Thursday, April 28, 2016

चुकलेल्या वाटा .

चुकलेल्या वाटा .
   "जोशी साहेब म्हणजे एकदम तत्वाचा माणुस"
"इथले सगळे सुपरवायझर चांगले आहेत पण हा जोशी ना एकदम खडूस!"
नोकरीला नवीनच लागलो होतो आणि पहिल्याच दिवशी  तेथील   सुपरवायझर बद्द्ल जुन्या जाणत्या  कर्मचाऱ्यांच्या कडून  माहीती दिली जात होती. कुणाबरोबर  कसे  वागायला  हवे याच्या  टीप्स मिळत होत्या सर्वसाधारणपणे जोशींबद्दलचा  रिमार्क  मात्र विचित्र व  खडूस  माणुस आहे असाच होता. ते कडक असल्याने त्यांच्यापासुन  सावध रहा असा सल्लाही  मिळाला. या  माणसाबद्दल मनात  थोडी भीतीही  वाटायला लागली होती.
   दुसऱ्याच  दिवशी या जोशींची आणि  माझी एकच  शिफ्ट आली आणि  त्यांच्याबद्दल ऐकलेल्या  एका एका गोष्टींची प्रचिती  यायला  लागली! झाले काय की, दहाची ड्युटी होती आणि मी साधारणपणे दहा वाजून दहा मिनिटानी  विभागात गेलो माझ्यानंतर दोन मिनिटांनी एकदम गोरे गोमटे उंच  पण  तब्बेतीने  थोडेसे किरकोळ असे जोशी  साहेब  विभागात आले. त्यांना  मी माझे  आजचे काम विचारण्यासाठी गेलो त्या काळी  टेलिफोन सुपरवायझरला मॉनिटर असेही  संबोधले  जायचे. मी समोर  गेलो  त्यानी  माझ्यासमोर  अटेंडस  रजिस्टर  ठेवले. माझ्या नावासमोर रिमार्क  लिहिला होता - Late by ten minuits! आणि विशेष म्हणजे स्वत:च्या  नावासमोर रिमार्क  लिहिला होता- late by twelve minuits! स्वत:चा लेट मार्क स्वत:  करणारे  जोशी  हे  माझ्या चौतीस वर्षात  भेटलेले एकमेव  सुपरवायझर  होते. सरकारी नोकरीत असुनही  हा माणूस  सर्व्हीसच्या शेवटच्या दिवसापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे  व कार्यक्षमतेने  करत होता! टेलिफोन  कर्मचार्यांना  प्रथमच जाहीर झालेला  प्रॉडक्टीव्हीटी लिंकड बोनस  या माणसाने  नाकारला होता.  त्या काळात आमच्या विभागात  टेलिफोनबाबत असलेली fault registration and repair service  या बाबतीत  कामकाज  चालायचे.त्याकाळी टेलिफोन ही अत्यंत चैनीची वस्तू  मानली  जात होती. आठ दहा वर्षे  वाट  पाहिल्यावर  टेलिफोन  मिळायचा. अगदी श्रीमंत व्यक्ती,मोठे उद्योगपती व सरकारी उच्चाधिकारी यानाच टेलिफोन घेणे परवडू  शकत होते. इंडियन टेलिग्राफ  ॲक्ट खाली  टेलिफोन धारक व या  खात्यातील कर्मचारी येत असत. कर्मचार्यांसाठे कडक नियम  व  शिस्त  पाळणे आवश्यक होते  आणि  ही शिस्त आमच्या जोशी साहेबांच्या  प्रत्येक कृतीमधे  दिसायची! या शिस्तीमुळेच त्याना लोक  खडूस  म्हणून ओळखायचे. लवकरच माझे आणि त्यांचे  चांगलेच सूर जमले होते. त्याचे कारण  म्हणजे  माझे हस्ताक्षर, त्यांना माझे  अक्षर  खूप आवडायचे! मी  कविता  लिहितो  हे समजल्यानंतर ते  माझ्याबरोबर दिलखुलास गप्पाही  मारू लागले. त्यांना प्रचंड  वाचनाची आवड होती. ते त्या काळी एम.ए. मराठीची पदवीधारक   होते! त्यांच्याबरोबर  बोलताना  लक्षात आले  की  खर तर हा माणुस आमच्या पोस्ट ॲन्ड टेलिफोन सारख्या एकदम  रूक्ष खात्याऐवजी एखाद्या नावाजलेल्या कॉलेजात  मराठीचा  प्रोफेसर  असायला हवा होता! एकदा  त्यांना मी तसे बोललो, तर  ते  किंचित  हसले.म्हणाले " बरोबर आहे ,मला प्रोफेसरच व्हायचे  होते  पण  परिस्थितीच  अशी निर्माण  झाली  की  मिळेल ती नोकरी  करावी लागली ,आणि  एक सांगतो -  या पोस्ट आणि  टेलिग्राफ खात्यात एकदा माणुस  चिकटला  की  तो कायमचा चिकटतो! नंतर आलेल्या चांगल्या  संधीही  नाकारतो "
  मी  त्यावेळी त्यांचे म्हणणे  फार  गंभीरपणे  घेतले नाही, कारण  अशा रूक्ष  खात्यात दुसरी  चांगली नोकरी मिळाली तर कोण कशाला  राहील,काहीतरीच!   मी तरी  जाईलच .पण पाच  दहा वर्षात लक्षात  आले की ते म्हणतात ते  बिल्कुल  खरे  आहे! इथे  पंचाहत्तर  टक्के कर्मचारी असे आहेत की त्याना आयुष्यात वेगळेच काही व्हायचे होते, पण  वाट  चुकून  इथे  ते चिकटले ते  कायमचेच, अगदी  माझ्यासह!
   जोशी साहेब फारच शिस्तीचे असल्याने व त्यांना अभिप्रेत असलेली  शिस्त खात्यात  पुढे  कुणालाच  नको  असल्याने  ऑड मॅन  आऊट न्यायाने  अजुन रिटायर व्हायला  सात आठ वर्षे असतानाच जोशींनी व्ही आर एस घेतली! पुढे ते कधीच  ऑफिसकडे  फिरकले नाहीत!
    ,,,,,,,प्रल्हाद दुधाळ  पुणे .

No comments:

Post a Comment