Tuesday, December 21, 2021

प्रेम करूया स्वतःवर...

प्रेम करूया स्वतःवर.... स्वतःबद्दल काही ना काही तक्रारी असलेल्या अनेक व्यक्ती आपल्या अवतीभवती आपण बघत असतो... कुणाला त्यांचा जन्म गरीब घरात झाला याचा खेद असतो,कुणाला आपला रंग गोरा नाही म्हणून दुःख असते तर कुणी अजून काही ना काही कारणाने स्वतःला कमनशिबी समजत असतो.... खरं तर सृष्टीने माणसाला खूप काही दिलेले असते;पण अनेकांना त्याची जाणीवच नसते. पायी चालणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडे सायकल नाही म्हणून दुःख वाटते तर ज्याच्याकडे सायकल आहे तो बाईक नाही म्हणून चिडचिड करत जगत असतो. बाईक असणारा कार नाही म्हणून रडत असतो.प्रत्येकाला आपल्याकडे जे आहे याबद्दल काहीच वाटत नाही परंतु जे नाही त्याचे मात्र दुःख असते!अशी छोट्या छोट्या दुःखांची गाठोडी बाळगत माणूस जगत असतो. तशा अर्थाने माणूस कधीच जीवनाच्या कोणत्याच आघाडीवर समाधानी नसतो.त्याची हाव कधीच संपत नाही आणि मग तो स्वतःचा द्वेष करायला लागतो... माझं नशीबच फुटकं, मी असा असतो तर यंव केलं असतं आणि तसा असतो तर त्यांव केलं असतं असा बडबडत रहातो.स्वतःला,ज्या कुटुंबात जन्म घेतला त्या कुटुंबाला,समाजाला, देशाला दोष देत रहातो. याचे कारण माणसाला त्याच्यातल्या सामर्थ्याची जाणीव नसणे हे आहे.स्वतःवर, स्वतःच्या आयुष्यावर प्रेम नसणारी अशी अनेक माणसे आपण आजूबाजूला वावरत असलेली पाहतो. खरं तर प्रत्येक व्यक्ती जन्मत: खूप गुणांनी परिपूर्ण असते, प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठली ना कुठली उपजत कला असते, कुणी गाण्याचा गळा घेऊन आलेला असतो,कुणी चित्रकलेत पारंगत असतो... आपल्याला आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टींचे वरदान मिळालेले असते.आपल्याकडे खूप अंगचे गुण असतात,आजूबाजूला अनेक गुणवान माणसे असतात पण आपल्याला याची जाणीवच नसते आपल्याला असलेल्या अनुकूल परिस्थितीचे भान नसते आणि आपण या गोष्टींबाबत कधी गंभीरही नसतो.आपले सगळे लक्ष आसपासच्या सकारात्मक बाबींपेक्षा नकारात्मक गोष्टींकडे एकवटलेले असते.अशा नकारात्मक मनस्थितीचा एकूण जगण्यावरच वाईट परिणाम होत रहातो कलागुणांची,सृष्टीने भरभरून दिलेल्या वरदानांची त्या त्या व्यक्तीला जाणीव नसते त्यामुळे प्रथम प्रत्येकाने स्वतःला ओळखायला हवे.यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा वास्तव स्वीकार! यासाठी प्रत्येकाने आपले सामर्थ्य ओळखायला हवे.. "मी जसा आहे, जेथे आहे तसा स्वतःचा स्वीकार करतो.मी सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करतो, माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे" अशी भावना जोपासली तरच प्रत्येकजण स्वतःला ओळखू शकेल... 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...' मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले हे गीत मला त्यामुळेच खूप म्हणजे खूप आवडते. माणूस संवेदनशील कधी असतो? माणसाच्या हृदयात करुणा दयाभावना कधी जिवंत असते? माणूस स्वतःवर प्रेम करत असेल तरच तो इत्तरांप्रती प्रेमळ वागू बोलू शकतो. संवेदनशीलता हा प्रेमळ, दयाळू व्यक्तीचा स्थायीभाव असतो,असायला हवा... एकदा का स्वतःवर प्रेम करता आले की माणूस आयुष्यातले छोटे छोटे क्षण साजरे करायला लागतो.त्याच्या मनात सतत असेच विचार येतात.... असे मिळाले आनंदी मानव जीवन कोमल हृदय संवेदनशील सुमन! ब्रम्हांडाने दिले मनोभावे जे मागिले सुबुद्धी समृद्धी अन नियमित धन! गर्द ही हिरवाई पाणी हवा मोकळी आरोग्यसंपदा अशी मिळाली कायम! माणुसकीचा अती सुंदर हा वारसा जाणू शकतो परपीडा दु:खी मन! माया ममता साथ ही जिवलगांची कोण पेरते जीवनी प्रसन्न हे क्षण! भल्याबुऱ्या प्रसंगी अचानक त्या शक्ती मिळते मम मनास कोठून? सृष्टीचक्र नियतीचे अविरत फिरते कधी इंद्रधनुचा देखावा विलक्षण! अबोध अशा त्या शक्तीला त्या सृष्टीला सांज सकाळी कृतज्ञतापूर्वक वंदन! तेव्हा प्रेम करायला हवे स्वतःवर आणि इत्तरांवरही! .....© प्रल्हाद दुधाळ.पुणे 9423012020

साथ सावलीची...

साथ सावलीची.... हिंदू धर्मात एकूण सोळा संस्कार सांगितले आहेत. या संस्कारात विवाह अर्थात लग्न संस्कार हा एक महत्वाचा संस्कार आहे.या संस्काराचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन वेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या संस्कारात वाढलेले ते दोघे पती आणि पत्नी रूपाने सप्तपदी चालतात आणि आयुष्यभर एकमेकाला साथ देण्याची शपथ घेतात! कोणत्याही विवाहाचे यश हे दोघांनी सप्तपदीत दिल्या घेतल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत यावर आहे. पती आणि पत्नी ही संसाराच्या गाड्यांची दोन चाके आहेत असे म्हटले जाते ते यासाठीच! लग्न झाले की वधू आपल्या आईवडिलांचे घर सोडून पतीच्या घरी रहायला येते.आत्तापर्यंत आईवडिलांच्या छत्रछायेखाली वाढलेली ती नव्या घरात येते आणि आता तिने हे नवे घर आपलेसे करावे,तिथल्या लोकांना जसे सासू ,सासरे,दिर,नणंदा तसेच चुलत नात्यातली सगळी माणसे आपली मानावी,त्यांचे सुख ते आपले सुख मानावे त्या घराचे दुःख ते आपले दुःख मानून जबाबदारी निभावावी असे आपले संस्कार सांगतात.एखाद्या जोडप्याचे सहजीवन जर यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी दोन्ही जोडीदारांनी एकमेकाला मनापासून साथ असायला हवी.एकमेकांना समजून घेणे,जोडीदाराच्या गुणांबरोबर दोषांचाही स्वीकार करणे,एकमेकांच्या आनंदात सहभागाबरोबरच दुःखाच्या प्रसंगीसुध्दा एकमेकांस आधार देणे या गोष्टी मनःपूर्वक केल्या तरच जोडप्याचे सहजीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल... संसार यशस्वी होण्यासाठी पतीने बाहेरच्या सर्व जबाबदाऱ्या जसे आवश्यक असलेले धनार्जन करण्यासाठी योग्य असा नोकरी धंदा करणे, कुटुंबाच्या पालनपोषण व सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची व्यवस्था करणे इत्यादी जबाबदाऱ्या निभावणे आवश्यक आहे असे पूर्वी म्हटले जाई,परंतु आधुनिक काळात शिक्षण प्रसारामुळे पत्नीही सुविद्य असते घरातल्या जबाबदाऱ्या घेण्याबरोबरच ती सुध्दा अर्थार्जनासाठी बाहेर पडते.आपली नोकरी व्यवसाय पूर्ण कार्यक्षमतेने चालवणे या बरोबरच घरच्या पारंपरिक जबाबदाऱ्याही ती लीलया पेलताना दिसते. कुटुंबासाठी अर्थार्जन करण्यात आता तिचा सिंहाचा वाटा असतो त्यामुळे पत्नीबरोबरच पतीच्या जबाबदारीतही नक्कीच वाढ झालेली आहे हे प्रत्येक पतीने समजून घ्यायला हवे. पूर्वी पत्नीचे कार्यक्षेत्र हे चूल आणि मुल एवढेच मर्यादित होते.घरातल्या निर्णय प्रक्रियेत तिचा सहभाग क्वचितच असायचा;पण आता काळ बदलला आहे त्यामुळे आजच्या काळात पत्नीनेही घरातल्या आर्थिक सामाजिक बाबीत जबाबदारी निभावणे आवश्यक आहे. आज स्री पुरुष समानतेचे युग आहे त्यामुळे पत्नीने आपल्या जवळ असलेल्या ज्ञानाचा कौशल्याचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी आणि समजासाठीही कसा करता येईल हे पहाणे आवश्यक झाले आहे. नवरा आणि बायको यांची सावलीसारखी साथ एकमेकांना मिळाली तर घरात सुख समृध्दी आणि आनंद ओसंडून वाहत रहातो... पतीपत्नी मधले नाते आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारी माझी एक कविता.... एक गंमत सांगू तुला?जगणं आहे सुंदरशी कला! तुटेल एवढं ताणायचं नसतं,उसवलं तर नातं विणायचं असतं! एक गंमत सांगू तुला? जगणं म्हणजे अधांतरी झूला! धोक्यांनी डगमगायचं नसतं,एकमेकांना सावरायचं असतं! एक गंमत सांगू तुला?जगणं असावं रंगमंच खुला! मुखवट्यांना भुलायचं नसतं,चेह-यांना ओळखायचं असतं! एक गंमत सांगू तुला? स्वत:तच बघ मला! एकमेकात उणं बघायचं नसतं,सूर जुळवत जीवनगाणं गायचं असतं! बरोबर ना? ......©प्रल्हाद दुधाळ. 9423012020

Wednesday, December 15, 2021

लयाला चाललेल्या लोककला...

लयाला चाललेली लोककला... माझे लहानपण गावाकडे गेले आहे.थोडेफार समजायला लागले तेव्हापासून विविध लोककलांना मिळत असलेला लोकाश्रय अगदी जवळून पाहिला आहे.लोककलावंतांना सन्मान दिला जाई.दर एकादशीच्या दिवशी गावातील गोंधळी गावदैवत आणि पांडुरंगाची भजने त्याच्या डवराच्या तालावर प्रत्येक दरवाजावर येऊन म्हणायचा आणि आयाबायानी घातलेल्या शिध्याने त्याची झोळी भरून जायची. नवरात्राच्या नऊ दिवसात ग्रामदैवत भैरवनाथाच्या पायावर आपली सेवा रुजू करायला काही ठराविक कलावंतीण यायच्या.कोल्हाटी समाजातील या कलावंतीनी दर वर्षी न चुकता नवरात्रीत हजर व्हायच्या.रोज रात्री पायात घुंगरू बांधून त्यांचे पाय ढोलकीच्या तालावर थिरकत असायचे.या कलावंतीना दौलतजादा करायला गावातले प्रतिष्ठित हजर असलेले आठवतात... एकदा सुगी सुरु झाली की काढणी मळणी उपणनी अशी कामे सुरू व्हायची.सगळे कुटुंब खळ्यावर कामासाठी उपस्थित असायचे.या सीझनला वासुदेव, पिंगळा, कुडमुडे जोशी, नंदिवाले असे लोककलाकार दारावर अथवा खळ्यावर हमखास हजेरी लावून जात.पिकलेल्या पिकातून सुपभर अशा कलावंतांच्या झोळीत ओतले जाई आणि भरभरून आशीर्वाद देऊन ही मंडळी जायची. यात्रा जत्रेचा सिझन सुरू झाला की ढोल लेझीम पथके अशा यात्रात हजेरी लावायला सज्ज होत.यात्रेच्या दिवशी अशा बाहेर गावाहून आलेल्या ढोल पथकांचे डाव पहाणे खूप आनंदाचे असायचे.उत्तम खेळ करून आपली कलाकारी दाखवणाऱ्या पथकाला खास बक्षीस जाहीर केले जात असे. गावच्या ग्रामदेवतेच्या उत्सवांचा अर्थात जत्रा यात्रा उत्सवाचा तमाशा फड हा अविभाज्य भाग असायचा. कोणत्या गावाने कोणत्या लोकनाट्य तमाशाला त्या वर्षी सुपारी दिली आहे हे आवरजून पाहिले जात असे. जत्रेतला तमाशा आणि त्याचे वगनाट्य जेवढे फर्मास त्यावर जत्रा कशी झाली याचे मोजमाप लोक करत.... संक्रातीच्या आधी महिनाभर गावात मारीआईचा फेरा येत असे.पोतराजाच्या आसुडाच्या फटके आणि ढोलकीच्या गुबुगुबु आवाजाने गावाकडे मरीआईचा डोलारा आल्याची वर्दी मिळे.आणि सवाष्णी पूजेच्या तयारीला लागत.या वर्षी संक्रात काय काय लेऊन आली आहे,तिने कोणता रंग घातला आहे, कोणत्या दिशेकडून आली आहे, कोणत्या दिशेकडे जाणार आहे यावरून संक्रात सणात काय काय वर्ज्य करायचे याची माहिती घेतली जात असे. हा फेरा घेऊन येणाऱ्या जोडीला धन धान्याची आणि ओटी बरोबर आलेल्या सामानाची बऱ्यापैकी कमाई होत असे. गावात कधी गारुडी येत असे.त्याचे खेळ बघायला पोराटोरांची चांगलीच गर्दी व्हायची.त्याच्याकडील मुंगूस आणि सापाची लढत बघायची उत्सुकता ताणत ठेवत गारुडी त्याच्याकडे असलेले ताईत मोठ्या खुबीने विकायचा. नजरबंदी चे जादूचे प्रयोग करून गारुडी लोकांचे मनोरंजन करत आपला गावातला शेअर घेऊन जात असे. गावात कधीतरी अचानक डोंबाऱ्याचा खेळ यायचा आणि त्यातल्या डोंबाऱ्याचा पोरांचे कसरतीचे खेळ पाहून गाव अंचांबित होऊन जात असे. त्यातल्या छोट्या मुलीने दाखवलेले खेळ गावात पुढे कित्येक दिवस चर्चेत असायचे. आता गावांचे शहरीकरण झाले आहे.आता लोककलेला खेड्यात सुध्दा पूर्वीसारखा लोकाश्रय राहिला नाही.अनेक लोक कलावंत आता त्यांचे पारंपरिक व्यवसाय सोडून नोकरी धंद्याची वाट चोखाळत आहेत.नव नव्या मनोरंजनाच्या आधुनिक सोयींनी बाळबोध लोक कलेचे महत्व आज संपवले आहे. शहरात सोडा; पण ग्रामीण भागातही लोककला नामशेष होत चालली आहे... ©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

Wednesday, December 8, 2021

पन्नास वर्षे पुढे..

पन्नास वर्षे पुढे... पन्नास वर्षांपूर्वीच्या जगात आणि आजच्या जगात जमीन अस्मानाचा फरक आहे. गेल्या पाच दशकांत जगातील उपलब्ध तंत्रज्ञानात शेकडोपट प्रगती झाली आहे.सोयी सुविधांमध्ये कैक पटीने सुधारणा झाली आहे. मानवी बुद्धिमत्तेने अनेक चमत्कार घडवून पन्नास वर्षात विज्ञान तंत्रज्ञानात कल्पनातीत गोष्टी घडलेल्या आमच्या पिढीने प्रत्यक्ष पाहिले अनुभवले आहे ... एक विचार सहजपणे मनात डोकावून गेला.... मला दिव्य दृष्टी मिळून पन्नास वर्षानंतरचे जग बघता आले तर? नक्की कसे असेल हे जग? मी विचारांनी त्या जगात पोहचलो....मी पाहिले.... आता जगात तंत्रज्ञानाने अत्युच्च पातळी गाठली आहे.लोकांना आता संभाषण करण्यासाठी बोलणे लिहिणे किंवा वेगळ्या कोणत्याही मीडियाची गरज भासत नाही. अती विकसीत सूक्ष्म लहरींच्या जोरावर माणूस एका मनातील संदेश दुसऱ्या मनात केवळ विचार करून पाठवू शकतो.आज असलेल्या स्मार्ट फोनच्या जागेवर अदृश्य असे स्मार्टफोन जे नजरेने दिसत नाहीत विकसित झाले आहेत.ज्याला संदेश पाठवायचा आहे त्याचा फक्त चेहरा नजरेसमोर आणला तरी त्याच्या संवेदन यंत्रणेला नोटिफिकेशन जाते आणि समोरच्या व्यक्तीकडून तो कोडेड संदेश स्विकारला किंवा नाकारला जातो. एकाच्या मनातील गोष्ट दुसऱ्याला अगदी मायक्रो सेकंदात पोहोचते. सूक्ष्म लहरीवर आधारीत अशी मेट्रो सेवा शहरांतर्गत वाहतुकीसाठी वापरली जाते पूर्वी ज्या प्रवासाला तास दोन तास लागायचे त्यां प्रवासाला आता केवळ पाच दहा मिनिटे लागतात.रस्त्यांवर आता अजिबात ट्रॅफिक नसते. प्रदूषण नामशेष झाले आहे.सर्व यंत्रणा आता अत्याधुनिक झाल्या आहेत त्यामुळे माणसा माणसात बोलणे भेटणे या गोष्टी इतिहास जमा झालेल्या आहेत. एका संदेशावर आता सरकारी कामे होतात.कुठल्याही कामासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत.केवळ एका संदेशावर तुम्हाला तुमचे काम करून घरपोहच मिळते. कुटुंब व्यवस्था, लग्नसंस्था, सणसमारंभ आता इतिहासजमा झालेले आहे .आता केवळ लिव्ह इन रिलेशनचा जमाना आहे.आता कुणीही कुठल्या नात्यात स्वतःला बांधून घेत नाही आणि बांधत नाही.आता केवळ शुध्द व्यवहारावर जग चालते मूल पाच वर्षाचे झाले की आई बापाला सोडून स्वतंत्र राहायला लागते त्याची सगळी जबाबदारी सरकार घेते. या जगात भावनेला थारा नाही. सर्व गोष्टी मायक्रो रोबोट करतात. माणसे केवळ यंत्रवत व्यवहार करतात. आता जगात कोणतीही नाती खरी नसतात.आभासी नात्यामुळे कोणीही कुणाशी भावनिक दृष्ट्या जोडलेला नसतो. खरी नातीच नसल्याने वाद भांडण तंटे रुसवे फुगवे असल्या गोष्टी नाहीत.जगाला अभिप्रेत असलेल्या आदर्श जगात आता माणूस रहातो आहे....एकदम शांत....निवांत... नो कलकलाट... नो गोंधळ.... " ए मूर्खा दिसत नाही का, का धक्के मारत चालतोय? दिवसा घेतली की काय?" कुणाला तरी माझा धक्का लागला आणि त्याच्या आवाजाने मी भानावर आलो.... त्या जगात पोहोचायला अजून पन्नास वर्षे आहेत तर.... जाऊ दे तोपर्यंत आहे तेच खरे जीवन.... © प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

Sunday, December 5, 2021

डुलकी दुपारची

डूलकी दुपारची.... आयुष्यात काही काही गोष्टींची वेळ यावी लागते असे म्हणतात ते काही खोटे नाही. माझ्या बाबतीत त्यातलीच एक गोष्ट म्हणजे दुपारच्या घटकाभर घेतलेल्या डुलकीत असलेले सुख अनुभवण्याची वेळ येण्यासाठी मला चक्क माझी वयाची साठी यावी लागली... शिकत असताना शाळा दिवसभर असायची,पुढे अगदी कॉलेजही संध्याकाळपर्यंत असायचे आणि कॉलेज लाईफ संपण्यापूर्वीच नोकरीत रुजू झाल्याने दुपारी झोपण्याचे ते सुख कधी मिळाले नव्हते.त्यातच आम्ही पडलो आयुर्वेदाचे हौशी अभ्यासक,आणि आयुर्वेदिक जीवनशैलीत जे वाचनात आले होते त्याप्रमाणे दुपारची झोप म्हणजे रोगांना आमंत्रण! त्यामुळे दुपारची झोप नको रे बाप्पा, असेच मनावर कोरले गेले होते.... आमचे अनेक मित्र छोटे मोठे व्यावसायिक होते ते मात्र या बाबतीत खूप म्हणजे खूप नशीबवान! सकाळी आठ नऊ वाजता आपल्या व्यवसायाच्या जागेवर जायचे,दुपारी घरी येऊन गरम गरम जेवण करायचे आणि मस्त पैकी पडी मारायची! चारनंतर वाफाळलेला चहा घेऊन पुन्हा व्यवसायाच्या ठिकाणी हजर! अशी मजेतली जीवनशैली प्रत्येकाला आकर्षक वाटणे अगदी साहजिक आहे. खरं तर बऱ्याच लोकांना दुपारी झोपावे आणि त्यातले सुख आपल्यालाही उपभोगता यावे अशी आंतरिक इच्छा असते परंतु बहुसंख्य लोकांना त्यांच्या नोकरी व्यवसायामुळे हे केवळ अशक्य असते... माझ्या बाबतीतही हेच होते.मला या दुपारी घडीभर का होईना झोप घेणाऱ्यांचा नाही म्हटलं तरी हेवा वाटत असायचा. ऑक्टोंबर २०१९ मध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर भरपूर फिरायचे, आपल्या छंदासाठी वेळ द्यायचा, परदेशात ट्रिपला जायचे.ज्येष्ठ नागरिक संघात रमायचे असे रम्य प्लॅन्स तयार होते;पण मार्च २०२०मध्ये कोरोनामुळे लॉक डाऊन लागले आणि जगाचे चक्र अक्षरशः थांबले.