Thursday, January 16, 2014

आयुष्यातली चिडचिड!!!

      आयुष्यातली चिडचिड!!!
      गोष्टी अगदी किरकोळ असतात पण आपल्या मनासारखे घडले नाही की आपण अगदी डिस्टर्ब
होऊन जातो. सकाळी सकाळी असे काही घडले की पूर्ण दिवस आपण बिघडलेल्या मूडमध्ये
 घालवतो.जणू काय आपले सर्वस्व हरवले आहे! खर तर आयुष्यातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे
एवढ्या तेवढ्याने डिस्टर्ब होण्याइतपत माणसाच्या सहनशक्ती चा ऱ्हास झाला आहे का? या प्रश्नाचे
 उत्तर कटू असले तरी हो असेच आहे! खाली काही असे प्रसंग दिले आहेत.
    १.सकाळी उठून घरातली सगळी कामे उरकायची असतात व कामावर जायचे असते तशातच
 नेहमीच्या वेळी कामवाली येत नाही.आता घरातली जास्तीची कामेही करावी लागणार या नुसत्या
 विचाराने आपला रागाचा पारा चढतो पण आपल्या हातात चिडचीड करण्याशिवाय काहीच नसत मग
 स्वत:शी बडबड करत, मोलकरणी च्या नावाने खडे फोडत,नशिबाला दोष देत कशीबशी कामे उरकून
 ओफिस गाठले जाते. सकाळी सकाळी मूड बिघडल्यामुळे अखंड दिवस चिडचिड होते.
    २.आपल्याला कुठेतरी घाईत जायचे असते पण ऐनवेळी बाईक चालू होत नाही किक मारून मारून
पाय दुखायला लागतो पण बाईक जाम चालू नाही होत! रागारागाने बाईकला लाथ मारून रिक्षाला हात
 करतो पण एकसुद्धा रिक्षा थांबत नाही आपण चिडतो.खूप प्रयत्नानंतर रिक्षा मिळते व ऑफिस गाठतो
 पण सकाळी सकाळी झालेल्या घटनांनी मूड खराब झालेला असतो तो सारा दिवस आपण चिडचिड
 करत  घालवतो.
      ३.रात्री झोपताना ठरवलेले असते कि सकाळी लवकर उठायचे व भराभर उरकून ऑफिसला
 जाण्यापूर्वी बँकेत जायचे आपण सकाळी उठतो घाईघाईने आन्हिके उरकतो व निघताना बँकेच्या
 कामाची कागदपत्रे शोधायला लागतो नेहमीच्या जागेवर कागदपत्रे मिळत नाहीत.आपल्याला खात्री
असते की कागदपत्रे त्याच जागेवर ठेवली होती कुणी हलवायाचीही शक्यता नसते तरीही मिळत नाही.
 खूप प्रयत्नांनंतरही कागदपत्रे सापडत नाहीत व बँकेचे काम पुढे ढकलावे लागते.मनासारखे घडले नाही
म्हणून मूड खराब होतो दिवसभर उगीच चिडचिड केली जाते.
      ४.आपल्याला कुठेतरी गडबडीने पोचायचे असते. सगळ्यात सोयीस्कर बसमध्ये आपण बसतो
 बस निघते अर्धे अंतर पार होते व ट्राफिक मध्ये अडकते कुठलीतरी मिरवणूक रस्त्यावर चालू असते
 व त्यामुळे  ट्राफिक दुसऱ्या मार्गाने वळवले जाते अपेक्षित ठिकाणी पोहोचायला आपल्याला तिप्पट
वेळ लागते व ज्या कामासाठी हा आटापिटा केला होता ते काम होत नाही.आपण भरपूर चिडतो.
 चिडचिड  करत रहातो.  
       वरील प्रसंग हे केवळ उदाहरणादाखल  दिले आहेत, आपल्या आयुष्यात असे किंवा अजून
वेगळ्या प्रकारचे अनेक प्रसंग येतात ज्या प्रसंगांनी आपण ताबडतोब डिस्टर्ब होऊन जातो. अनेक वेळा
आपण अशा परिस्थितीत अडकतो की, फक्त चिडचिड करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरलेले
 नसते. असे काही प्रसंग असतात की.त्यासाठी सरकारी गलथानपणा कारणीभूत असतो. आपण
 अशावेळी आपल्याकडील संवेदनाहीन शासनयंत्रणा, कामचुकारपणा, भ्रष्ट व्यवस्था व एकूण
व्यवस्थेबाबत तोंडसुख घेतो. भरपूर चिडतो. आयुष्यातले असे अनेक दिवस आपण चिडचिडेपणा
करण्यात वाया घालवतो. थोडा शांत डोक्याने विचार करून पहा बर की आपली त्या त्या प्रसंगी
 झालेली चिडचिड जरी स्वाभाविक असली तरी टाळता येऊ शकत होती का? चिडचिडेपणामुळे खरच
किती फायदा झाला का? चिडचिडेपणा केल्यानंतर आपण आजूबाजूंच्या लोकांशी,ऑफिसमधील
 व्यक्तींशी,आपल्या घरातील माणसांशी कसे वागलो आणि तसे वागणे योग्य होते की अयोग्य होते?
ज्यांच्यावर आपण चिडलो त्या व्यक्ती परिस्थिती चिडण्यायोग्य होण्यासाठी कितपत जबाबदार होत्या?
      मला व्यक्तीश: असे वाटते की ज्या ज्या प्रसंगी आपली चिडचिड होते, त्या पैकी शेकडा नव्वद
  वेळा ती चिडचिड आपण टाळू शकतो. माझे हे वाक्य थोडे अविवेकी वाटेल, पण बऱ्याचदा तर समोर
 आलेल्या प्रसंगाना काही अंशी स्वत: आपणच कारणीभूत असतो. साधारणपणे सत्तर टक्के प्रसंगी
 आपण केलेली चिडचिड किंवा दिलेल्या प्रतिक्रिया अनाठायी असतात! आपण जो त्रागा करतो त्यातून
व्यवस्थ्या तर किंचितही बदलत नाहीच पण केलेल्या त्राग्यामुळे आपलेच मनस्वास्थ्य बिघडते! एकदा
 असे वारंवार घडायला लागले की तुमच्या वागण्या बोलण्यातही हा त्रागा आपला प्रभाव दाखवायला
लागतो! नकारात्मक विचारसरणी कडे आपला प्रवास सुरु होऊ शकतो. मनोकायिक आजार आपला
 पिच्छा सुरु करू शकतात! हेकट स्वभावाचा म्हणूनही आपली प्रतिमा समाजात होऊ शकते!!!
    आता वर दिलेल्या प्रसंगासंबंधी आपण काही करू शकतो का हे पाहू-
१.       आपली कामवाली सुद्धा एक माणूस आहे म्हणजेच तुमच्या आमच्या आयुष्यात ज्या समस्या येऊ शकतात त्या समस्या कामवालीला ही येऊ शकतात हे प्रथम लक्षात घ्या. आजारपण वा इत्तर आकस्मिक कारणामुळे असा एखादा दिवस तिला तुमच्याकडे कामासाठी येणे शक्य झाले नसेल. तसे तुम्हाला कळवणे आवश्यक होते पण तेवढे गांभीर्य किंवा समज कदाचित त्या अशिक्षित व्यक्तीकडे नसेल असे समजा त्या पायी तुम्ही का डिस्टर्ब होता? ती न आल्यामुळे आता खोळंबा झाला आहेच पण त्याबद्दल त्रागा करण्यापेक्षा समोर जी परिस्थिती आहे तिचा प्रथम स्वीकार करा.आता तुम्हाला काय करणे शक्य आहे ते पहा.घरातली काही कामे वाटून द्यायचा प्रयत्न करा व घरातल्या सदस्यांना तशी सवय लावा. पुरेसा वेळ हातात नसेल तर ती कामे लगेच करण्याचा अट्टाहास सोडून द्या! विचार करा की ही कामे नंतर केल्याने काय असे आभाळ कोसळणार आहे? आणि हातात पुरेसा वेळ असेल तर... घ्या की मजा घरातली कामे करायची! मस्तपैकी आवडती गाणी लावा! संगीताच्या ठेक्यावर फिरवा हातातला झाडू घरही ! एखाद्या दिवशी फिरू द्या की भांड्यावर आपुलकीचा हात! कण्हत कुथत आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यापेक्षा त्यातला आनंद घेऊन सामोरे जा.चिडचिडेपणा करून अनमोल आयुष्यातला अख्खा दिवस वाया का घालवायचा!
२.       योग्य नियोजन केले तर कोणतेच काम घाईचे असू शकत नाही! होते काय की आपण प्रत्येक काम करताना ते करण्याचा शेवटचा दिवस कोणता आहे हे बघून प्रायोरिटीज ठरवतो.आणि मग आयत्या वेळी येणार्या अडचणींचा विचार न करता कामांचे नियोजन करतो. बाईक ला एक इंजिन आहे आणि त्याला त्रांत्रिक समस्या नक्कीच सांगून येत नाही. सर्व गोष्टी गृहीत धरून वेळेचे नियोजन केले तर अनेक प्रसंगी होणारी घाई टाळू शकते. आणि त्यातूनही असा काही प्रसंग वाट्याला आला तर चिडचिडेपणा करून काय हाती लागणार आहे? त्यापेक्षा एक आव्हान म्हणून पर्याय शोधा! मनस्वास्थ्य बिघडून घेतल्याने मार्ग तर सुचणार नाहीच पण दिवस मात्र बरबाद होईल. लवकर निघा, वेळेत पोहचा.आलीच काही समस्या तरीही तर शांत डोक्याने विचार करा कारण प्रत्येक समस्येवर किमान एक योग्य उत्तर असतेच असते. पाणी आपल्या मार्गानेच जाणार असते पण आनंद मिळवण्यासाठी त्यावर कारंजे फुलवायला काय हरकत आहे?
३.       येथेही नियोजनाच्या अभावामुळेच चिडचिड होण्याचा प्रसंग उद्भवलेला आहे. महत्वाच्या वस्तू  योग्य वेळी पटकन सापडण्यासाठी योग्य ते नियोजन हवेच.पण स्वत:च्या स्मरणशक्तीवर अवास्तव विसंबून राहिल्यामुळे असे प्रसंग घडतात. हे प्रसंग टाळण्यासाठी महत्वाच्या कामांच्या व कागदपत्रांच्या नोंदी खिशातल्या डायरीत ठेवल्या तर निश्चितच फायद्याचे राहील. लिहिण्याचा कंटाळा असला तर  मोबाईलमध्ये अशा नोंदी ठेवणे सहज शक्य आहे ज्यायोगे वेळेचे नियोजन करता येईल व ऐन वेळी होणारी धावपळ व मनस्ताप चिडचिड टाळता येऊ शकेल.
४.       आपण गजबजलेल्या शहरात रहातो.रस्ते वाहनांनी भरून वाहात असतात सार्वजनिक वहातुक व्यवस्थ्या वाढत्या लोकसंखेच्या प्रमाणापुढे अपुरी आहे. गैरव्यवस्थापन, अनागोंदी भ्रष्टाचार या गोष्टी तर आपल्या देशासाठी शाप ठरत आहेत पण आपणही याच व्यवस्थेचा भाग आहोत हे प्रथम मान्य करणे आवश्यक आहे. भर रस्त्यातल्या मिरवणुका, अतिक्रमणे, बेशिस्त वहातुक या गोष्टींचा सामना करतच आपल्याला जगायचं आहे! हे सगळ बदलायला हव यात दुमत असायचे कारण नाही, पण आपण करत असलेल्या वांझोट्या त्राग्यामुळे यामध्ये काहीच फरक पडणार नाही हे समजून घेणे आवश्यक आहे. व्यवस्थेविरुद्ध  तक्रार करणे,निषेध व्यक्त करणे निश्चितच आवश्यक आहे पण स्वत:वर फक्त चिडून काहीच साध्य होणार नाही. गैरव्यवस्थेचा
तुमच्या जीवनावर होणारा परिणाम जर टाळता येत असेल तर त्या पर्यायी जीवन शैलीचा प्राधान्याने विचार करणे आवश्यक आहे!
      वरील काही उदाहरणे सोडा पण एरवीसुद्धा आपल्या दररोजच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात ज्या क्षणी आपला मनाचा तोल ढळतो, राग येतो,चीड येते थोडक्यात षडरिपुंची बाधा होते आणि  मग भावनेच्या भरात सारासार विवेकबुध्दी न वापरता आपण काहीच्या काही वागतो. मागचा पुढचा विचार न करता बोलतो, हमरीतुमरीवर येतो ,कधी शब्दांनी तर कधी शब्दश: मार देतो किंवा मार खातो. वेळ निघून जाते आणि मग आपण त्या त्या प्रसंगी असे कसे वागलो याबद्दल पश्चाताप करायची वेळ येते!
   थोड तारतम्याने निर्णय घेतले, परिस्थितीचे भान ठेऊन टोकाच्या  प्रतिक्रिया टाळल्या तर आपले जगणे बरेचसे सहज होईल.सुखाचे होईल की नाही माहीत नाही पण आनंदाचे तरी होईल. कारण –
आपणच आपल जगण, अवघड करत असतो,
पालथ्या घड्यात पाणी विनाकारण भरत असतो!
हा तसा, ती तशी, उगाचच  बडबडत असतो,
साप साप म्हणून बऱ्याचदा, भुईलाच बडवत असतो!
भीती चिंता कटकट वटवट, करीत असतो जीवनाची फरफट,
चडफडत धुसफुसत जगत असतो, जगण अवघड करत असतो!
तेंव्हा आपल्या जीवनात  चिडचिडेपणा कसा टाळायचा याचा जरूर विचार करायलाच हवा!
तुम्हाला काय वाटते ????

                                  ............प्रल्हाद दुधाळ.
प्रकाशित.... ई  सकाळ २३/८/२०१६ 

   

Saturday, December 21, 2013

सुख म्हणजे नक्की काय असतं ?

सुख म्हणजे नक्की काय असतं ?
    सुख सुख म्हणतात ते असत तरी काय? अनेक माणसांप्रमाणेच मला ही हा प्रश्न कायम छळत आलेला आहे.माझ्या मते सुखी असणे ही एक मानसिक अवस्थ्या आहे त्यामुळे सुख व्यक्तीसापेक्ष आहे.या जगात सर्वसुखी असणारी एकही व्यक्ती असणे शक्य नाही हे प्रत्येकाला माहीत आहे तरीसुद्धा या जगातला प्रत्येक माणूस आपण सुखी व्हावे म्हणून धडपडताना दिसतो. मुळात हे सुख आहे तरी काय?अस काय सुख मिळत असेल सुखी असण्याने की हरेक व्यक्ती सुखामागे धावते?
    प्रथम सुख आणि दु:ख यातला फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.मी आत्ताच म्हटले प्रत्येक व्यक्ती सुखामागे धावते याचाच दुसरा अर्थ असाही होतो की प्रत्येकजण थोडा तरी दु:खी असतो आणि सुखी होण्याचा प्रयत्न करत असतो!
 प्रत्येक व्यक्तीच्या सुखी असण्याच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात.एका व्यक्तीचे सुख हे दुसऱ्या व्यक्तीच्या दु:खाचे कारण आहे असेही असू शकते! म्हणजेच स्वत:च्या सुखापायी दुसऱ्याला दु:ख देणे हे सुद्धा माणसाच्या सुखाच्या आड येते!
  उदाहरणार्थ, एका कंपनीमध्ये एका कर्मचाऱ्याची भरती करायची आहे.कंपनीने दिलेल्या जाहिरातीला मिळालेल्या प्रतिसादावरून त्या एका जागेसाठी एकूण दोनशे लायक व्यक्ती इच्छुक आहेत.या दोनशेमधून एकाचीच निवड होणार आहे. येथे नोकरी मिळाली हे एका व्यक्तीच्या सुखाचे कारण आहे पण हेच कारण बाकी एकशे नव्याण्णव व्यक्तींच्या दु:खाचे कारण आहे असे आपण म्हणू शकतो! पण यावरून एकशे नव्याण्णव लोक दु:खी आहेत असा निष्कर्ष काढणे चुकीचे होईल! सुख दु:खाच्या माणसाच्या कल्पना एवढ्या मर्यादेत बसणाऱ्या नक्कीच नाहीत!
  सुख आणि दु:ख ही मानवजन्माच्या जगण्याची विभिन्न पण अविभाज्य अंगे आहेत.जगात दु:ख आहे म्हणून सुखाचे महत्व आहे! यासाठी सुख या संकल्पनेची थोडी व्यापक चर्चा करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे माणूस सुखी आहे असे केंव्हा म्हटले जाते? खालील यादीमधील एक किंवा अनेक गोष्टी व्यक्तीकडे असणे म्हणजे तो सुखी असल्याचे गृहीतक आहे-
१.भरपूर स्थ्यावर व जंगम मालमत्तेचा मालक असणे.
२.अनिर्बंध सत्तधीश असणे.
३.आर्थिक,शैक्षणिक व कौटुंबिक बाबतीत यशस्वी असणे.
४.उच्चशिक्षित असणे.
५.समाजात मान मतराब असणे.
६.सुसंस्कारित असणे.
७.आनंदात असणे.
८.मनासारखा जोडीदार व भरपूर कुटुंबस्वास्थ्य असणे.
९.सज्जन व दानशूर असणे.
१०.सत्संग व अध्यात्मातील प्रगतीमुळे समाधानी असणे.
११.मुले कर्तबगार असणे.
१२.दिमतीला भरपूर नोकरचाकर असणे.
१३ ऐसपैस सर्व सुखसोयींनी युक्त बंगला असणे.
१४.दिमतीला आधुनिक महागड्या मोटारी चा ताफा असणे.
१५.सरकारी व खाजगी मोठ्ठे अधिकारी असणे.
१६.सर्वगुणसंपन्न असणे.
.................इत्यादी इत्यादी.
    ही यादी कधीच संपणारी नाही कारण माणूस सुखाच्या बाबतीत कधीच संतुष्ट नसतो.त्याची सुखाची तहान कायम वाढती असते.पायी चालणारा माणूस पायच नसलेल्या माणसापेक्षा खर तर सुखी आहे,पण तो आपल्याकडे चालण्यासाठी पाय आहेत यातल्या सुखापेक्षा आपल्याकडे सायकल नाही हा विचार करून दु:खी दिसतो! बर त्याला सायकल मिळाली की तो सुखी होईल असेही नाही! मग तो दुचाकी किंवा चारचाकी नाही म्हणून कुरकुरत असतो. हे दुष्टचक्र असे वाढत्या प्रमाणात चालत रहाते.जे आपणाजवळ आहे,जे वास्तव आहे त्यातला आनंद घेण्यापेक्षा जे नाही त्यामागे धावण्यात माणूस आपली सर्व शक्ती खर्च करत रहातो. आपल्याला नक्की काय हवे याचे तारतम्य नसल्यामुळे पूर्ण आयुष्य आभासी सुखामागे धावत रहातो.अनेकांना याचे भान मरेपर्यंत येत नाही तर काहींना आयुष्याच्या संध्याकाळी सुखाचे भान येते पण वेळ गेलेली असते! आयुष्यातल्या कितीतरी आनंदाला  आपण मुकलो आहे याचे भान सरत्या आयुष्यात आल्यानंतर माणूस अजूनच दु:खी होतो.पण तोपर्यंत सगळ हातातून निसटलेले असते.
  सुखाचा शोध घेण्यासाठी भल्याभल्यांनी आपल्या जीवनाचे रान केलेले आपण ऐकले आहे पण खर्या सुखाचा शोध कुणाला लागल्याचे ऐकिवात नाही! खरे तर सुखाचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे धावायची गरजच नाही. “ तुझे आहे तुजपाशी पण जागा चुकलासी” या उक्तीप्रमाणे सुख अगदी तुमच्याजवळ आहे पण ते ओळखता यायला हवे! आभासी सुख हे मृगजळासारखे आहे,जेवढे तुम्ही त्याच्यामागे धावणार त्याच वेगाने ते लांब लांब जाते. या पळापळीत मानव जन्म संपून जातो पण सुख मात्र सापडत नाही!
  एक उदाहरण म्हणून सांगतो माझ्या ओळखीचे एक गृहस्थ्य आहेत. त्यांनी अनेक अडचणींवर मात करत एका दरिद्री कुटुंबात जन्म घेऊनही कष्ट करत उच्चशिक्षण घेतले व ते एक प्रथितयश सरकारी अधिकारी आहेत.दिमतीला सरकारी गाडी व नोकरचाकर आहेत.त्याच्या इशाऱ्यावर एका कार्यालयाचा कारभार चालतो. समजदार पत्नी व सुसंस्कारित मुले आहेत.या व्यक्तीला लांबून ओळखणारे या माणसाचा हेवा करतात.सर्वजण विचार करतात की हा किती सुखी माणूस आहे! पण प्रत्यक्षात हा माणूस कायम वैतागलेला असतो.आपल नशिबच खराब आहे.मी श्रीमंत घरात जन्मलो असतो तर आज कुठल्या कुठे पोहचलो असतो, मी यांव केले असते अन त्यांव केल असत म्हणून कायम चिडचिड चालू असते. हाताखालच्या लोकांना कायम छळत असतो. बायको व मुलांवर विनाकारण ओरडत असतो.आपल्या आयुष्यात जे आहे त्यातले सुख/आनंद/समाधान न बघता त्याने जे जे मिळाले नाही त्याचा विचार करून स्वत:चे व आजूबाजूला संपर्कात असणार्या प्रत्येकाचे जगणे त्याने वेठीला धरलेले असते! खर तर त्याने आपण केलेल्या प्रगतीबद्दल आनंदी व समाधानी असायला हवे.आपण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इथपर्यंत पोहोचलो व आयुष्यात यशस्वी झालो याचा त्याला अभिमान असायला हवा.आपल्या कुटुंबाबद्दल त्याला समाधान असायला हवे.थोडक्यात काय तर हा माणूस खर तर सुखात आहे! पण खर्या सुखाबद्दल नीट माहिती नसल्यामुळे सुखात असूनही तो त्याच्या विचारसरणीमुळे तो दु:खात आहे!
