Monday, August 7, 2017

श्रावण उपक्रम .

श्रावण उपक्रम .
     श्रावण महीना म्हणजे निसर्गावर हिरवाईची लयलूट! नद्या नाले तुडूंब भरून वहात असतात. या काळात आपल्याकडे विविध सण साजरे केले जातात.गावाकडे लोक एकत्र येवून आजूबाजूच्या परिसरातील देवदेवततांच्या दर्शनाला बाहेर पडतात.
माझ्या लहानपणी प्रत्येक श्रावणी सोमवारी आमच्या गावातल्या सिध्देश्वराला अभिषेक केला जायचा. बेलपत्र व मंदिराच्या आवारात फुललेली पांढऱ्या चाफ्याची फुले घेवून आमची वानरसेना सोमवारी सिध्देश्वराला आवर्जून जायची! रविवारी पहाटे उठून ओढ्यात डुबकी मारायची आणि ओले अंग घेवूनच आम्ही तांब्या भरून पाणी घेवून ग्रामदैवताच्या- नाथाच्या डोंगरावर भैरवनाथाला पाणी घालायलो जायचो. 
    आमच्या घरी श्रावण महीण्यात दरवर्षी ग्रंथांचे वाचन केले जायचे.अजून आमच्या गावात वीज पोहोचलेली नव्हती त्यामुळे दोन तीन गॅसबत्त्या लावून हे ग्रंथवाचन व्हायचे. आमच्या भावकितले नामदेवराव दुधाळ तेथे ग्रंथाचे वाचन करायचे. खड्या आवाजात ते एक एक प्रसंग वाचायचे आणि उपस्थित लोकातो तो प्रसंग साध्या सोप्या समजेल अशा भाषेत वर्णन करून सांगायचे. ज्ञानेश्वरी,नवनाथ भक्तीसार, पांडवप्रताप, भक्तीविजय, हरिविजय, रामविजय अशा अनेक ग्रंथांचे वाचन आमच्या घरी त्या काळी झाले. मी त्या काळात एकदम लहान होतो शाळेतही जायला लागलो नव्हतो; पण मला त्या भक्तीरसाच्या श्रवणाची अशी काही गोडी लागली होती की बस्स! ग्रंथ श्रवणाची ती अनुभूती घेण्यासाठी मी श्रावणाची वाट बघायचो. प्रत्येक दिवशी ग्रंथाचा एक किंवा दोन अध्याय वाचले जायचे आणि पसायदानाने शेवट केला जायचा. मग शेंगदाणे फुटाणे वा खडीसाखर प्रसाद म्हणून वाटला जायचा. प्रसाद वाटायचा मान कायम माझ्याकडेच असायचा. आपण काहीतरी खूप महत्वाची जबाबदारी पेलतोय असं त्यावेळी माझ्या बालबुध्दीला वाटत रहायचे. संपूर्ण ग्रंथाचे वाचन झाल्यावर समाप्तीचा उत्सव व्हायचा. सत्यनारायण पूजेचा प्रसाद व जेवायला सारे गाव यायचे. लहानपणी ऐकलेले ते ग्रंथवाचन माझ्यावर खूप मोठे अध्यात्मिक संस्कार करून गेले!
      आमच्या गावात अजून एक महत्वाचा सार्वजनिक उपक्रम श्रावणात अजुनही होतो, तो म्हणजे वनभोजन! एका ठरलेल्या दिवशी सगळे गाव घरी गोडाधोडाचे जेवण तयार करून ते घेवून नाथाच्या डोंगरावर जमतात. देवाला नैवेद्य दाखवून डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात गप्पांच्या महफिली जमतात. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात आग्रह करून करून गावकरी एकमेकांना जेवायला घालतात. हे परंपरागत वनभोजन म्हणजे आमच्या गावाचे सांस्कृतिक संचित आहे! लहानपणी अनुभवलेली श्रावणातली हिरवाई, सणाला चालणारी लगबग आणि मुख्य म्हणजे माणसामाणसातल्या माणुसकीच्या नात्यांची जोपासना करण्यासाठी जाणीवपूर्वक साजरे होणारे सण उत्सव कायमच मनात घर करून राहीले आहेत .
.... प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment