Friday, November 25, 2016

देश बदल रहा है.....

देश बदल रहा है.....
सकाळी सकाळी ऑफिसला जायची गडबड होती.घराबाहेर पडणार होतो तेव्हढ्यात दररोज गाडी पुसणारा अर्जुन दारात आला.दररोज पार्किंग मधील गाड्या पुसायचे काम तो करतो व महिन्याला ठरलेली रक्कम घेवून जातो.
" साहेब या महिन्याचे पैसे द्या ना."
नोटाबंदी झाल्यापासून अशी किरकोळ देणी देणे फारच अवघड झाले आहे.काटकसरीने दिवस काढणे चालू आहे त्यामुळे त्याला आता काय सांगायचे हा प्रश्नच पडला होता.
"अरे शंभर पन्नासच्या नोटा नाहीत,दोन हजाराचे सुट्टे आहेत का?"
"नाही हो साहेब."
"बर मग बँकेत अकाऊन्ट असेल ना, त्याचा नंबर दे,आजच तुझ्या खात्यावर साडेचारशे रुपये ट्रान्स्फर करून टाकतो ."
" साहेब सुट्टे नाहीत तर पेटीएम आहे का तुमचे?"
" तुझ्याकडे आहे का पेटीएम?" मी आश्चर्याने त्याला विचारले.
" हो साहेब आहे ना, करा पेटीएमने पेमेंट,चालेल मला."
" सांग तुझा मोबाईल नंबर."
त्याने मला त्याचा मोबाईल नंबर दिला मी माझ्या वालेट मधे त्याचा नंबर टाकला आणि दोन मिनिटाच्या आत त्याच्या वालेटमधे पैसे जमा झाले!
खरंच नोटाबंदी करायला हवी होती का नव्हती याच्यावर कितीही मतमतांतरे असोत,त्या वादात मला पडायचे नाही पण त्या निमित्ताने गाड्या धुणारा कष्टकरी अर्जुन पेटीएमने त्याची मजुरी स्वीकारू लागलाय!
हा बदल नक्कीच महत्वाचा आहे!
बदल नक्कीच होतो आहे!
काय वाटतंय तुम्हाला?
................ प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment