Sunday, January 29, 2017

प्रांजळ....

"प्रांजळ”- मला उमगलेले .....

कवी रवींद्र कामठे यांचा चपराक साहित्य महोत्सवात प्रकाशित झालेला  “ प्रांजळ “ हा काव्यसंग्रह नुकताच वाचला. प्रांजळपणे सांगायचे तर मी काही परीक्षक वगैरे नाही.माझ्या अल्पमतीला जो समजला  उमजला तो ‘प्रांजळ’ मधील प्रांजळपणा जेवढा मला भावला त्याबद्दल थोडेफार लिहिण्याचा हा प्रयत्न आहे....

श्री रवींद्र कामठेजी यांनी प्रेमापासून ते विरहापर्यंत आणि शेतीपासून ते अध्यात्मापर्यंतचे विषय या संग्रहात समर्थपणे हाताळले आहेत.इतिहास आणि काही प्रासंगिक विषयांवरील कवितांचाही या संग्रहात समावेश आहे.मी हा संग्रह मन:पूर्वक वाचला आणि मला या संग्रहात अतिशय आवडलेल्या जागा येथे देत आहे.

पहिल्याच कवितेत ते म्हणतात –

मांडले कवितेने भावही प्रांजळपणे,व्यक्त झाले अंत:करणापलीकडले!

या संग्रहात अनेक प्रेमकविता आहेत.त्यातील काही ओळींचा उल्लेख करावासा वाटतो –

-    चंद्रालाही वाटला तुझाच की रे हेवा,शुक्रतारे सारे,आसमंत तेजवून गेले .

-    हे स्वप्न मजला पडले का वास्तव हे,सडे मोगऱ्याचे पडले माझ्या बागेत होते.

-    पापण्या मिटल्यावरही तुझाच चेहरा दिसतो,स्वप्नातही तुझी साथ सोडवत नाही.

-    पाउस आला की प्रेम कसं उमलायला लागत,मनाचं पाखरू कसं बागडायला लागत!

या संग्रहातल्या लाजाळू,यौवन,सुखद आठवणी,तुझ्या काळजात राहणे आहे इत्यादी प्रेमकवितानी बहार आणली आहे.

प्रेमाबरोबरच द्वेष,वैर,देव,सुख, दैव इत्यादी विषयांवरच्या कविताही उल्लेखनीय आहेत –

-    सांगू ना सखे काय तुला होते हवे ,नव्हते का ग प्रेम मी पुरेसे केले?

द्वेषावर तुझ्या मी प्रेम पुरेसे केले!

किंवा

- पाण्यात राहून माशाशी केले वैर नाही ,असे फारसे काहीही केले मी गैर नाही!

- कोण देत कोण नेत मला माहीत नाही,जात्यातच नियतीच्या पुरा भरडलो!

- देताना तू छप्पर फाडून देतोस म्हणे, ओंजळीत मावेल इतकेच दे नशिबा आता!

- येवू नका सुखानो असे माझ्या दारी, मजवरी दु:ख जरा रुसले तरीही!

-कशाला घ्यावा शोध सुखाचा,दु:खातच सुख सापडले आहे !

-वेदना माझ्या कोणा मी आता सांगू कधी,फाटक्या आभाळास ठिगळे लावू कधी?

-ठेव ना रे पावसा साठवून हे थेंब तुझे, शिंपडेन मी ते आल्यावर भाग्य माझे!

- तूच घडवीशी ,जडवीशी,तूच मिळवीशी,अजूनही जमात राक्षसांची संपवीली नाही,

शिवरायांचा इतिहास आदळतो कानीकपाळी,दुज्या जिजाऊची कूस तू का उजवली नाही?

- मुर्तीतल्या देवा कर ना तू एक ठराव,राखेल पर्यावरण शाबूत त्यालाच पाव !

अशी वेगळी प्रार्थनाही आहे.

या शिवाय विविध विषयांवर रविन्द्रजी भाष्य करतात जसे –

दुर्गपुजा-

गडकोट हे आहेत दैवत आपुल्या स्वराज्याचे,पणाला लागले येथे सर्वस्व आपुल्या मावळ्यांचे!

दुष्काळ –

साकड घालितो आम्ही घेऊनिया माळ,नको सावट हे सदा सर्वकाळ!

भ्रष्टाचार-

कुठवर सहन करायचे हे सारे आपण, चला बदलून टाकू आपण आचार सारा!

भीक –

देशील का रे एक दान देवा आता,माणसात माणुसकी तू का भरली नाही?

बळीराजा –

-    बळ येवू दे आता बाहूत दहा हत्तींचे,राजा तुझ्यावर देशाची मदार आहे!

-    बळीराजाची आसवे वाया का घालविता,आसवांची शेती आता पिकवू नका!

शेती,शेतकरी,दुष्काळ,राजकारण,भ्रष्टाचार यावर या संग्रहात अनेक कविता आहेत.

वयाची पन्नाशी ओलांडल्यावर जे विषय कवितेत अचानक डोकावायला लागतात अशा विषयांवरही या संगहात भाष्य आहे.जसे की –

-    वेध मला आता लागले होते पैलतीराचे, तुझ्या एका झलकेच्या  अर्चना केल्या होत्या!

किंवा

-    जेव्हा आयुष्य माझे ढळायला लागले,तेव्हा आयुष्य मला कळायला लागले!

श्री रविंद्र कामठे यांचा हा “प्रांजळ” पणा नक्कीच रसिकांना आवडेल याची मला खात्री आहे,त्यांच्या भविष्यातील साहित्यसेवेसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा!

..... प्रल्हाद दुधाळ. पुणे (९४२३०१२०२०)

No comments:

Post a Comment