Saturday, March 18, 2017

पत्र

#मित्राला_पत्र
 प्रिय ...
      खरं तर मला प्रश्न पडलाय; तुला मित्र म्हणू का नको!तसा तू आणि मी दाखवायला वेगळे आहोत कुठे?माझ्या आतच तर तू राहतोस. माझ्यातला  तू नेमका नको तेव्हा आपले रंग दाखवतोस आणि त्याची सगळी वाईट फळ मात्र मला भोगावी लागतात! बरं ते जावू दे,  मला कधी कधी असेही वाटते की जर तुझा माझ्यावर एवढा प्रभाव आहे तर मग तू  माझा शत्रू तरी कसा असणार नाही का? जाऊ दे: नेहमीप्रमाणे प्रश्नांच्या गुंत्यात अडकून पडायला नको!  तर,  माझ्या प्रिय मित्रा कदाचित माझ्या पहिल्या श्वासाबरोबरच तुझी माझी गट्टी जमली ती जमलीच, मी कितीही प्रयत्न केला तरी तू गोचडीसारखा मला कायमचा चिकटलेला आहेस.
    मला थोड थोड आठवत  मी फार तर महिन्याभराचा असेल नसेल मला बघायला आलेली एक बाई माझ्या आईला म्हणाली फारच बारकुंडा आहे ग तुझा बाळ, तेव्हाच माझ्या मनात तू शिरलास! हो मित्रा न्यूनगंड या दुर्गूणाच्या रूपाने तू कायमच माझ्या आत तू रहायला लागलास. आपल्यात व इत्तरांच्यात फरक आहे या न्यूनगंडापायी मी कधी बाळस धरलच नाही.थोडा कळता झाल्यावर या न्युनगंडात भरच पडली ती आपण गरीब आहोत या समजाची! शाळेत पहिल्या नंबराने पास व्हायचो पण आपल्या या हुशारीचे कौतुक करायला कोणी  जवळ आले नाही आणि माझ्यातल्या तुला अजूनच रूजायला चान्स मिळाला. आपल्याला आपल्या आर्थिक स्थितीमुळे फार मोठी स्वप्ने पाहणे परवडणार नाही या न्युनगंडाने माझ्यावर तू राज्य करायला लागला.तुझ्यामुळे ना मला बालपण उपभोगता आले ना कॉलेज जीवनात मी रमलो.तुझा माझ्यावर असलेल्या पगड्यामुळे जीवन नीरस झाले. जीवनात आलेल्या प्रत्येक संधीचा मला माझ्या आत असलेल्या तुझ्यामुळे उपभोग घेता आला नाही.आपण गावंढळ म्हणून शहरी मुलांच्यात कमीपणा, तब्बेतीने बारीक म्हणून आपली छाप पडणार नाही, दिसायला यथा यथा म्हणून सुंदर मित्र मैत्रीणींपासून लांब, आर्थिक स्थिती बिकट म्हणून उच्चभ्रू वर्गापासून दूर,आपल्याला शोभणार नाही म्हणून आवडत्या फॅशनपासून दूर असे अनेक समज गैरसमज तुझ्या मैत्रीमुळे आत पक्के बसले. परिस्थिती बदलली प्रगल्भता आली आता पुर्वीचे दिवस राहीले नाहीत आता सगळे न्यूनगंड खरं तर लांब पळायला हवेत पण तुझ्या मैत्रीत एवढा गुंतलोय की कितिही दूर जायचा प्रयत्न केला तरी मांजर आडवे गेल्यासारखा तू आडवा येतोच आणि खूप प्रयत्नांनी जमवून आणलेली उमेद हातातून निसटून जाते.
  मित्रा न्युनगंडा आता झाला तेवढा तमाशा पुरे झाला,आता जे जे तुझ्या आस्तीत्वामुळे हातातून निसटले आहे ते मला परत मिळवायचे आहे त्यामुळे आता मला तुझ्या मैत्रीच्या आड लपलेल्या गुलामीतून कृपा करून मुक्त कर. आता मला माझ्या पध्दतीने जगू दे. थोडा उशीर झालाय पण असू दे, आता मी समर्थ आहे, माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार आहे याची मला जाणीव झाली आहे तेव्हा आता तुझी माझी कायमची कट्टी! आता पुन्हा पायात घोटाळू नको, गेट आऊट, गो!
तुझा ( आता मित्र नाही म्हणणार)
..... प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment