Tuesday, July 26, 2016

राग.

                   राग.
                मला पूर्वी प्रचंड राग यायचा,पण तो राग शक्यतो व्यक्त होवू नये याची मी काळजी घ्यायचो.खूप वेळा असा आलेला राग मी गप्प गिळायचो! विसेक वर्षापूर्वीपर्यंत अगदीच टोकाची राग येणारी घटना घडलेली असेल, आणि समोरच्याचे वागणे तेवढेच अन्याय्य असेल,तर मागचा पुढचा विचार न करता समोरच्याला "योग्य" भाषेत वाजवायची तयारी असायची! मुळात ग्रामीण भागात बालपण गेल्याने हे रांगडेपण वागण्यात होते, अशा वेळी.समोरचा माणूस माझ्या किरकोळ तब्बेतीपेक्षा धिप्पाड असला, तब्बेतीने कितीही चांगला असला तरी त्याला गावरान भाषेत उत्तर द्यायचो.अजून एक, जर मी अशावेळी उपाशी असलो,की मग विचारायला नको, हा राग दुप्पट वेगात यायचा! शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहरात आलो पोटभर सकस खायला लागलो भरपूर सकस वाचायला लागलो, अनेक चांगल्या लोकांच्या संपर्कात आलो शिवाय माझा मूळ स्वभाव शांत असल्याने पुढे वयाच्या तिशी पस्तीशीनंतर मात्र प्रत्येक सिच्युएशनचे विश्लेषण करण्याची सवय वाढली.एक प्रकारची परिपक्वता आली आणि नकळत ती वागण्या बोलण्यात दिसायला लागली. आता आयुष्यात छपन्न पावसाळे पाहून झालेत जीवनातले अनेक चढ उतार अनुभवून झालेत एक प्रकारचे स्थैर्य आल्यामुळे असेल पण रागावर चांगलेच नियंत्रण आले आहे! आता जरी थोडीफार सटकली तरी समोरच्याच्या भूमिकेत जावून पहातो व आपोआपच राग आवरला जातो!
एक लक्षात आलय----
आपणच आपल जगण अवघड करत असतो,
 पालथ्या घड्यात पाणी विनाकारण भरत असतो!
तो 'तसा ' ती ' तशी' उगाचच बडबडत असतो,
साप साप म्हणून बऱ्याचंदा भुइलाच बडवत असतो!
भीती चिंता कटकट वटवट,करत असतो जीवनाची फरफट,
विनाकारण चडफडत असतो, जगण अवघड करत असतो!

------प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment