Thursday, May 30, 2013

ताण तणाव.


                                 ताण तणाव.

              आपण हल्ली बऱ्याच लोकांकडून एकतो-

                मी फार टेन्शनमध्ये आहे हो!

                          आधुनिक जीवनशैलीमुळे माणूस अनेकदा ताण तणावाचा बळी होत आहे.त्याला भविष्याची चिंता वाटते ,नोकरीतील आव्हानांची चिंता वाटते, मुलांच्या शिक्षण व करिअर बद्दल तो कायम काळजीत असतो.जे जवळ आहे त्याबद्दल फारसा विचार न करता जे नाही किंवा काही आभासी गोष्टी बद्दल विचार/चिंता करत राहिल्यामुळे ताण तणावाचा सामना त्याला करावा लागत आहे. कायम तणावग्रस्त राहिल्यामुळे अनेक मनोकायिक आजार त्याच्या वर हल्ला करण्यासाठी टपून बसलेले आहेत.

                         तणाव म्हणजे जीवनातल्या येणाऱ्या बऱ्यावाईट प्रसंगांना आपल्या शरीराने दिलेली नैसर्गिक प्रतिक्रिया! तणावग्रस्त माणसाच्या शरीरात तणावामुळे काही बदल होतात आणि त्या व्यक्तीच्या अंगात बळ वाढते ,कधी त्याला भीती वाटू शकते, घाम फुटतो,बेचैनी वाढते,आत्मविश्वास कमी होतो,असुरक्षितता वाटायला लागते.

                         चांगल्या प्रकारच्या ताणामुळे माणसाच्या अंगात अचानक शक्ती वाढते व तणाव ज्या कारणामुळे वाढला आहे त्या कारणापासून दूर होणे शक्य होते .उदा. वाघ समोर आला की एरवी न पळू शकणारा माणुसही जीव वाचविण्यासाठी धूम ठोकतो!.एखादा विद्यार्थी टेन्शन मध्ये जास्त अभ्यास करू शकतो!

                        सध्याच्या काळात टेन्शन वाढायचे मुख्य कारण म्हणजे जीवनातली अनिश्चीतता,वाढलेली हाव व त्यामुळे समोर ठाकलेली वेगवेगळी आव्हाने हे आहे.सतत टेन्शन मध्ये राहिल्याने शरीरावर अनेक घातक परिणाम होऊ शकतात.

           टेन्शनमध्ये माणसात खालीलपैकी लक्षणे दिसू शकतात.

          १.जास्त भूक लागणे.

          २.जास्त झोप येणे .

          ३.खूप राग येणे व रागाच्या भरात  पुढचा मागचा विचार न करता वागणे.

          ४.आजूबाजूच्या व्यक्ती व परिस्थिती ची पर्वा न करणे .

          ५.पैशासाठी वेडापिसा होणे.

          ६.जास्त प्रमाणात व्यसने /शिगार/दारू पिणे.

          ७.जास्त प्रमाणात औषधे घेणे.

          ८.संथ व निष्क्रिय होणे.

                 असे वागल्याने  बरे वाटते हा समज आपला आपणच करून घेतला जातो  व आपण जे करतोय तेच बरोबर असे वाटायला लागते .

         ताण-तणाव किंवा टेन्शन मधील त्रासामधून सुटका होण्यासाठी काही सोपे उपाय आपण करू शकतो –

         मोकळ्या हवेतील भरपूर प्राणवायू शरीरात घेणे .

         आवडते संगीत/गाणी ऐकणे

         विनोदी पुस्तके वाचणे /भरपूर हसणे.

         शरीराचा हलका मसाज करणे .

         आवडत्या व्यक्तीच्या सहवासात रहाणे त्याच्याशी सुसंवाद साधणे.प्रसन्न रहाण्याचा प्रयत्न करणे.

         आवडता सेंट लावणे. मंद सुगंधात मन प्रसन्न करण्याची जबरदस्त शक्ती आहे.

         निसर्गाच्या सानिध्यात रहाणे. फळे फुले हिरवी राने यांच्या सहवासात मोकळा श्वास घेणे.

                निसर्गाच्या सानिध्यात  राहिल्याने माणूस सारासार विचार करायला लागतो आपले वास्तव स्वीकारायला शिकतो.सुख काय आहे? दुखः काय आहे? यावर डोळसपणे विचार करू लागतो. आत्मचिंतन व आवडत्या व्यक्तीशी केलेला मुक्त संवाद त्याला चिंतामुक्त व टेन्शन पासून दूर ठेऊ शकतो.दैनंदिन आयुष्यातील आव्हानांना दोन हात करायला नव्याने शिकवतो.पुन्हा नव्या जोमाने जगण्याच्या लढाईला सज्ज होतो!.

                                        ...........प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, May 22, 2013

व्यसनाधीन.


                                   व्यसनाधीन.

                    अनेक प्रकारच्या व्यसनांनी आजच्या माणसाचे आयुष्य भरून गेले आहे. आजकाल रस्त्याने जाताना      अनेक व्यसनांच्या आहारी गेलेली माणसे अवती भवती बघायला मिळतात.कोणी बडबड करत असतात, कुणी शून्यात नजर लाऊन धुराची वर्तुळे सोडत असतात,कोणी रस्त्यात पचापच थुंकत असतात तर काहीजण धक्के खात व धक्के देत फिरत असतात! मला तर अशी माणसे बघायचे व्यसनच लागले आहे! आहे की नाही गम्मत! व्यसनांवर एक व्यसनीच लिहितोय! आजकाल तर कानात हंड्स फ्री घालून हातवारे करत बडबड करणारेही वाढले आहेत!

   व्यसने अनेक प्रकारची असू शकतात. काही व्यसने शारीरिक आरोग्याला अपायकारक आहेत असे जाणकार म्हणतात तर काही व्यसने माणसाचे मानसिक आरोग्य सूद्धा धोक्यात  आणू शकतात.

या व्यसनांचे दुष्परिणाम सर्वांना माहीत असतात पण अंगवळणी पडलेल्या या सवयी ‘कळते पण वळत नाही!’ या सदराखाली सुटत नाहीत.

  पहिल्या प्रकारातील व्यसनामध्ये प्रामुख्याने नावे येतात ती  दारू, गांजा, चरस, गुटका, पान,तंबाखू ,

शिगार, बिडी ,ब्राऊन शुगर किंवा तत्सम इत्तर अमली पदार्थ यांचे सेवन .या प्रकारच्या व्यसनांवर आत्तापर्यंत अनेकजणांनी बोलून झाले आहे अनेक नामवंत संस्थ्या व प्रसिद्ध व्यक्ती अशा प्रकारच्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या माणसांच्या व्यसनमुक्तीवर काम करत आहेत आणि भविष्यात करत राहणार आहेत.

  इथे  मी लिहिणार आहे ते दुसऱ्या प्रकारच्या व्यसनांवर किंवा सवयींवर! या प्रकारच्या सवयींचा माणसाच्या एकंदर आयुष्यावर दृष्य/अदृश्य स्वरूपात लगेच किंवा काही काळानंतर परिणाम होतो.अशी काही व्यसने माणसाला लागली आहेत त्यापैकी काही –

   आधुनिक जीवनशैली चा भाग व सुरुवातीला गरज म्हणून माणसाच्या जीवनात आलेल्या मोबाईल फोन ने  अनेक व्यकीना आज गुलाम केले आहे. कानाला सतत मोबाईल लावलेल्या माणसांच्या झुंडी च्या झुंडी  आज रस्त्यावर पहायला मिळतात.मोबाईल वर बोलताना आजूबाजूला काय चालू आहे यांचे भान नसलेले अनेकजण पाहिल्यावर नक्की त्यांचे काय होणार याची चिंता पडते. दुचाकीस्वार बेफाम वेगात गाडी चालवत असतो त्याचा एक हात बाईक च्या हंड्ल वर असतो तर दुसरा मोबाईल वर असतो .बोलण्यात तो इतका रंगलेला असतो की रस्त्यावर असलेल्या इत्तरांचा आणि अर्थात स्वत:चाही जीव धोक्यात घालत असतो. मला आजपर्यंत न कळालेलं कोड आहे की आपला जीव पणाला लाऊन एवढ महत्वाच हे लोक काय बोलत असतात? लक्षात घ्या जीव असेल तर बाकी सर्व गोष्टींना अर्थ आहे.जी गोष्ट द्चाकीस्वारांची तीच चारचाकी चालावणारांची आहे.

