाईट आपल्या हातून घडेल अशी भीतीही  क्वचितप्रसंगी वाटायची, पण तेवढे धैर्य नव्हते म्हणा किंवा मनात कुठेतरी अंधुक का होईना आशेचा किरण दिसू शकेल असा  संकेत मिळाल्याने म्हणा, कधी टोकाच्या आततायीपणे  मी वागलो नाही.सुरूवातीला  असा  हताश  अवस्थेत  असताना  एक  अनुभव आला  अशा  समस्येच्या वेळी अचानक काहीतरी मार्ग निघाला त्याने  आलेली समस्या पूर्ण सुटली जरी नाही तरी उभ्या ठाकलेल्या  त्या समस्येचा बोचरेपणा सहन होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. एकदा  दोनदा  तीनदा  याची पुनरावृत्ती  झाली  आणि  मग  याची सवयच झाली! उगीच  रडत  बसण्याऐवजी  खंबीरपणे  तोंड द्यायची मानसिक तयारी  करू लागलो. असा विचार  करू लागलो की  समोर आलेल्या समस्येवर  काही ना काही मार्ग  असतोच आणि योग्य  वेळ  आल्यानंतर  त्या  समस्येवर असलेले  ते  समाधान  अचानक  सुचते किंवा  अदृश्य  शक्तीकडून सुचवले जाते  याचा  अनुभवांती  विश्वास  वाटायला  लागला. आणि मग आयुष्यात  कोणतेही  संकट आले, कितीही गंभीर समस्या  उभी  राहीली तरी त्यावर  काहीतरी उत्तर  मिळेल असा  आशावाद आणि पुढे  आत्मविश्वास  निर्माण झाला . मार्ग  कसा  निघेल, कोण  काढेल याचा काहीच अंदाज नसतानाही  केवळ  आशावादी  राहून  समस्येवर अगदी  समाधानकारक  नाही मिळाली  तरी  काही ना काही  उत्तरे  मिळतीलच हा आशावादच  कायम माझ्या मदतीला  आला .या  आशावादानेच  कायम  माझी पाठराखण केली आहे  आणि  विश्वास  आहे की  पुढेही  असेच  घडत  राहील.(अपूर्ण )

Thursday, May 19, 2016

लेबल.

         लेबल.
            माझ  लग्न ठरलं  लग्नपत्रिका छापून आल्या. निमंत्रण  करायला  सुरूवात करायची होती. मी असा विचार केला की ज्या वस्तीत आपण इतके दिवस रहातोय तेथील प्रतिष्ठीत व्यक्तींना आपण प्रथम निमंत्रण पत्रिका देवू या! वस्तीत आमच्या छत्रपती  शिवाजी मंडळाने साईबाबा मंदिर बांधले होते. या साईं मंदिराचा मी सुरूवातीपासून क्रियाशील सदस्य होतो.सर्वप्रथम मी बाबांच्या मुर्तीसमोर लग्नपत्रिका ठेवली. साईबाबाना मनोभावे नमस्कार करून पत्रिका देण्यासाठी पहीली व्यक्ती निवडली- गाढवे कील! या वकील साहेबांचे आणि माझे जरी तोंड ओळख होती तरी कधी समोरासमोर बोलणे झाले नव्हते. मला ते मंदिराच्या चौकात उभा असताना कायम बघायचे.त्यांचा चेहराच असा होता की ते कायम थोडे घुश्शात असल्यासारखे  दिसायचे,मीसुध्दा स्वत: होवून कधी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला नव्हता.असे असले तरी त्यांची बायको मात्र मला ओळखायची.बऱ्याचदा ती माझ्याशी गप्पा मारायची, येता जाता आस्थेने विचारपूही  करायची.अशा वस्तीत राहून, शिकून मी सरकारी नोकरी मिळवल्याने वकीलीनबाईना माझे नेहमी कौतुक असायचे.तर माझी लग्नपत्रिका द्यायची सुरूवात या वकीलसाहेबांपासून करायच्या हेतूने मी त्यांचा दरवाजा वाजवला गाढवेसाहेबानी दरवाजा उघडला.मला पहाताच त्यांची मुद्रा त्रासिक झाली.
एक अत्यंत तुच्छतेने नजरेचा रागीट कटाक्ष माझ्याकडे टाकून ते फिस्कारले -
" काय आहे रे ?"

" सर पत्रिका द्यायची होती ." मी चाचरत बोललो.

" कसली पत्रिका?" त्यांचा तोच तुच्छतेचा स्वर होता.

" सर पुढच्या सोळा तारखेला माझे लग्न आहे,त्याची पत्रिका द्यायची होती ." माझ्या आवाजाला नको एवढा कंप आलेला होता. माझ्याकडे अविश्वासाने बघत त्यांनी माझ्या हातातून पत्रिका जवळ जवळ हिसकावून घेतली.आता बाईसाहेबही बाजूला येवून उभ्या राहिल्या होत्या.हातात आलेल्या पत्रिकेवर भराभर नजर फिरवत वकीलसाहेबानी मला आपादमस्तक न्याहळले! अत्यंत कुत्सित व् हेटाळणीपूर्ण आवाजात कडाडले .

" तर आता लग्न करणार तू ! नोकरी ना धंदा तुला ! एक पै कमवायची अक्कल नाही, दिवसभर वस्तीतल्या फालतू कारट्यांबरोबर चकाट्या पिटत फिरतोस आणि लग्न करतोय!" 

" आणि काय रे बायकोला कसा पोसणार आहेस? पहिलं काम धंदा बघ, स्वत:च पोट भरायची  सोय कर आणि मग लग्न कर! मुर्ख कुठला! "

गाढवेकीलांच्या तोंडाचा पट्टा जोरात सुटला होता, आवाजही वाढला होता शेजारीपाजारी जमा झाले होते! मला काय आणि कसे बोलावे तेच उमजेना.बाजूला उभ्या असलेल्या बाईसाहेब त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होत्या,पण ते ऐकायच्या मनस्थितीत ते बिल्कूल नव्हते! शेवटी एकदाची कीलीनबाईना बोलायला संधी मिळाली-
" अहो असे काय बोलताय त्याच्याशी?"

" मग काय करू,खेटराने पूजा करू त्याची? कमवायची काडीची अक्कल नाही आणि चाललालग्न करायला !" 

" अहो कुणी सांगितलं तुम्हाला तो नोकरी करत नाही म्हणून ? अहो टेलिफोन खात्याची चांगली सरकारी नोकरी आहे त्याला! चांगला ग्रॅज्युएट झालाय तो!" 

आता मात्र वकील साहेब शांत झाले,पण तरीही माझ्याकडे अविश्वासाने बघत होते.मी खिशातले माझे खात्याचे ओळखपत्र थरथरत्या हाताने त्यांच्या हातात दिले.त्यांनी ते नीट बघितले व परत मला दिले.
" नोकरीला आहे तर मग नोकरीला कधी जातोस. कायम दांडी मारतो वाटतो. जेंव्हा जेंव्हा बघतो तेंव्हा त्या मंडळाच्या फालतू पोरांबरोबर पडीक असतोस!"
आता मात्र मला त्यांचा माझ्याबद्दल असलेला गैरसमज दूर करणे आवश्यक वाटले.
" सर मी रात्रपाळी करतो.दोन दिवसातुन एकदा संध्याकाळी पाच ते सकाळी सात अशी डबल ड्युटी करतो! " 

आता साहेबाना माझ्याशी रागाने बोलल्याचा पश्चात्ताप झालेला दिसत होता.माझा हात धरून त्यानी मला घरात नेले. बाईसाहेब हातावर द्यायला साखर घेवून आल्या.
  चुक त्यांची नव्हती, मी ज्या वस्तीत रहात होतो, ज्या मित्रांच्या सहवासात वावरत होतो,त्यातली अनेक मुले विविध व्यसनांच्या आहारी गेलेली होती.कित्येकानी शिक्षण अर्धवट सोडलेले होते, अनेकाना कामधंदा नव्हता! ही मुले मनाने खुप चांगली होती. पण माणूस म्हणून ही मुले कितीही चांगली असली तरी समाजाने त्याना वाया गेलेली व टारगटपणाचे लेबल चिकटवलेले होते! आणि अशा मुलांच्यात  वावरणारा मी त्यांच्यातलाच एक असणार, असे वाटणे अगदी साहजिक होते! शेवटी तुम्ही कितीही सज्जन आणि चांगले असला तरी तुमच्या कपाळावर थोडेच ते लिहिलेले असते? समाजात तुमचे मूल्यमापन होताना तुम्ही काय काम धंदा करता,तुम्ही किती कमावता,तुम्ही कोठे रहाता,तुमचे मित्र कोण आहेत,तुम्ही घालत असलेले कपडे,इत्यादि वरवरच्या बाबींवरून होते! या गोष्टींवरून तुम्हाला लावायचे लेबल ठरते!

--- (कॉपीराईट)- प्रल्हाद दुधाळ .



Friday, May 13, 2016

भिडस्त

भिडस्त.
असा मी बावळा नी भिडस्त
भोवताली लुटारूंची गस्त
जगणे किती येथे महाग 
मात्र मरण जाहले स्वस्त
घर चंद्रमौळी ही झोपडी
मन माझे परंतु प्रशस्त
राखण्यास दिला देश ज्यांना
त्यांनी केले तयास उध्वस्त
राहती कष्टणारे उपाशी
शेठजी भरपेट नी मस्त
कथा ही असे युगायुगांची
बळी कान पिळती समस्त

   ---प्रल्हाद दुधाळ  

Sunday, May 8, 2016

गती ते सद्गती

गती ते सद्गती.

  परवा मित्रांबरोबर गप्पा चालू होत्या. विषय होता रूटीन  जीवनातल्या  बदलाचे महत्व. आयुष्य जर समरसतेने जगायचे असेल  तर  दैनंदिन आयुष्यात  वरचेवर  थोडाफार  बदल  असायला हवा. क्षणभरासाठी का होईना पण  आपल्या  कंटाळवाण्या आयुष्यात  जो जाणीवपुर्वक बदल करतो त्याला  जगण्यासाठी नव्याने उर्जा मिळते. रटाळ जगणे म्हणजे  आयुष्याला असलेली  रूक्ष अशी  गती !
या गतीमधे काही  सकारात्मक बदल केले  तरच जीवनात प्रगती होते. थांबला तो संपला! एका जागी थांबले तर  एक प्रकारचे साचलेपण  येते . गती,मग ती शिक्षणात असेल तर   स्वत:ला  गती  असलेल्या  विषयांचे सखोल ज्ञान मिळवता येते. त्यासाठी आपल्याला कोणत्या  विषयात गती आहे हे  जाणून  घ्यायला  हवे. एकदा  का ते समजले की मग त्या विषयात पारंगतता मिळवणे सोप्पे होवून जाते, पण  उगाच   आपल्याला गती नसलेल्या  विषयात  ओढून ताणून प्रगती करण्याचा अट्टाहास  आयुष्यभरासाठी महागात पडू शकतो. असा  अट्टाहास  जीवनातील  प्रगतीऐवजी  अधोगतीस कारणीभूत होवू  शकतो! कुणाला  व्यवसायात,कुणाला नोकरीत,कुणाला एखाद्या अभिजात कलेमधे गती असू शकते. ज्याने त्याने  जर वेळीच  स्वत:चा नैसर्गिक कल  ओळखून  त्या दिशेने  प्रामाणिकपणे  प्रयत्न केले  तर  नक्कीच  प्रगती  होते  व  आयुष्याला  अपेक्षित असलेली  गती  मिळते . ड्रायव्हिंग करताना  आपण जसे कुठे थांबायचे, कधी गती  वाढवायची, कधी  गती कमी  करायची,  कोणत्या  दिशेला  वळायचे या सर्व  बाबींचे  भान ठेवागती असेल तरच जीवनात प्रगती होते. थांबला तो संपला. गती मग ती शिक्षणात असेल तर विषयांचे सखोल ज्ञान मिळवता येतेआपल्याला कोणत्या  विषयात गती आहे हे का एकदा समजले की मग त्या विषयात पारंगतता मिळवणे सोप्पे होवून जाते,पण  उगीच  गती नसलेल्या  विषयात  ओढून ताणून प्रगती करण्याचा अट्टाहास महागात पडू शकतो. कुणाला  व्यवसायात,कुणाला नोकरीत,कुणाला एखाद्या अभिजात कलेत गती असू शकते. ज्याने त्याने  जर वेळीच  स्वत:चा नैसर्गिक कल  ओळखून  त्या दिशेने  प्रामाणिकपणे  प्रयत्न केले  तर  नक्कीच  प्रगती  होते  व  आयुष्याला  गती  मिळते . ड्रायव्हिंग करताना जसे कुठे थांबायचे,  कधी गती  वाढवायची, कधी  गती कमी  करायची वा  कोणत्या  दिशेला  वळायचे याचे भान ठेवावे  लागते आणि तसे  गतीत  केलेल्या बदलानुसार  आपण इप्सित स्थळी   पोहोचू  शकतो  त्या प्रमाणेच  मानवी  जीवनात  गतीचे  भान ठेवून  वाटचाल केली  तर  जीवनातील  अंतीम  धेय्य -  सद्गतीपर्यंत  पोहचता येते.

,,,,,,,,,प्रल्हाद दुधाळ  पुणे .९४२३०१२०२० .