आमची निवृत्तीनंतर काय काय करायचे याची पाहिलेली स्वप्ने अक्षरशः कोमेजून गेली!मग सुरू झाली वेळ घालवण्याची लढाई....खाणे, बसणे, वाचन, टिव्ही,घरातल्या घरात येरझाऱ्या, घरातल्या कामातली बिनकामी लुडबुड...तरीही वेळ जात नव्हता! झोप कितीही आकर्षक वाटत असले तरी दुपारी शक्यतो झोपायचे नाही असे ठरवले होते,पण दुपारी जेवण झाले की नुसते बसून कंटाळा यायला लागला.सोफ्यावर बसून पाठ अवघडून येऊ लागली,मग जरा पाठ टेकवू... असे म्हणत दुपारी बेडवर आडवे होणे सुरू झाले आणि त्या आडव्या होण्याचे वामकुक्षीत रूपांतर कधी झाले ते माझे मलाच समजले नाही! न दुपारची झोप आरोग्याला हानिकारक आहे हे मनावर कोरलेले असूनही या डुलकीचा मोह मात्र अनावर होऊ लागला आणि शेवटी मनाची समजूत घातली....त्यातच कुठे तरी एका प्रख्यात वैद्यांनी लिहिलेले वाचनात आले....दुपारच्या जेवणानंतर आटोपशीर वामकुक्षी घेणे आरोग्यास हितकारक असते! मग काय माझ्या वामकुक्षीचे शास्त्रशुध्द कारणही हाताला लागले.... आता पूर्णवेळ 'नो टेन्शन फुल पेन्शन ' अर्थात निवृत्त असल्याने दुपारी दीड दोन वाजता मनसोक्त जेवण करायचे, थोडी शतपावली करायची आणि आवडीचे पुस्तक किंवा मोबाईल मध्ये एखाद्या आवडत्या लेखकाचे आर्टिकल वाचायला घ्यायचे.वाचता वाचता अचानक डोळे जड होतात ती वेळ साधायची आणि निद्रादेवीच्या अधीन होऊन जायचे. या डुलकीतली सुखाची अनुभूती? छे हो ते सुख शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य! ती वाचायची किंवा ऐकायची गोष्ट नाही तर अनुभवायची गोष्ट आहे तर उगाच चर्चेत वेळ घालवू नका आपल्याला रुचेल पचेल आणि शरीराला झेपेल इतकी वामकुक्षी अर्थात दुपारची झोप नक्की घेऊन बघा आणि या सुखाची सुंदर अनुभूती जरूर घ्या.... © प्रल्हाद दुधाळ पुणे. 9423012020

Monday, November 29, 2021

यंत्र मानव विचार करू लागला तर...

यंत्र मानवाला विचार करता येऊ लागला तर... नुकताच मी एका मॉलमध्ये गेलो होतो तिथे काही कामे यंत्र मानव करताना दिसले.उदाहरणार्थ मी पाहिले की मॉलमधील फरशी साफ करण्यासाठी एक रोबोट अर्थात यंत्रमानव बसवलेला आहे. मी शांतपणे त्या यंत्रमानवाचे काम पहात होतो.तो भिंतीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी सरळ रेषेत चालत तो जमिनीवरचा कचरा स्वाहा करत होता.त्याला सोपवलेली जबाबदारी तो इतक्या इमान इतबारे करत होता की त्याचे ते काम पहातच रहावे असे वाटत होते. सहजच मनात विचार आला की या यंत्रमानवाच्या जागी खराखुरा माणूस असता तर त्याने हेच काम करताना किती चुकारपणा केला असता? त्याच्या मागे एक सुपरवायझर पुन्हा त्या सुपरवायझरचा मुकादम एवढे मनुष्यबळ ठेऊनसुध्दा कामात हलगर्जीपणा झाला असता;पण हा यंत्रमानव त्याला दिलेल्या आदेशाचे किती तंतोतंत आणि शिस्तीने पालन करत होता... माणसाने त्याच्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर असे कितीतरी प्रकारचे यंत्रमानव तयार केले.माणसाचे कष्ट कमी करून सगळी कामे अगदी चुटकीसरशी व्हावीत,मानवी अंगमेहनत कमी व्हावी म्हणून, माणसाच्या बुध्दिवर अकारण पडणारा ताण कमी व्हावा, एकूणच उत्पादन क्षमता वाढावी म्हणून अशा यंत्रमानवांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली.या यंत्रासाठी काही ठराविक प्रोग्राम डिझाईन करून त्याला दिलेल्या ठराविक आदेशप्रणालीच्या भरवशावर माणसाची अनेक किचकट वेळखाऊ कामे सोपी करण्यात माणूस यशस्वी झाला. समजा काही चमत्कार झाला आणि माणसाने तयार केलेले यंत्रमानव विचार करू लागले तर? मी विचार करू लागलो.... शेवटी यंत्रमानव ही मानवाचीच निर्मिती आहे त्यामुळे त्याने बनवलेला यंत्रमानव विचार करू लागला तर तो माणसासारखाच विचार करणार ना? मग सध्या इमाने इतबारे जमिनीची स्वच्छता करणारा यंत्रमानव अचानक माणसासारखा विचार करेल की ' काल तर ही जमीन मी स्वच्छ केली.समोर कचरा किंवा धुळही दिसत नाहीये,मग मी विनाकारण कशाला फिरत राहू? त्यापेक्षा जरा आराम केला तर मालकाला थोडेच समजणार आहे? त्याला विचार करण्याची शक्ती मिळाल्याने स्वतः वेगळ्या पद्धतीने काम करणे सुरू होईल.चुकारपणा् सुरू होईल. यंत्राला माणसाने दिलेली आज्ञावली कुचकामी होऊन तो यंत्रमानव स्वतःच्या विचारप्रणालीवर निर्णय घ्यायला लागेल.' काम करायचे की नाही, आज सुट्टी घ्यायची का, आज थोड्या कमी चकरा मारू ' अशा प्रकारे विचार करून तो मनमानी करायला लागेल. पैसे मोजून घेणारा आणि देणारा यंत्रमानव असाच स्वतःच्या मनाने वागायला लागला तर आर्थिक क्षेत्राचा खेळखंडोबा होऊन जाईल. विविध इंडस्ट्रीजमधील यंत्रमानव जर त्यांना सोपवलेली कामे सोडून स्वतः विचार करून वेगळे वागायला लागले तर उत्पादनांची गुणवत्ता मार खाईल. थोडक्यात यंत्रमानव जित्याजागत्या माणसासारखा विचित्र पद्धतीने वागायला लागेल आणि त्याला बनविण्यासाठीचा माणसाचा उद्देशच निकालात निघेल... यंत्र मानव विचार करायला लागला तर माणसात आणि त्याच्यात फरक रहाणार नाही किंबहुना माणसाला यंत्रमानव आपल्याला वरचढ होतो आहे हे सहनच होणार नाही.मग माणूस आपल्या अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावर यंत्र मानवाचा विनाश घडवून आणेल आणि या बाबतीत मानवाने केलेली प्रगती शून्य होऊन जाईल.... म्हणून माणूस यंत्रमानव त्याच्या आज्ञेप्रमाणे च काम करेल स्वतः विचार करू शकणार नाही याची काळजी घेत आला आहे आणि पुढेही घेत राहील कारण सर्व प्राणिमात्रात मनुष्य हा प्राणी फारच खतरनाक आहे! ©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

Friday, November 26, 2021

ज्ञानी- अज्ञानी

ज्ञानी-अज्ञानी ज्ञान अर्थात एखाद्या गोष्टी बाबतीत सखोल वास्तवाची जाणीव हा माणसाच्या जन्माबरोबर मिळणारा गुण नाही.प्रत्येक बाळ हे या पृथ्वीतलावर आल्यावर सारखेच असते.थोडीफार प्रत्येकाची आकलनशक्ती वेगळी वेगळी असू शकते;पण ज्ञान ही निश्चितच पुढच्या टप्प्यावर मिळण्याची गोष्ट आहे. दुसरे असे की प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रातले परिपूर्ण ज्ञान असणे केवळ अशक्य आहे.वाढत्या वयाबरोबर ज्ञानार्जन करण्याची भूकही वाढत जाते;पण व्यक्तीच्या आजूबाजूचे संस्कार,त्याला उपलब्ध असलेल्या संधी तसेच त्या व्यक्तीची ज्ञान ग्रहण करण्याची कुवत याप्रमाणे ती व्यक्ती कोणत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकते हे ठरते. मी असे मुळीच मानत नाही की आयुष्यात प्रत्येकाला योग्य संधी मिळेल पण असेही घडत नाही की इथला संधी मिळालेला प्रत्येकजण निश्चितपणे ज्ञानी होईल इथे प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार ज्ञानार्जन करतच असतो;पण एका क्षेत्रात प्रावीण्य असलेली व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रात तशी अज्ञानीच असते. समाजात वावरताना मात्र आपल्याला काही स्वतःला सर्वज्ञ समजणारी माणसे पदोपदी भेटतात.त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत आहे असे निदान त्यांना तरी वाटते.एखाद्या बाबतीत आपल्याला ज्ञान नाही हे कबूल करणे अशा व्यक्तींना कमीपणाचे वाटते! कोणतीही व्यक्ती स्वतःला परिपूर्ण समजत असेल तर तो वास्तवातील सर्वात मूर्ख व्यक्ती आहे असे माझे मत आहे. या जगातला प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे,प्रत्येकाची आवड वेगळी आहे.ज्ञानार्जनाची प्रत्येकाची कुवत वेगळी आहे.एखाद्या व्यक्तीला मिळणारी संधी, अंगिकारता आलेली कौशल्य यावर त्या त्या व्यक्तीचे ज्ञान कमी जास्ती असू शकते .म्हणूनच कुणी कुणाला अज्ञानी म्हणून हिनवणे चुकीचे आहे तसेच मी सर्वज्ञानी आहे असा अहंगंड बाळगणे सुध्दा पूर्णपणे चुकीचे आहे. हजार अज्ञानी परवडले पण एखादा अर्धवट ज्ञानी खूपच त्रासदायक ठरतो. जगातील ज्ञानाचे भांडार अमर्याद आहे आणि कोणीही व्यक्ती प्रत्येक क्षेत्रातला तज्ज्ञ होऊ शकत नाही. तसा तर प्रत्येकजण आयुष्यभर विद्यार्थीच असतो. प्रत्येकाने या मर्यादांची जाणीव नक्कीच ठेवायला हवी. कसे ओळखायचे हे ज्ञानी-अज्ञानी? कणभर ज्यास ज्ञान नाही वास्तवाचे परी भान नाही तया मूर्ख असे समजावे हात चार लांबच राहावे ! फारसे जरी ज्ञान नाही शिकण्यास नवे ना नाही असंस्कारी तया समजावे संस्कारांनी सुज्ञ करावे ! तसा तो अडाणी नाही ज्ञानाचे त्यास भान नाही निद्रेत मग्न समजावे जागृतीचे यत्न करावे! मुळी ज्यास ज्ञान नाही स्वीकाराचे भान नाही लबाड त्यास समजावे ढोंग तयाचे उघड करावे ! सर्वज्ञानी परी गर्व नाही ज्ञान दानास नां नाही गुरुपदी योग्य समजावे ज्ञानामृत ग्रहण करावे ! तर अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी प्रत्येकाने ज्ञानार्जनाची कास धरावी.... प्रत्येकास अधिकाधिक ज्ञानार्जनासाठी शुभेच्छा.... ©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020