Wednesday, October 16, 2019

निवडणूका आणि मी ...

निवडणूका आणि मी ...
लहानपणी कळायला लागलं तेव्हाची पहिली निवडणूक आठवते. ती बहुतेक जिल्हा परिषदेची निवडणूक असावी. ट्रकमागे ट्रक भरून माणसं यायची,  प्रत्येकाच्या खिशाला एक रंगीत चित्र लावलेलं असायचं,  हातात पक्षाचे झेंडे असायचे.कुणीतरी  एकजण घोषणेचा अर्धा भाग म्हणायचा आणि ती घोषणा पूर्ण करण्यासाठी ट्रकमधली बाकी माणसं  अगदी बेंबीच्या देठापासून ओरडायची! पंधरावीस मिनिटात अख्या गावात घोषणांचा धुराळा उडवून या गाड्या पुढच्या गावाला जायच्या! दुसऱ्या दिवशी दुसरे लोक यायचे आणि घोषणा देत रान उठवायचे! त्या वयात हे नक्की  काय चाललंय हे मुळीच समजत नव्हतं.शाळेत नागरिकशास्र शिकायला लागल्यावर या  लोकशाहीच्या उत्सवाची थोडीफार ओळख झाली.मला जी पहिली निवडणूक आठवते त्यातल्या एका उमेदवाराचे नाव बहुतेक ज्ञानेश्वर खैरे होते, ते  पुढे आमदार होते... त्यांचं चिन्ह होतं बहुतेक बैलजोडी! पुढे थोडी प्रगल्भता आल्यावर त्या  घोषणा देण्याऱ्या गर्दीत मीही मित्रांबरोबर सामील झालो.आमचा तालुका त्यावेळी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला होता. "चिमासाहेब बाळासाहेब मुळीक" यांच्यासाठी दिलेल्या घोषणा  चांगल्याच आठवतात.अनेक वर्षें  समाजवादी पक्ष या एकाच पक्षाचे आस्तित्व आमच्या भागात जाणवायचं!दादा जाधवराव हे  एकच आमदार कित्येक  निवडणूका जिंकत होते! काँग्रेसच्या चरखा वा बैलजोडी यापेक्षा झाड आणि पुढे नांगरधारी शेतकरी ही चिन्हेच आमच्या भागात जास्त प्रसिद्ध होती असे आठवते.अर्थात विद्यार्थी दशेत असल्याने राजकारणातलं काही कळायचं ते वय आणि तेव्हढी   समजही नव्हती. ग्रामपंचायतीच्या रेडिओवरून ज्या बातम्या ऐकायला मिळायच्या तेवढंच अख्ख्या गावाचं ज्ञान असायचं!  आणीबाणी नंतरची निवडणूक आणि जनता दलातल्या नेत्यांची भाषणे मात्र खूप मन लावून ऐकली होती शिवाय ते वयही संस्कारक्षम होते त्यामुळे असेन, पण स्वतःची अशी काही राजकीय मते बनायला लागली होती.वृत्तपत्रे वाचून व बातम्यांचे विश्लेषण करून एव्हाना  कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे समजायला लागलं होतं.कॉलेज जीवनात असताना काही मित्रांच्या संगतीने थोडे दिवस राष्ट्र सेवा दलात काम करत होतो.काँग्रेस हॉलवर संत्र्यामंत्र्याच्या पुढे पुढे करुन  काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी  लोक कोणत्या थरापर्यंत जातात हे त्या काळात अगदी जवळून बघायला मिळालं.नंतर  समाजवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून एक विधानसभा आणि एक मनपा निवडणुकीत कामही केलं!एक मात्र खरं आहे मी मनापासुन  तिथे रमत नव्हतो!
     दरम्यानच्या काळात मला  सरकारी नोकरी लागली आणि सीसीएस कंडक्ट रूल वाचला. नियमाप्रमाणे सरकारी नोकर म्हणून आता आपण राजकीय पक्ष सोडा आपलं साधं  राजकीय मतही व्यक्त करू शकत नाही याची जाणीव झाली! आपसूक त्या गोष्टींपासून  दूर झालो...
       नंतर  मात्र इमानेइतबारे मी एक सुजाण नागरिक म्हणून माझा गुप्त मतदानाचा अधिकार बजावत असतो!
नो पॉलिटिक्स, काय!   
 .... प्रल्हाद  दुधाळ.

No comments:

Post a Comment