Wednesday, January 30, 2019

जिद्द...

जिद्द....
     मागच्या आठवड्यात मी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी एक शपथ पोस्ट केली होती.खूप जणांना ती पोस्ट खूप आवडली होती.
   अनेक मित्रांनी यापुढे आपणही अन्नाची नासाडी टाळू असे सांगितले.माझ्या एका मित्राने तर ती शपथ खूपच गांभीर्याने घेतली होती....
   आज ऑफिसात एका गृपने संक्रातीच्या निमित्ताने दुपारचे जेवण आयोजित केले होते आणि आम्ही सगळे आमंत्रित म्हणून हजर होतो.जेवणात तीळ पोळी, मसाला भात टॉमॅटो सार असा मस्त मेनू होता. प्रत्येक ताटात खूपच वाढून दिले होते.आपल्याला हे सगळं संपवणं शक्य नाही हे जवळपास प्रत्येकाला माहीत होते;पण आग्रहापुढे कुणाचेही चालत नव्हते. बऱ्याच जणांनी माझ्यासह अगदी नाईलाजाने समोर वाढलेले संपवले.माझा तो मित्र मात्र एका पोळीत आऊट झाला होता. ताटात शिल्लक राहिलेले अन्न कुणाला तरी खायला देऊन ती शपथ पाळायची असे त्याने ठरवले.त्याने तसे बोलूनही दाखवले आणि एका रद्दी न्युज पेपरमध्ये उरलेले अन्न घेवून तो गरजु भुकेलेला माणूस शोधायला तो बाहेर पडला!
 दोनशे मीटर अंतरावर एक भिक्षेकरी नेहमी बसतो हे त्याला माहीत होते.तो त्या चौकात गेला;पण आज नेमका तो भिक्षेकरी गायब होता. मग तो तसाच पुढं चालत राहिला.एक दीड किलोमीटर परिसरात त्याला कुणी गरजु सापडला नाही.एका उभ्या असलेल्या टेंपोच्या सावलीत एक कुत्रे झोपले होते.त्याने शेवटी त्या कुत्र्याला ते अन्न द्यायचा निर्णय घेतला.कुत्र्याला त्याने आवाज दिला." काय कटकट आहे" असा भाव ठेवून कुत्रे महाशयांनी डोळे उघडले.मित्राने उत्साहाने अन्नाचा कागद त्याच्यासमोर ठेवला.कुत्रे महाशयांनी अन्नाकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा झोपून घेतले!पुन्हा प्रयत्न करूनही कुत्रोबाने डोळे उघडायला नकार दिला!
आता मित्राने हार मानली आणि तो कागद उचलून अजून पुढे चालायला लागला.उपाशी माणूस, कुत्रा किंवा कोणताही प्राणी ज्याला हे अन्न खायला देता येईल,असा विचार करत शोधत शोधत तो चांगला दोन किलोमीटर पुढे गेला. अचानक त्याला एक दुसरा कुत्रा दिसला.लगबग करून तो पुढे गेला आणि तो कागद त्या कुत्र्यासमोर ठेवला.कुत्रा थांबला त्याने तो कागद क्षणभर हुंगला आणि मित्राकडे  एक नजरेचा कटाक्ष टाकला आणि सरळ पुढे निघून गेला.
आता मात्र मित्र चांगलाच वैतागला!
"माणूस सोडा, एक साधे कुत्रेही त्याने दिलेले अन्न खायला तयार नव्हते!"
  नाईलाज होवून त्याने तो पेपर पुन्हा उचलला आणि अजून पुढे चालायला लागला.रस्त्याच्या कडेला काही कोंबड्या मातीत चोच मारत होत्या.मित्राला मग कल्पना सुचली आणि पोळीचे छोटे छोटे तुकडे करून तो त्या कोंबड्यांना अन्न भरवत राहीला.
"मी अन्न वाया घालवणार नाही" ही शपथ अशा प्रकारे त्याने एकदाची निभावली!!!
याला म्हणतात जिद्द! हो की नाही?
..... प्रल्हाद दुधाळ.
     ३०/१/२०१९

No comments:

Post a Comment