Saturday, February 25, 2017

काटा रुते कुणाला

रसग्रहण
काटा रुते कुणाला                                                                                                कवयित्री -शांता शेळके,

 काटा रुते कुणाला आक्रंदात कोणी
 मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे
काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे
हा स्नेह वंचना की काहीच आकळेना
आयुष्य ओघोळोनी मी रिक्तहस्त आहे
 कवयित्री शांताबाई शेळके यांची ही रचना मला अत्यंत भावते. प्रत्येक माणसाला जगण्याचा खरा अर्थ समजेलच असे नाही.आपल्या मनातल्या सच्च्या भावना व्यक्त करण्याची संधीही प्रत्येकाला मिळतेच असे नाही.आपल्या आयुष्यात आपण बरेच काही ठरवतो पण ठरवले तसेच घडत नाही,आयुष्याच्या एका ठराविक वळणावर पोहोचल्यानंतर याची जाणीव होते.असे होते की जे कधी आपण बोललोही नव्हतो ते घडते! आणि जे काही घडते आहे ते नीटसे उमगत नाही आणि चुकून उमगले तरी असेही घडू शकते हे लवकर पटत नाही.
 शांताबाई म्हणतात - ज्याच्या पायाला काटा रुततो त्याचे आक्रंदन अगदी साहजिक आहे त्याला ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्यामुळे दु:खी होणे समजूही शकते पण मला फुलसुध्दा रुतते आहे हा कसला दैवयोग? खर तर ज्याच्या वाट्याला फुले आली ते नशीबवानच की! मात्र कधी कधी उलटे घडते,काळजाच्या आतली वेदना बोलताही येत नाही त्याची सल कुणाला दाखवताही येत नाही. जीवनातली अशी कसौटी खूपच त्रासदायक असते.या दु:खावर काही उपाय केला तरी अनर्थ होईल.हे असे जगणे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे.हे असे का आणि कसे मला मुळीच कळत नाही. यावर माझा मीच उपाय शोधला आहे. मला जे काही मिळाले आहे मग ते काटे असोत की फुले,सगळे सोडून दिले आहे आणि माझे हात रिक्त केले आहेत.आयुष्याच्या संध्याकाळी मी एका स्थितप्रज्ञ अवस्थेला पोहोचले आहे! अशा विरक्त आनंदाचा कवयित्री आता अनुभव घेते आहे.
.................... प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment