Monday, April 8, 2013

जिवलग मित्र.- Story


                एका गावात एक गृहस्थ रहात होते.आयुष्यभर प्रचंड काबाडकष्ट करून आपला संसार त्याने उभा केला होता. मुलांना उत्तम शिक्षण दिले.गावात मोठे घर बांधून सर्व मुलाबाळांबरोबर तो रहात होता .मुले मोठी झाली, कमावती झाली.मधल्या काळात त्याची पत्नी किरकोळ आजाराचे निमित्त होऊन देवाघरी गेली.आता आपल्या जबाबदाऱ्या मुलांवर सोपऊन आपल्या लाडक्या मुलांबरोबर आरामशीर आयुष्य घालवायचे असे त्याने ठरविले. आपली सर्व मालमत्ता सर्व मुलांना त्याने वाटून टाकली व ते  आपल्या  विवाहित मुलांबरोबर राहू लागले.कालपरत्वे गृहस्थ म्हातारे झाले .नजर अधू झाली होती. ऐकायला कमी येऊ लागले होते.ज्या मुलांना त्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते त्या मुलांना आपला बाप आता अडचण वाटू लागला होता. त्यांची जबाबदारी घेण्यावरून घरात भांडणे होऊ लागली. म्हाताऱ्याचे गाठोडे आता एका बंदिस्त खोलीत हलवण्यात आले. खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. आठ आठ दिवस म्हाताऱ्याकडे कुणी फिरकत नव्हते. कुणी विचारपूस करीत नव्हते. होते नव्हते ते सर्व मुलांना देऊन आपण हे संकट ओढावून घेतल्याची जाणीव झाली पण आता उशीर झाला होता. अतिविश्वास नडला होता.आपले आयुष्य आता असेच सडणार या जाणीवेने गृहस्थ खूप दु:खी कष्टी झाले. त्याच गावात गृहस्थाचा लहानपणीचा एक मित्र रिटायर झाल्यावर नुकताच राहायला आला होता.स्वत:च्या मुलांकडून आपल्या मित्राचे चालू असलेले हाल त्याला समजले. आपण त्याच्यासाठी काहीतरी करायचे असे त्याने ठरविले.प्रथम त्याने काही नाणी घेतली व एका पितळी डब्यामध्ये भरली. तो डबा एका फडक्यात बांधला व दुपारच्या वेळी गृह्स्थ्याला भेटायला गेला .घरात त्यावेळी फक्त गृहस्थ्याची एक सुनबाई असते हे त्याने पाहून ठेवले होते. मित्राच्या घरी गेल्यावर त्याने मित्राची चौकशी केली. त्याच्या सुनेला त्याने तिच्या सासऱ्याचे त्याच्यावर कितीतरी उपकार असल्याचे सांगितले.सुनेने त्याला म्हाताऱ्याच्या खोलीत नेले. म्हाताऱ्याची अवस्थ्या पाहून मित्राला अत्यंत वाईट वाटले .आपल्या जिवलग मित्राशी खूप दिवसांनी मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत असे सांगून त्याने सुनेला खोलीबाहेर काढले व दरवाजा बंद केला. एक पत्र व आणलेला डबा म्हाताऱ्याकडे  दिले व पत्रातील मजकूर वाचायला दिला. म्हाताऱ्याने मित्राचे आभार मानले .अर्धा तास हितगुज करून मित्र निघून गेला .म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहून त्याची सून बुचकळ्यात पडली. तिने रात्री आपल्या नवऱ्याला घडलेली घटना थोडा मसाला लाऊन सांगीतली. सर्वांनुमते म्हाताऱ्याच्या मित्राला निश्चित काय घडले आहे ते विचारायचे ठरविले. गृह्स्थ्याच्या मित्राने त्याच्या मुलांना  आपल्याकडे  मित्राचे काही लाखांचे गुपित आहे व तुम्ही मुलांनी कमीत कमी पाच वर्षे तरी आपल्या बापाला नीट सांभाळले तरच ते माझ्याकडून तुम्हाला समजेल हे सुध्दा सांगितले. दुसऱ्या दिवसापासून घरातील सर्वजण जातीने वडिलांची चौकशी करू लागले .त्यांची वारंवार माफी मागू लागले. व्यवस्थित खायला व दवापाणी मिळू लागला .मनाने खचलेल्या गृहस्थ्याने पुन्हा उभारी धरली .समाधानी साडेचार वर्षाच्या नंतर गृहस्थ्य वारले. क्रियाकर्म होताच मुले वडिलांच्या मित्राकडे लाखांचे गुपित विचारण्यासाठी गेले.  

               मित्राने गुपित सांगितले “ माझ्या जिवलग मित्राने तुम्हाला निरोप दिला आहे की तुमच्या सारख्या मुलांना जन्म देण्याऐवजी निपुत्रिक म्हणून जगलो असतो तर बरे झाले असते! तसेच त्यांनी तुमच्यासाठी एक डबा पलंगाखाली ठेवला आहे त्यात लाखो रुपयांचे धन ठेवले आहे.हे धन वडीलांनी तुमच्यासाठी ठेवले आहे पण ते तुम्हाला तरच मिळेल जर त्यांच्या  शेवटच्या दिवसात  तुम्ही जे काही  केले ते लोभापायी केले नसेल!

               अन्यथा त्याची माती झालेली असेल! “

               लोभी कुटुंबाने ताबडतोब डबा शोधून काढला व उघडला.
  डब्यात माती होती ! 
 ................प्रल्हाद दुधाळ.
                       
             

Tuesday, April 2, 2013