Monday, July 28, 2014

आनंदी जीवन

                                आनंदी जीवन.
                   आपले जीवन आनंदात असावे असे प्रत्येकाला वाटत असते, किंबहुना आपले जीवन सुख समाधान व आनंदात असावे यासाठीच माणसे जीवनभर अनेक प्रकारचे खटाटोप करत असतात.कुणाला वाटते की आपल्याला भरपूर संपत्ती मिळाली की त्याचे जीवन आनंदाने भरून जाईल,तर कुणाला वाटते त्याला अनिर्बंध सत्ता मिळाली की त्याच्यासारखा आनंदी तोच! कुणी गृहसौख्याला आनंदी जीवन समजते तर कुणी आपल्याच मस्तीत जगण्याला आनंदी जीवन मानत असतो! काही लोक विविध व्यसनात आपला आनंद शोधत असतात! अशा प्रकारे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, जन्मापासून ते मरेपर्यंत माणसे आपापल्या परीने आनंदी रहाण्याचा प्रयत्न करत असतात. आनंदाच्या मागे माणूस अक्षरश: धावत असतो! यात अगदी तुम्ही,मी,आखिल मानवजात असेच वागते!सर्वजण अशा आनंदी जीवनासाठी धावपळ करत असतात ! खरच मिळतो का आनंद अशा धावपळीतून? होते का आनंदी माणसाचे जीवन त्याच्या अपेक्षेप्रमाणे?
                    मला असे वाटते की, आपल्याला आनंदी व्हायचे आहे म्हणजे नक्की काय मिळवायचे आहे? हे जोपर्यंत माणूस निश्चित करत नाही तोपर्यंत तो आनंदी जीवन जगतो आहे की नाही हे ठरवणे अवघड आहे. म्हणजेच,प्रथम आपल्या आनंदाच्या कल्पना ठरवायला हव्यात.मग या कल्पना साकार झाल्या की खर तर तुम्ही आनंदी झाला असे व्हायला हवे, पण तसे होत नाही आनंद ही भावना अशी कोणत्याही व्याख्येत बसवणे अशक्य आहे! एक उदाहरण म्हणून सकाळच्या चहाचे उदाहरण घेऊ, सकाळी उठल्याबरोबर बाल्कनीत कोवळ्या उन्हात बसून चहाचे घोट घेत आजचा पेपर वाचण्यात एखाद्याला प्रचंड आनंद मिळतो असे समजू.त्या व्यक्तीला त्याच्या अपेक्षेप्रमाणे बाल्कनीत पेपर व चहा मिळाला.तो घुटके घेत चहा पीत आहे.आनंदात डुंबत दररोज असा तो चहा पीत असतो तसाच तो आजही पीत आहे पण त्याचे मन ऑफिसात आज प्रमोशनच्या ज्या ऑर्डर निघणार आहेत त्यात आपले नाव असेल की नसेल या चिंतेत आहे. मग तो आनंदी आहे असे म्हणता येईल का? तर नाही असेच म्हणावे लागेल!अशा अनेक गोष्टी मानवी जीवनात त्या त्या प्रसंगी आनंद निर्माण करत असतात! अशा प्रासंगिक आनंदाच्या कल्पना माणसाच्या  सर्वंकष आनंदी जीवनासाठी कुचकामीच ठरतात. अशा प्रासंगिक आनंदाचे अनेक क्षण प्रत्येकाच्या दररोजच्या आयुष्यात येत असतात पण त्यावरून त्या व्यक्तीचे जीवन आनंदी आहे असे म्हणणे धाडसाचे ठरू शकते! मग आनंदी जीवन कशाला म्हणायचे?        
                                आनंदी आणि समाधानी असणे ही एक मानसिक अवस्था आहे! जीवनभर आनंदी असण्यासाठी आपल्या जीवनाबद्दल त्याच्या उद्देशाबद्दल खूप अभ्यासाची गरज आहे.आपल्या जीवनात कोणत्या कोणत्या गोष्टींनी आनंद बहरू शकतो ते डोळसपणे ठरवायला हवे.तात्पुरत्या स्वरूपातील आनंदापेक्षा आपले जीवन कायम आनंदात राहील अशा कारणांची जाणीवपूर्वक यादी करायला हवी.अमक्या गोष्टीत खूप आनंद मिळेल पण त्या गोष्टीं ऐवजी अजून कशा कशामुळे तोच आनंद मिळू शकतो यावरही विचार करून ठेवायला हवा! कायम आनंदी अवस्थेत रहाण्यासाठी जीवनातले अगदी छोटे छोटे नकळत आयुष्यात येणारे आनंदी क्षणही जाणीवपूर्वक वेचता यायला हवेत.दुसऱ्याला झालेला आनंदही आपला आनंद म्हणून साजरा करता यायला हवा! घेण्यात आनंद आहेच पण काही देण्यातही आनंद असतो हे कळायला हवे. आपल्या प्रगतीमध्ये आनंद आहेच पण समाजाच्या उन्नतीमधील आनंदाचीही अंगी जाणीव हवी. कुणाला दु:खी करून आनंद मिळत असेल तर तो आनंद कामाचा नाही हे समजणारी संवेदना अंगी असायला हवी! आपल्याला मिळालेले मानवी जीवन हे भीती,चिंता,कटकटीने ग्रासलेले वा कसे तरी रडत खडत धुसफुसत ढकलण्यासाठी नसून ते आनंदात व उत्साहात प्रत्येक दिवस एक उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी आहे असे सतत मनावर बिंबवायला हवे.आयुष्यातली घडणारी प्रत्येक घटना आपल्या मनाप्रमाणे घडणे अशक्य आहे, तसेच समोर येणारा प्रत्येक माणूस आपल्याला अपेक्षित आहे तसाच वागणेही अशक्य आहे याची जाणीव ठेऊन आनंदी जीवनासाठी या जीवनातला प्रत्येक क्षण प्रसन्न कसा होईल ते बघायला हवे.आयुष्यातले येणारे चढ उतार हे जीवनाचे  अविभाज्य भाग आहे, त्यामुळे ते समोर येणारच आहेत,ते चढ वा उतार साजरे करायला शिकायला हवे. समोर येणाऱ्या  समस्येला आनंदातला अडसर न मानता अशा समस्येवर स्वार होऊन आव्हान स्वीकारण्यात मिळणारा आनंद उपभोगता यायला हवा! अशा वृत्तीने समस्या ही समस्या न रहाता एक संधी म्हणून स्वीकारली जाईल व या संधीच सोन करण्यातला आनंदही साजरा करता येईल!
                         आपल्या दैनंदिन रुटीन आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण हात जोडून उभे असतात पण आपल्या आनंदी जीवनाच्या पारंपारिक ठोकताळ्यात आपण गळ्यापर्यंत अडकलेले असल्यामुळे असे  छोटे छोटे आनंदाचे क्षण न उपभोगताच आपण जगत असतो. आभासी आनंदाच्या कल्पनाविश्वात रमत रहातो आणि जीवनातला खरा आनंद जीवनातून निसटून जातो! हे समजून घ्यायला हवे की थोडं हटके वागून प्रचंड आनंद निर्माण करता येतो.
             आयुष्यात आपल्याला जे मिळाले नाही त्यासाठी उगाच रडत वा चडफडत राहण्यापेक्षा जे समोर आहे त्यात सुख समाधान शोधून आनंदी जीवन जगण आपल्या मानसिक व शाररीक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि हे उत्तम मानसिक व शाररीक आरोग्य म्हणजेच आनंदाची गुरुकिल्ली आहे हे समजून घ्यायला हवे!
         थोडा वेगळ्या पद्धतीने  विचार केला तर ही गोष्ट लक्षात येईल.असा सकारात्मक दृष्टीकोन अंगी येण्यासाठी अगदी डोळसपणे आपल्या आनंदी जीवनाच्या कल्पना पुन्हा एकदा तपासून पहा! बघा, नुसत्या अशा उत्साही सकारात्मक विचारानेसुध्दा तुम्हाला प्रसन्न वाटत आहे! ही प्रसन्नता हा आनंद कायम कसा मिळत राहील यासाठी आजपासूनच स्वत:ला थोडं बदलायचं का?   

                                               ......................प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment