Friday, July 9, 2021

माझे_आवडते_शिक्षक

#माझे_आवडते_शिक्षक माणसाच्या जडणघडणीत आई-वडिलांच्या बरोबरीनेच त्याच्या शिक्षकांचेही अत्यंत मोलाचे योगदान असते. त्यातही एखादा शिक्षक किंवा शिक्षिका नकळत संपूर्ण आयुष्यभर पुरून उरतील एवढे महत्वाचे संस्कार करतात आणि त्या बाई किंवा सरांचे त्या माणसाच्या मनात आयुष्यभरासाठी आदराचे स्थान निर्माण होते. माझ्यावरही अनेक शिक्षकांनी असेच खूप चांगले संस्कार केले. एका अशिक्षित, अल्प-भूधारक शेतकरी कुटुंबातला मी.. आज मी जो काही आहे, तो केवळ मला शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर लाभलेल्या शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या संस्कार आणि मार्गदर्शनामुळेच! सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची गावात असलेली ‘शेती शाळा परिंचे‘ या शाळेत आणि पुढे रयत शिक्षण संस्थेच्या ‘कर्मवीर विद्यालय परिंचे‘ या माझ्या हायस्कूलमध्ये मला अनेक चांगले शिक्षक भेटले.त्यांनी मला शालेय अभ्यासक्रमात असलेले विषय तर शिकवलेच;पण खऱ्या अर्थाने जीवन जगणेही शिकवले. आपल्या तुटपुंज्या पगारातून माझी एसएससी परीक्षेची फॉर्म फी भरणारे पडवळ सर मला इथेच भेटले. साहित्य-कला-नाट्याचे बीज माझ्यात रुजवले ते जी. बी. विद्यासागर या माझ्या गुरुंनी.. तसं पाहिलं,तर विद्यासागर सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे.आम्हाला अभ्यासक्रमात आठवीपासून इंग्रजी हा विषय होता. आठवीपर्यंत एबीसीडी न येणाऱ्या आम्हाला विद्यासागर सरांनी अशा काही कौशल्याने इंग्रजी शिकवलं, की बस्स! त्या भाषेतला एक-एक शब्द शिकवण्याची त्यांची तळमळ, हातोटी इतक्या वर्षानंतरही अजूनही जशीच्या तशी लक्षात आहे. ‘थ्रो‘ आणि ‘कॅच‘ शिकवण्यासाठी त्यांनी वर्गात चेंडू आणला होता; तर ‘डान्स‘ हा शब्द शिकवण्यासाठी त्यांनी अक्षरश: आम्हाला नाचून दाखवलं होतं! सरांनी इंग्रजी विषयाची माझी इतकी तयारी करून घेतली, की बोर्डामध्ये इंग्रजीत मी पहिल्या पाचांमध्ये होतो.. विद्यासागर सर इंग्रजी तर चांगले शिकवायचेच; पण मराठी साहित्याचाही त्यांचा गाढा अभ्यास होता.आम्हाला इंग्रजी शिकवता शिकवता अनेकदा ते मध्येच मराठी कवितेविषयी बोलायला लागायचे. त्यांचा तो तास म्हणजे माझ्यासाठी अक्षरश: साहित्यिक पर्वणी असायची.त्यांनी अशा मराठीच्या जादा तासात आम्हाला कुसुमाग्रज, बालकवी, विंदा, भा. रा. तांबे, केशवसुत, ग्रेस अशा महान साहित्यिकांच्या अनेक गाजलेल्या कविता रसग्रहणासह शिकवल्या. एखाद्या कथेचा किंवा कादंबरीचा रसास्वाद कसा घ्यायचा, ते आम्ही त्यांच्यामुळे शिकलो. ‘नटसम्राट‘, ‘अश्रूंची झाली फुले‘, ‘एकच प्याला‘सारखी अनेक नाटके सरांना त्यातील प्रसंगांसहित तोंडपाठ होती.ते एखाद्या नाटकाविषयी बोलायला लागले, की असे वाटायचे की आपण ते नाटक स्टेजवर पाहतोय! अजूनही त्यांचे ते तास जसेच्या तसे आठवतात... विद्यासागर सरांनी शिकवलेलं ‘पृथ्वीचं प्रेमगीत‘, ‘खबरदार जर टाच मारुनी‘ वा ‘जन पळभर म्हणतील हाय हाय‘ यांसारख्या अनेक कविता आजही जशाच्या तशा स्मरणात आहेत. त्या साहित्यसंस्कारांमुळे पुढील आयुष्यात मला वाचनाची प्रचंड गोडी लागली. आपल्या वैयक्तिक आयुष्यात नोकरीत मी पायरी-पायरीने प्रगती साधत राहिलोच; पण लेखन क्षेत्रातही नेहमीच काही ना काही धडपड करत राहिलो..याचे श्रेय अर्थातच विद्यासागर सरांचे आहे. आतापर्यंतच्या माझ्या लेखनप्रवासामध्ये दोन कवितासंग्रह,एक लेखसंग्रह काही कथा आणि ललित लेख प्रसिद्ध झाले आहेत. २००७ साली प्रसिद्ध झालेल्या माझ्या पहिल्या कवितासंग्रहाला माझ्या आवडत्या शिक्षकाची ...या विद्यासागर सरांची प्रस्तावना घेण्याची माझी इच्छा होती.माझ्या मॅट्रिकनंतर पुढच्या 30 वर्षांमध्ये त्यांच्याशी अजिबात संपर्क नव्हता... रयत शिक्षण संस्थेतून ते उपसचिव पदावरून निवृत्त झाले होते. त्यांची प्रस्तावना घेण्यासाठी पुण्यात त्यांचे घर शोधून मी त्यांना भेटलो. माझी ओळख आणि भेटण्याचे प्रयोजन सांगताच त्यांनी आनंदाने हे काम केले. एक सुंदर प्रस्तावना लिहून दिली. माझे व्यक्तिमत्व घडण्यात त्यांनी कळत-नकळत केलेले संस्कारच कारणीभूत आहेत, हे सांगायला मला नेहमीच अभिमान वाटतो. ©प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment