Saturday, December 7, 2019

सेवानिवृत्ती निमित्ताने मनोगत

रिटायरमेंट 
        बीएसएनएल पुणेच्या वतीने नुकताच   ऑफिशिअली रिटायरमेंट फंक्शनमध्ये मला माझ्या स्वेच्छा निवृत्ती निमित्ताने सन्मानपत्र देण्यात. या प्रसंगी मी व्यक्त केलेले मनोगत..... 

सर्वांना नमस्कार.... 
सर्वप्रथम आज रिटायर होणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकार्याना तसेच पुढच्या काही महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या सर्वाना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
   मी  पुणे टेलीफोन्समध्ये 28 डिसेंबर 1982 रोजी टेलिफोन ऑपरेटर म्हणून कॅंटोन्मेंट एक्सचेंज टेस्टींग सेक्शन येथे नोकरी सुरू केली.त्यावेळी मी बीएस्सी च्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो;पण शिक्षण पूर्ण करण्यापेक्षा नोकरी करणे आवश्यक झाल्याने मी ही नोकरी पत्करली होती.
    पुढे नाईट शिफ्ट करून मी माझे शिक्षण पूर्ण केले. आज सांगायला हरकत नाही की मी टेलिफोन खात्यात येईपर्यंत टेलिफोनवर एकदाही बोललो नव्हतो!सिलेक्शन झाल्यावर स्वारगेट एस टी स्टॅण्डवर एक कॉईन बॉक्स होता तेथे जाऊन टेलीफोनमध्ये कुठून बोलायचे आणि कुठून ऐकायचे असते ते बघितल्याचे आजही आठवते!असो...
   टेलिफोन खात्यात आल्यावर पहिला शब्द शिकवला गेला तो  'नमस्कार', हा! .'अहर्निश सेवामहे'  हा वसा इथल्या ट्रेनिंगमध्ये दिला गेला आणि जवळ जवळ अडतीस वर्षे तो वसा मी प्रामाणिकपणे निभावू शकलो याचा खूप आनंद आहे. आज दोनतीन वर्षांपूर्वीच ठरवल्याप्रमाणे स्वेच्छेने निवृत्त होताना पुणे टेलीफोन्स आणि पुढे बीएसएनएल मध्ये निभावलेल्या विविध जबाबदार्याचा सगळा चित्रपट समोर उभा आहे....
   या खात्याने मला खूप काही दिले, पद,पैसा, प्रतिष्ठा आणि समाजात पत याबरोबरच मला सर्वांगीण प्रगती करण्याची संधी दिली.देशात कदाचित हे एकमेव डिपार्टमेंट असेल जिथे तुमची इच्छा असेल तर अभ्यास करून,परीक्षा देऊन तुम्ही प्रमोशन्स घेऊ शकत होता,  आणि मला तशी संधी मिळाली.पहिल्या पाच वर्षातच मी फोन इन्स्पेक्टर या पदाची स्पर्धापरीक्षा पास झालो आणि 1989 ते 1996 या काळात फोन इन्स्पेक्टर म्हणून संपूर्ण कार्यक्षमतेने काम केले.कॅंटोन्मेंट एक्स्चेंज विभागात  उत्कृष्ट काम केल्याचे फळ म्हणून मला 1993 सालचा संचार सारथी हा बहुमान  मिळाला.प्रथमच एक्स्टर्नल विभागात  हा पुरस्कार दिला गेला होता! 
    1996 ते 2004 या काळात मी जेटीओ म्हणून RTTC , वाकड,  सांगवी तसेच साळूंके विहार इत्यादी विभागात काम केले.अनेक आव्हाने पेलत मी या विभागात मला दिलेली जबाबदारी पार पाडली. सांगवीत तीन वर्षात तीनशे किलोमीटर केबल टाकून मागितल्याबरोबर टेलिफोन कनेक्शन देण्याची व्यवस्थ्या करण्यात माझी महत्वपूर्ण भूमिका होती याचा आनंद आहे.याच विभागात एका आठवड्यात 467 टेलिफोन कनेक्शन देण्याचा विक्रम आमच्या टीमच्या नावावर नोंदवला गेला आणि त्याबद्दल ऍप्रिसिएशनही  मिळाले.
   पुढे एसडीई म्हणून भोर ग्रुप , बाजीराव रोड ग्राहक सेवा केंद्र , सेल्स मार्केटिंग अशा विविध विभागात उल्लेखनीय जबाबदाऱ्या मी निभावल्या.
2009 ते 2012 या काळात बीएसएनल सातारा येथे युएसओ सेक्शनचे काम पाहिले आणि फेब्रुवारी 2012 ते जुलै 2018 या काळात आयटीपीसी पुणे प्रशासन विभागात आणि शेवटचे दिड वर्ष बीएसएनएल पुणे च्या स्टाफ सेक्शन येथे कार्यरत होतो.
    मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला  इंटर्नल ,एक्स्टर्नल ,प्लॅनिंग, केबल कन्स्ट्रक्शन,सी एस सी, सेल्स मार्केटिंग, ट्रेनिंग सेंटर, युएसओ, वेल्फेअर, प्रशासन आणि स्टाफ अशा विविध विभागात अनेक महत्वाच्या पदांवर  काम करण्याची संधी मिळाली.
पगार मिळतो म्हणून सगळेचजण काम करतात,  पण कामात मिळणाऱ्या समाधानासाठी आपले काम संपूर्ण कार्यक्षमतेने केल्यानंतर जो अवर्णनीय आनंद मिळतो तो आनंद मला माझ्या पूर्ण नोकरीच्या काळात मिळाला.
   आपले कर्तव्य बजावत असतानाच या डिपार्टमेंटमध्ये मला ट्रेड युनियनमधील एक कार्यकर्ता म्हणूनही ओळख मिळाली.सुरुवातीला एनएफपीटीई संघटनेत ब्रँच लेव्हलला  आणि प्रमोशननंतर एस एन इ ए पुणे या संघटनेत खजिनदार म्हणून उल्लेखनीय असे काम करण्याची संधी मला मिळाली.
   पुणे टेलीफोन्स तर्फे त्या काळी घेतल्या जाणाऱ्या गरवारे करंडक एकांकिका स्पर्धेत सलग पाच वर्षे मला एकांकिकेत छोट्यामोठया भूमिका करण्याची संधीही मिळाली.या निमित्ताने स्टेजवर अभिनयाची हौसही भागवली गेली.
    पुणे टेलिकॉमचे मुखपत्र सिंहगड तसेच सह्याद्री,सातारा टेलिकॉमचे अजिंक्यतारामध्ये माझ्या कविता नेहमी प्रसिद्ध व्हायच्या.हिंदी  पखवाडा तसेच सतर्कता सप्तांहात घेतल्या गेलेल्या स्पर्धात माझ्या निबंधाना अनेक बक्षिसे मिळालेली आहेत.माझे दोन कविता संग्रह आणि एक वैचारिक लेखांचा संग्रह अशी तीन पुस्तके प्रसिद्ध झालीत आणि या क्षेत्रात अजून काही भरीव करण्याचा प्रयत्न आहे.
माझ्या या संपूर्ण प्रवासात मला अत्यंत चांगले अधिकारी लाभले.एक जबाबदार कार्यक्षम अधिकारी म्हणून माझे नाव झाले ते केवळ माझ्या हाताखाली काम केलेल्या कार्यक्षम कर्मचारी व माझ्या सहकारी अधिकारी मित्रांमुळेच! त्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना खूप खूप धन्यवाद! फिल्डमध्ये काम करत असताना बारा बारा तास घराबाहेर रहावे लागायचे त्यामुळे घराकडे दुर्लक्ष व्हायचे पण याबद्दल कुठलीही तक्रार न करता माझी पत्नी स्मिता हिने स्वतःची स्टेट गव्हर्मेंटची नोकरी करुन घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या निभावल्या. तिच्या साथीमुळेच मी आज जो काही आहे तसा आहे. माझा विवाहित मुलगा त्याच्या कुटूंबाबरोबर अमेरिकेत आहे. सर्व आघाड्यांवर अत्यंत यशस्वी समाधानी जीवन आज आम्ही जगतो आहोत याचे सर्व श्रेय्य अर्थातच बीएसएनएलने दिलेल्या आर्थिक व मानसिक आधारामुळे! यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो!
शेवटी जाता जाता माझी एक कविता..... 
काही असे, काही तसे, जगलो असे, जमले जसे!
हात कधी पसरला नाही, पडले मनासारखे फासे, 
जगलो असे जमले जसे!
गरिबीची लाज नाही, श्रीमंतीचा माज नाही, 
सरळ मार्ग सोडला नाही, टाकले नाही घेतले वसे, 
जगलो असे जमले जसे!
हवेत इमले बांधले नाही, मृगजळामागे धावलो नाही, 
शब्दांत कधी सापडलो नाही, झाले नाही कधीच हसे, 
जगलो असे जमले जसे!
भावनेत कधी वाहिलो नाही, वास्तवाला सोडले नाही, 
विवेकाला तोडले नाही, वागलो कधी जशास तसे, 
जगलो असे जमले जसे!
वावगा कधी हट्ट नाही, तडजोडीला ना नाही, 
उगा रक्त आटवले नाही, सजवले क्षण छोटे छोटेसे 
जगलो असे जमले जसे!
  पुन्हा एकदा सर्वांचे आभार....
बी एस एन एल ला पुन्हा गतवैभव लाभो या सदिच्छेसह मी माझे मनोगत संपवतो.....
  धन्यवाद!

प्रल्हाद दुधाळ 
एस डी ई  बी एस एन एल
 9423012020

No comments:

Post a Comment