Thursday, April 13, 2017

आनंद

आनंद.

आज दुपारी मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. 
" आपण दुधाळ सर बोलताय का?" 
" हो, मी दुधाळच बोलतोय."
" आपण कुठे असता."
"मी पुण्यात असतो; पण आपण कोण ?"
" मी कोल्हापूर कागल तालुक्यातील कापशी सेनापती या गावातून सौ चौगुले बोलतेय, .काय झालं की मागच्या आठवड्यात माझ्या मुलीच्या शाळेत वत्कृत्व स्पर्धा होती. एरवी मी तिला भाषण लिहून देते,पण यावेळी मला बिल्कूल वेळ नव्हता,त्यामुळे मी माझ्या पुतण्याला हिला कुठून तरी शोधून भाषण लिहून दे, असे सांगितले आणि मी कामावर निघून गेले. दुपारी मला माझ्या मुलीच्या क्लासटीचरचा फोन आला की तुमच्या मुलीने एकदम छान भाषण केल आणि तिचा स्पर्धेत पहिला नंबर आलाय! माझ्या तिसरीत असलेल्या मुलीने न अडखळता अगदी हावभाव करून भाषण केल्याचे त्यांनी सांगितले,मला खूपच आनंद झाला."
" छानच झाले की! आपले अभिनंदन!" 
मी काहीतरी बोलायला हवं म्हणून मधेच बोललो. पण मला प्रश्न पडला की हे सगळ या बाई मला का सांगताहेत, आणि तेही खास फोन करून? 
मी हे त्यांना विचारण्यापुर्वीच बाई पुढे सांगायला लागल्या -
" मग काय झालं ना की, संध्याकाळी मी माझ्या पुतण्याला त्या भाषणाबद्दल विचारले.तर तो म्हणाला की त्याने गुगलवर ्शोधले आणि पहिला जो लेख मिळाला तो लेख तिला दिला! माझ्या मुलीने ते लेखन पाठ केले आणि स्पर्धेत ते जसेच्या तसे हावाभावासहीत सादर केले!"
पुन्हा मी बोललो -
"छानच झाले की!" 
बाई पुढे सांगायला लागल्या-
" माझ्या पुतण्याकडून मी ती प्रिंट पुन्हा काढून घेतली तर त्या लेखाखाली नाव होते 'प्रल्हाद दुधाळ' शिवाय मोबाईल नंबरही होता. आज माझ्या मुलीला बक्षीस आणि प्रमाणपत्र मिळाले,जाम खुश झाली होती ती! तिचा तो आनंद आपल्यापर्यंत पोहचावा असे मला प्रकर्षाने वाटले म्हणून आपल्याला फोन केला! सर, आपण माझ्या मुलीला जी मदत केलीत याबद्दल आपली मी खूप खूप आभारी आहे!, असेच लिहीत रहा"
यावर मला काय बोलावे ते कळेनाच! 
दरवर्षी फेसबुकवर 'रेणुका आर्ट्स' या समूहाच्या वतीने आसावरी इंगळेताई एक ओनलाईन साहित्य संमेलन आयोजित करतात,गेली तीन वर्षे मी या संमेलनात सहभागी होत आहे. या संमेलनात साहित्यातले विविध प्रकार हाताळून पहाता येतात. मान्यवर साहित्यिक या साहित्य प्रकारांचे समीक्षणही करतात अशाच एका संमेलनात आपण दुसरी किंवा तिसरीत शिकतो आहे असे समजून 'माझा आवडता ऋतू ' या विषयावर एक निबंध लिहायचा होता.मी त्यावेळी हा निबंध लिहिला होता.पुढे मी हा निबंध माझ्या ब्लॉगवरही प्रसिद्ध केला.गुगलवर शोधल्यानंतर माझा हा निबंध त्या मुलाला मिळाला होता आणि तिसरीतल्या त्या चिमुरडीला भाषण म्हणून पाठ करायला दिला होता.तिला पहिले बक्षीस मिळाले म्हणून तिची आई माझे आभार मानत होती! 
खर तर त्या चिमुरडीने माझ्या लेखनाचे सादरीकरण करून तिच्या कौशल्याने पहिले बक्षीस मिळवले होते! मी तसे तिच्या आईला बोलूनही दाखवले तर ती म्हणाली -
" सर, तुमचे आभार यासाठी की तुम्ही लहान होवून हा निबंध लिहिलात,शिवाय तो इंटरनेटवर उपलब्ध करून ठेवलात. आमच्यासारख्याना आपल्या दैनंदिन व्यवहारातून मुलांना वेळ देता येत नाही, आणि अशा अडचणीच्या प्रसंगी तुमचे ते लेखन माझ्या मुलीच्या कामाला आले.तिला पहिले बक्षीस मिळाले याचा जो आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता ना,त्याचे वर्णन मी नाही करू शकत!" 
चौगुलेबाईंच्या वाक्यावाक्यातून तो आनंद ओसंडून वाहात होता! 
खास फोन करून त्यांच्या आनंदात मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी त्या माउलीचे आभार मानले!
आपल्या तोडक्या मोडक्या लिखाणाचा असाही उपयोग होवू शकतो, हे अनुभवून मलाही खूप आनंद झाला!
....... प्रल्हाद दुधाळ. १३/०४ /२०१७ 
(९४२३०१२०२०)

No comments:

Post a Comment