Monday, January 12, 2015

धीर धरा रे.....

धीर धरा रे.....
   तुम्ही बस ने ऑफिसला निघाला आहात,रस्त्याने नेहमी प्रमाणे गर्दीचा महापूर ओसंडून वहात आहे.नेमका चौकातला सिग्नल बंद पडला आहे.बसच्या दोन्ही बाजूने सायकल्स,बाईक्स,टेम्पो, रिक्षा पुढे पुढे घुसत होत्या.त्यातच एक ट्र्क विरुध्द दिशेने घुसला आणि सर्व बाजुनी वहातुकीची कोंडी झाली कुणालाही थांबायला वेळ नाहीये.प्रत्येकाला पुढे घुसायची घाई आहे या प्रकारामुळे वाहतुक पूर्ण थांबली आहे बसमधील प्रवासी अगतिकपणे आजुबाजूला चाललेला गोंगाट व हॉर्नचे कर्कश आवाज सहन करत आहेत.कुणीही आपले वाहन मागे घ्यायला तयार नाही.तुम्ही हताश होऊन फक्त बघत राहण्याशिवाय काहीच करू शकत नाही.दररोजच्या धकाधकिच्या शहरी आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाने असा प्रसंग अनुभवलेला असतो.कधी बाईकस्वार म्हणून तर कधी त्या बस मधील प्रवासी म्हणून असा प्रसंग प्रत्येकाने अनुभवलेला असतो.असा गोंधळ का होतो?
तुम्ही आपल्या फॅमिली सोबत हॉटेल मधे डिनरला गेला आहात.रविवार असल्यामुळे हॉटेल मधे खुपच गर्दी आहे .काही कारणाने वेटरने मागवलेले पदार्थ द्यायला उशिर केला आहे.तुम्हाला प्रचंड राग येतो व तुम्ही वेटरला नको त्या भाषेत झापता.हॉटेलमधे गोंधळ घालता.सगळे लोक हा तमाशा बघतात.डिनरची सगळी मजा जाते.एरवी शांत असलेले तुम्ही असे का वागता?
एका नामवंत कंपनीत नोकरीसाठी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावणे आले.मुलाखत अगदी व्यवस्थित पार पडली.येथे आपले काम नक्की होणार याची खात्री असतानासुध्दा काहीतरी गडबड होते आणि तुमचे सिलेक्शन होत नाही.खात्री असुनही काम झाले नाही म्हणुन तुमची चिडचिड होते.
     आपल्या जीवनात अनेक असे प्रसंग येतात जेथे तुम्ही प्रमाणिकपणे प्रयत्न केलेले असतात पण आपल्याला हव्या त्या वेळी व हव्या त्या स्वरूपाचे रिझल्ट्स मिळत नाहीत.अशावेळी आपण आपले मनस्वास्थ्य हरवुन बसतो.पण शांतपणे विचार केला तर लक्षात येइल की प्रयत्न करणे जरी आपल्या हातात असले तरी हव्या तशा स्वरूपातील यश मिळणे हे नक्किच तुमच्या हातात नसते.थोडा धीर धरला तर अपेक्षीत असलेल्या मनासारख्या गोष्टी घडू शकतात.प्रत्येक वेळी घाइ करून काहीच साध्य होणार नाही हे समजुन घेणे आवश्यक आहे.
आजचा जमाना हा इंस्टंटचा आहे.बटन दाबल्याबरोबर अनेक गोष्टी घडतात.बॅंकेत रांगेत उभे राहण्याचा काळ मागे पडला आहे मशिन समोर उभे राहुन बॅंकेचे सर्व व्यवहार होतात.सिनेमाची फर्स्ट डे फर्स्ट शो ची तिकिटे लाइनमधे उभे राहुन काढायचा काळ कधीच संपलाय!हवी ती रो व हवी ती सीट पाहुन इंटरनेटवर सिनेमाची तिकिटेच काय तर विमान प्रवास,रेल्वे व बस प्रवास आरक्षित करणे एका क्लिकवर सहज शक्य झाले आहे.हव्या त्या वस्तूंची घर बसल्या ऑर्डर देउन घरपोच डिलिवरीने मिळतात.सर्व गोष्टी इतक्या सहजपणे मिळू लागल्यामुळे तसेच त्यासाठी लागणारा पैसा लठ्ठ पगाराच्या आय टी वा तत्सम नोकरीमुळे उपलब्ध असल्यामुळे एखाद्या गोष्टीची वाट पहाणे सवयीचे राहीलेले नाही किंबहुना अशा परिस्थितीमुळे आयुष्यात कोणत्याही गोष्टीसाठी धीराने घेणे वा कळ काढणे म्हणजे काय असते ते नव्या पिढीला माहीतच नाही! त्यामुळे 'धीर धरा रे धीरापोटी असती फळे रसाळ गोमटी' वा 'सब्र का फल मिठा होता है!' हे पचनी पडायला अवघड जात आहे.मिळणारी फळे कितीही रसाळ असली तरी त्यासाठी लागणारा धीर अंगी नसल्यामुळे खरी गोची झाली आहे! धीराने घेण्याएवढी सवड व वाट पहाण्याची आवड या दोन्ही गोष्टी अंगी नसल्यामुळे आयुष्यात हवे ते ताबडतोब न मिळाल्यास माणसे निराश होत आहेत.अगदी क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड करत आहेत.वेड्यासारखी वागत आहेत,असे वागुन नातेसंबंध व मैत्रीसंबंधात नको एवढी कटूता निर्माण होत आहे.नात्यांत दुरावा होण्यापर्यंत ती ताणली जात आहेत.
सहनशिलता,धीर ,वाट पहाण्याची तयारी किंवा आधुनिक भाषेत पेशंस माणसाच्या अंगी असायलाच हवी असे मला मनापासुन वाटते.प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती वेळ येइपर्यंत वाट पहाण्याला पर्याय नाही ही केवळ कल्पना नाही असे अनुभवाअंती वाटते.काही गोष्टी पराधीन असतात,काही निसर्गाच्या हातात असतात तर काही गोष्टींसाठी प्रचलित कार्यप्रणाली प्रमाणे ठरलेली एक वेळ यावी लागते.कितिही उतावळेपणा केला तरी होणार्या गोष्टी सुयोग्य वेळीच घडतात त्यामुळे धीर हा धरायलाच हवा ही अपरिहार्यता प्रत्येकाने प्रथम समजुन घेणे आवश्यक आहे.दुसरी बाबसुध्दा लक्षात घ्यायला हवी की आपण कितिही उतावीळ असलो तरी समोर येणारा रिझल्ट आपल्याला अपेक्षित असलेलाच असेल असे गृहीत धरणे चुकिचे ठरु शकते हे सुध्दा समजणे आवश्यक आहे!
प्रत्येकाने आयुष्यातील प्रत्येक बाबतीत धीराने घ्यायला हवे हे बोलायला ठिक आहे,पण तसे वागणे तेव्हढे सोपे नाही हे वास्तव आहे.तरी पण आपल्या वागण्यात ही गरजेची असलेली सहनशिलता रुजवणेही तेव्हढेच आवश्यक आहे.पध्दतशीरपणे व अभ्यासपुर्ण केलेले प्रयत्न नक्कीच अशा प्रकारचे पेशंस वाढवायला मदत करतील.शेवटी धीराने घेतले की यश मिळणारच आहे ,तेंव्हा थोडा धीर हा धरायलाच हवा!
........प्रल्हाद दुधाळ.