  तुम्ही सुखात आहात की दु:खात आहात हे समजून घ्यायचे असेल तर प्रथम स्वत:ला ओळखता यायला हवे! स्वत:ची ओळख नव्याने करून घ्यायची तयारी हवी कारण तुम्ही सुख कशाला म्हणता, दु:ख कशाला म्हणता हे तुमच्या विचार करायच्या पद्धतीवर अवलंबून आहे. म्हणून एकदा पुन्हा नव्याने यावर विचार करून बघा स्वत:ला दु:खी ही बिरुदावली लावण्यापूर्वी सारासार विवेकबुद्धी व प्रामाणिकपणे स्वत:चे परीक्षण करून बघा -
१.        स्वत:मध्ये कोणते कोणते चांगले गुण आहेत त्याची यादी करा.
२.        स्वत:मधल्या दोषांची व मर्यादांची यादी करा.
३.        आपण अहंकारी तर नाही ना याचे पुन्हा एकदा परीक्षण करा. कारण अहंकार हा तुम्ही सुखी होण्यातला मुख्य अडसर असू शकतो!
४.        तुमच्या आयुष्यात पुढे येणार्या (तुमच्यासाठी) सकारात्मक अथवा नकारात्मक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का?
५.        या जगातली प्रत्येक व्यक्तीमत्व वेगळे वेगळे असते याची तुम्हाला जाणीव आहे का?
६.        आयुष्यात प्रत्येक गोष्टीला एक पर्याय व प्रत्येक समस्येला एक योग्य असे पर्यायी उत्तर असते यावर तुमचा विश्वास आहे का, आणि हा पर्याय स्वीकारण्याची तुमची मानसिकता आहे का हे  पुन्हा एकदा तपासून घ्या.
७.        प्रत्येक घटना जशी तुम्हाला दिसते तशीच नसून  त्या घटनेची दुसरीही काही बाजू असू शकते याचा आपण कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करता का?
८.        आपल्या अवास्तव अपेक्षांचे ओझे तुम्ही कोणावर लादत तर नाही ना?याबद्दल कधी विचार केला आहे का?
९.        तुम्ही आपल्या आजूबाजूला वावरणार्या माणसाना ते तुमच्या मताप्रमाणे वागतील /बोलतील असे गृहीत धरता का?
१०.     आयुष्यात हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणे बऱ्याचदा शहाणपणाचे असते या उक्तीवर आपला विश्वास आहे का?
११.     जी परिस्थिती समोर आहे ती बदलणे (काही मर्यादेनंतर) तुमच्या हातात नसते याची तुम्हाला जाणीव आहे का?
१२.     आपण दुसऱ्या व्यक्तीबरोबर जसे वागतो /बोलतो तसेच इत्तर तुमच्याबरोबर वागले/बोलले तर तुम्हाला चालेल ना? एकदा तपासून बघा.
१३.     प्रत्येक परिस्थिती ही त्या त्या वेळेपुरती असते.पुढे ती निश्चितपणे बदलणार असते.त्यामुळे उतावळेपणाने कोणताही निर्णय घेणे आततायीपणा ठरू शकतो! यावर तुमचा विश्वास आहे का?
१४.     तुमच्यामधले गुण अथवा दोष  आजूबाजूच्यांना त्रासदायक तर होत नाहीत ना? एकदा त्या पद्धतीने विचार करून बघा.
    तर आत्मपरीक्षण ही सुखाकडे वाटचाल करण्यातली पहिली पायरी आहे! आपण ज्या प्रकारे वागतो विचार करतो त्यामुळे आपण कुणासाठी दु:खाचे कारण तर होत नाही ना हा विचार स्वत: सुखाची अपेक्षा करणार्याने प्रथम करायला हवा.असा विचारच तुम्ही स्वत:ला  व इत्तराना सुखी करण्यासाठीचे पहिले पाऊल आहे!
  स्वत:मधले दोष दूर करणे तेव्हढे सोप्पे निश्चितच नाही. डोळसपणे अथक प्रयत्न केल्यानंतरच हे साध्य होऊ शकेल. पण स्वत:च्या  व इत्तर माणसांच्या दुख:चे कारण असलेले आपले  दोष प्रयत्नपूर्वक दूर करणेच श्रेयस्कर ठरेल.काही त्रासदायक सवयी बदलणेच योग्य ठरेल.
  माझ्या माहितीमध्ये एक गृहस्थ्य आहेत.ते भल्या पहाटे उठतात व सोसायटीच्या मंदिरात जातात.तेथील घन्टा जोरजोरात वाजवतात तसेच मोठ्या भसाड्या आवाजात भजने म्हणतात त्यांचे काही समवयस्क ही त्यांचेबरोबर असतात. आपण करत असलेल्या प्रचंड देवपूजेमुळे त्यांना मोक्ष मिळणारच असा त्यांचा ठाम विश्वास आहे. जोरजोरात घंटानाद व भजने यांमुळे सोसायटीत रहाणारे रुग्ण,लहान मुले,रात्रपाळी करून नुकतेच घरी पोहचलेले रहिवाशी यांचे मनस्वास्थ्य आपण वेठीला धरतोय व आपल्याला लाभणार असलेल्या संभाव्य सुखापायी अनेक जणांच्या दुख:चे कारण होत आहोत हे त्यांच्या गावीच नसते! अशा देवापुजेने मोक्ष तर दूरच पण शिव्याशापच मिळणार!
   तर इत्तरांना जर आपण सुख देऊ शकत नसू तर निदान त्यांच्या दु:खाचे कारण तरी होऊ नये एवढे तारतम्य तरी सुखाची अभिलाषा असणार्याने ठेवायला हवेच. आहे त्या परिस्थितीचे योग्य मूल्यमापन करून त्याच स्वीकार केला गेला तर त्यामधले सुखाचे क्षण वेचणे अवघड निश्चितच नाही!
  आता मूळ मुद्दा- हे सुख सुख म्हणतात ते नक्की काय असत?तर असे म्हणता येईल कि तुम्ही सुखी आहात का दु:खी आहात हे ठरवणे तुमच्या वृत्तीवर अवलंबून आहे! तुम्ही स्वत:ला सुखी समजायला लागला तर तुम्ही नक्कीच सुखात असणार तुम्ही स्वत:ला दु:खी समजून रडत बसला तर सुख कशा कशात आहे हे कधीच तुम्हाला कळू शकणार नाही. कविवर्य मंगेश पाडगावकर यांची एक कविता आहे-
पेला अर्धा भरला आहे,
अस सुध्दा म्हणता येत.
पेला अर्धा सरला आहे,
अस सुध्दा म्हणता येत.
सरला आहे म्हणायचं
की भरला आहे म्हणायचं?
तुम्हीच ठरवा.
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की
गाण म्हणत?
तुम्हीच ठरवा.
  तुम्ही सुखी आहात,समाधानी आहात,यशस्वी आहात,आनंदी आहात हे समजणे आणि तसे तुम्ही  होणे हे सर्वस्वी तुमच्या विचारासरणीवर अवलंबून आहे.आपल्या सुखाच्या कल्पना वास्तवावर घासून बघितल्या की सुखाबाबत आपण जमिनीवर राहून विचार करू लागतो.
   मोठी स्वप्ने माणसाला कायमच खुणावत असतात आणि सर्वांगीण प्रगती साठी मोठी स्वप्ने पहायलाही हवीत पण मोठ्या स्वप्नांमागे धावताना आपल्याकडील हातात असलेल सुख तर निसटत नाही ना?याच भान ठेवणे आवश्यक आहे.माझ्याकडे जे आहे ते सत्य आहे व ते माझे आहे त्यातून, ते मिळवताना समाधान मिळाले आहे,आनंद मिळाला आहे किंवा मिळणार आहे,हे समाधान व आनंद हेच खरे सुख आहे.या वास्तवाचा स्वीकार करण्याची सवय लावली की तुम्ही सुख तुमच्याकडे धावत आहे. कारण सुख कशात मानायचे हे तुमच्या विचार करायच्या पद्धतीवर अवलंबून आहे.माणसाला हवे असलेली प्रत्येक गोष्ट आयुष्यात मिळेलच असे नाही पण याचा अर्थ जे काही मिळाले आहे तेही काही कमी नाही ही विचारसरणी तुम्हाला एका आनंदी मानसिक अवस्थेकडे घेऊन जाते आणि ही मानसिक अवस्थ्या म्हणजेच सुख!
  एकदा या दृष्टीने विचार करायला सुरुवात तर करून बघा!!!!!!!!
                                                .................प्रल्हाद दुधाळ.
                                                           ९४२३०१२०२० . 
प्रकाशित - विचार परिवर्तनाचा ई दिवाळी अंक २०१४.
  

    

Wednesday, December 18, 2013

मयत.

                            मयत.
      रात्रीचे अकरा वाजलेले.पोटात चार घास ढकलून हळू हळू नेहमी च्या ठिकाणी टोळक जमू लागल. चौकडीचा तसा रिवाजच होता.दिवसभर पोटासाठी वणवण करून घराकडे निघता निघता रस्त्यातल्या देशी बारमध्ये दोन ग्लास ढकलायचे,घरी जाऊन घरच्यांची वटवट ऐकायची.सगळ सहनशक्ती च्या पलिकड गेल की हळूच नाक्याकडे निघायचं. वस्तीपासून थोड बाजूला रस्त्याच्या कडेच्या बस स्टाप च्या बाकड्यावर हा चौकडीचा अड्डा दररोज जमायचा! जीवाभावाचे चार दोस्त तिथे भेटायचे.एकमेकाची थोडी टिंगल टवाळी करायची.गप्पा झोडायच्या.दिवसभरातल्या गमती जमती सांगितल्या जायच्या.डोक्यातली अक्काबाई उतरत आली की जांभया देत घराकड निघायचं.सगळ जग झोपल की घरी येऊन पडवीत झोपायचं.पक्याचा हा दररोजचा दिनक्रम होता.दिवसभरात कमाई जरा बरी झाली असली तर या टोळक्याची थोडी जास्तीची ऐश व्हायची. आजचा दिवसही तसाच होता. पक्याबरोबरच शिरपा,दिलपा व यशवंता यांची ही चौकडी आजूबाजूला प्रसिध्द होती.त्याच कारणही तसचं होत, परिस्थितीने फाटके असले तरी त्यांच्यातली  माणुसकी जिवंत होती.कुणालाही अडचणीच्या प्रसंगी ही चौकडी मदतीला धावत असे. आजचा दिवसही तसाच होता! सगळ्यांनी आज बऱ्यापैकी डोक्यात  टाकलेली होती.एक एक जण अड्ड्यावर जमा झाला. हसण्या खिदळण्याला बहार आला होता. तेव्हढ्यात पलीकडील मैदानातून रडण्याचा आवाज आला. चौकडीच्या तोपर्यंत मैदानातल्या नवीन पडलेल्या पालाकडे लक्षच गेल नव्हत! पालाच्या बाजूनेच रडण्याचा आवाज येत होता. अंधार होता त्यामुळे शंभरेक मिटरवर असलेल्या या पालाकड गेल्याशिवाय कोण रडतय हे कळण्यास मार्ग नव्हता. चौकडीतल्या शिरपा ने सर्वाना पालाकडे चालायची सुचना केली.तसा तो या चौकडी चा लीडर होता.
  पालाच्या जवळ गेल्यावर दिसले की एक माणूस तिरडीवर ठेवलेल्या प्रेताकडे पाहून रडत होता.बाजूला एक बाई डोक्यावर पदर घेऊन दोन पायावर मुसमुसत बसली होती. प्रेत तिरडीवर बांधलेल्या स्थितीत होते.सफेद कापडात गुंडाळलेले  प्रेत,प्रेताच्या कपाळावर कुंकू फासलेल,प्रेताच्या तोडात कसला तरी बोळा.
पांढरे कापड अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत घट्ट बांधलेलं.आजूबाजूला अंधार.दूरच्या रस्त्यावरचा दिवा व मडक्यात भरण्यासाठी पेटवलेल्या धुर टाकणार्या गोवऱ्या यांचाच काहीसा उजेड! अगदी भयानक देखावा होता तो!
“काय झाल व पावन ?”
शिरपाने बाजूला बसलेल्या माणसाला विचारले. माणसाला हुंदका फुटला.
“शेट बघा ना माझ्या म्हातारीन दुपारी प्राण सोडला.आता मसणवटीत न्यायचं पण मी एकटा कसा नेऊ? आजच इथ पाल टाकल अन हे घडल! तुम्ही देवासारख आला बघा. आता तुम्हीच मदत करा. मी तिरडी बांधलीया.नदीकाठी सरपाण पण रचून आलोय पण खांदा द्यायलाच कुणी नाही.तुम्ही  फकस्त खांदे द्या म्हणजे म्हातारीच क्रियाकर्म तरी व्हइल नाय तर काय करू मी?लय उपकार होतील बघा.”
शिरपा ला परिस्थिती च भान आल.
आता चौकडी मधले समाजसेवक जागे झाले होते!
शिरपाने परिस्थिती चा ताबा घेतला.पक्या दिलपा पुढे व यशवंता व स्वत: मागे असे खांदे द्यायचे ठरले.माणसाच्या डोक्यावर घोंगड्या ची खोळ करून घातली.त्याला मडक्यात पेटत्या गोवऱ्या टाकून शिकाळे करून दिले व पुढे चालायला सांगितले. बरोबर इत्तर सामानाची पिशवी सुद्धा दिली.
“माग अजाबात बघायचं नाही.” माणसाला शिरपाने बजावले.
  “राम नाम सत्य है.” चा आवाज चौकडीन दिला. तिरडी उचलली व ही प्रेतयात्रा निघाली. मडके घेऊन माणूस पुढे व त्यामागे हे चौघे तिरडी घेऊन निघाले.पुढच्या बाजूला पक्या व दिलपा व मागे बाकी दोघे.
पक्याच लक्ष प्रेताच्या चेहर्याकडे होते. प्रेताचे लालभडक तोंड भयानक दिसत होते.पुढे मडकेवाला माणूस प्रेतयात्रा निघाली. पक्याला अचानक कसला तरी आवाज आला.
“चू चू “
पक्याला वाटलं भास झाला असेल. पुन्हा तसाच आवाज भास नक्कीच नव्हता! तो गपकन थांबला.अचानक थांबल्यामुळे बाकी तिघे परेशान!
दिलपा गुरकला “ये का थाबतो रे?”
पक्या ला घाम फुटलेला.आवाजाच्या दिशेने पक्याने दिलप्याला खुणावले.
“चू चू”
पुन्हा आवाज!
मागे न बघितल्यामुळे मडकेवाला माणूस बराच पुढे गेलेला!
पुढचे दोघे का थांबले म्हनून मागचे दोघे चिडलेले अंधारात प्रेत अजूनच भयानक दिसत होते.
पुन्हा आवाज
“चू चू “
आता मात्र पक्या व दिलापाची पूर्ण उतरली होती!
“आयला म्हातारी जिवंत तर नाही?”
दिलपा कुजबुजला.
पक्याची भीती ने गाळण उडालेली.
“आवाज नक्कीच प्रेतातून येतोय”
पक्याची तर खात्रीच झाली होती!
मागचे दोघे हे सारखे थांबतात का म्हणून पुढच्या दोघांना शिव्या देऊ लागले!
आता पक्याला वाटायला लागले कुठून दुर्बुद्धी झाली आणि खांदे द्यायला आलो. म्हातारी जिवंत असली तर काय ? का हा भुताटकीचा प्रकार आहे? त्या मडकेवाल्याला विचारायचे तर मडकेवाला तर बराच पुढे गेलेला.माग बघू नको सांगितल्यामुळे तो पुढे पुढेच चाललेला! पायातले त्राण गेल्यासारखे वाटत होते. मागचे दोघे सारखे करवादत होते.पक्याने विचार केला या दोघांना जर कळाले तर पळूनच जातील. काय करावे कळत नव्हते.हळू हळू पुढे चालणेच योग्य असा विचार करून घाबरत मधेच म्हातारीच्या तोंडाकडे बघत पुढे निघाले.
कसे बसे थांबत थांबत प्रेतयात्रा नदीपर्यंत आली.
तिरडी खाली ठेवल्याबरोबर शिरपाने पक्याचे गचुन्डेच पकडले.
“कशाला थांबत थांबत चालत होता रे ? साल्या काय मस्करी लावली होती?”
शिरपाच्या हाताला पक्याला फुटलेला घाम जाणवला.
“काय झाल रे?”
पक्याने प्रेताकडे बोट दाखवले.
“अरे म्हातारी जिवंत आहे बहुतेक.आवाज येतोय कसला तरी!”
आता चौघांनीही अंदाज घेतला
“चू चू चू चू “
आता मात्र चौकडीची घाबरगुंडी उडाली.
दुसऱ्या बाजूला असलेल्या मडकेवाल्या माणसाला काहीतरी गडबड झाली असल्याचे जाणवले
मडके बाजूला ठेऊन खोळ सावरत तो जवळ आला.
“काय झाल हो भाऊ?”
मडकेवाल्या माणसाने घाबरून विचारले.
“काय रे म्हातारी नक्की मेलीय ना? तिरडीतून आवाज कसा काय येतोय!
“ अरे तो आवाज व्हय?”
मडकेवाला हसायला लागला!
“अरे भाऊ तुम्ही मर्दासारखे मर्द, अन अस घाबराया काय झाल?”
हसत हसत त्याने प्रेताच्या डोक्या जवळचे कापड बाजूला केले!
चूSS चू S करत एक कोंबडीच पिल्लू बाहेर आले व पळायला लागले.
“अवो  भाऊ आमच्या जमातीत माणूस मेला की त्याच्या तिरडीमध्ये कोंबडीच पिल्लू बांधायची रीत आहे. अस केल्याने माणूस स्वर्गात जातो अस म्हणतात. कशापायी एवढ घाबरायचं म्हणतो मी ?”
“चला आता प्रेताला अग्नी देऊ!!!!!!”
चौकडी चे चेहरे पहाण्यासारखे झाले होते!
                                  ................प्रल्हाद दुधाळ.

   

Sunday, November 3, 2013

एका ’पक्या’ची दिवाळी……

एका ’पक्या’ची दिवाळी……
धुरळा उडवत यस्टी आली आणि थांब्यावर करकचून ब्रेक मारत थांबली.इतका वेळ झाडाखाली पेंगुळलेल्या पक्याने सदऱ्यावरची माती झटकून आशेने यस्टी च्या दरवाजाकडे पाहिले.या शेवटच्या यस्टीतही भाऊ आलेला नसल्याच  पाहून पक्याच तोंड अजूनच सुकल. सकाळपासून जेवढ्या गाड्या थांबल्या त्यामध्ये त्याने भावाला शोधला पण तो काही दिसला नाही.दिवाळी सुरु झाली होती. आठवडाभर मेहनत करून पक्यान कळकाच्या कांब्या तासून आकाशदिवा तयार केला होता.त्याला रंगीत कागद चिकटवायला कागद आणायचा होता. गव्हाच्या पिठाची खळ पण करायची होती .
 त्याने आईला पैसे मागितलं तर पाठीत जोरात धपाटा मिळाला होता.दिवाळीला भाऊ आला की तो आकाश कंदील तयार करणार होता.दिवाळीला भावाकडून नवे कपडे,फटाके अन मिठाई हे सगळ यावर्षी तरी नक्की मिळेल अस त्याला वाटत होत. गेल्या दोन दिवाळ्यांना भाऊ आला नव्हता. आईन दोन्ही वर्षी फक्त कापण्या करून दिवाळी केली होती.पक्यान आजूबाजूच्या पोरानी वाजवलेल्या व फुसक्या निघालेल्या लवंगी फटाक्यांची दारू काढून पेटवली व आपली फटाक्यांची हौस भागवली होती. शाळेत घालायचे जुने कपडेच धुवून तांब्याने इस्त्री करून घातले होते.यंदा भाऊ दिवाळीला येणार असल्याचे आई कुणाला तरी सांगताना पक्यान ऐकल होत त्यामुळे तो सकाळपासून रस्त्यावर येणारी प्रत्येक गाडी बघत होता.शेवटच्या गाडीतही भाऊ दिसला नाही हे बघून पक्याला तर रडायलाच आल. वाडीतल्या जवळ जवळ सगळ्या घराचे चाकरमानी दिवाळीला घरी आले होते. यस्टीतून उतरणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आनंद होता.मुंबईला कामाला असलेली बरीच मंडळी काहीबाही घेऊन आली होती.बऱ्याच घरात चाकरमान्याने आपुलकीने आणलेल्या नव्या कपड्यांच्या व मिक्स मिठाईच्या पिशव्या खोलल्या होत्या. एरवी सुनसान असलेल्या वाडीत हळूहळू चैतन्य पसरत होत. पक्यान सकाळी सकाळी आईच नव्या कपड्यावरून डोकं खाल्ल होत. आईन डोळ्याला पदर लाऊन बहुतेक आज भाऊ कपडे घेऊन येईल असे सांगितले होते त्यामुळे सकाळपासूनच तो रस्त्यावरच्या मातीची पर्वा न करता वाट पहात होता; पण शेवटची गाडी गेली आणि पक्याच अवसान संपलं. पाय ओढत तो कसाबसा घराकडे निघाला.अंधार होऊ लागला होता. रस्त्यात धुराबाच घर लागलं. कालच त्याचा मिलिटरीत असलेला भाऊ आला होता.धुराबा नवे कपडे घालून भुईनाळा पेटवत होता. जवळ भरलेली फुलबाजाची पिशवीही होती. धुराबा पक्याचा वर्गमित्र; पण आज त्याला पक्याकड लक्ष द्यायला वेळ नव्हता.पक्याच्या घरातन बुंदी तळताना येतो तसा वास येत होता. पक्यान धुराबाकड आशाळभूतपणे पाहिले पण तो आपल्याच मस्तीत भुईनाळा लावण्यात मग्न होता. पक्या अजूनच केविलवाणा होऊन पुढे चालायला लागला. पुढच घर बाळूआबाच होत.या घरासमोरचे अंगण शेणाने सारवले होते. सासरी आलेल्या आबांच्या मुलीने दारात झकास रंगीत रांगोळी काढली होती. कळकाच्या बांबूवर मोठा आकाशदिवा ऐटीत लावला होता. घरात भरपूर गडबड चालली होती. आपल्या दिवाळीचे कसे होणार हा विचार मनात येताच पक्या पुढे निघाला. रस्त्याने चालताना प्रत्येक घरात व घराबाहेर चाललेला दिवाळीचा जल्लोष पाहून पक्या अधिकच निराश होत होता.सगळी वाडी आनंदात हसत खिदळत असताना आपल्याच घरी अशी परिस्थिती का? हे अडनिड वयाच्या पक्याला समजत नव्हते. आपल्याला आपली आई जमेल तेवढे कष्ट करून शाळेत पाठवते याची पक्याला जाणीव होती; पण आपल्याच नशिबाला हे असे भोग का?  हा प्रश्न मात्र कायम त्याला छळत राहायचा. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तर त्याला आपल्या या कमनशिबाबद्दल नव्याने चीड निर्माण झाली होती. वडील लहान असतानाच गेलेले, ज्यांच्यावर भविष्याची भिस्त होती त्या मोठ्या भावाने त्याच्या लग्नानंतर गाव व घराकडे फिरवलेली पाठ. बहिणीच्या लग्नासाठी होती नव्हती ती शेती गहाण पडलेली आणि या सर्व परिस्थितीवर मात करून आपल्यासाठी खस्ता खाणारी आपली खंबीर आई! पक्याला लहान असूनही या सर्व गोष्टींची जाणीव होती. आपल्यासाठी आपली आई पहाटे उठून हाळीपाटी करून शेजारच्या गावात भाज्या विकते, दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करते, गोधड्या शिवून देते, कुरडया व शेवया वळून देते.या सर्व कामातून येणाऱ्या मोबदल्यातून कसाबसा दोघांचा घास मिळतो हे पक्याला माहीत होते; पण आपल्या घरी साधी दिवाळीसुद्धा साजरी करता येऊ नये म्हणजे काय?
तिरमिरीत आतल्या आत रडतच पक्या घराकडे निघाला. आपल्या काडाच्या झोपडीजवळ आला तेंव्हा त्याला कापण्याचा खमंग वास आला. घरासमोर सडा टाकलेला होता. दरवाजात पक्याने आधीच तयार केलेल्या एरंडाच्या बियांचा दिवा लावला होता.
आई चुलीवर ठेवलेल्या तव्यातून धपाटे भाजून काढत होती.परातीत लालभडक कापण्या तळून नुकत्याच ठेवल्या होत्या.आईच्या चेहऱ्याकडे पाहून पक्याचा राग कुठल्या कुठे गेला त्याने आईला मागून विळखा घातला.मायेने आईने पक्याला कापण्या आणि धपाटे खाऊ घातले.सकाळपासून उपाशीतपासी राहून शिणलेल्या पक्याच्या तोंडावर कापण्या व धपाटे खाऊन तरतरी आली. ग्लासभर पाणी पिऊन पक्याला एकदम बरे वाटले.
  पक्या विचार करू लागला या परिस्थितीमधून फक्त आपणच मार्ग काढू शकतो.आईची इच्छा पूर्ण करून शिक्षण घ्ययाला हवे. होईल तेव्हढी तडजोड करून कुणाला उगीच दोष न देता जे भोग आपल्या नशिबात आहेत त्यांना हसतमुखाने सामोरे जायला हवे.त्याने निश्चय केला, बास, आता नशिबाला दोष नाही द्यायचा! आपले नशीब आपणच बदलू शकतो! शिकायचे! पडेल ते कष्ट करायचे, प्रगती करायची जमेल तेव्हढी इत्तरांना मदत करायची.त्या रात्री  पक्याला एकदम शांत झोप लागली.स्वप्नात त्याने धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली स्वत:साठी आणि आईसाठी भरपूर कपडे खरेदी केली. फटाक्यांची आतषबाजी केली.भरपूर पंचपक्वान्ने खाल्ली. त्याची आई पूर्ण गावाला सांगत होती-
"माझ्या कष्टाचे चीज झाले.पक्याने माझे नाव राखले.पुत्र असावा तर असा!"
पक्याला सकाळी जाग आली.एकदम हलके वाटत होते.भराभर घरातली कामे उरकून तो शाळेत गेला. भरपूर अभ्यास करू लागला.त्याला आईची इच्छा पूर्ण करायची होती ..........
...........प्रल्हाद दुधाळ.
            ९४२३०१२०२०.

Friday, October 25, 2013

रोखठोक.


              रोखठोक.  
         काही माणसे मनात येईल ते बोलून टाकतात.राग,लोभ जे व्हायचे ते होऊ दे असा विचार करून जी काही  मनातली भावना असेल ती रोखठोक बोलतात. अशा स्पष्ट वक्तेपणामुळे समोरचा माणूस  दुखावला तरी त्याची ते पर्वा करत नाहीत. जे खरे आहे ते बोलल्यामुळे किंवा वास्तव समोर ठेवल्यामुळे जरी तात्पुरता वाईटपणा आला. तरी तो घेण्याची अशा माणसांची तयारी असते. अशा प्रसंगी ऐकणाऱ्याला जे आहे ते जरी कटू असले तरी सत्य काय आहे हे माहीत होते. गप्प राहून किंवा गुळमुळीत उत्तर देऊन वेळ निभावून नेण्याच्या भागुबाई  वृत्ती पेक्षाहा रोखठोकपणा शत पटींनी चांगला.यातून फार तर आजचा दिवस निभावला जातो. पण आज ना उद्या सत्य समोर येते व केवळ वाईटपणा घ्यायला नको म्हणून केलेला खोटेपणाही उघड होतो. अशा केलेल्या खोटेपणामागे बऱ्याच वेळा तात्कालिक स्वार्थ असतो! अशा प्रसंगी परस्परात गैरसमज वाढू शकतात. खरे तर योग्य वेळी खरी परिस्थिती समोर ठेवली तर समोरचा माणुसही जमिनीवर राहून विचार करू शकतो.जे आहे त्यांचा स्वीकार करून पुढची वाटचाल करू शकतो. पण ......

                  पण नाही म्हणायला जे धैर्य लागते ते सर्वांपाशी कुठे असते?

                असे रोखठोक वागण्याची तेव्हढीच मोठी किंमतही मोजावी लागेल या जाणीवेने व भित्रेपणामुळे लोक असा वाईटपणा घेत नाहीत!  

Tuesday, October 8, 2013

विवाहोत्तर नात्यांचे संगोपन.


विवाहोत्तर नात्यांचे संगोपन.

 

                  भिन्न वातावरणात वाढलेले ते दोघे जेंव्हा लग्नानंतर पती-पत्नी च्या भूमिका साकारायला लागतात तेंव्हा बऱ्याचदा एकमेकाला समजून घेताना अडचणी येऊ शकतात. लग्नानंतर पती-पत्नी मधील नात्यांचे योग्य संगोपन होणे आवश्यक असते.एकमेकांना समजून घेताना वयक्तिक अवकाशाचा योग्य तो आदर ठेऊन काही घेण्याबरोबरच काही देण्याची मानसिक तयारी ठेवायला हवी. मी च्या जागी आम्ही यायला हवा.पती-पत्नी या नात्याबरोबरच दोघांच्याकडील कुटुंबे ही एकमेकाशी जोडली जातात. सख्ख्या नात्यागोत्यांबरोबरच चुलत/मावस नातेसंबंधही सांभाळावे लागतात. काही नाजूक नाती ही काचसामानाप्रमाने जपावी लागतात. नातेसंबंध सांभाळताना बऱ्याचदा अनोळखी घरात नुकत्याच आलेल्या नववधूला तारेवरची कसरत करावी लागते. लग्न करताना त्यानंतर कराव्या लागणार्या अशा तडजोडींचा जर आधीच विचार व मानसिक तयारी केलेली असेल तर गोष्टी सोप्या होऊन जातात, पण संपर्कात येणारी  व्यक्ती जर विनाकारण वाकड्यात घुसणारी, नकोसे रिमार्क पास करणारी किंवा टोमणे मारणारी असेल तर उमलण्यापूर्वीच अशी नाती कोमेजू शकतात. घरात आलेल्या नववधुला जर पहिल्या दिवसापासूनच मानापमानाच्या तराजूत तोलले जात असेल तर घरातील वडीलधार्या माणसांनी हस्तक्षेप करून योग्य ती जाणीव संबंधितांना देणे आवश्यक ठरते. नातेसंबंधातील पोषणासाठी घरातील प्रत्येकानेच समंजसपणे वागणे फायद्याचे आहे. प्रख्यात डॉ.ऋजुता विनोद यांच्या मते नवराबायकोचा  संसार यशस्वी होण्यासाठी त्यांच्या भावी  सुखी संसारात पती-पत्नी ही भूमिका जरी मध्यवर्ती असली तरी प्रसंगानुरूप वेगवेगळ्या भूमिका दोघांना साकाराव्या लागतात.-

 

                १.प्रियकर प्रेयसी भूमिका- ही पती-पत्नीमधील  सर्वात भावणारी भूमिका आहे .या भूमिकांमध्ये स्पर्धा ,अहंकार वा कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड यांना थारा नाही.केवळ निकोप प्रेम या नात्यात असते.एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी व उस्फूर्तता व प्रसंगी वेडेपणा या भूमिकांत असतो. या नात्यात खोडकरपणा आहे. काव्य आहे,रसिकता आहे , निरागसता आहे. मोकळ ढाकळ पारदर्शी असे हे नाते असते. लग्नानंतर काही दिवस केवळ याच भूमिका जगल्या जातात. हळू हळू जबाबदार्यांच्या जाणीवा वाढतात आणि या भूमिकांचा प्रभाव कमी होऊ लागतो व समंजस गृहस्थाश्रमाची सुरुवात होते. आयुष्यातील अनेक प्रसंगी या उत्कट नात्याची पुनरावृत्तीचे दर्शन होते.आनंदी व  सशक्त दांपत्य जीवनासाठी आयुष्यभर या उत्कट भूमिका पुन्हा पुन्हा जगायला हव्यात.एकमेकांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस,मैत्री दिवस, व्हालेंटाइन डे, असे स्पेशल दिवस मनापासून साजरे केल्यामुळे  नात्यांतले माधुर्य वाढते.

 

                २.बालक पालक भूमिका- या भूमिकांमध्ये दोघात वात्सल्याचे नाते असते.  एकामधल्या बालकाला दुसरा जोडीदार पालकाच्या भूमिकेतून सांभाळतो. वेगवेगळ्या प्रसंगी गरजेप्रमाणे एकाने पालकाची भूमिका बजावली तर अहंकारांपोटी येणारी नात्यांमधील कटुता टाळता येऊ शकते. एकमेकाना सांभाळून घेणे / समजून घेणे  या भूमिकांच्या अंतर्गत येते. एकदा का एकमेकांची मने ओळखायला येऊ लागली की एकमेकांना समजून घेणे ही सोप्पे होऊन जाते .आपल्या जोडीदाराच्या किंवा मुलांच्या  आजारपणात त्यांची योग्य ती सेवा,औषधोपचार व सुश्रुषा या भूमिकेतून केली जाते. दोघांपैकी कोणालाही कुठल्याही प्रकारची समस्या आली तर दुसऱ्याने पालकाची भूमिका स्वीकारून त्या समस्येचे निराकरणासाठी योग्य ती मदत करायला हवी. एकमेकांच्या यशाचे मनापासून कौतुक तर अपयशाच्या प्रसंगी आधार/धीर देणे हे या बालक पालक भूमिकेतूनच साध्य होते.

               “एक जोडीदार जर कुठे कमी पडत असेल तर दुसऱ्याने त्याला सावरायचे असते, सांडलेच काही एकाकडून चुकून-माकून तर दुसऱ्याने न रागावता पुन्हा भरायचं असते!

             असे एकमेकाला समजून उमजून तर घ्यायचंच पण घरातल्या वयोवृद्ध माणसांचे/तिच्या किंवा त्याच्या जन्मदात्यांचे संगोपन आपुलकीच्या भावनेने पालक या नात्याने दोघांनी मिळून करण्याची दांपत्याची भूमिका असायला हवी. आयुष्यभर पती-पत्नी दोघांनाही  कधी बालक तर कधी पालक या भूमिका साकाराव्या लागतात.

             या भूमिका साकारताना निव्वळ कर्तव्यभावना कामाची नाही. या भूमिका साकारताना  कर्तव्यभावने बरोबरच आपुलकी ओलावा असेल तर सहजीवनातला आनंद कितीतरी पटीने वाढतो.

 

                              .यजमान–गृहिणी भूमिका- पती-पत्नी नात्यामध्ये ही भूमिका व्यापक अर्थाने खूप महत्वाची आहे. एक कुटुंब म्हणून समाजात स्थिरता आल्यावर एकमेकांच्या साथीने  पती व पत्नी आपल्या महत्वकांक्षा साकारतात. स्वत:चे शिक्षण करिअर घडवतात.आपापल्या कामात प्रवीण होतात. उद्योग व्यवसायात जम बसतो. यजमान–गृहिणी भूमिका साकारताना मुलांचे पालनपोषण तसेच त्यांचेवर उत्तम संस्कार केले जातात. एकसंघ आदर्श कुटुंब म्हणून नावलौकिक मिळतो.एकमेकांच्या सुख दुख:त साथ दिली जाते. येथे ना उपकाराची भाषा असते ना कुणी कुणाचे ऋणाईत असते.एका समान पातळीवर येऊन आपल्या जोडीदाराला प्रोत्साहित करून मिळणार्या यशापयशाची जबाबदारी एकमेकासाठी घेतली जाते. उत्तम सहजीवनात या भूमिकांचा वाटा मोलाचा आहे.

 

               ४.मित्र-मैत्रीण भूमिका- नवदाम्पत्यांसाठी पती-पत्नी नाते यशस्वीपणे निभावण्यासाठी प्रथम एकमेकांचे मित्र होणे गरजेचे आहे. या भूमिकेत समजूतदारपणा असतो. मित्रत्वाच्या नात्याने एकमेकांवर विश्वास असायला हवा. परस्पर आदरभावना असायला हवी. अनेक जोडपी लग्नापूर्वी एकमेकांचे चांगले मित्र असतात. त्यानंतर ते प्रियकर-प्रेयसी चे  नातेही यशस्वीपणे निभावतात पण लग्नानंतर पती-पत्नी भूमिकेत गेल्यावर ही मैत्रीभावना दुरावते. खर तर असे घडायला नको. पती-पत्नी जेंव्हा मित्र-मैत्रीण भूमिकेतून आयुष्याकडे पहातात तेंव्हा संसाराचा स्वर्ग व्हायला वेळ लागत नाही.

 

              ५.गुरु-शिष्य भूमिका - नवरा-बायको एकमेकांचे गुरु शिष्यही  असू शकतात.

             आजच्या उच्च शिक्षित जोडप्यामध्ये वयक्तिक अहंकारापोटी विसंवाद होतांना दिसतात. प्रत्येकजण स्वत:ला शहाणा समजतो व सहजीवानातली मजा लुटायची सोडून एकमेकांवर कुरघोडी करणे सुरु होते. अशी  एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा खर तर  पतीदेव  पत्नीकडून तर कधी पत्नी पतीकडून काही नवे शिकू शकतात. एकमेकातल्या त्रुटी शोधण्यापेक्षा त्या त्रुटी दूर करून जीवन समृद्ध कसे करू शकतो यावर भर असायला हवा. गुरु शिष्याच्या भूमिका मनापासून साकारून अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या ज्ञानसागराचा लाभ घ्यायला काय हरकत आहे ? आपल्याला जे माहित आहे ते जोडीदाराशी वाटून घेऊन/देऊन  पती-पत्नी नातेसंबंध एका नव्या उंचीवर पोहोचू शकतात. अशा दांपत्यांची पुढची पिढी निश्चितच अत्यंत हुशार निपजेल.

               सुखी संसारासाठी प्रत्येक जोडीदाराने आपल्या वाट्याला आलेल्या व वेळोवेळी आवश्यकतेनुसार साकाराव्या लागणार्या वरील वेगवेगळ्या भूमिका मनापासून साकारल्या तर सहजीवनाची ही वाट आनंद सुख समाधान यांनी सजलेली असेल.


भिन्न भिन्न स्वभाव, समंजसाचा तेथे अभाव,

शब्दांचे घणाघाती घाव, कुचकामी असा संसार!

नसावी ती "ग" ची बाधा, महत्व सदैव सुसंवादा,

आत्मसन्मानास नको ठेच,  तोच सुखी संसार!

एक दुस-यास सावरावे, दोषांसहीत स्वीकारावे,

सुसंवादातुन साधणे हीत, आनंदी होईल संसार!

..........
प्रल्हाद कों दुधाळ.

                 ९४२३०१२०२०

              Blog-www.dudhalpralhad.blogspot.com