    माणसाने आपले काम सुलभ व्हावे म्हणून अनेक शोध लावले त्यातीलच एक म्हणजे संगणक होय ! अनेक अवघड कामे संगणकामुळे चुटकीसरशी होऊ लागली .इन्टरनेट ने माणसाच्या जीवनात क्रांती झाली. इन्टरनेट वरील साईट वर नको ते पाहण्याचे व्यसन अनेक लोकांना जडले! हव्या असलेल्या सर्व प्रकारच्या  माहिती बरोबरीने नको त्या माहितीचे भांडार ही सर्व वयोगटातील स्री पुरूषांना उपलब्ध झाले! सोशल नेटवर्क साईट्स चे चाहते वाढले त्यातूनच एका नव्या व्यसनाची माणसाला बाधा झाली आणि अक्षरश: पिढी च्या पिढी त्याची गुलाम झाली  जे ज्या वयात पाहू नये ते नजरेच्या टप्प्यात आले! त्यातूनच अनेक मनोकायिक विकार माणसाला जडू लागले! सतत तणावाखाली राहिल्यामुळे मानसिक तसेच शारीरिक व्याधी जडू लागल्या.

अकाली वृद्धत्व येऊ लागले. व्यसनाने आपले काम करायला सुरुवात केली आहे!

    अन्न वस्र निवारा याबरोबरच माणसाला मनोरंजनाची गरज भासू लागली .दैनंदिन कामामधून सवड काढून तो नाटक सिनेमा पहात असे .विरंगुळा म्हणून रेडीओ वरील संगीत, टी.व्ही. वरील काही कार्यक्रम यातून घरातच मनोरंजनाची भूक भागू लागली. जोपर्यन्त मर्यादित स्वरूपात वाहिन्या होत्या तोपर्यंत ठीक होते पण च्यानेल वाढले आणि स्पर्धा आणि टी.आर.पी.च्या नादात टी. व्ही.वर सिरीयल्स चा रतीब घातला जाऊ लागला.चानेल्स वर कौटुंबिक कलह दाखवले जाऊ लागले. निर्माते आपला गल्ला भरण्यासाठी विवाह बाह्य संबंधावर मालिका बनऊ लागले. टी व्ही चे जग हेच वास्तव जग आहे असे लोक समजू लागले .एखाद्या मालिकेतला एखादा भाग चुकविणे म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न वाटू लागला.दैनंदिन आयुष्यातले प्रश्न विसरून माणूस आभासी मालिकेत रमू लागला. कुटुंबातला संवाद हरवायला लागला. मालिका बघण्याचे एक नवीन व्यसन संपूर्ण कुटुंब संस्थेला हादरे देऊ लागले आहे. टी व्ही मालिकांमुळे लोकाना जेवायला वेळ मिळेनासा झाला आहे. काही लोक जेवताना ते व्ही पहातात आपण काय खात आहोत यावरही लक्ष नसते.अशा व्यसनी कुटुंबाकडे जर मालिकेच्या वेळात पाहुणे आले तर मालिका पाहण्याच्या नादात पाहुण्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते त्यातूनच अनेक जीवाभावाचे संबंध दुरावताना दिसत आहेत. सोशल नेट्वर्किंग वर हजारो मित्र जोडणारया माणसाकडे प्रत्यक्ष भेटायला आलेल्या मित्राशी बोलायला वेळ या मालिकांमुळे मिळत नाही हे वास्तव आहे. मालिका पहाण्याचे हे व्यसन माणसातल्या माणुसकीला संपवायला निघाले आहे!

       ही आधुनिक व्यसने पारंपारिक व्यसना एवढीच धोकादायक आहेत !

       तुम्हाला काय वाटते ?

                                     ......... प्रल्हाद दुधाळ .पुणे

                                     www.dudhalpralhad.blogspot.com