Wednesday, July 6, 2016

मोबाईलची घाई नको ग बाई

मोबाईलची घाई नको ग बाई ....
      मागच्या आठवड्यात एका दुकानासमोर उभा होतो.एक काका दुकानदाराला आपल्या मुलाबद्दल सांगत होते-

"माझा  मुलगा फक्त चार वर्षांचा आहे  पण फारच हुशार आहे बर का! तो मोबाईलवरचे सगळे गेम खेळतो.फोटोसुध्दा काढतो, एवढेच काय मोबाईल मधले  सैराटचे “झिंगाट” गाणे सुध्दा त्याला  लावता येते! काय नाचतो तो त्या गाण्यावर ,एकदम झिंगाट !"
मोबाईलबाबत आपल्या पाल्याचे असे कौतुक अनेक पालक अगदी  उत्साहात करत असतात.आपला मुलगा किंवा मुलगी मोबाईल किंवा कॉंप्युटर वा लॅपटॉप अगदी लहान वयातही सफाईदारपणे वापरू शकतो याचा आजकालच्या पालकांना नको इतका अभिमान वाटत असतो! ते काका सांगत होते ते बरोबरच होते.आजच्या काळात अगदी  लहान वयातही  नव्या तंत्रज्ञानाविषयी मुलांना खूप समज आहे.अनेक पालक आपल्या  पाल्याला आवर्जून या वस्तू घेवून देतात! पण खरच अशा लहान वयात मुलांच्या हातात असा आधुनिक सुविधा असलेला मोबाईल देणे बरोबर आहे का? मोबाईल हे साधन माहितीच्या दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरलेले असले तरी लहान मुलावर त्याचे वाईट परिणाम होताना दिसत आहेत. ज्या वयात मुलांनी विविध संस्कारक्षम गोष्टी, कथा ऐकायच्या,अभ्यास करून चांगले मार्क मिळवायचे आपल्या भविष्यातील आयुष्याचा पाया पक्का करायचा त्या वयात मुले चित्रपटांमधील उडती गाणी ऐकताना-पाहताना दिसतात.गेम खेळताना दिसतात.मुलांना एक वेळ कविता पाठ नसतील; पण चित्रपटांची गाणी तोंडपाठ असतात. मोबाईलवर ही गाणी सातत्याने ऐकल्यामुळेच हे घडते.मोबाईल वापरामुळे मुलांच्या अभ्यासावर तर परिणाम होतोच पण त्यांच्या आरोग्यावर व एकंदरीत व्यक्तिमत्वावर अत्यंत दुरगामी वाईट परिणाम होवू शकतात हे पालकांना कळायला हवे. मोबाईलचे डोळ्यांना दिसणाऱ्या या दुष्परिणामाशिवाय इत्तर अनेक वाईट परिणाम आहेत.
 मोबाईल फोनचे धोके : तुम्ही सिगारेट, तंबाखूची जाहिरात पाहिलीत का? त्यावर स्पष्ट लिहिले आहे की, ‘सिगारेट, तंबाखूमुळे कॅन्सर होतो.’ तशीच आता मोबाइल वापरणार्‍यांसाठीही सुचना देण्याची वेळ आली आहे, एवढे मोबाईलचे गंभीर दुष्परिणाम होत आहेत आणि वयाच्या सोळा वर्षापर्यंत हे दुष्परिणाम दुप्पट वेगाने घातक आहेत!   मोबाइलच्या माध्यमातून उत्सर्जक किरणे म्हणजे रेडिएशनचा शरीरावर  खूपच वाईट परिणाम होतो  या दुष्परिणामाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ फार चिंतित आहेत.अनेक रिसर्च प्रोजेक्ट यावर कसून संशोधन करीत आहेत व त्याची माहिती जगासमोर ठेवत आहेत. धोक्याच्या इशार्‍याची घंटा वाजवत आहेत. लहान मुलांसाठी हे High Frequency Electro Magnetic field (PEMF) मेंदूसाठी व रक्तासाठी फारच हानिकारक असतात. याच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी,टेंशन, निद्रानाश व कानाच्या पडद्यावरही  वाईट परिणाम होतो.
  फिनलॅँड रेडिएशन अ‍ॅँड न्यूक्लियर सेफ्टी अथोरिटीच्या अहवालानुसार मोबाईल अतिवापरामुळे मानवी शरीरातील पेशी सुकण्यास सुरुवात झाली आहे. त्या आकसून जात आहेत. संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे की हे पेशीमधील प्रोटीन वाढवते व ते पेशी खराबीचे एक लक्षण आहे. मोबाइल फोन कानाजवळ ठेवल्यामुळे त्यातून निघणार्‍या रेडिओ लहरी डोक्यात शिरतात. त्यामुळे त्याभागातील उष्णतापमान वाढते व लोकल ब्लडफ्लो वाढतो. त्यामुळे अ‍ॅल्बुनिन रक्तवाहिनीतून निघून मेंदू पेशीत व पेशीजलात येतो. मोटोरोला कंपनीने सांगितले की रेडिएशन जास्त प्रमाणात की पॅड व माउथ पीसमधून पाझरत असते. हेच रेडिएशन मेंदूपेशींमध्ये जबरदस्तीने घुसतात. डोळे, कान या पेशीत शिरतात. डोळे व कान यातील पेशी सूक्ष्म व नाजूकपेशी असतात. मायक्रोव्हेवना अत्यंत संवेदनशील असतात.लहान मुलांच्यात तर त्याचा भयानक परिणाम होतो. उत्सर्जक किरणे लिव्हर, मूत्रपिंडाकडे जातात.छातीजवळ, खिशात किंवा पॅँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलमधील  किरण उत्सर्जनामुळे अवयव खराब होतात. ज्या कानाला मोबाइल ठेवता त्या बाजूला ट्यूमर होण्याचा धोका खूप आहे.
रेडिएशनमुळे मेंदू पेशींमध्ये संवेदना वाहून नेण्याची क्षमता असुरक्षित : रेडिएशनमुळे मेंदू पेशींमध्ये संवेदना वाहून नेण्याची क्षमता असुरक्षित होते. पेशीची कार्यक्षमता कमी होते.त्याशिवाय थकवा, गळावट, झोपेतील अनियमितता, लक्ष न लागणे, एकाग्रतेचा अभाव, पटकन प्रतिक्रया न निर्माण होणे,डोकदुखी, बैचनी, अशक्तपणा, हृदयात धडधडणे, रक्तदाब वाढणे इत्यादी लक्षणे दिसतात.
स्मरणशक्ती कमी होते : स्पॅनिश शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये चिडचिडपणा, मूड बदलणे वाढते व ते डिप्रेशनकडे जातात. त्यांची वागणूक व शिकण्याची क्षमता मंदावते, कमी होते. त्यामुळे  खोडकर, हट्टी मुलांना मोबाइल देताना पालकांनी काळजी घ्यावी. जी मुले सातव्या महिन्यात जन्मलेली आहेत, त्यांना बालपणात व नंतर मोबाइल देताना पालकांनी जास्त काळजी घ्यावी.

तर अशा प्रकारे मोबाईल लहान मुलांसाठी घातक तर आहेच पण मोठया माणसांसाठीसुध्दा याचा अतिवापर धोक्याचा आहे. त्यामुळे -----

वाटला जरी जरूरी वापरावा तो जपून

वेड त्याच लागल की,अभ्यासाचं खर नाही....

व्हिडीओ गाणी गेम सिनेमा वाटे जरी भारी  

बालपणी मोबाईलची घाई नको ग बाई....
      --्--- प्रल्हाद  दुधाळ
   (नातवाला लिहून दिलेला निबंध)

No comments:

Post a Comment