Thursday, February 23, 2017

सामर्थ्य शब्दांचे.

सामर्थ्य शब्दांचे.
    कुशाग्र बुद्धीमत्तेप्रमाणेच ‘वाणी’ हे माणसाला इत्तर प्राण्यांपेक्षा जास्तीचे वरदान लाभलेले आहे. बोलण्याच्या या वरदानामुळे  माणसे एकमेकांशी संवाद साधू शकतात.हा संवाद शब्दांच्या माध्यमातून साधला जातो.मनातल्या भावना योग्य शब्दात मांडण्याची कला अंगी असलेल्या व्यक्तीची समाजात  वेगळी ओळख असते.संवाद साधताना शब्द खूप महत्वाची भूमिका बजावतात.शब्द कसे उच्चारले गेले,आवाजातील चढउतार यावरून एका शब्दाने विविध अर्थ वा अनर्थही घडू शकतात.
कोणी महात्म्याने म्हटले आहे –
शब्दांमुळे दंगल। शब्दांमुळे मंगल।
शब्दांचे हे जंगल। जागृत राहावे।।
   शब्दांची विविध रूपे आहेत.शब्दांचे सेतू संवाद जमवून आणू  शकतात हे जेवढे खरे आहे तेवढेच हे सुध्दा सत्य आहे की, एखाद्या चुकीच्या शब्दाने विसंवादही रुजू शकतो. म्हणूनच हे दुधारी शस्र फार काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे काय असतात हे शब्द?
शब्द असतात बहुरूपी, रंग बदलतात  क्षणात शब्द!
बोचू शकतात शब्द, ओरखाडे काढू शकतात शब्द!
शब्द घालतात काळजाला साद,ओथंबले असतात शब्द!
शब्द असू शकतात मवाळ,आगही लावू शकतात शब्द!
पोकळ काही असतात शब्द, मायावीही असतात शब्द !
शब्दातून ओसंडते प्रेम,मुर्दाड मनालाही आणती ओल शब्द!
शब्दात असू शकते दयामाया,लाचारही असू शकतात शब्द!
शब्दाने देतात आधार, विश्वासाने दिले घेतले जातात शब्द!
वाढू शकतात शब्दानेच शब्द, नाती बिघडवूही शकतात शब्द!
अस्रही असू शकतात शब्द, शस्रही होवून टोचू शकतात शब्द!
म्हणूनच असे म्हणतात की तोलून मापूनच वापरावेत हे शब्द!
  शब्दात प्रचंड सामर्थ्य आहे हे सामर्थ्य तसे तर शब्दातीतच आहे!
 जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात...
‘‘आम्हा घरी धन - शब्दांचीच रत्ने,
शब्द शब्दांचीच शस्त्रे - यत्न करू।।’’
शब्द हे शस्त्र आहे. ते जपून वापरायला शिकणे ही साधना आहे. शब्द हसवू शकतात त्याप्रमाणे  शब्द रडवूही शकतात.म्हणूनच आनंदी,सुखी,समाधानी जीवनासाठी शब्दांचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. ज्या माणसाकडे सौजन्य,शिष्टाचार व चार गोड शब्द आहेत, त्यांचे बोलणे आपल्याला नेहमीच आवडते.अशी व्यक्ती आपल्यावर एक प्रकारची जादू करते. अशा शब्दप्रभू माणसाचे विचार आपल्याला भावतात. अर्थपूर्ण संवादाने शब्दांना श्रीमंती येते. मनातले विचार व भावना संयमित शब्दात व्यक्त करणे ही एक कला आहे आणि ही कला ज्याला साध्य झाली आहे तो माणसांच्या समूहाला जिंकू शकतो! आपली जीभ जेव्हा गोड बोलू लागते,बोलण्यात माधुर्य येते! या माधुर्याच्या  जोडीला विनम्रतेचा गुण असेल तर असा माणूस सर्वांना जीव की प्राण असतो!
    ................ प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment