Saturday, July 25, 2015

पोपटमामा.

     पोपटमामा.
परवा खूप दिवसांनी गावाला गेलो होतो.थोडा निवांतपणा असला की मी गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत अगदी विनाकारण चक्कर मारतो.अगदी मारुतीच्या देवळापासून ते सरकारी दवाखाण्यापर्यंत हा फेरफटका असतो.मला आवडते असे करायला.रस्त्याने चालत असताना पावलोपावली बालपणीची एक एक आठवण येते,बालपणीच्या आठवणीत रमत गमत फिरणं खूपच आनंददायक असतं!
तर त्या दिवशीही असाच रमत गमत चाललो होतो.आजूबाजूला काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे दिसत होते. आपल्याच गावात आता आपल्याला न ओळखणारे खुपजण आहेत हे प्रकर्षाने जाणवले.अचानक समोर एक ओळखीचा चेहरा दिसला.मला पहाताच त्याच्या चेहऱ्यावर दिलखुलास हास्य पसरले.आमच्या शाळेचा सेवानिवृत्त शिपाई होता तो!पांढरा मळकट पायजमा,फिक्कट निळा सदरा, डोक्यावर टोपी असा पेहराव! आम्ही त्याला पोपटमामा म्हणायचो.
“नमस्कार,कधी आलायस?”
“नमस्कार नमस्कार मामा,आजच आलोय, कसं चाललंय मामा?”
“ठीक आहे.आता रिटायर होवून पाच वर्षे झाली बघ.थोरल्याच लग्न केलं यंदा.धाकटासुध्दा लागलाय कामाला!” “तूझ कसं काय, ठीक ना?”
त्याने आपुलकीने विचारले.मी मात्र भूतकाळात अगदी शालेय जीवनात हरवलो ....
मी आठवीत हायस्कूलमधे प्रवेश घेतला होता.एकोणीसशे चौऱ्याहत्तर साल होते ते. तोपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं त्यामुळे हायस्कूलचा खाकी पांढरा युनिफॉर्म व इनशर्ट हे सगळ अगदीच नवीन होत आमच्यासाठी! त्यात शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड नावाचे सर होते ते खूपच कडक होते.सहा फूट उंच व धिप्पाड! लांब लांब मिशा व कानावर तसेच लांब लांब केस! हातात वेताची काठी घेवून हे सर सकाळी पावणेसातला हायस्कूलच्या गेटवर उभे राहायचे.सात वाजून अगदी एक मिनिट उशीर झाला तरी विद्यार्थ्यांना सर गेटच्या बाहेर उभे करायचे.साधारण सव्वा सात वाजेपर्यंत असे वीस पंचवीस विद्यार्थी तरी सापडायचे! मग हे सर त्यांना ओळीत उभे करून वेताच्या काठीने पायांवर फटके मारायचे. अगदी त्यांचे हात दुखेपर्यंत सपासप काठी मारत राहायचे! अगदी दररोज असा मार खाण्याचा कार्यक्रम असायचा शाळेचा शिपाई असलेल्या पोपटमामाला हे सगळे असह्य व्हायचे पण सरांसमोर बोलायची त्याचीच काय कुणाचीही हिंम्मत नव्हती. इत्तर शिक्षकानाही मुलांना असे गुरांसारखे मारणे आवडत नव्हते पण सांगायचे कसे,म्हणून तेही गप्प बसत.काही तरी करून मुलांना अशा दररोज पडणाऱ्या मारापासून वाचवायला हवे असे या पोपटमामाला अगदी मनापासून वाटत होते.मग त्याने या गोष्टीचा थोडा अभ्यास केला.बरीच मुले शाळेची घंटा वाजली की घरातून निघत अगदी धावत पळत शाळेत पोहचत,पण जे विद्यार्थी वेळेत पोहोचू शकत नसत ते नेमके सरांच्या तावडीत सापडायचे व भरपूर मार खायचे,जास्त करून थंडीच्या सिझनला जेंव्हा दिवस उशीरा उगवतो तेंव्हा अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढते हे मामाच्या लक्षात आले .मग त्याने यावर एक उपाय शोधला.
सकाळी सातच्या शाळेची घंटा पावणेसातलाच वाजायला लागली. पावणे सात ते सात अशी पंधरा मिनिटे हे मामा घंटा वाजवत रहायला लागले.गावातील अगदी शेवटच्या आळीतली मुलेही बेल सुरू झाल्याबरोबर पळत निघाली तर सात वाजायच्या आत शाळेत पोहोचू लागली.याचे चांगले परिणाम दिसायला लागले. मार खाव्या लागणाऱ्या मुलांच्या संखेत लक्षणीय घट झाली.अर्थात यासाठी पोपटमामाचे सर्वानी कौतुकच केले.....
“ अरे कसला विचार चाललाय?” मामाच्या प्रश्नाने मी भानावर आलो. “काही नाही मामा!” मी हसलो.
“चल, शेतात जायचंय, भेटत जा,असाच आला की” ...मामाने माझा निरोप घेतला.
मी पुढे चालायला लागलो.बालपणीच्या आठवणीना उजाळा देत देत एक एक पाउल पडत होते.....
. ........प्रल्हाद दुधाळ.

     

No comments:

Post a Comment