Wednesday, July 27, 2016

समस्या.

समस्या.
  खूप दिवसांनी त्या भागात गेलो होतो.पूर्वी अगदी खेडेगाव असलेल्या गावाच्या माळरानावर एकापेक्षा एक बड्या बिल्डर्सचे गृहप्रकल्प उभे राहिले होते.गावातील मोकळ्या जमिनी विकून आलेल्या पैशांमुळे संपूर्ण गावाचा कायापालट झालेला दिसत होता. पूर्वी अगदी जुन्या घरांच्या जागी छोटी मोठी बंगलेवजा घरे उभी राहिली होती.घरांसमोर आलिशान मोटारी उभ्या होत्या.येथून तीनचार किलोमीटरवर हिंजवडी आयटी पार्क विकसित झाले होते आणि तेथे काम करणाऱ्या आयटी प्रोफेशनल्सच्या बडया पैकेजेसनी ही कमाल केली होती.याच गावातल्या एका तशा दूरच्या नातेवाईकाकडे भगवानकडे जवळ जवळ सहा सात वर्षानंतर मी गेलो होतो.भगवानच्या साध्या घराचेही आता आलिशान बंगल्यात रूपांतर झाले होते. कोपऱ्या कोपऱ्यात नव्याने आलेली सुबत्ता दिसत होती.या कुटूंबात फारसे कुणी शिकले सवरलेले नव्हते.या भागाचे शहरीकरण जसे जसे होवू लागले,तसे जमिनीला भाव मिळू लागले,झालच तर बायकोला भरपूर सोने नाणे घेवून दिले होते,आपली श्रीमंती आल्यागेल्याच्या नजरेत भरेल, अशा प्रकारे या ऐश्वर्याचे प्रदर्शन केले जात होते.भगवान स्वत: व तरुण मुलगा गळ्यात सोन्याच्या जाडजूड साखळ्या व अंगठ्या घालून मिरवत होते. त्यानेही मोठ्या उत्साहात,त्याचे सगळे ऐश्वर्य मला दाखवले.त्याचे नवे  घर तसे हायवेला लागून होते.घराला लागून दोन एकरचा पट्टा अजून त्याने सांभाळून ठेवला होता.हायवे च्या कडेने त्याच्या जमिनीवर जाहिरात एजन्सीचे मोठे मोठे सहा फलक तेथे लावले होते.
       मी कुतूहलाने त्या फलकांबद्द्ल,त्यातून होणारे उत्पन्न, त्याची कराराची पद्धत याबद्दल त्याला विचारले. त्याने उत्साहात माहिती द्यायला सुरुवात केली.
“हो,या बोर्डाचे दोनेक लाख भाड्याचे मिळतात ना!” त्याने माहिती दिली.
“मग आता पोराचे लग्न करून टाकायचं की!” मी मजेत त्याला छेडलं.
“ लग्न करायचं हो,पण कुठ जुळतच नाही ना!”
मला प्रश्न पडला. एवढ्या श्रीमंत माणसाच्या मुलाचे लग्न जुळायला खर तर कसलीच अडचण यायला नको,पण हा तर म्हणतो जुळत नाही!
“का? न जुळायला काय झाल? मुलगा दिसायला चांगला आहे,पैसा आडका आहे मग अजून काय पाहिजे?”
“अहो तीच तर समस्या आहे, आजकाल नुसत्या पैशाला कोण विचारतो?आता पुर्वीसारख कुणी राह्यलय का? भरपूर पोरी पाह्यल्या पण कुणी हो म्हणेल तर शप्पथ!”
“ चुकून एखादी मुलगी पसंत पडली की समोरची पार्टी विचारते, पोरगा किती  शिकलाय? तो काय काम करतो? आम्ही सांगतो- आता खर सांगायचं तर पोरग चवथीपर्यंत शिकलय, आणि एवढा पैसा आहे काय करायचं शिक्षण आणि नोकरी!”
आम्ही सांगून पाह्यल, “पोराला दोन लाख रुपये कमाई आहे त्याला काम करायची काय गरजच नाही! समोरची पार्टी विचार करून सांगतो म्हणते आणि पुढे काय बोलतच नाही हो!”
“काही जण तोंडावर बोलतात,ही श्रीमंती बापजाद्यांची जमीन विकून आलीये,पोराच कर्तुत्व काय आहे? गप्प बसाया लागतंय बघा!” त्याने आपली व्यथा मोकळेपणी सांगितली.
मी  विचारात पडलो लोकांचे काय चुकीचे आहे.शहरांच्या आजूबाजूच्या गावात अशी हजारो कुटुंबे नक्की असतील ज्यांना या समस्येला सामोरे जावे लागत असेल.तात्पुरता आलेला पैसा चैनीत आणि ऐशोआरामात खर्च झाल्यावर या लोकांचे भवितव्य काय? आत्ताच अनेक अशा गावातले शेतकरी आपल्या जमिनी विकून देशोधडीला लागले आहेत.आपण विकलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या टोलेजंग सोसायटीच्या गेटवर वाचमनगिरी करत आहेत.घरातली बायकामाणसे धुण्याभांड्याची कामे करून आपली गुजराण करत आहेत! या भगवानचे तरी असे काही होवू नये असे मला मनोमन वाटत होते!
“बघा की एखादी पोरगी पहाण्यात असली तर!, आपल्याला हुंडाबिंडा काही नको,फक्त आम्हाला शोभल असं झोकात लग्न करून दिले की बास!”
समोरचा चहा संपवत मी म्हणालो –
“ हो  नक्की बघतो की!”
मी काढता पाय घेतला!

      ------- प्रल्हाद  दुधाळ.

No comments:

Post a Comment