Thursday, May 30, 2013

ताण तणाव.


                                 ताण तणाव.

              आपण हल्ली बऱ्याच लोकांकडून एकतो-

                मी फार टेन्शनमध्ये आहे हो!

                          आधुनिक जीवनशैलीमुळे माणूस अनेकदा ताण तणावाचा बळी होत आहे.त्याला भविष्याची चिंता वाटते ,नोकरीतील आव्हानांची चिंता वाटते, मुलांच्या शिक्षण व करिअर बद्दल तो कायम काळजीत असतो.जे जवळ आहे त्याबद्दल फारसा विचार न करता जे नाही किंवा काही आभासी गोष्टी बद्दल विचार/चिंता करत राहिल्यामुळे ताण तणावाचा सामना त्याला करावा लागत आहे. कायम तणावग्रस्त राहिल्यामुळे अनेक मनोकायिक आजार त्याच्या वर हल्ला करण्यासाठी टपून बसलेले आहेत.

                         तणाव म्हणजे जीवनातल्या येणाऱ्या बऱ्यावाईट प्रसंगांना आपल्या शरीराने दिलेली नैसर्गिक प्रतिक्रिया! तणावग्रस्त माणसाच्या शरीरात तणावामुळे काही बदल होतात आणि त्या व्यक्तीच्या अंगात बळ वाढते ,कधी त्याला भीती वाटू शकते, घाम फुटतो,बेचैनी वाढते,आत्मविश्वास कमी होतो,असुरक्षितता वाटायला लागते.

                         चांगल्या प्रकारच्या ताणामुळे माणसाच्या अंगात अचानक शक्ती वाढते व तणाव ज्या कारणामुळे वाढला आहे त्या कारणापासून दूर होणे शक्य होते .उदा. वाघ समोर आला की एरवी न पळू शकणारा माणुसही जीव वाचविण्यासाठी धूम ठोकतो!.एखादा विद्यार्थी टेन्शन मध्ये जास्त अभ्यास करू शकतो!

                        सध्याच्या काळात टेन्शन वाढायचे मुख्य कारण म्हणजे जीवनातली अनिश्चीतता,वाढलेली हाव व त्यामुळे समोर ठाकलेली वेगवेगळी आव्हाने हे आहे.सतत टेन्शन मध्ये राहिल्याने शरीरावर अनेक घातक परिणाम होऊ शकतात.

           टेन्शनमध्ये माणसात खालीलपैकी लक्षणे दिसू शकतात.

          १.जास्त भूक लागणे.

          २.जास्त झोप येणे .

          ३.खूप राग येणे व रागाच्या भरात  पुढचा मागचा विचार न करता वागणे.

          ४.आजूबाजूच्या व्यक्ती व परिस्थिती ची पर्वा न करणे .

          ५.पैशासाठी वेडापिसा होणे.

          ६.जास्त प्रमाणात व्यसने /शिगार/दारू पिणे.

          ७.जास्त प्रमाणात औषधे घेणे.

          ८.संथ व निष्क्रिय होणे.

                 असे वागल्याने  बरे वाटते हा समज आपला आपणच करून घेतला जातो  व आपण जे करतोय तेच बरोबर असे वाटायला लागते .

         ताण-तणाव किंवा टेन्शन मधील त्रासामधून सुटका होण्यासाठी काही सोपे उपाय आपण करू शकतो –

         मोकळ्या हवेतील भरपूर प्राणवायू शरीरात घेणे .

         आवडते संगीत/गाणी ऐकणे

         विनोदी पुस्तके वाचणे /भरपूर हसणे.

         शरीराचा हलका मसाज करणे .

         आवडत्या व्यक्तीच्या सहवासात रहाणे त्याच्याशी सुसंवाद साधणे.प्रसन्न रहाण्याचा प्रयत्न करणे.

         आवडता सेंट लावणे. मंद सुगंधात मन प्रसन्न करण्याची जबरदस्त शक्ती आहे.

         निसर्गाच्या सानिध्यात रहाणे. फळे फुले हिरवी राने यांच्या सहवासात मोकळा श्वास घेणे.

                निसर्गाच्या सानिध्यात  राहिल्याने माणूस सारासार विचार करायला लागतो आपले वास्तव स्वीकारायला शिकतो.सुख काय आहे? दुखः काय आहे? यावर डोळसपणे विचार करू लागतो. आत्मचिंतन व आवडत्या व्यक्तीशी केलेला मुक्त संवाद त्याला चिंतामुक्त व टेन्शन पासून दूर ठेऊ शकतो.दैनंदिन आयुष्यातील आव्हानांना दोन हात करायला नव्याने शिकवतो.पुन्हा नव्या जोमाने जगण्याच्या लढाईला सज्ज होतो!.

                                        ...........प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment