Wednesday, May 13, 2020

परिचय

परिचय
   अनोळखी लोकांसमोर गेलं, की त्यांना आपण कोण आहोत हे सांगण्याची प्रक्रिया म्हणजे परिचय असे ढोबळ्मानाने म्हणता येईल.
    एखाद्याचा परिचय करून द्यायचा म्हणजे काय काय माहिती दिली जाते?
  परिचयात सर्वप्रथम सांगितले जाते नाव, गाव, तो करत असलेला व्यवसाय, त्यातले त्याचे पद इत्यादी इत्यादी.
  मी एका अज्ञात्मिक शिबिराला गेलो होतो. तिथे एक प्रश्न विचारला गेला...
तुम्ही कोण आहात?
 तुमचा परिचय द्या...
मी माझं नाव सांगितलं.
 अजून...?
मी माझं आडनाव सांगितलं.
अजून...?
मी माझ्या वडिलांचा मुलगा, आजोबाचा नातू, पंजोबाचा पणतू, माझ्या मुलाचा बाप, नातवाचा आजोबा, पणतूचा पणजोबा इतपर्यंत पोहोचलो.
बस एवढाच परिचय?  अजून?
मग मी माझं पद, गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देशही सांगितला!
 अजून...?
मी विचारात पडलो, खरंच काय आहे माझा परिचय?
या जगातल्या हजारो माणसांसारखा एक माणूस,
असंख्य पशू, पक्षी, जीव, जंतू यांसारखाच एक सजीव!
 मनुष्यप्राणी?
हो,यत्किंचित प्राणीच!
बस्स,  तुझी एवढीच ओळख आहे...
एक... मनुष्यप्राणी!
हाच आहे तुझा खरा परिचय!
..... प्रल्हाद  दुधाळ.

Saturday, May 9, 2020

द्वेष...

द्वेष...
आज एक काम करा. डोळे मिटून जरा विचार करा आपण सध्या कुणा कुणाचा द्वेष करतो?
    कारण काहीही असो, आपण ज्या ज्या व्यक्तींचा द्वेष करतो अशांची नावे डोळ्यासमोर आणा.ही यादी कदाचित खूप मोठी असेल! असे असेल तर सरळ कागद पेन घ्या आणि त्यांची नावे लिहून काढा.
     तुम्ही माना अथवा मानू नका; पण हे सत्य आहे की तुम्ही द्वेष करत असलेल्या व्यक्तींची ही यादी जेव्हढी मोठी तेव्हढी तुमची मानसिक अस्वस्थता जास्त आहे!
    जरा प्रामाणिकपणे आपली मनातली ही अशांतता आणि त्यापोटी होणारे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होणारे  दुष्परिणाम मग ते मानसिक असतील वा त्यापुढच्या टप्प्यावर म्हणजे कोणत्या तरी शारीरिक आजाराच्या स्वरूपात असतील, त्याची पडताळणी करून घ्या. या सगळ्या अशांतीचे मूळ कदाचित तुम्ही लोकांच्या करत असलेल्या द्वेषभावनेत असू शकेल.         तुम्ही केलेल्या यादीतले एक एक नाव बंद डोळ्यसमोर आणा आणि स्वतःची माफी मागा. इथे तुम्हाला त्या व्यक्तीच्या समोर जाऊन माफी मागायची नाही तर त्या व्यक्तीच्या द्वेषभावनेचे ओझे मनावर बाळगल्याबद्दल स्वतःची माफी मागायची आहे. तुम्ही जेव्हा असे प्रत्येकाला तुमच्या द्वेषभावनेतून मुक्त कराल तेव्हा बघा तुम्हाला किती हलकं हलकं वाटायला लागेल. ते हलकेपण जाणीवपूर्वक सांभाळा.   
      तुम्ही द्वेष केल्याने समोरच्या व्यक्तीला काही फरक पडत नाही तर तुमच्या स्वतःच्या जीवनावर मात्र दूरगामी परिणाम होतो. म्हणून या द्वेष भावनेचा त्याग करा आणि जीवनातला आनंद साजरा करा...
 पटलं तर  जरूर अमलात आणून बघा!
  © प्रल्हाद दुधाळ.