Monday, December 2, 2019

आज आत्ता लगेच

   आज आत्ता लगेच!

     काही काळासाठी माझी साताऱ्याला बदली झाली होती.तेथे माझ्याकडे रिटायरमेंटसाठी थोडेच दिवस बाकी असलेले एक असिस्टंट होते.माझ्या कामात मला हवी ती कारकूनी स्वरूपाची मदत करायचे काम त्यांच्याकडे होते.एका बाजूला आम्ही ऑफिसचे काम करत करत गप्पाही चालू असायच्या.माझ्यापेक्षा आठ नऊ वर्षे वयाने जेष्ठ असलेले हे गृहस्थ्य मला मदत करता करता माझ्यातल्या गुणदोषांवरसुद्धा स्पष्टपणे बोट ठेवायचे.मला त्यांचे ते स्पष्ट बोलणे सुरवातीला खटकत होते;पण नंतर त्या गोष्टी मला आवडायला लागल्या.सहसा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याची खोटी खोटी स्तुती करून हरबऱ्याच्या झाडावर चढवण्याचा लोकांचा प्रयत्न असतो;पण ही व्यक्ती वडीलकीच्या नात्याने मला काही सांगत असेल तर ते माझ्यासाठी चांगलेच आहे असा मी विचार करायला लागलो.त्यांनी माझ्यातला एखादा दोष सांगितला की मी आत्मपरीक्षण करणे सुरू केले आणि लक्षात आले की त्यांचे माझ्याबद्दलचे निरीक्षण अगदी योग्य असते!
      एकदा एक महत्वाचा रिपोर्ट आठवडाभरानंतर मुंबईतील आमच्या सर्कल कार्यालयाला पाठवायचा होता आणि त्यासंबंधीची माहिती गोळा करण्यासाठी ते मला मदत करत होते.एखादे काम हातात घेतले की आज त्यातले किती काम आजच संपवायचे हे मी आदल्या दिवशीच ठरवलेले असायचे.दुसऱ्या दिवशी काम सुरू केले की ते संपेपर्यंत मला चैन पडायचे नाही.एक प्रकारे मी वर्कहोलिक होतो कामाच्या नादात मी डबा खाणेही विसरायचो.एकही ब्रेक न घेता मी त्या दिवशी काम करत होतो.माझे असिस्टंट चहाच्या वेळेला चहा घेऊन आले.जेवण्याच्या सुट्टीत घरी जाऊन जेवण करून आले चार वाजता पुन्हा चहाला निघाले जाताना त्यांनी मला चहाला त्यांचेबरोबर चालण्याचा आग्रह केला;पण माझ्या डोक्यावर आजचे ठरवलेले काम आजच पूर्ण करायचे भूत स्वार झालेले होते त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.ते चहा घेऊन आले आणि आल्याबरोबर त्यांनी सरळ माझ्या पीसीचा पॉवर सप्लाय बंद केला! मला त्यांचा खूप राग आला होता;पण त्यांच्या जेष्ठतेकडे बघून गप्प बसलो.माझ्या चेहऱ्यावरचा राग त्यांना दिसला होता,त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी मला सुनावले ....
"सर, ही काय पध्द्त आहे का? पाहिजे तर माझ्यावर ऍक्शन घ्या;पण मी हे खपवून घेणार नाही!"
माझे नक्की काय चुकलंय हे तोपर्यंत माझ्या लक्षात आलं नव्हतं;पण त्यांनी माझा टिफिन माझ्यासमोर धरला तेव्हा माझ्या लक्षात आले.'कामाच्या गडबडीत मी माझा टिफिन खाल्ला नव्हता!"
"सर मला सांगा खाणे पिणे सोडून सलग करण्याएवढे हे काम महत्वाचे आहे का?हातात पुढचा अख्खा आठवडा आहे हे काम पूर्ण करायला! मग हातातलं सगळं काम आजच संपवायचा अट्टाहास कशासाठी? तुम्ही खूप चांगले अधिकारी आहात,तुमचा स्वभाव छान आहे;पण काम संपवण्यासाठी जेवणखाण सोडायची सवय मात्र मला मुळीच आवडत नाही!"
 मी भानावर आलो,ते बोलत होते त्यात तथ्य होतं! माझ्या जवळ जवळ तीस वर्षाच्या सेवेत माझ्यात असलेल्या या दोषावर कुणी बोट  ठेवलेच नव्हते. मी त्यांच्या हातातला माझा टिफिन घेतला आणि काहीही न बोलता जेवायला सुरुवात केली.
    मग मी विचार करायला लागलो आजपर्यंत आजचे काम आजच करायच्या अट्टाहासामुळे स्वतःचे किती नुकसान करून घेतले असेल?
   माझ्या त्या जेष्ठ मित्रामुळे मला माझ्यातल्या त्या दोषांची जाणीव झाली ज्याला आत्तापर्यंत मी माझा गूण  समजत  होतो! या माझ्यातल्या उणिवेवर मी खूप विचारमंथन केले आणि मग अनेक गोष्टींचा नव्याने उलगडा झाला....
    आपण आपल्याकडे असलेल्या कामाचा नको इतका बागुलबुवा केलेला असतो.आजचे सगळे काम आजच संपवून समोरचा कामाचा ट्रे रिकामा करायची घाई आपल्याला झालेली असते पण तो ट्रे कधीच रिकामा होत नाही.जेवढ्या गोष्टी तुम्ही हातावेगळ्या केलेल्या असतात तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा जास्तच कामे तुमच्या ट्रेमध्ये येऊन पडलेली असतात त्यामुळे व्यावसायिक जीवनात किंवा वैयक्तिक आयुष्यातही सगळी कामे आज आत्ता लगेच संपवायचा अट्टाहास करण्यात काहीच अर्थ नाही! अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्यासमोर असलेल्या कामांच्या ढिगाऱ्यातली फार थोडी कामे ही 'अत्यावश्यक  वा तातडीची 'असतात! शेकडा नव्वद टक्के कामे कामातला आनंद उपभोगत,हसत खेळत करण्यासारखी असतात.कुणी महात्म्याने म्हटले आहे की 'पाटातून वहात असणारे  पाणी हे शेती पिकवण्यासाठी सोडलेले आहे आणि ते त्याचसाठी वापरले जावे;पण त्या वाहणाऱ्या पाटावर जर कारंजे उडवले फुलझाडे लावली तर त्या पाटावर कितीतरी सौदर्य फुलवता येईल!'
     आपल्या दैनंदिन कामातून आपल्याला जगण्यासाठी आवश्यक अशी रोजीरोटी मिळत असते हे खरे आहे;पण फक्त काम आणि कामच करत राहिलो तर ज्या आनंदी व सुखी जीवनासाठी हा सगळा खटाटोप चाललाय तो आनंद उपभोगणार कधी? काळ कोणासाठी थांबत नाही. तुमच्या समोर पेंडिंग कामाचा ट्रे कायमच भरलेला असणार आहे,तुम्ही अगदी मरेपर्यंत तो उपसत राहिला तरी त्यात बरेच करण्यासारखे पेंडिंग असणार आहे तेव्हा वेळीच समोरचे सगळे काम आज आत्ता व लगेच संपवण्याचा अट्टाहास सोडा. जीवनात पैशापेक्षा धनदौलतीपेक्षा खूप महत्वाच्या गोष्टी तुमची वाट पाहात आहेत त्यातला आनंद उपभोगा, स्वतःसाठी,मुलाबाळांसाठी,मित्रांसाठी वेळ काढा कामाच्या वेळी काम करा आणि जीवनात आनंद उपभोगण्यासाठी जो वेळ आहे त्याचा समतोल ठेवा!
    जिंदगी हासणे गाणे के लिये भी है! हो ना ?

No comments:

Post a Comment