Sunday, February 16, 2014

नाही म्हणायला शिका!

                                                            नाही म्हणायला शिका!

   एक गोष्ट नक्की आहे की, जर माणसाला स्वत:बद्दल आत्मविश्वास असेल तरच तो इत्तरांवर विश्वास ठेऊ शकतो! मला असे वाटते की,जेंव्हा  कधी आपला कुणी नातेवाईक,मित्र,वा दररोज संपर्कात येणारा जवळचा माणूस एखाद्या गोष्टीबद्दल काही सांगतो,त्यावेळी अशा बोलण्यावर  विश्वास ठेवण्यापूर्वी  व त्याप्रमाणे वागण्यापुर्वी, त्या सांगितलेल्या गोष्टीबद्दल शहानिशा करायला हवी. याशिवाय त्याबद्दल आपल्या अंतर्मनाचा कौलही घेणे आवश्यक आहे, पण असे घडत नाही! खर तर कुणी एखादी गोष्ट करायला सांगीतली तरी ती करायची की नाही या बद्दल निर्णय घेण्यापूर्वी वा तो निर्णय घेतल्या नंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची,बऱ्या वाईट परिणामांची तसेच संभाव्य फायदे अथवा तोट्यांची जाणीव प्रत्येकाला असायलाच हवी.एखाद्यावर अंधपणे विश्वास ठेवणे आयुष्यभरासाठी अडचणीचे होऊ शकते!
      साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की,समोरच्या व्यक्तीवर अजिबात विश्वासच ठेवायचा नाही की काय? प्रत्यक्ष जीवनात समोरच्या व्यक्तीवर असा अविश्वास दाखवणे सोपे आहे का? मला वाटते की, अशावेळी समोरच्या व्यक्तीवर सरळपणे अविश्वास न दाखवता सौम्य भाषेत विचार करण्यासाठी वेळ मागून घेणे केंव्हाही चांगले! अशामुळे होते काय की,त्या जवळच्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीबाबत शांतपणे विचार करता येतो.त्या बाबीमुळे  होणारे संभाव्य नुकसान आपण टाळू शकतो.जनलज्जा व भिडेखातर कोणतीही चिकित्सा न करता कुठल्याही बाबतीत अतिविश्वास ठेवला तर बऱ्याचदा आपल्या पदरी नको तो  मनस्ताप व निराशा येऊ शकते,म्हणून आयुष्यात अशावेळी थोडासा वाईटपणा घेऊन,योग्य तेथे स्पष्ट भाषेत नकार द्यायला शिकणे अत्यंत आवश्यक आहे! अशाप्रकारे विचारपूर्वक निर्णय घेतल्यानंतर सहसा पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.आपल्याला प्रश्न पडला असेल की हे ज्ञान मला कुठून मिळाले?आणि ते मी येथे का पाजळतो आहे? हा प्रश्न अगदी साहजिक आहे,तर आता सांगायला हरकत नाही की ही अक्कल मी विकत घेतलेली आहे! शहाणपणा अनुभवातुन आलेला आहे! बाबतीत मला आलेले अनुभव अजून काही लोकांनाही आलेले असतील आणि त्यावरून कुणाची होणारी संभाव्य फसवणूक तरी टाळली जाईल!
     तर, एकदा माझा एक ऑफिसमधील सहकारी माझ्याकडे आला.त्याने माझ्यासाठी एक फॉर्म आणला होता. तो फॉर्म कुठल्यातरी इन्स्युरंस कंपनीचा होता.त्याने त्या स्कीमबद्दल व त्यानंतर मला होणाऱ्या संभाव्य फायद्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.त्या स्कीम प्रमाणे मी फक्त तीन हजार रुपये एकदाच भरायचे होते व त्या बदल्यात मला कंपनी कडून तीन हजार रुपये किमतीचे साबण,तेल,पेस्ट इत्यादी रोजच्या घरगुती वापराच्या वस्तू डिस्काऊंट वर मिळणार होत्या! शिवाय माझा एक लाख रुपयांचा जीवनभरचा अपघात विमा ती कंपनी देणार होती.या फायद्याशिवाय जर मी त्या प्रकारचा फॉर्म आणखी कुणाला दिला व एक ग्राहक मिळवून दिला तर कंपनीकडून मला एक हजार रुपये परत मिळणार होते! ज्याने माझ्याकडे ही स्कीम आणली तो माझा सहकारी अगदी दररोजच्या संबंधातला असल्यामुळे मला त्याला नाही म्हणता आले नाही आणि भिडेखातर मी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तीन हजाराचा चेक त्याला दिला.आठ-दहा दिवसातच मला एक ब्रीफकेस घरपोच मिळाली! त्यामध्ये मी आयुष्यात कधीही न पाहिलेल्या ब्रांड च्या वेगवेगळ्या वस्तू भरलेल्या होत्या.
याशिवाय स्कीम मध्ये कबुल केल्याप्रमाणे अपघात विमा प्रमाणपत्रही होते.केवळ भिडेखातर केलेल्या या व्यवहारामध्ये मला दिलेला फॉर्म मी न वाचताच सह्या केल्या होत्या.येथे मी माझ्या त्या सहकाऱ्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवला होता.नंतर लक्षात आले की मिळालेल्या वस्तू या अगदीच सुमार दर्जाच्या होत्या! विम्यासाठीच्या अटी व शर्ती अत्यंत फसव्या स्वरूपाच्या होत्या.याशिवाय या विम्याचे दर वर्षी नुतनीकरण सुध्दा करणे आवश्यक होते! आपण आपल्या अगदी जवळच्या माणसाकडून अत्यंत पद्धतशीरपणे फसवले गेलो आहे याची आणि याबद्दल भिडेखातर गप्पही राहावे लागणार असल्याची जाणीव होईपर्यंत उशीर झाला होता! थोडक्यात तोंड दाबून बुक्क्यांचा मारअसा तो प्रकार होता. आपल्याला फसवले गेले व आपण अगदी सहजपणे फसलो गेलो या गोष्टीचा अर्थातच खूप मानसिक त्रास झाला! पण एका अनुभवाने शहाणा झाला तर माणूस कसला! हा अनुभव पुरेसा नव्हता की काय कोण जाणे, म्हणून वेळोवेळी अशाच प्रकारे अनेक मित्रांकडून व अगदी जवळच्या माणसांकडून   विविध मल्टीलेवल मार्केटिंग व आभासी फायद्याच्या योजना मला सांगितल्या गेल्या व भाग घेण्याबद्दल गळ घातली गेली व यांना कसे काय नाही म्हणायचे?या भिडेखातर मी पुन्हा पुन्हा फसत राहिलो!स्वभावात असलेला मुखदुर्बळपणा कायमच मला संकटात ढकलत राहिला! असे अनेक आर्थिक व मानसिक फटके बसल्यानंतर मी एकदाचा नाहीम्हणायला शिकलो! थोडक्यात मी आता जो शहाणपणा तुम्हाला शिकवतो आहे त्याची अक्कल मला हजारो रुपयांना विकत घ्यावी लागली आहे! अशा प्रकारच्या नवनवीन फसव्या स्कीम मार्केटमध्ये येत असतात.त्याचे पद्धतशीरपणे मार्केटिंग केले जाते.आपल्या अगदी जवळचा माणूस त्या जाळ्यात ओढला जातो व पुढच्या टप्प्यातील चेनसाठी तो तुमची निवड करतो! ती स्कीम त्यालाही अर्धवटच माहीत असते पण तो पोटतिडकीने तुम्हाला त्यातून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल सांगत असतो! कंपनीचे डायरेक्टर्स म्हणून अनेक नामांकित लोकांची यादी दाखवली जाते.आत्तापर्यंत फायदा झालेल्या लोकांची भली मोठ्ठी यादी यावेळी वाचून दाखवली जाते.पंचतारांकित हॉटेलमध्ये तुम्हाला बोलावले जाते.आकर्षक पेहरावातल्या मधाळ बोलणाऱ्या कंपनी च्या रिप्रेझेंटेटिवज् कडून अत्यंत लाघवी भाषेत तुमचे स्वागत केले जाते.स्कीम बद्दल अत्यंत आकर्षक प्रेझेन्टेशन ऑडीओ व विडीओज च्या स्वरूपात सादर केले जाते.डायरेक्टर बोर्डावर असलेल्या मोठ्या मोठ्या लोकांची नावे पाहून नाही म्हटले तरी स्कीमवर तुमचा विश्वास बसतो.साखरपेरणी करून होणाऱ्या संभाव्य फायद्यांचे अत्यंत आकर्षक गाजर दाखवले जाते.तेथील एकूण भपकेबाज  वातावरण पाहून तुम्ही कंपनी च्या जाळ्यात अलगद फसता.एखादी रिस्क घ्यायला काय हरकत आहे? असा विचार करून तसेच जी व्यक्ती तुम्हाला तेथपर्यंत घेऊन गेलेली असते त्याचे मन राखण्यासाठी तुम्ही त्या स्कीम मध्ये भाग घेता.कधी कधी अशा स्कीम्स मध्ये हजारो रुपये कर्ज काढून गुंतवले जातात.अशा स्कीम्स मध्ये सुरुवातीला काही लोकांना फायदाही झालेला असतो त्यांचे बँक पासबुक पाहून मोठया विश्वासाने तुम्ही तेथे गुतंवणूक करता.येथे तुमची आर्थिक गुंतवणूक असतेच पण एक नवे स्वप्नही तुम्ही विश्वासाने खरेदी केलेले असते! जेंव्हा तुम्ही अशा स्कीम मध्ये फसले गेल्याचे लक्षात येते तेंव्हा आर्थिक नुकसानीबरोबरच तुमचा विश्वासघातसुध्दा झालेला असतो! पण वेळ गेलेली असते ज्या व्यक्ती मार्फत तुम्ही या जाळ्यात फसलेला असता ती एक तर तुमच्या अतिशय जवळची असते शिवाय अनेकदा या फसवणुकीची ती व्यक्ती सुध्दा शिकार झालेली असते!
  मल्टी लेवल मार्केटिंग हे केवळ एक उदाहरण झाले,पण आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा आपण केवळ ‘वाईटपणा घ्यायला नको’ म्हणून मनाविरुध्द निर्णय घेत असतो! कधी कुणाला विश्वासाने सांगितलेल्या गुपिताचा तुमची अगदी जवळची विश्वासातली व्यक्ती तुमच्या विरुध्द वापर करते,तर कधी कुणाला त्याच्या अडचणीत विश्वासाने दिलेले पैसे बुडवले जातात.जवळच्या माणसाबरोबर केलेल्या भागीदारी व्यवसायात फसवणूक होते.नातेसंबंधात अशा फसवणुकीच्या व विश्वासघाताच्या अनेक घटना घडत असतात. कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणता आपल्याला अशा फसवणुकीला सामोरे जावे लागते. विश्वासघातामुळे नात्यात तसेच मैत्रीत कायमचा दुरावा निर्माण होतो.अशा विश्वासघाताने आर्थिक नुकसानीपेक्षाही मनावर झालेली जखम खूप खोलवर असते.नंतर कितीही उपचार केले तरी ती सहजपणे भरून येत नाही. म्हणूनच अशा जखमा होऊच नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घ्यायला हवी.विश्वासाने विश्वास ठेवता येतील अशी माणसे जोडायला हवीत.
  हे खरे आहे की,कधी कधी आयुष्यात असे काही व्यवहार करावे लागतात की ते करताना समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवायलाच लागतो तेथे तुमच्या समोर दुसरा पर्यायच नसतो.अशा व्यवहारांमध्ये तशा प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता फार कमी असते कारण एकमेकांवरच्या विश्वासावरच अशा व्यवहारांच्या इमारती उभारल्या जातात.पण त्यातूनही झालीच काही फसवणूक,तर ती टाळणे बऱ्याचदा तुमच्या हातात नसते.ती एक प्रकारे अपरिहार्यता असते,तेथे विश्वास ठेवल्याशिवाय व्यवहाराच पुढे सरकणार नसतो! पण जेथे सहज शक्य आहे तेथे तरी आपण कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हे तरी नक्कीच ठरवू शकतो!
    प्रश्न आर्थिक असो,भावनिक असो किंवा इत्तर कुठल्याही प्रकारचा असो कुणावर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधीत बाबीची योग्य त्या निकषांवर खातरजमा करायला हवी.कोणी कुणाबद्दल काही बरे वा वाईट मत व्यक्त केले तर तेच तुमचे मत बनवणे धोकादायक ठरू शकते.पूर्वग्रह न बाळगता आपल्या स्वत:च्या नजरेने व अनुभवाच्या कसोटीवर घासून त्रयस्थपणे समोरच्या व्यक्तीची पारख करणे थोड्या अभ्यासानंतर सहज शक्य आहे! व्यवहारात किंवा नातेसंबंधात आजूबाजूला उठणाऱ्या वावड्यांवर विसंबून विश्वास ठेवणे संबंधीत व्यवहार अथवा नातेसंबंध अडचणीत आणू शकते म्हणून अंधपणे विश्वास ठेवण्यांऐवजी तारतम्याने विचारपूर्वक आत्मविश्वासाने निर्णय घेणे शहाणपणाचे ठरते.
  आता वरील विवेचनावरून "सहजासहजी कुणावर विश्वासच ठेवायचा नाही का?" असा विचार मनात येणे साहजिक आहे."चुकून विश्वासायोग्य व्यक्तीवर अविश्वास दाखवला तर संबंधात  दुरावा नाही का येणार?"  तर येथे मी पुन्हा सांगतो की,माणसे ओळखण्याची कला तुमची तुम्हालाच आत्मसात करावी लागेल! देहबोलीचा (बॉडी-लँग्वेज) थोडाफार अभ्यास केल्यास विश्वासायोग्य कोण आणि अयोग्य कोण हे तुम्ही सहज ओळखू शकाल. एवढे मात्र नक्की की तुम्हाला या जगात जर आनंदात जगायचे असेल तर योग्य तेथे नाही म्हणता आलेच पाहिजे! आणि कोणत्याही गोष्टीला हो किंवा नाही म्हणायचा अधिकार तुम्हाला नक्कीच आहे!
तुम्हाला काय वाटते!
                                        ..........प्रल्हाद दुधाळ, पुणे.
                                                ९४२३०१२०२०.

Thursday, February 6, 2014

कौतुक

कौतुक
                चांगल्या गुणांचे कौतुक होणे ही माणसाची एक मानसिक गरज आहे. जेंव्हा एखादे चांगले काम माणसाच्या हातून घडते,एखाद्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले जाते, एखादा महत्वाचा पुरस्कार मिळतो, किंवा यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात नाव  होते तेंव्हा आजूबाजूच्या लोकांकडून आपले कौतुक व्हावे असे वाटणे साहजिक आहे. वास्तविक अशा व्यक्तीच्या आसपास वावरणारे नातेवाईक,मित्रमंडळी,शेजारी,शिक्षक, सहकर्मचारी यांनी दिलेली पाठीवरची थाप जीवनात खूपच मोलाची असते. अशा कौतुकामुळे अंगावर मुठभर मांस चढते. अशी व्यक्ती मिळालेल्या प्रोत्साहनामुळे दुप्पट वेगाने प्रगती करू शकते. आजूबाजूच्या लोकांपेक्षाही अशा व्यक्तीचे जेंव्हा आपल्या जवळच्या व्यक्ती जसे आई,वडील,भाऊ,बहिण,पत्नी,मुले यांच्याकडून कौतुक होते तेंव्हा माणसाला आयुष्य  कृतार्थ झाल्यासारखे वाटते.त्याला नवी उर्जा मिळते.   
                  पालक आपले मुल लहान असताना  मुलाने टाकलेले पहिले पाऊल,मुलाच्या तोंडातून आलेला पहिला बोबडा शब्द, टाकलेले पहिले पाउल,लिहिलेले पहिले अक्षर तसेच मुलाच्या आयुष्यातल्या प्रत्येक लहानसहान प्रगतीच्या टप्प्यावर यांचे भरभरून कौतुक करताना दिसतात आजकाल तर अशा क्षणांचे फोटो किंवा व्हिडीओ चित्रण करून असे प्रसंग जतन केले  जातात. जीवनाच्या पुढच्या टप्प्यात मुलांच्या  शिक्षणातल्या प्रगतीच्या काळात तर मुलांना अशा कौतुकाची फारच गरज असते.चांगल्या यशाबद्दल शाबासकी तर मिळायलाच हवी  पण एखाद्या अपयशाच्या क्षणी मुलांना मानसिक आधार व पुढच्या वेळी जादा प्रयत्नासाठी प्रेरणा द्यायची ही तयारी पालकाने ठेवायला हवी.
                                                लहानपणी कौतुक होण्यासाठी लायकी असूनही जर योग्य त्या व्यक्ती कडून अशी शाबासकी मिळाली नाही तर अशी मुले एकलकोंडी होऊ शकतात.आपल्यात  काहीतरी कमी असल्याची भावना अशा मुलांच्या मनात घर करू शकते व सर्व काही ठीक असूनही आत्मविश्वास कमी होण्यासाठी अशा घटना कारणीभूत होऊ शकतात म्हणूनच पालकांनी योग्य गोष्टींचे कौतुक तर आवश्यक तिथे मानसिक आधार आपल्या पाल्याला द्यायला हवा.
                                                योग्य त्या प्रसंगी कौतुक होणे आवश्यक आहे हे खरे आहे पण उठसुठ फक्त कौतुकच होत राहिले तरीही धोकादायक आहे. म्हणजेच शाबासकी देण्यायोग्य गोष्टी असतील तरच कौतुक व्हायलाच हवे पण जेथे आवश्यक आहे तेथे त्याच्यातली कमतरता सुध्दा संबंधीताला कळायला हवी. थोडक्यात यशाबरोबरच अपयश पचविण्याची व अपयशाच्या प्रसंगी ज्या संभाव्य परिस्थितीचा सामना करावा लागतो त्याची जाणीव व मानसिकता सुध्दा अंगी असायला हवी हे सांगायला हवे, नाहीतर नेहमी कौतुकच वाट्याला आलेली व्यक्ती जेंव्हा समाजात वावरायला लागेल तेंव्हा जेंव्हा एखाद्या पसंगी झालेली टीका/अपमान  अथवा मिळणार्या प्रतिक्रिया अशा व्यक्ती सहन करू शकणार नाहीत. त्यामुळे लहानपणापासूनच योग्य त्या वयात यश,अपयश व त्याबरोबरीने येणारे कौतुक किंवा टीका अथवा मिळणारे अन्य प्रतिसाद याची कल्पना व अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी या संबंधी पालकांनी मुलांशी मोकळेपणाने बोलायला हवे.वास्तवाची जाणीव कायम मनावर बिंबवायला हवी . आपल्या पाल्याचे खोटे खोटे कौतुक करून तुम्ही त्याला तात्पुरता आनंद देऊ शकाल पण याच तुमच्या वागण्यामुळे त्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत करत आहात हे सुध्दा तितकेच खरे आहे. एकदा सतत यश मिळत गेले की त्या यशाची सवय लागते आणि जेंव्हा एखादे अपयश समोर उभे राहील तेंव्हा अशा व्यक्तीला जगणे अवघड होऊ शकेल!
                  बऱ्याच ठिकाणी ज्या व्यक्तीकडून फायदा होणार असेल त्या व्यक्तीचे खुशमस्करे त्याच्या भोवती  आपल्या फायद्यासाठी गोळा होतात. खोटेखोटे गुणगान करून अशा माणसाच्या मर्जीत रहाण्याचा प्रयत्न असे खुशमस्करे करत रहातात. त्यासाठी कौतुक/स्तुती करायचा एकही प्रसंग सोडत नाहीत. असे होणारे कौतुक हे बर्याचदा ‘ हरबर्याच्या झाडावर चढवणे असते पण संबंधिताला जर अशा कौतुकाबद्दल जाणीव नसेल तर अशी व्यक्ती वास्तवाशी फारकत घेऊन एका आभासी जगात रहायला लागते. अशावेळी यशाचा कैफ चढायला वेळ लागत नाही.अशा व्यक्तीचा भ्रमाचा भोपळा जेंव्हा कधी फुटतो  तेंव्हा मात्र अशा लोकांची अवस्थ्या वाईट होऊन जाते. वेळीच अशा स्तुतीपासून सावध रहायला हवे.
                  योग्य वेळी व योग्य बाबतीत झालेल्या कौतुकामुळे पुढील प्रगतीसाठी प्रेरणा मिळते.अधिक जोमाने प्रयत्न केले जातात तर कौतुकास पात्र असूनही जर योग्य वयात अपेक्षित असलेली शाबासकीची थाप पाठीवर मिळाली नाही तर माणूस स्वत:ला बदनसीब समजायला लागतो. अशा व्यक्तीची कौतुकाची भूक अपूर्णच रहाते. आजूबाजूला जर किरकोळ बाबतीतही कौतुक होणारे असतील तर त्यांच्याशी स्वत:ची तुलना केली जाते एकप्रकारचा न्यूनगंड येतो आणि माणूस नैराश्याची शिकार होऊ शकतो.
                  एक व्यक्ती म्हणून विचार करतो तेंव्हा असे लक्षात येते की जीवनात सामान्यपणे प्रत्येकाच्या आयुष्यात  अशा कौतुकास्पद कामगिरीचे, उत्तुंग यशाचे, जीवनातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आकांक्षांच्या पूर्तीचे, छोट्या मोठ्या पुरस्कारांचे प्रसंग येत असतात व त्या त्या प्रसंगी आपल्याला शाबासकी मिळावी लोकांकडून कौतुक व्हावे असे वाटते. तसेच बऱ्याचदा अपयशाला सामोरे जाणारेही आजूबाजूला असतात .एक संवेदनाशील माणूस म्हणून तुमच्या आजूबाजूच्या अशा यशस्वी व्यक्तींचे जरूर कौतुक करा. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करा तर अपयशाच्या प्रसंगी गरजूना आधार द्या. अपयश ही बऱ्याचदा यशाची पायरी असते हे समजून घ्या व लोकाना समजावा.
                  कौतुकास्पद कामगिरीचे कौतुक तर व्हायलाच हवे! तुम्हाला काय वाटते?
                                          .....प्रल्हाद दुधाळ,पुणे.

                  

Friday, January 17, 2014

वाटणी.

   वाटणी.
   बाबुराव हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत होते डॉक्टर च्या सांगण्यावरून बाबुरावांच्या पत्नीला  चारही मुलांना बोलाऊन घेण्यात आले. सगळेजण जमा झाल्यावर डॉक्टरच्या समोरच  बाबुराव निरवानिरवीचे बोलू लागले.म्हणाले “ मी आता मरणार आहे तेंव्हा तुम्ही सगळेजण एकमेकाना सांभाळा व आपल्या आईला अंतर देऊ नका.काळजी घ्या. “
बायकोकडे वळून तिला म्हणाले  –
“बर का ग, डेक्कनच्या चार बिल्डिंग तुझ्याकडेच राहू दे!, सहकार नगरचे सगळे बंगले थोरल्या व
दोन नंबरच्याला देऊन टाक! शिवाजीनगर मधली दुकाने तीन नंबरला व बिबवेवाडी ची सगळी दुकाने
 व चाळी चार नंबर ला दे! चल आता मी निघतो ,माझी जायची वेळ झाली.”
बाबुरावांचे ऐश्वर्य ऐकून व त्यांनी आपल्या  मालमत्तेची मुलांमध्ये केलेली वाटणी पाहून डॉक्टर फारच प्रभावित झाले.त्यांना अगदी गहिवरून आले. थोड्याच वेळात बाबुरावांचे निधन झाले. डॉक्टरने
बाबुरावांच्या  मुलांना सांगितले-
 “आपल्या वडिलांचे क्रियाकर्म व्यवस्थितपणे होऊ दे, पैसे काय पळून जात नाहीत, हॉस्पिटल चे बील सावकाश पाठवून द्या!”
बाबुराव जाऊन चार महिने झाले तरी बिलाचे पैसे मिळाले नाही म्हणून डॉक्टर ने शेवटी बाबुरावांच्या
पत्नीला गाठले व खडसावले -
“ काय हो ताई, बाबुरावांनी केवढी तरी मालमत्ता तुम्हा सगळ्याना वाटली तरीसुध्दा माझे बिलाचे पैसे अजून का दिले नाही?”
बायको गरजली –
“ कसली डोंबलाची मालमत्ता घेऊन बसलात डॉक्टर? अहो त्यांचा पेपर टाकायचा धंदा आहे! त्याची
वाटणी करून गेले ते!!!!!!!!!”

                     .........प्रल्हाद दुधाळ.

Thursday, January 16, 2014

आयुष्यातली चिडचिड!!!

      आयुष्यातली चिडचिड!!!
      गोष्टी अगदी किरकोळ असतात पण आपल्या मनासारखे घडले नाही की आपण अगदी डिस्टर्ब
होऊन जातो. सकाळी सकाळी असे काही घडले की पूर्ण दिवस आपण बिघडलेल्या मूडमध्ये
 घालवतो.जणू काय आपले सर्वस्व हरवले आहे! खर तर आयुष्यातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे
एवढ्या तेवढ्याने डिस्टर्ब होण्याइतपत माणसाच्या सहनशक्ती चा ऱ्हास झाला आहे का? या प्रश्नाचे
 उत्तर कटू असले तरी हो असेच आहे! खाली काही असे प्रसंग दिले आहेत.
    १.सकाळी उठून घरातली सगळी कामे उरकायची असतात व कामावर जायचे असते तशातच
 नेहमीच्या वेळी कामवाली येत नाही.आता घरातली जास्तीची कामेही करावी लागणार या नुसत्या
 विचाराने आपला रागाचा पारा चढतो पण आपल्या हातात चिडचीड करण्याशिवाय काहीच नसत मग
 स्वत:शी बडबड करत, मोलकरणी च्या नावाने खडे फोडत,नशिबाला दोष देत कशीबशी कामे उरकून
 ओफिस गाठले जाते. सकाळी सकाळी मूड बिघडल्यामुळे अखंड दिवस चिडचिड होते.
    २.आपल्याला कुठेतरी घाईत जायचे असते पण ऐनवेळी बाईक चालू होत नाही किक मारून मारून
पाय दुखायला लागतो पण बाईक जाम चालू नाही होत! रागारागाने बाईकला लाथ मारून रिक्षाला हात
 करतो पण एकसुद्धा रिक्षा थांबत नाही आपण चिडतो.खूप प्रयत्नानंतर रिक्षा मिळते व ऑफिस गाठतो
 पण सकाळी सकाळी झालेल्या घटनांनी मूड खराब झालेला असतो तो सारा दिवस आपण चिडचिड
 करत  घालवतो.
      ३.रात्री झोपताना ठरवलेले असते कि सकाळी लवकर उठायचे व भराभर उरकून ऑफिसला
 जाण्यापूर्वी बँकेत जायचे आपण सकाळी उठतो घाईघाईने आन्हिके उरकतो व निघताना बँकेच्या
 कामाची कागदपत्रे शोधायला लागतो नेहमीच्या जागेवर कागदपत्रे मिळत नाहीत.आपल्याला खात्री
असते की कागदपत्रे त्याच जागेवर ठेवली होती कुणी हलवायाचीही शक्यता नसते तरीही मिळत नाही.
 खूप प्रयत्नांनंतरही कागदपत्रे सापडत नाहीत व बँकेचे काम पुढे ढकलावे लागते.मनासारखे घडले नाही
म्हणून मूड खराब होतो दिवसभर उगीच चिडचिड केली जाते.
      ४.आपल्याला कुठेतरी गडबडीने पोचायचे असते. सगळ्यात सोयीस्कर बसमध्ये आपण बसतो
 बस निघते अर्धे अंतर पार होते व ट्राफिक मध्ये अडकते कुठलीतरी मिरवणूक रस्त्यावर चालू असते
 व त्यामुळे  ट्राफिक दुसऱ्या मार्गाने वळवले जाते अपेक्षित ठिकाणी पोहोचायला आपल्याला तिप्पट
वेळ लागते व ज्या कामासाठी हा आटापिटा केला होता ते काम होत नाही.आपण भरपूर चिडतो.
 चिडचिड  करत रहातो.  
       वरील प्रसंग हे केवळ उदाहरणादाखल  दिले आहेत, आपल्या आयुष्यात असे किंवा अजून
वेगळ्या प्रकारचे अनेक प्रसंग येतात ज्या प्रसंगांनी आपण ताबडतोब डिस्टर्ब होऊन जातो. अनेक वेळा
आपण अशा परिस्थितीत अडकतो की, फक्त चिडचिड करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरलेले
 नसते. असे काही प्रसंग असतात की.त्यासाठी सरकारी गलथानपणा कारणीभूत असतो. आपण
 अशावेळी आपल्याकडील संवेदनाहीन शासनयंत्रणा, कामचुकारपणा, भ्रष्ट व्यवस्था व एकूण
व्यवस्थेबाबत तोंडसुख घेतो. भरपूर चिडतो. आयुष्यातले असे अनेक दिवस आपण चिडचिडेपणा
करण्यात वाया घालवतो. थोडा शांत डोक्याने विचार करून पहा बर की आपली त्या त्या प्रसंगी
 झालेली चिडचिड जरी स्वाभाविक असली तरी टाळता येऊ शकत होती का? चिडचिडेपणामुळे खरच
किती फायदा झाला का? चिडचिडेपणा केल्यानंतर आपण आजूबाजूंच्या लोकांशी,ऑफिसमधील
 व्यक्तींशी,आपल्या घरातील माणसांशी कसे वागलो आणि तसे वागणे योग्य होते की अयोग्य होते?
ज्यांच्यावर आपण चिडलो त्या व्यक्ती परिस्थिती चिडण्यायोग्य होण्यासाठी कितपत जबाबदार होत्या?
      मला व्यक्तीश: असे वाटते की ज्या ज्या प्रसंगी आपली चिडचिड होते, त्या पैकी शेकडा नव्वद
  वेळा ती चिडचिड आपण टाळू शकतो. माझे हे वाक्य थोडे अविवेकी वाटेल, पण बऱ्याचदा तर समोर
 आलेल्या प्रसंगाना काही अंशी स्वत: आपणच कारणीभूत असतो. साधारणपणे सत्तर टक्के प्रसंगी
 आपण केलेली चिडचिड किंवा दिलेल्या प्रतिक्रिया अनाठायी असतात! आपण जो त्रागा करतो त्यातून
व्यवस्थ्या तर किंचितही बदलत नाहीच पण केलेल्या त्राग्यामुळे आपलेच मनस्वास्थ्य बिघडते! एकदा
 असे वारंवार घडायला लागले की तुमच्या वागण्या बोलण्यातही हा त्रागा आपला प्रभाव दाखवायला
लागतो! नकारात्मक विचारसरणी कडे आपला प्रवास सुरु होऊ शकतो. मनोकायिक आजार आपला
 पिच्छा सुरु करू शकतात! हेकट स्वभावाचा म्हणूनही आपली प्रतिमा समाजात होऊ शकते!!!
    आता वर दिलेल्या प्रसंगासंबंधी आपण काही करू शकतो का हे पाहू-
१.       आपली कामवाली सुद्धा एक माणूस आहे म्हणजेच तुमच्या आमच्या आयुष्यात ज्या समस्या येऊ शकतात त्या समस्या कामवालीला ही येऊ शकतात हे प्रथम लक्षात घ्या. आजारपण वा इत्तर आकस्मिक कारणामुळे असा एखादा दिवस तिला तुमच्याकडे कामासाठी येणे शक्य झाले नसेल. तसे तुम्हाला कळवणे आवश्यक होते पण तेवढे गांभीर्य किंवा समज कदाचित त्या अशिक्षित व्यक्तीकडे नसेल असे समजा त्या पायी तुम्ही का डिस्टर्ब होता? ती न आल्यामुळे आता खोळंबा झाला आहेच पण त्याबद्दल त्रागा करण्यापेक्षा समोर जी परिस्थिती आहे तिचा प्रथम स्वीकार करा.आता तुम्हाला काय करणे शक्य आहे ते पहा.घरातली काही कामे वाटून द्यायचा प्रयत्न करा व घरातल्या सदस्यांना तशी सवय लावा. पुरेसा वेळ हातात नसेल तर ती कामे लगेच करण्याचा अट्टाहास सोडून द्या! विचार करा की ही कामे नंतर केल्याने काय असे आभाळ कोसळणार आहे? आणि हातात पुरेसा वेळ असेल तर... घ्या की मजा घरातली कामे करायची! मस्तपैकी आवडती गाणी लावा! संगीताच्या ठेक्यावर फिरवा हातातला झाडू घरही ! एखाद्या दिवशी फिरू द्या की भांड्यावर आपुलकीचा हात! कण्हत कुथत आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यापेक्षा त्यातला आनंद घेऊन सामोरे जा.चिडचिडेपणा करून अनमोल आयुष्यातला अख्खा दिवस वाया का घालवायचा!
२.       योग्य नियोजन केले तर कोणतेच काम घाईचे असू शकत नाही! होते काय की आपण प्रत्येक काम करताना ते करण्याचा शेवटचा दिवस कोणता आहे हे बघून प्रायोरिटीज ठरवतो.आणि मग आयत्या वेळी येणार्या अडचणींचा विचार न करता कामांचे नियोजन करतो. बाईक ला एक इंजिन आहे आणि त्याला त्रांत्रिक समस्या नक्कीच सांगून येत नाही. सर्व गोष्टी गृहीत धरून वेळेचे नियोजन केले तर अनेक प्रसंगी होणारी घाई टाळू शकते. आणि त्यातूनही असा काही प्रसंग वाट्याला आला तर चिडचिडेपणा करून काय हाती लागणार आहे? त्यापेक्षा एक आव्हान म्हणून पर्याय शोधा! मनस्वास्थ्य बिघडून घेतल्याने मार्ग तर सुचणार नाहीच पण दिवस मात्र बरबाद होईल. लवकर निघा, वेळेत पोहचा.आलीच काही समस्या तरीही तर शांत डोक्याने विचार करा कारण प्रत्येक समस्येवर किमान एक योग्य उत्तर असतेच असते. पाणी आपल्या मार्गानेच जाणार असते पण आनंद मिळवण्यासाठी त्यावर कारंजे फुलवायला काय हरकत आहे?
३.       येथेही नियोजनाच्या अभावामुळेच चिडचिड होण्याचा प्रसंग उद्भवलेला आहे. महत्वाच्या वस्तू  योग्य वेळी पटकन सापडण्यासाठी योग्य ते नियोजन हवेच.पण स्वत:च्या स्मरणशक्तीवर अवास्तव विसंबून राहिल्यामुळे असे प्रसंग घडतात. हे प्रसंग टाळण्यासाठी महत्वाच्या कामांच्या व कागदपत्रांच्या नोंदी खिशातल्या डायरीत ठेवल्या तर निश्चितच फायद्याचे राहील. लिहिण्याचा कंटाळा असला तर  मोबाईलमध्ये अशा नोंदी ठेवणे सहज शक्य आहे ज्यायोगे वेळेचे नियोजन करता येईल व ऐन वेळी होणारी धावपळ व मनस्ताप चिडचिड टाळता येऊ शकेल.
४.       आपण गजबजलेल्या शहरात रहातो.रस्ते वाहनांनी भरून वाहात असतात सार्वजनिक वहातुक व्यवस्थ्या वाढत्या लोकसंखेच्या प्रमाणापुढे अपुरी आहे. गैरव्यवस्थापन, अनागोंदी भ्रष्टाचार या गोष्टी तर आपल्या देशासाठी शाप ठरत आहेत पण आपणही याच व्यवस्थेचा भाग आहोत हे प्रथम मान्य करणे आवश्यक आहे. भर रस्त्यातल्या मिरवणुका, अतिक्रमणे, बेशिस्त वहातुक या गोष्टींचा सामना करतच आपल्याला जगायचं आहे! हे सगळ बदलायला हव यात दुमत असायचे कारण नाही, पण आपण करत असलेल्या वांझोट्या त्राग्यामुळे यामध्ये काहीच फरक पडणार नाही हे समजून घेणे आवश्यक आहे. व्यवस्थेविरुद्ध  तक्रार करणे,निषेध व्यक्त करणे निश्चितच आवश्यक आहे पण स्वत:वर फक्त चिडून काहीच साध्य होणार नाही. गैरव्यवस्थेचा
तुमच्या जीवनावर होणारा परिणाम जर टाळता येत असेल तर त्या पर्यायी जीवन शैलीचा प्राधान्याने विचार करणे आवश्यक आहे!
      वरील काही उदाहरणे सोडा पण एरवीसुद्धा आपल्या दररोजच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात ज्या क्षणी आपला मनाचा तोल ढळतो, राग येतो,चीड येते थोडक्यात षडरिपुंची बाधा होते आणि  मग भावनेच्या भरात सारासार विवेकबुध्दी न वापरता आपण काहीच्या काही वागतो. मागचा पुढचा विचार न करता बोलतो, हमरीतुमरीवर येतो ,कधी शब्दांनी तर कधी शब्दश: मार देतो किंवा मार खातो. वेळ निघून जाते आणि मग आपण त्या त्या प्रसंगी असे कसे वागलो याबद्दल पश्चाताप करायची वेळ येते!
   थोड तारतम्याने निर्णय घेतले, परिस्थितीचे भान ठेऊन टोकाच्या  प्रतिक्रिया टाळल्या तर आपले जगणे बरेचसे सहज होईल.सुखाचे होईल की नाही माहीत नाही पण आनंदाचे तरी होईल. कारण –
आपणच आपल जगण, अवघड करत असतो,
पालथ्या घड्यात पाणी विनाकारण भरत असतो!
हा तसा, ती तशी, उगाचच  बडबडत असतो,
साप साप म्हणून बऱ्याचदा, भुईलाच बडवत असतो!
भीती चिंता कटकट वटवट, करीत असतो जीवनाची फरफट,
चडफडत धुसफुसत जगत असतो, जगण अवघड करत असतो!
तेंव्हा आपल्या जीवनात  चिडचिडेपणा कसा टाळायचा याचा जरूर विचार करायलाच हवा!
तुम्हाला काय वाटते ????

                                  ............प्रल्हाद दुधाळ.
प्रकाशित.... ई  सकाळ २३/८/२०१६ 

   

Saturday, December 21, 2013

सुख म्हणजे नक्की काय असतं ?

सुख म्हणजे नक्की काय असतं ?
    सुख सुख म्हणतात ते असत तरी काय? अनेक माणसांप्रमाणेच मला ही हा प्रश्न कायम छळत आलेला आहे.माझ्या मते सुखी असणे ही एक मानसिक अवस्थ्या आहे त्यामुळे सुख व्यक्तीसापेक्ष आहे.या जगात सर्वसुखी असणारी एकही व्यक्ती असणे शक्य नाही हे प्रत्येकाला माहीत आहे तरीसुद्धा या जगातला प्रत्येक माणूस आपण सुखी व्हावे म्हणून धडपडताना दिसतो. मुळात हे सुख आहे तरी काय?अस काय सुख मिळत असेल सुखी असण्याने की हरेक व्यक्ती सुखामागे धावते?
    प्रथम सुख आणि दु:ख यातला फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.मी आत्ताच म्हटले प्रत्येक व्यक्ती सुखामागे धावते याचाच दुसरा अर्थ असाही होतो की प्रत्येकजण थोडा तरी दु:खी असतो आणि सुखी होण्याचा प्रयत्न करत असतो!
 प्रत्येक व्यक्तीच्या सुखी असण्याच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात.एका व्यक्तीचे सुख हे दुसऱ्या व्यक्तीच्या दु:खाचे कारण आहे असेही असू शकते! म्हणजेच स्वत:च्या सुखापायी दुसऱ्याला दु:ख देणे हे सुद्धा माणसाच्या सुखाच्या आड येते!
  उदाहरणार्थ, एका कंपनीमध्ये एका कर्मचाऱ्याची भरती करायची आहे.कंपनीने दिलेल्या जाहिरातीला मिळालेल्या प्रतिसादावरून त्या एका जागेसाठी एकूण दोनशे लायक व्यक्ती इच्छुक आहेत.या दोनशेमधून एकाचीच निवड होणार आहे. येथे नोकरी मिळाली हे एका व्यक्तीच्या सुखाचे कारण आहे पण हेच कारण बाकी एकशे नव्याण्णव व्यक्तींच्या दु:खाचे कारण आहे असे आपण म्हणू शकतो! पण यावरून एकशे नव्याण्णव लोक दु:खी आहेत असा निष्कर्ष काढणे चुकीचे होईल! सुख दु:खाच्या माणसाच्या कल्पना एवढ्या मर्यादेत बसणाऱ्या नक्कीच नाहीत!
  सुख आणि दु:ख ही मानवजन्माच्या जगण्याची विभिन्न पण अविभाज्य अंगे आहेत.जगात दु:ख आहे म्हणून सुखाचे महत्व आहे! यासाठी सुख या संकल्पनेची थोडी व्यापक चर्चा करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे माणूस सुखी आहे असे केंव्हा म्हटले जाते? खालील यादीमधील एक किंवा अनेक गोष्टी व्यक्तीकडे असणे म्हणजे तो सुखी असल्याचे गृहीतक आहे-
१.भरपूर स्थ्यावर व जंगम मालमत्तेचा मालक असणे.
२.अनिर्बंध सत्तधीश असणे.
३.आर्थिक,शैक्षणिक व कौटुंबिक बाबतीत यशस्वी असणे.
४.उच्चशिक्षित असणे.
५.समाजात मान मतराब असणे.
६.सुसंस्कारित असणे.
७.आनंदात असणे.
८.मनासारखा जोडीदार व भरपूर कुटुंबस्वास्थ्य असणे.
९.सज्जन व दानशूर असणे.
१०.सत्संग व अध्यात्मातील प्रगतीमुळे समाधानी असणे.
११.मुले कर्तबगार असणे.
१२.दिमतीला भरपूर नोकरचाकर असणे.
१३ ऐसपैस सर्व सुखसोयींनी युक्त बंगला असणे.
१४.दिमतीला आधुनिक महागड्या मोटारी चा ताफा असणे.
१५.सरकारी व खाजगी मोठ्ठे अधिकारी असणे.
१६.सर्वगुणसंपन्न असणे.
.................इत्यादी इत्यादी.
    ही यादी कधीच संपणारी नाही कारण माणूस सुखाच्या बाबतीत कधीच संतुष्ट नसतो.त्याची सुखाची तहान कायम वाढती असते.पायी चालणारा माणूस पायच नसलेल्या माणसापेक्षा खर तर सुखी आहे,पण तो आपल्याकडे चालण्यासाठी पाय आहेत यातल्या सुखापेक्षा आपल्याकडे सायकल नाही हा विचार करून दु:खी दिसतो! बर त्याला सायकल मिळाली की तो सुखी होईल असेही नाही! मग तो दुचाकी किंवा चारचाकी नाही म्हणून कुरकुरत असतो. हे दुष्टचक्र असे वाढत्या प्रमाणात चालत रहाते.जे आपणाजवळ आहे,जे वास्तव आहे त्यातला आनंद घेण्यापेक्षा जे नाही त्यामागे धावण्यात माणूस आपली सर्व शक्ती खर्च करत रहातो. आपल्याला नक्की काय हवे याचे तारतम्य नसल्यामुळे पूर्ण आयुष्य आभासी सुखामागे धावत रहातो.अनेकांना याचे भान मरेपर्यंत येत नाही तर काहींना आयुष्याच्या संध्याकाळी सुखाचे भान येते पण वेळ गेलेली असते! आयुष्यातल्या कितीतरी आनंदाला  आपण मुकलो आहे याचे भान सरत्या आयुष्यात आल्यानंतर माणूस अजूनच दु:खी होतो.पण तोपर्यंत सगळ हातातून निसटलेले असते.
  सुखाचा शोध घेण्यासाठी भल्याभल्यांनी आपल्या जीवनाचे रान केलेले आपण ऐकले आहे पण खर्या सुखाचा शोध कुणाला लागल्याचे ऐकिवात नाही! खरे तर सुखाचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे धावायची गरजच नाही. “ तुझे आहे तुजपाशी पण जागा चुकलासी” या उक्तीप्रमाणे सुख अगदी तुमच्याजवळ आहे पण ते ओळखता यायला हवे! आभासी सुख हे मृगजळासारखे आहे,जेवढे तुम्ही त्याच्यामागे धावणार त्याच वेगाने ते लांब लांब जाते. या पळापळीत मानव जन्म संपून जातो पण सुख मात्र सापडत नाही!
  एक उदाहरण म्हणून सांगतो माझ्या ओळखीचे एक गृहस्थ्य आहेत. त्यांनी अनेक अडचणींवर मात करत एका दरिद्री कुटुंबात जन्म घेऊनही कष्ट करत उच्चशिक्षण घेतले व ते एक प्रथितयश सरकारी अधिकारी आहेत.दिमतीला सरकारी गाडी व नोकरचाकर आहेत.त्याच्या इशाऱ्यावर एका कार्यालयाचा कारभार चालतो. समजदार पत्नी व सुसंस्कारित मुले आहेत.या व्यक्तीला लांबून ओळखणारे या माणसाचा हेवा करतात.सर्वजण विचार करतात की हा किती सुखी माणूस आहे! पण प्रत्यक्षात हा माणूस कायम वैतागलेला असतो.आपल नशिबच खराब आहे.मी श्रीमंत घरात जन्मलो असतो तर आज कुठल्या कुठे पोहचलो असतो, मी यांव केले असते अन त्यांव केल असत म्हणून कायम चिडचिड चालू असते. हाताखालच्या लोकांना कायम छळत असतो. बायको व मुलांवर विनाकारण ओरडत असतो.आपल्या आयुष्यात जे आहे त्यातले सुख/आनंद/समाधान न बघता त्याने जे जे मिळाले नाही त्याचा विचार करून स्वत:चे व आजूबाजूला संपर्कात असणार्या प्रत्येकाचे जगणे त्याने वेठीला धरलेले असते! खर तर त्याने आपण केलेल्या प्रगतीबद्दल आनंदी व समाधानी असायला हवे.आपण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इथपर्यंत पोहोचलो व आयुष्यात यशस्वी झालो याचा त्याला अभिमान असायला हवा.आपल्या कुटुंबाबद्दल त्याला समाधान असायला हवे.थोडक्यात काय तर हा माणूस खर तर सुखात आहे! पण खर्या सुखाबद्दल नीट माहिती नसल्यामुळे सुखात असूनही तो त्याच्या विचारसरणीमुळे तो दु:खात आहे!
  तुम्ही सुखात आहात की दु:खात आहात हे समजून घ्यायचे असेल तर प्रथम स्वत:ला ओळखता यायला हवे! स्वत:ची ओळख नव्याने करून घ्यायची तयारी हवी कारण तुम्ही सुख कशाला म्हणता, दु:ख कशाला म्हणता हे तुमच्या विचार करायच्या पद्धतीवर अवलंबून आहे. म्हणून एकदा पुन्हा नव्याने यावर विचार करून बघा स्वत:ला दु:खी ही बिरुदावली लावण्यापूर्वी सारासार विवेकबुद्धी व प्रामाणिकपणे स्वत:चे परीक्षण करून बघा -
१.        स्वत:मध्ये कोणते कोणते चांगले गुण आहेत त्याची यादी करा.
२.        स्वत:मधल्या दोषांची व मर्यादांची यादी करा.
३.        आपण अहंकारी तर नाही ना याचे पुन्हा एकदा परीक्षण करा. कारण अहंकार हा तुम्ही सुखी होण्यातला मुख्य अडसर असू शकतो!
४.        तुमच्या आयुष्यात पुढे येणार्या (तुमच्यासाठी) सकारात्मक अथवा नकारात्मक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का?
५.        या जगातली प्रत्येक व्यक्तीमत्व वेगळे वेगळे असते याची तुम्हाला जाणीव आहे का?
६.        आयुष्यात प्रत्येक गोष्टीला एक पर्याय व प्रत्येक समस्येला एक योग्य असे पर्यायी उत्तर असते यावर तुमचा विश्वास आहे का, आणि हा पर्याय स्वीकारण्याची तुमची मानसिकता आहे का हे  पुन्हा एकदा तपासून घ्या.
७.        प्रत्येक घटना जशी तुम्हाला दिसते तशीच नसून  त्या घटनेची दुसरीही काही बाजू असू शकते याचा आपण कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करता का?
८.        आपल्या अवास्तव अपेक्षांचे ओझे तुम्ही कोणावर लादत तर नाही ना?याबद्दल कधी विचार केला आहे का?
९.        तुम्ही आपल्या आजूबाजूला वावरणार्या माणसाना ते तुमच्या मताप्रमाणे वागतील /बोलतील असे गृहीत धरता का?
१०.     आयुष्यात हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणे बऱ्याचदा शहाणपणाचे असते या उक्तीवर आपला विश्वास आहे का?
११.     जी परिस्थिती समोर आहे ती बदलणे (काही मर्यादेनंतर) तुमच्या हातात नसते याची तुम्हाला जाणीव आहे का?
१२.     आपण दुसऱ्या व्यक्तीबरोबर जसे वागतो /बोलतो तसेच इत्तर तुमच्याबरोबर वागले/बोलले तर तुम्हाला चालेल ना? एकदा तपासून बघा.
१३.     प्रत्येक परिस्थिती ही त्या त्या वेळेपुरती असते.पुढे ती निश्चितपणे बदलणार असते.त्यामुळे उतावळेपणाने कोणताही निर्णय घेणे आततायीपणा ठरू शकतो! यावर तुमचा विश्वास आहे का?
१४.     तुमच्यामधले गुण अथवा दोष  आजूबाजूच्यांना त्रासदायक तर होत नाहीत ना? एकदा त्या पद्धतीने विचार करून बघा.
    तर आत्मपरीक्षण ही सुखाकडे वाटचाल करण्यातली पहिली पायरी आहे! आपण ज्या प्रकारे वागतो विचार करतो त्यामुळे आपण कुणासाठी दु:खाचे कारण तर होत नाही ना हा विचार स्वत: सुखाची अपेक्षा करणार्याने प्रथम करायला हवा.असा विचारच तुम्ही स्वत:ला  व इत्तराना सुखी करण्यासाठीचे पहिले पाऊल आहे!
  स्वत:मधले दोष दूर करणे तेव्हढे सोप्पे निश्चितच नाही. डोळसपणे अथक प्रयत्न केल्यानंतरच हे साध्य होऊ शकेल. पण स्वत:च्या  व इत्तर माणसांच्या दुख:चे कारण असलेले आपले  दोष प्रयत्नपूर्वक दूर करणेच श्रेयस्कर ठरेल.काही त्रासदायक सवयी बदलणेच योग्य ठरेल.
  माझ्या माहितीमध्ये एक गृहस्थ्य आहेत.ते भल्या पहाटे उठतात व सोसायटीच्या मंदिरात जातात.तेथील घन्टा जोरजोरात वाजवतात तसेच मोठ्या भसाड्या आवाजात भजने म्हणतात त्यांचे काही समवयस्क ही त्यांचेबरोबर असतात. आपण करत असलेल्या प्रचंड देवपूजेमुळे त्यांना मोक्ष मिळणारच असा त्यांचा ठाम विश्वास आहे. जोरजोरात घंटानाद व भजने यांमुळे सोसायटीत रहाणारे रुग्ण,लहान मुले,रात्रपाळी करून नुकतेच घरी पोहचलेले रहिवाशी यांचे मनस्वास्थ्य आपण वेठीला धरतोय व आपल्याला लाभणार असलेल्या संभाव्य सुखापायी अनेक जणांच्या दुख:चे कारण होत आहोत हे त्यांच्या गावीच नसते! अशा देवापुजेने मोक्ष तर दूरच पण शिव्याशापच मिळणार!
   तर इत्तरांना जर आपण सुख देऊ शकत नसू तर निदान त्यांच्या दु:खाचे कारण तरी होऊ नये एवढे तारतम्य तरी सुखाची अभिलाषा असणार्याने ठेवायला हवेच. आहे त्या परिस्थितीचे योग्य मूल्यमापन करून त्याच स्वीकार केला गेला तर त्यामधले सुखाचे क्षण वेचणे अवघड निश्चितच नाही!
  आता मूळ मुद्दा- हे सुख सुख म्हणतात ते नक्की काय असत?तर असे म्हणता येईल कि तुम्ही सुखी आहात का दु:खी आहात हे ठरवणे तुमच्या वृत्तीवर अवलंबून आहे! तुम्ही स्वत:ला सुखी समजायला लागला तर तुम्ही नक्कीच सुखात असणार तुम्ही स्वत:ला दु:खी समजून रडत बसला तर सुख कशा कशात आहे हे कधीच तुम्हाला कळू शकणार नाही. कविवर्य मंगेश पाडगावकर यांची एक कविता आहे-
पेला अर्धा भरला आहे,
अस सुध्दा म्हणता येत.
पेला अर्धा सरला आहे,
अस सुध्दा म्हणता येत.
सरला आहे म्हणायचं
की भरला आहे म्हणायचं?
तुम्हीच ठरवा.
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की
गाण म्हणत?
तुम्हीच ठरवा.
  तुम्ही सुखी आहात,समाधानी आहात,यशस्वी आहात,आनंदी आहात हे समजणे आणि तसे तुम्ही  होणे हे सर्वस्वी तुमच्या विचारासरणीवर अवलंबून आहे.आपल्या सुखाच्या कल्पना वास्तवावर घासून बघितल्या की सुखाबाबत आपण जमिनीवर राहून विचार करू लागतो.
   मोठी स्वप्ने माणसाला कायमच खुणावत असतात आणि सर्वांगीण प्रगती साठी मोठी स्वप्ने पहायलाही हवीत पण मोठ्या स्वप्नांमागे धावताना आपल्याकडील हातात असलेल सुख तर निसटत नाही ना?याच भान ठेवणे आवश्यक आहे.माझ्याकडे जे आहे ते सत्य आहे व ते माझे आहे त्यातून, ते मिळवताना समाधान मिळाले आहे,आनंद मिळाला आहे किंवा मिळणार आहे,हे समाधान व आनंद हेच खरे सुख आहे.या वास्तवाचा स्वीकार करण्याची सवय लावली की तुम्ही सुख तुमच्याकडे धावत आहे. कारण सुख कशात मानायचे हे तुमच्या विचार करायच्या पद्धतीवर अवलंबून आहे.माणसाला हवे असलेली प्रत्येक गोष्ट आयुष्यात मिळेलच असे नाही पण याचा अर्थ जे काही मिळाले आहे तेही काही कमी नाही ही विचारसरणी तुम्हाला एका आनंदी मानसिक अवस्थेकडे घेऊन जाते आणि ही मानसिक अवस्थ्या म्हणजेच सुख!
  एकदा या दृष्टीने विचार करायला सुरुवात तर करून बघा!!!!!!!!
                                                .................प्रल्हाद दुधाळ.
                                                           ९४२३०१२०२० . 
प्रकाशित - विचार परिवर्तनाचा ई दिवाळी अंक २०१४.
  

    

Wednesday, December 18, 2013

मयत.

                            मयत.
      रात्रीचे अकरा वाजलेले.पोटात चार घास ढकलून हळू हळू नेहमी च्या ठिकाणी टोळक जमू लागल. चौकडीचा तसा रिवाजच होता.दिवसभर पोटासाठी वणवण करून घराकडे निघता निघता रस्त्यातल्या देशी बारमध्ये दोन ग्लास ढकलायचे,घरी जाऊन घरच्यांची वटवट ऐकायची.सगळ सहनशक्ती च्या पलिकड गेल की हळूच नाक्याकडे निघायचं. वस्तीपासून थोड बाजूला रस्त्याच्या कडेच्या बस स्टाप च्या बाकड्यावर हा चौकडीचा अड्डा दररोज जमायचा! जीवाभावाचे चार दोस्त तिथे भेटायचे.एकमेकाची थोडी टिंगल टवाळी करायची.गप्पा झोडायच्या.दिवसभरातल्या गमती जमती सांगितल्या जायच्या.डोक्यातली अक्काबाई उतरत आली की जांभया देत घराकड निघायचं.सगळ जग झोपल की घरी येऊन पडवीत झोपायचं.पक्याचा हा दररोजचा दिनक्रम होता.दिवसभरात कमाई जरा बरी झाली असली तर या टोळक्याची थोडी जास्तीची ऐश व्हायची. आजचा दिवसही तसाच होता. पक्याबरोबरच शिरपा,दिलपा व यशवंता यांची ही चौकडी आजूबाजूला प्रसिध्द होती.त्याच कारणही तसचं होत, परिस्थितीने फाटके असले तरी त्यांच्यातली  माणुसकी जिवंत होती.कुणालाही अडचणीच्या प्रसंगी ही चौकडी मदतीला धावत असे. आजचा दिवसही तसाच होता! सगळ्यांनी आज बऱ्यापैकी डोक्यात  टाकलेली होती.एक एक जण अड्ड्यावर जमा झाला. हसण्या खिदळण्याला बहार आला होता. तेव्हढ्यात पलीकडील मैदानातून रडण्याचा आवाज आला. चौकडीच्या तोपर्यंत मैदानातल्या नवीन पडलेल्या पालाकडे लक्षच गेल नव्हत! पालाच्या बाजूनेच रडण्याचा आवाज येत होता. अंधार होता त्यामुळे शंभरेक मिटरवर असलेल्या या पालाकड गेल्याशिवाय कोण रडतय हे कळण्यास मार्ग नव्हता. चौकडीतल्या शिरपा ने सर्वाना पालाकडे चालायची सुचना केली.तसा तो या चौकडी चा लीडर होता.
  पालाच्या जवळ गेल्यावर दिसले की एक माणूस तिरडीवर ठेवलेल्या प्रेताकडे पाहून रडत होता.बाजूला एक बाई डोक्यावर पदर घेऊन दोन पायावर मुसमुसत बसली होती. प्रेत तिरडीवर बांधलेल्या स्थितीत होते.सफेद कापडात गुंडाळलेले  प्रेत,प्रेताच्या कपाळावर कुंकू फासलेल,प्रेताच्या तोडात कसला तरी बोळा.
पांढरे कापड अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत घट्ट बांधलेलं.आजूबाजूला अंधार.दूरच्या रस्त्यावरचा दिवा व मडक्यात भरण्यासाठी पेटवलेल्या धुर टाकणार्या गोवऱ्या यांचाच काहीसा उजेड! अगदी भयानक देखावा होता तो!
“काय झाल व पावन ?”
शिरपाने बाजूला बसलेल्या माणसाला विचारले. माणसाला हुंदका फुटला.
“शेट बघा ना माझ्या म्हातारीन दुपारी प्राण सोडला.आता मसणवटीत न्यायचं पण मी एकटा कसा नेऊ? आजच इथ पाल टाकल अन हे घडल! तुम्ही देवासारख आला बघा. आता तुम्हीच मदत करा. मी तिरडी बांधलीया.नदीकाठी सरपाण पण रचून आलोय पण खांदा द्यायलाच कुणी नाही.तुम्ही  फकस्त खांदे द्या म्हणजे म्हातारीच क्रियाकर्म तरी व्हइल नाय तर काय करू मी?लय उपकार होतील बघा.”
शिरपा ला परिस्थिती च भान आल.
आता चौकडी मधले समाजसेवक जागे झाले होते!
शिरपाने परिस्थिती चा ताबा घेतला.पक्या दिलपा पुढे व यशवंता व स्वत: मागे असे खांदे द्यायचे ठरले.माणसाच्या डोक्यावर घोंगड्या ची खोळ करून घातली.त्याला मडक्यात पेटत्या गोवऱ्या टाकून शिकाळे करून दिले व पुढे चालायला सांगितले. बरोबर इत्तर सामानाची पिशवी सुद्धा दिली.
“माग अजाबात बघायचं नाही.” माणसाला शिरपाने बजावले.
  “राम नाम सत्य है.” चा आवाज चौकडीन दिला. तिरडी उचलली व ही प्रेतयात्रा निघाली. मडके घेऊन माणूस पुढे व त्यामागे हे चौघे तिरडी घेऊन निघाले.पुढच्या बाजूला पक्या व दिलपा व मागे बाकी दोघे.
पक्याच लक्ष प्रेताच्या चेहर्याकडे होते. प्रेताचे लालभडक तोंड भयानक दिसत होते.पुढे मडकेवाला माणूस प्रेतयात्रा निघाली. पक्याला अचानक कसला तरी आवाज आला.
“चू चू “
पक्याला वाटलं भास झाला असेल. पुन्हा तसाच आवाज भास नक्कीच नव्हता! तो गपकन थांबला.अचानक थांबल्यामुळे बाकी तिघे परेशान!
दिलपा गुरकला “ये का थाबतो रे?”
पक्या ला घाम फुटलेला.आवाजाच्या दिशेने पक्याने दिलप्याला खुणावले.
“चू चू”
पुन्हा आवाज!
मागे न बघितल्यामुळे मडकेवाला माणूस बराच पुढे गेलेला!
पुढचे दोघे का थांबले म्हनून मागचे दोघे चिडलेले अंधारात प्रेत अजूनच भयानक दिसत होते.
पुन्हा आवाज
“चू चू “
आता मात्र पक्या व दिलापाची पूर्ण उतरली होती!
“आयला म्हातारी जिवंत तर नाही?”
दिलपा कुजबुजला.
पक्याची भीती ने गाळण उडालेली.
“आवाज नक्कीच प्रेतातून येतोय”
पक्याची तर खात्रीच झाली होती!
मागचे दोघे हे सारखे थांबतात का म्हणून पुढच्या दोघांना शिव्या देऊ लागले!
आता पक्याला वाटायला लागले कुठून दुर्बुद्धी झाली आणि खांदे द्यायला आलो. म्हातारी जिवंत असली तर काय ? का हा भुताटकीचा प्रकार आहे? त्या मडकेवाल्याला विचारायचे तर मडकेवाला तर बराच पुढे गेलेला.माग बघू नको सांगितल्यामुळे तो पुढे पुढेच चाललेला! पायातले त्राण गेल्यासारखे वाटत होते. मागचे दोघे सारखे करवादत होते.पक्याने विचार केला या दोघांना जर कळाले तर पळूनच जातील. काय करावे कळत नव्हते.हळू हळू पुढे चालणेच योग्य असा विचार करून घाबरत मधेच म्हातारीच्या तोंडाकडे बघत पुढे निघाले.
कसे बसे थांबत थांबत प्रेतयात्रा नदीपर्यंत आली.
तिरडी खाली ठेवल्याबरोबर शिरपाने पक्याचे गचुन्डेच पकडले.
“कशाला थांबत थांबत चालत होता रे ? साल्या काय मस्करी लावली होती?”
शिरपाच्या हाताला पक्याला फुटलेला घाम जाणवला.
“काय झाल रे?”
पक्याने प्रेताकडे बोट दाखवले.
“अरे म्हातारी जिवंत आहे बहुतेक.आवाज येतोय कसला तरी!”
आता चौघांनीही अंदाज घेतला
“चू चू चू चू “
आता मात्र चौकडीची घाबरगुंडी उडाली.
दुसऱ्या बाजूला असलेल्या मडकेवाल्या माणसाला काहीतरी गडबड झाली असल्याचे जाणवले
मडके बाजूला ठेऊन खोळ सावरत तो जवळ आला.
“काय झाल हो भाऊ?”
मडकेवाल्या माणसाने घाबरून विचारले.
“काय रे म्हातारी नक्की मेलीय ना? तिरडीतून आवाज कसा काय येतोय!
“ अरे तो आवाज व्हय?”
मडकेवाला हसायला लागला!
“अरे भाऊ तुम्ही मर्दासारखे मर्द, अन अस घाबराया काय झाल?”
हसत हसत त्याने प्रेताच्या डोक्या जवळचे कापड बाजूला केले!
चूSS चू S करत एक कोंबडीच पिल्लू बाहेर आले व पळायला लागले.
“अवो  भाऊ आमच्या जमातीत माणूस मेला की त्याच्या तिरडीमध्ये कोंबडीच पिल्लू बांधायची रीत आहे. अस केल्याने माणूस स्वर्गात जातो अस म्हणतात. कशापायी एवढ घाबरायचं म्हणतो मी ?”
“चला आता प्रेताला अग्नी देऊ!!!!!!”
चौकडी चे चेहरे पहाण्यासारखे झाले होते!
                                  ................प्रल्हाद दुधाळ.