Wednesday, December 19, 2018

पुण्यकर्म

काल एक मनोरंजक तेव्हढीच   गंभीरपणे विचार करायला लावणारी केस माझ्यासमोर आली होती.प्रशासन विभागात काम करत असल्याने सामान्यपणे लोकांना होता होईल एवढी मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो;पण कधी कधी अशी काही बिलींदर माणसे भेटतात की ज्याचे नाव ते!
   निवृत्ती जवळ आलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचे सर्व्हिस रेकॉर्ड तपासून काही त्रुटी असल्यास त्या दुरूस्त करून पुढे पेंशन संबंधी काही अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही मोहीम राबवत असतो.अशाच एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला तो पुढच्या सहा महिन्यात रिटायर होत असल्याने त्याचे सर्व्हिस बुक दाखवले.
सर्व्हिस पुस्तकातल्या नोंदी पाहून तो बराच विचारात पडलेला दिसला . त्या  दिवशी तो निघून गेला; पण सातआठ दिवसांनी तो काही कागदपत्रे घेऊन पुन्हा आला . त्याने एक अर्ज आणला होता.
  अर्जात त्याने लिहिले होते...
" माझी पहिली पत्नी राजश्री केशव जाधव हीचे दिनांक  २०/५/२००० रोजी निधन झाले.( सोबत मृत्यू प्रमाणपत्र जोडले आहे) .त्यानंतर २ जाने.२००१ ला मी उषा केशव बेंद्रे हिच्याशी लग्न केले आहे आणि तिचे नाव बदलून राजश्री केशव जाधव असे ठेवले आहे! (सोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदली झाल्याचे प्रतिज्ञापत्र जोडले आहे) . नजर चुकीने माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल ऑफिसला कळवणे राहून गेले होते त्याबद्दल माफी असावी .आता माझ्या सर्व्हिस पुस्तकात माझ्या पहिल्या  पत्नीचे नाव वगळून दुसऱ्या पत्नीची नोंद करावी तसेच माझे आधीचे नॉमिनेशन बदलुन नवीन नोंद करावी ....."
त्याचा अर्ज वाचून मी विचारात पडलो.  
त्याचा  अर्ज घेतला आणि त्याला दोन तीन दिवसात फोन करून कळवतो असे सांगितले.
मी गोंधळून गेलो होतो.  
 लगेच त्याची केस वाचायला घेतली ...
आता तुम्ही म्हणाल यात मजेशीर काय आहे?....सांगतो....
  या महाशयांनी दुसरे लग्न २००१ सालात केले असे म्हटले आहे; पण त्याची नोंदणी सतरा वर्षांनी केली आहे. ऑफिसला पहिल्या बायकोचे निधन आणि दुसऱ्या लग्नाबद्दल कळवावे असे त्याला तब्बल सतरा वर्षानंतर आवश्यक वाटले . आपल्या दुसऱ्या बायकोला त्याने पहिल्या बायकोचे नावच दिले!
 विशेष म्हणजे दुसऱ्या बायकोच्या वडिलांचे नाव आणि हे महाशय दोघांचे नाव सारखेच!
केशव!!! आहे का नाही योगायोग?
सगळी केस वाचून डोक्याचा गोयंदा झालायं....
त्याचा नॉमिनेशन फॉर्म वाचून मात्र मी गंभीर झालोय...
आधीच्या नॉमिनेशन मध्ये त्याच्या पहिल्या पत्नी बरोबर एक मुलगा आणि एका मुलीचे नाव होते .नवीन नॉमिनेशन फॉर्म मध्ये मात्र  त्याने फक्त दुसऱ्या बायकोचे नाव लिहिले आहे ....
काय दोष त्या मुलांचा?
केस पेंडीग ठेवलीय...
विचारात पडलोय ...
बघूया काय करता येईल.  ...
(उत्तरार्ध..)

काल तो पुन्हा आला .
त्याची केस माझ्याकडे पडलेली होती त्यामुळे मी त्याची वाटच बघत होतो. त्याने  आपले नॉमिनेशन बदलावे म्हणून दिलेले एप्लिकेशन अजून मी कार्यवाहीसाठी घेतले नव्हते.
या केसमध्ये आपण नियमात बसवून काहीतरी करायला पाहिजे असे मनापासून वाटत होते पण;शेवटी ते त्याचे नॉमिनेशन होते आणि ते त्याने कुणाच्या नावाने करावे हा त्याचा अधिकार होता!असे असले तरी कितीही वाईट असला तरी प्रत्येक माणसात एक सज्जन माणूस दडलेला असतो यावर माझा विश्वास होता आणि त्याच्यातल्या त्या सज्जन माणसाला आवाहन करायचे आणि त्या मुलांवर भविष्यकाळात कळत नकळत होणारा अन्याय दूर करायचा मी प्रयत्न करणार होतो.त्याला नियमांच्या खिंडीत गाठून हे करणे शक्य आहे हे दोन तीन दिवस केलेल्या विचाराअंती मला माहीत झाले होते. आता तो विचार प्रत्यक्षात आणायची वेळ आलेली होती.
" सर माझ्या अर्जाचे काय झाले?"
"ते दुसरे लग्न आणि नॉमिनेशन बद्दल ना..."
मी उगीचच अज्ञान पाजळले..
" हो सर..."
" त्याचे काय आहे की तुमची बायको गेली २००० ला , पुढे २००१ सालात तुम्ही दुसरे लग्न केले बरोबर ना ?"
" हो..."
" मग अठरा वर्षांनी तुम्हाला हे ऑफिसला कळवावे असे का वाटले?"
मी माझ्या मनात खदखदत असलेला प्रश्न विचारला...
" हे कळवायला लागतं हे मला माहीत नव्हतं..."
" मग आता कसं काय समजलं?"
" मी या वर्षी रिटायर होणार आहे त्यामुळे एका नातेवाईकाने सगळं रीतसर करून घ्यायला सांगितलं, म्हणून अर्ज दिलाय ..."
" आधी दिलेलं नॉमिनेशन बदलायला त्यानेच सांगितलं का?"
"हो,त्यानेच सांगितलं!"
" तो माणूस दुसऱ्या बायकोच्या नात्यातला आहे ना?"
त्याने आता मान खाली घातली आणि मान डोलावली.
आता माझा आवाज वाढला..
" अरे काय आहे, त्याने सांगितले आणि तुम्ही लगेच अर्ज दिला, थोड स्वतः डोकं चालवाव वाटलं नाही तुम्हाला? फक्त दुसऱ्या बायकोच्या नावाने नॉमिनेशन हवंय ? त्या दोन पोरांनी काय केलंय? त्यांची नावे वगळायची?"
खर तर त्याच्याशी असं बोलणं नियमानुसार नव्हतं;पण चांगल्या कामासाठी ही रिस्क मी घेतली.
माझा तो बदललेला पवित्रा बघून तो बराच गंभीर झाला होता.त्याने काढता पाय घेतला..
"मी दुपारनंतर परत येतो सर..."
माझा निरोप घेवून तो निघून गेला.
लंचला जाऊन मी परत आलो तर तो माझी वाटच बघत होता.
" सर, ते आधीचे पेपर परत द्या, आणि माझे हे नवे नॉमिनेशन घ्या ..."
मी त्याचा नवीन अर्ज वाचला आणि मी माझ्यावर खुश झालो.
ऑपरेशन सक्सेसफुल झाले होते!
नव्या नॉमिनेशन फॉर्म मध्ये त्याच्या दुसऱ्या बायकोला ५०टक्के आणि दोन्ही मुलांना २५ टक्के प्रत्येकी असे वाटप होते .
"धन्यवाद सर, मी चूक करत होतो. तुम्ही मला सावध केले..."
त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान होते.
नकळत हातून एक चांगले काम होणार होते .
...प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment