Friday, March 21, 2014

अहंकार.

                                                       अहंकार. 
            कधीतरी आपण बसने प्रवास करत असतो आपला अत्यंत चांगला मूड असतो.शेजारच्या सीटवरील माणसाशी मस्त गप्पा मारत मजेत प्रवास करू, असा विचार तुम्ही करत असता.तशी गप्पा मारायला सुरुवातही तुम्ही करता पण शेजारचा माणूस तुच्छतेने तुमच्याकडे एक नजर टाकतो व मान वळवून बसतो.त्याच्यात असणाऱ्या अहंकारामुळे तो तुम्हाला बोलण्यायोग्य समजत नाही!
                कधी तुम्ही एखाद्या नातेवाईकाच्या किंवा मित्राच्या घरच्या लग्न समारंभाला जाता अनेक ओळखीची मंडळी आजूबाजूला वावरत असतात,पण प्रत्येकजण आपण कुणीतरी स्पेशल असल्याच्या थाटात वावरत असतो. आपल्याच विश्वात रममाण झालेला असतो.चुकून कोणी बोलला तरी तो स्वत:बद्दलची मीपणाची टेप वाजवायला लागतो.एकूणच ”मी असा आणि मी सा याचा जपच ऐकू यायला लागतो.
                अशा प्रकारे आपल्या दररोजच्या आयुष्यात अनेक अहंकारी व्यक्तींशी आपला संबंध येत असतो तर कधी कधी आपण सुद्धा अहंकार बाळगून समोरच्याशी वागत असतो! काय असतो हा अहंकार? माणसाच्या स्वभावात तो कसा येत असावा? प्रत्येक माणसाच्या स्वभावात अनेक गुणअवगुण असतातच. येथे अहंकार या अवगुणाबद्द्ल मी चर्चा करणार आहे.
    माणसातला सर्वात धोकादायक असलेला अवगुण म्हणजे त्याच्यामधे असणारा अहंकार( इगो) होय! माझ्या मते जन्मानंतर काही दिवसच लहान मूल खऱ्या अर्थाने निरागस असते!तेवढेच मोजके काही दिवस कुठल्याही भाव भावना त्याच्या मनात नसतात,पण थोड्या दिवसातच त्याला आपली जवळची माणसे-जसे की आई, वडील,आज्जी, आजोबा वा इत्तर नातेवाईक ओळखायला येऊ लागतात.आपली जवळची माणसे कोण?अनोळखी कोण? याचा त्याला बोध व्हायला लागतो त्यातही आपल्या माणसांपैकी त्याचे कोण जास्त लाड करतो तेही हळुहळु त्याला समजायला लागते.त्यामुळे नकळतआवडता-नावडता ही भावना त्याच्या मनात रुजली जाते.त्यामुळेच काही ठराविक माणसे समोर दिसली की बाळाची कळी खुलते तर काही व्यक्ती समोर येताच बाळ भोकाड पसरते! हळू हळू त्यातल्या आवडत्या माणसांवर फक्त त्याचा एकट्याचा अधिकार असल्याची भावना किंवा समज त्याला यायला लागते.थोडक्यात मोठेपणी ज्या बऱ्यावाईट सवयी लागू शकतात त्याची सुरुवात नकळत या निरागस वयातच होते.यापुढची पायरी म्हणजे त्याला त्याच्या वस्तु कोणी घेतलेल्या आवडत नाहीत.चुकुन जर त्याच्या माणासांवर, त्याच्या वस्तुंवर कुणाचे अतिक्रमण झाले तर रडून वा गोंधळ घालुन ते आपला निषेध व्यक्त करु लागते. मी म्हणजे कुणीतरी स्पेशल व्यक्ती असल्याची जाणीव त्याला व्हायला लागते त्याच्या  हसण्याला बोबड्या बोलण्याला एवढेच काय प्रत्येक लहान मोठ्या बाललीलांना मिळणारा प्रतिसाद त्याच्या मनावर कुठेतरी नोंदवला जातो. त्याच्या पालकांकडूनही त्याच्या प्रतिक्रियेला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला जातो त्याच्या हट्टाला नकळत खतपाणी मिळते त्याला विशेष महत्व मिळते व हळूहळू तशा प्रतिसादाची त्याला सवय जडते.आपण कुणीतरी विशेष आहोत आणि आपण जसे पाहिजे तसे आजुबाजुच्या माणसाना वागायला भाग पाडू शकतो ही जाणीव या चक्रातली पुढची पायरी असते.ही पायरी म्हणजे माणसामधील अहंगंडाचा मीपणाचा पाया असतो.पुढच्या आयुष्यात हीच व्यक्ती कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी मित्र वा नातेवाईक म्हणून ओळखला जातो या बरोबरच तो उच्च शिक्षण घेउन आपल्या नावासमोर वेगवेगळ्या पदव्या लावायला लागतो,आपल्या शिक्षणाला साजेशी नोकरी त्याला मिळते अथवा एखादा बडा उद्योग तो सुरु करतो.आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर तो सर्व प्रकारचे यश मिळवतो.त्याची स्वत:ची ओळख आता बनायला लागते,बंगला गाडी,नोकर चाकर अशी सर्व प्रकारची सुखे हात जोडून त्याच्या समोर उभी रहातात.सुंदर पत्नी व गोंडस मुळे या वैभवात अजून भर घालतात सत्ता आणि संपती व ऐश्वर्य एकदा मिळाले की त्याबरोबरच या सत्ता व श्रीमंतीचा कैफ त्याला चढायला लागतो.काही खुशमस्करे त्यांचा अहंकार कुरवाळत त्याच्या कडून आपला योग्य तो फायदा करून घेतात. समाजात आपण कुणीतरी विशेष आहोत आपला वेगळाच वट आहे असे तो समजायला लागतो,आपला सामाजिक व आर्थिक स्तर इत्तरांपेक्षा वरचा असल्याची भावना व त्या सोबतची मग्रुरीही स्वभावात व त्याच्या वागण्या बोलण्यात येते.अहंकारी माणूस स्वत:ला विशेष मानत असल्यामुळे तशाच प्रकारची विशेष वागणुक सर्वांकडून त्याला मिळायला हवी अशी नकळत अपेक्षा व पुढच्या टप्प्यात जबरदस्ती आजुबाजुच्या माणसांना तो करायला लागतो. ही विशेष वागणुक म्हणजे त्याला त्याचा हक्क वाटू लागतो! प्रसंगी साम दाम दंड भेद अशी सर्व प्रकारची आयुधे वापरुन हा विशेष दर्जा कायम राखण्याचा प्रयत्न केला जातो.एकदा का ही ग ची बाधा त्याला झाली की असा माणुस नाती-गोती,सखे-सोबती अशा सगळ्यां नात्यांशी फारकत घेतो.आपला अहंकार कुरवाळत बसण्याचे त्याला व्यसनच लागते.हा अहंकाराचा फुगा मग फुगतच रहातो.अशा अहंकारी माणसाचा संबंधच नको असा विचार करून आजुबाजुला वावर असणारी माणसे एक एक करुन त्याच्यापासून तन व मनाने दूर होतात.त्याच्या घमेंडखोर बोलण्याने काही संबंध तर तो स्वत:च तोडतो. या सर्वाचा परिणाम म्हणून मने दुखावलेली अशी अगदी जवळची वा संबंधातली माणसे दुरावतात, पण अहंकारी माणसाला त्याची जाणीव नसते.मित्रमंडळी,नातेवाईक,धंद्यातले भागीदार, हाताखालचे कर्मचारी एवढेच नाही तर कुटूंबातील जवळच्या व्यक्तीसुध्दा अशा माणसाला टाळायला लागतात व एक दिवस असा उगवतो की त्याच्या अहंकाराबरोबर तो फक्त एकटाच असतो.त्याच्या हट्टी,दुराग्रही व अहंकारी स्वभावामुळे तो मानसिक आजाराला बळी पडायला लागतो अशा माणसाने वेळीच आपला अहंकारी स्वभाव स्वत:च बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर त्याचे भयंकर परिणाम त्या माणसाला आयुष्यभर भोगावे लागतात.
                अहंकार कशाचाही असू शकतो.कधी कुणाला विद्वत्तेचा,कुणाला सत्तेचा,कधी संपत्तीचा तर कधी फुकट्च्या बडेजावाचाही अहंकार असु शकतो. अहंकार मग तो कोणत्याही प्रकारचा असो तो वाईटच,नाही का?
तुम्हाला काय वाटते ?
                            ............प्रल्हाद दुधाळ.पुणे.
(९४२३०१२०२०)
                                                

No comments:

Post a Comment