Sunday, August 4, 2019

आठवणींच्या पोतडीतून ....

आठवणींच्या पोतडीतून ....
 १९७६ चा तो असाच जुलै महिना होता . मी नुकताच लोणंद येथील मालोजीराजे विद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता.मला खरं तर अजूनही पॉलिटेक्निकला प्रवेश मिळेल याची आशा होती त्यामुळे अकरावी सायन्स वर्गात अजून लक्ष लागत नव्हतं .जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात डिप्लोमाकरीता चांस कॉल येतात असे ऐकले होते;पण मला मात्र अजून त्याबद्दल काहीच समजले नव्हते.पावसाने संततधार धरली होती आणि नीरा नदीला महापूर आला होता. पुणे आणि सातारा जिल्ह्याला जोडणारे सगळे पूल पाण्याखाली गेले होते त्यामुळे माझं गाव आणि लोणंद यांचा संपर्क तुटला होता.एस टी वाहतुकीची सेवा संपूर्णपणे  बंद झाली होती .पूर्ण आठवडा हेच चित्र होते. पाऊस कमी झाला आणि नदीचे पाणी जवळ जवळ दहा दिवसांनी ओसरले.त्यानंतर एक दिवस माझा भाऊ एक पत्र घेवून धावतपळत माझ्याकडे आला .पत्र वाचले आणि मला रडूच फुटले.....
 तो माझ्या डिप्लोमा प्रवेशाचा चांस कॉल होता आणि त्या पत्रातील मजकूर असा होता की "मी चार तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करावा अन्यथा पुढच्या उमेदवाराला ती जागा बहाल करण्यात येईल!" आज दहा तारीख उलटून गेली होती; हातातोंडाशी आलेला घास जाणे म्हणजे काय असते याचा हा आयुष्यातला मोठा धडा होता. माझा डिप्लोमा प्रवेश निरेच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला होता!
त्यातूनही काही चमत्कार होईल अशी आशा होती म्हणून कराड पॉलिटेक्निक गाठले;पण वेळ गेलेली होती....
....प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment