Saturday, September 3, 2016

विद्यासागर सर.

कळत-नकळत घडवणारे विद्यासागर सर
- प्रल्हाद दुधाळ, पुणे
शनिवार, 3 सप्टेंबर 2016 - 02:30 AM IST

माणसाच्या जडणघडणीत आई-वडिलांच्या बरोबरीनेच शिक्षकांचेही अत्यंत मोलाचे योगदान असते. त्यातही एखादा शिक्षक किंवा शिक्षिका संपूर्ण आयुष्यभर पुरून उरतील एवढे संस्कार करतात आणि त्या बाई किंवा सरांचे त्या माणसाच्या मनात आयुष्यभरासाठी आदराचे स्थान निर्माण होते. माझ्यावरही अनेक शिक्षकांनी असेच खूप चांगले संस्कार केले. 

एका अशिक्षित, अल्प-भूधारक शेतकरी कुटुंबातला मी.. आज मी जो काही आहे, तो केवळ मला लाभलेल्या अनेक शिक्षकांनी वेळोवेळी केलेले संस्कार आणि मार्गदर्शनामुळेच! सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची गावात असलेली ‘शेती शाळा परिंचे‘ या शाळेत आणि पुढे रयत शिक्षण संस्थेच्या ‘कर्मवीर विद्यालय परिंचे‘ या माझ्या हायस्कूलमध्ये अनेक चांगले शिक्षक भेटले. त्यांनी मला शालेय अभ्यासक्रम तर शिकवलाच; पण खऱ्या अर्थाने जगणेही शिकवले. आपल्या पगारातून माझी फी भरणारे पडवळ सर मला इथेच भेटले. साहित्य-कला-नाट्याचे बीज माझ्यात रुजवले ते जी. बी. विद्यासागर या माझ्या गुरुंनी.. तसं पाहिलं, तर विद्यासागर सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे. आम्हाला आठवीपासून इंग्रजी हा विषय होता. विद्यासागर सरांनी अशा काही कौशल्याने इंग्रजी शिकवलं, की बस्स! एक-एक शब्द शिकवण्याची त्यांची तळमळ, हातोटी अजूनही लक्षात आहे. ‘थ्रो‘ आणि ‘कॅच‘ शिकवण्यासाठी त्यांनी वर्गात चेंडू आणला होता; तर ‘डान्स‘ शिकवण्यासाठी त्यांनी अक्षरश: नाचून दाखवलं. त्यांनी इंग्रजी विषयात माझी इतकी तयारी करून घेतली, की बोर्डामध्ये इंग्रजीत मी पहिल्या पाचांमध्ये होतो.. विद्यासागर सर इंग्रजी तर चांगले शिकवायचेच; पण मराठी साहित्याचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. आम्हाला इंग्रजी शिकवता शिकवता अनेकदा ते मध्येच मराठी कवितेविषयी बोलायला लागायचे. त्यांचा तो तास म्हणजे माझ्यासाठी अक्षरश: साहित्यिक पर्वणी असायची. त्यांनी अशा मराठीच्या जादा तासात आम्हाला कुसुमाग्रज, बालकवी, विंदा, भा. रा. तांबे, केशवसुत, ग्रेस अशा महान साहित्यिकांच्या अनेक गाजलेल्या कविता रसग्रहणासह शिकवल्या. एखाद्या कथेचा किंवा कादंबरीचा रसास्वाद कसा घ्यायचा, ते आम्ही त्यांच्यामुळे शिकलो. ‘नटसम्राट‘, ‘अश्रूंची झाली फुले‘, ‘एकच प्याला‘सारखी अनेक नाटके सरांना तोंडपाठ होती. ते नाटकाविषयी बोलायला लागले, की असे वाटायचे की आपण नाटकच स्टेजवर पाहतोय. अजूनही ते तास जसेच्या तसे आठवतात. 

विद्यासागर सरांनी शिकवलेलं ‘पृथ्वीचं प्रेमगीत‘, ‘खबरदार जर टाच मारुनी‘ वा ‘जन पळभर म्हणतील हाय हाय‘ यांसारख्या अनेक कविता आजही जशाच्या तशा स्मरणात आहेत. त्या साहित्यसंस्कारांमुळे पुढील आयुष्यात मला वाचनाची प्रचंड गोडी लागली. आपल्या वैयक्तिक आयुष्यात मी पायरी-पायरीने प्रगती साधत राहिलोच; पण लेखन क्षेत्रातही काही ना काही धडपड करत राहिलो. 

आतापर्यंतच्या माझ्या लेखनप्रवासामध्ये दोन कवितासंग्रह, काही कथा आणि लेख प्रसिद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, 2007 मध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या पहिल्या कवितासंग्रहाला विद्यासागर सरांची प्रस्तावना लाभली. गेल्या 30 वर्षांमध्ये त्यांच्याशी संपर्क नव्हता. रयत शिक्षण संस्थेतून ते उपसचिव पदावरून निवृत्त झाले होते. तरीही मी त्यांना भेटून माझी ओळख सांगताच त्यांनी आनंदाने हे काम केले. माझे व्यक्तिमत्व घडण्यात त्यांनी कळत-नकळत केलेले संस्कारच कारणीभूत आहेत, हे सांगायला मला अभिमान वाटतो. 

No comments:

Post a Comment