Thursday, June 23, 2016

पाठराखण ....

पाठराखण ....

  आज माझे वय छप्पनच्या वर आहे.आजपर्यंतच्या जीवनात अनेक आघाड्यांवर वेगवेगळ्या प्रकारची लढाई लढत रहावी लागली.कधी आर्थिक,मानसिक,पारिवारिक वा शाररिक आघाडीवर समस्या येत राहिल्या.तशा तर त्या प्रत्येक सजीवाच्या आयुष्यात येतच असतात! आयुष्याच्या  सुरूवातीला जेंव्हा जेंव्हा  अशा समस्या उभ्या ठाकल्या तेंव्हा मी घाबरून जायचो.वाटायचे आता सगळे संपले, समोर अंधार असायचा.कुणी आपल्याला आधार देईल,खंबीरपणे मागे उभा राहील अशी परिस्थिती बिल्कूल  नव्हती. हताश होवून जे काही होईल ते पहात रहाणे एवढेच काय ते हातात असायचे.अशा वेळी मनाचा तोल ढासलेल व कदाचित  स्वत:च्या जीवाचे काही बरेवाईट आपल्या हातून घडेल अशी भीतीही  क्वचितप्रसंगी वाटायची, पण तेवढे धैर्य नव्हते म्हणा किंवा मनात कुठेतरी अंधुक का होईना आशेचा किरण दिसू शकेल असा  संकेत मिळाल्याने म्हणा, कधी टोकाच्या आततायीपणे  मी वागलो नाही.सुरूवातीला  असा  हताश  अवस्थेत  असताना  एक  अनुभव आला  अशा  समस्येच्या वेळी अचानक काहीतरी मार्ग निघाला त्याने  आलेली समस्या पूर्ण सुटली जरी नाही तरी उभ्या ठाकलेल्या  त्या समस्येचा बोचरेपणा सहन होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. एकदा  दोनदा  तीनदा  याची पुनरावृत्ती  झाली  आणि  मग  याची सवयच झाली! उगीच  रडत  बसण्याऐवजी  खंबीरपणे  तोंड द्यायची मानसिक तयारी  करू लागलो. असा विचार  करू लागलो की  समोर आलेल्या समस्येवर  काही ना काही मार्ग  असतोच आणि योग्य  वेळ  आल्यानंतर  त्या  समस्येवर असलेले  ते  समाधान  अचानक  सुचते किंवा  अदृश्य  शक्तीकडून सुचवले जाते  याचा  अनुभवांती  विश्वास  वाटायला  लागला. आणि मग आयुष्यात  कोणतेही  संकट आले, कितीही गंभीर समस्या  उभी  राहीली तरी त्यावर  काहीतरी उत्तर  मिळेल असा  आशावाद आणि पुढे  आत्मविश्वास  निर्माण झाला . मार्ग  कसा  निघेल, कोण  काढेल याचा काहीच अंदाज नसतानाही  केवळ  आशावादी  राहून  समस्येवर अगदी  समाधानकारक  नाही मिळाली  तरी  काही ना काही  उत्तरे  मिळतीलच हा आशावादच  कायम माझ्या मदतीला  आला .या  आशावादानेच  कायम  माझी पाठराखण केली आहे  आणि  विश्वास  आहे की  पुढेही  असेच  घडत  राहील.(अपूर्ण )

No comments:

Post a Comment